Login

जन्म बाईचा भाग ३० अंतिम

कथा मालतीच्या जीवनाची शेवट
जन्म बाईचा भाग ३० (अंतिम)

'किशोर प्रेमात पडला की काय? तसं असतं तर त्याने ते देखील मला सांगितले असते. आजी नातू काय लपवत आहे हे मला कळणारच.'

श्रीकांत आणि मालतीच्या लग्नाचा वाढदिवस होता. किशोरने तर त्याच्या आई बाबांसाठी सुट्टी काढली होती.


"हॅपी ऍनिव्हर्सरी आई बाबा." किशोरने श्रीकांत आणि मालतीला शुभेच्छा दिल्या.


"तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." सुमन म्हणाली.

मालती आणि श्रीकांत दोघेही सुमनच्या पाया पडले.

मालती खूप भावनिक झाली होती. हा लग्नाचा वाढदिवस तिच्यासाठी खास होता, कारण सुमनने आज पहिल्यांदाच शुभेच्छा दिल्या होत्या, त्यादेखील मनापासून.


"आई - बाबा आज जेवायला बाहेर जाऊया." किशोर.


"किशोर, आत्याबाईंना बाहेरच जमत नाही." मालती.

"मालती, त्याची काळजी करू नको. माझ्यासाठी घरातूनच चपाती भाजी घेऊन जाऊया. लग्नाचा वाढदिवस वर्षातून एकदाच येतो. साजरा तर करायला हवा." सुमन.


"अरे वा! आई ही भारी आयडिया आहे." श्रीकांत म्हणाला.


"श्रीकांत आणि मालती तुम्ही दोघे मंदिरात जाऊन पाया पडून या." सुमन.


"हो आई." श्रीकांत.


मालतीने छान लाल रंगाची साडी नेसली.
केस बांधत होती तितक्यात सुमन आली.

मोगऱ्याचा गजरा घेऊन.

तो गजरा पाहून लक्ष्मी आजीची खूप आठवण आली. त्या आणि नारायण आजोबा केव्हाच देवाघरी गेले होते.
हो आणि तिची खास मैत्रीण प्रिया ती देखील दुसरीकडे शिफ्ट झाली होती.


"आत्याबाई, हा गजरा कुठे मिळाला?"

"अगं सकाळी फिरायला खाली गेले होते. समोर मोगऱ्याची झाडं आहेत तेथूनच वेचली फुलं, जमेल तसा गजरा बनवला आहे."


व्यक्ती निघून जाते आणि त्यांच्या अनेक आठवणी कायम सोबत करतात. लक्ष्मी आजींची सोबतही अशीच राहीली होती.

"थँक यु आत्याबाई."


'लक्ष्मी आजी तुमची खूप आठवण येते. तुमच्या मायेचा हात, तुमचं मार्गदर्शन होतं त्यामुळे माझं आयुष्य बदललं. तुमच्याकडून खूप मौल्यवान गोष्ट शिकले.'


तितक्यात मालतीला आईचा फोन आला.


"हॅलो आई."

"मालती, तुला आणि जावई बापूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." कांता.

"धन्यवाद आई." मालती.

स्क्रीनवर कमलचा नंबर दिसत होता.

"आई, कमल कॉल करतेय."

"बरं बोलून घे. ठेवते फोन."

"ताई, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." कमल

"थँक यु कमल."

"काय मग ताई, आज काय स्पेशल?"

"आता आम्ही मंदिरात चाललो आहे, त्यानंतर बाहेर जेवायचा प्लॅन आहे."

"छान छान. बरं माझा भाचा कसा आहे.?"

"एकदम छान."

"ताई, सासूबाईची तब्येत आता बरी आहे ना?"

"हो आता व्यवस्थित आहे."

शर्मिलाचा फोन येत होता.

आज फोनवर शुभेच्छाचा वर्षाव होत होता.

"कमल, शर्मिला ताईंचा फोन आहे."

"बरं ठीक आहे. बोलून घे. आपण नंतर बोलू."

"हॅलो वहिनी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

"थँक यु ताई. शुभम कसा आहे?"

"शुभम खूप मस्त आहे. चांगल्या कंपनीत कामाला लागला आहे."

"वा! छान."

तितक्यात श्रीकांतने मालतीला आवाज दिला.

"मालती."

"ताई, हे बोलवत आहे. मी नंतर फोन करते."

श्रीकांत हॉलमध्ये येरझऱ्या मारत होता.

विमलचा देखील फोन आला.
थोडं बोलली आणि फोन ठेवून दिला.

अजून मालतीचे केस बांधायचे होते.

ती बाहेर आली. तिला तसं पाहून श्रीकांत म्हणाला,
"मालती, अजून तयार झाली नाही?"

"अहो सर्वांचे फोन येत होते."

"श्रीकांत, तुला काय तयारी करायची असते. बायकांना तयारी करायला वेळ लागतोच. मालती, जा तू निवांत तयार हो बरं."
सुमन म्हणाली.

सुमनचं आजचं वाक्य आणि शर्मिलाच्या लग्नादिवशीचं वाक्य ह्यात खूप फरक होता.

"काय हा अवतार? जा तयार हो." जसच्या तसं वाक्य तिला आठवलं.

तेव्हा तर तिला रडायलाच आलं होतं.

आज मात्र कितीतरी वर्षाचं ओझं हलकं झाल्यासारखे झाले होते.

मारलेल्याच्या जखमा जातात, कटू बोलल्याच्या नाही. शर्मिलाचं लग्न होऊन किती वर्षे झाले होते, तरी जसच्या तसं मालतीला आठवलं.
पावलोपावली होणारा अपमान गिळत आली होती. आज मात्र सुमनच्या गोड बोलण्याने मन सुखावलं.

ती केस बांधायला आत गेली.

श्रीकांतही आला.

"मालती, काय जादू केली आहेस बरं?"

"मी काय जादू केली?"

"आई, आता मलाच गप्प करतेय. सुनबाई बद्दल एकही शब्द ऐकून घेत नाहीये."

मालती मिश्किल हसली.

"बायको, तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा." त्याने तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा घातला.

"काय हे. आपला मुलगा आता लग्नाला आला. हे शोभतं का तुम्हाला?"

"मुलं लग्नाच्या वयाची झाली की, नवऱ्याने बायकोवर प्रेम करायचं नाही असं कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे का?"

तो तिला जवळ घेत म्हणाला.

"सोडा मला." तिच्या गालावर लाजेची लाली चढली होती.

श्रीकांत मात्र ऐकत नव्हता.

"तुम्ही ऐकणार आहात की नाही?"

"अजिबात नाही."

"मी आत्याबाईना आवाज देईन."

"दे." त्याला वाटलं ती अशीच खोटं खोटं बोलतेय.

"आत्याबाई." ती मोठयाने म्हणाली.

तसं तो लगेच बाजूला झाला. त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला.

"मालती, काय झालं?" सुमन आली.

"ते माझा गजरा नीट बसला आहे का बघा ना."
मालती मिश्किल हसत श्रीकांतकडे पाहत होती.

"तुला मी नंतर बघतो." तो हळूच म्हणाला आणि निघून गेला.

सुमनने तिचा गजरा नीट केला.

"आत्याबाई, तुम्हीही चला ना मंदिरात."

"नको गं. मी आराम करते. मी आणि किशोर आहोत घरी. तुम्ही दोघेही जाऊन या."

"बरं ठीक आहे."

सुमनचा फोन वाजला.
निलेशचा फोन येत होता.

मालतीने ते पाहिले.

सुमन त्याचा फोन घेत नव्हती.

दुसऱ्यांदा पुन्हा फोन आला.

"आई, निलेश भाऊजींचा फोन येतोय."

"माहितीये मला." ती नाराजीच्या सुरात म्हणाली.

"त्यांच्याशी एकदातरी बोला."

"माझी ईच्छा नाही."

"आत्याबाई, असं लहान मुलीगत नका वागू. झाली त्यांच्याकडून चूक. मग त्यांच्याशी बोलणारच नाही का? तुमचा मुलगा आहे. असं नका करू."

"त्याला आली का माझी आठवण? मी किती आजारी होते. मला भेटायला आला नाही. काय कमी केलं मी त्याच्यासाठी आणि नयनसाठी? हे असं वागले ते."


"मान्य आहे; पण काहीही झालं तरी तो तुमचा मुलगा आहे आणि त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे म्हणून तर ते सतत फोन करत आहेत. आत्याबाई, त्यांना तरी जवळचं कोण आहे. तुम्ही आई आहात. असं नका वागू. एक संधी द्या. मनात जर हे सगळं ठेवलं तर नातं विखुरलं जाईन. निलेश भाऊजी देखील आपल्याच परिवाराचा हिस्सा आहे. असं तुटकपणे नका वागू. प्लिज माझं ऐका."

तिने फोन उचलला.

"आई, सॉरी खरंच माझी चूक झाली. मला माफ कर." निलेश रडवेला होऊन बोलत होता.

मुलाचा असा आवाज ऐकून ती माय देखील हळवी झाली. सारा राग एका क्षणात नाहीसा झाला.

"गप्प बस बरं. रडू नको." सुमनचे देखील डोळे पाणावले.

थोडं फार बोलणं झालं. सुमनने फोन ठेवला.

"बघा एका संवादात किती ताकद आहे. मनातील सारं दुःख, आक्रोश बाहेर पडला की नाही."

"हो गं मालती, निलेशचा आवाज ऐकून मन भरून आलं." ती डोळे पुसत म्हणाली.

"मन भरून येणारच, आईचं काळीज आहे."

"बरं चल जा तू."
मालती श्रीकांत गेले.

किशोर आणि सुमन दोघे मिळुन घर सजवू लागले.

सुमन, किशोरला मदत करत होती.

झेंडूच्या फुलांच्या माळा, फुगे असं बरंच काही वापरून हॉल सुंदर सजवला होता.

मालती आणि श्रीकांतच्या लग्नातला फोटो लावला होता.


ते दोघे कधी येतात ह्याचीच वाट सुमन आणि किशोर बघत होते.

बेल वाजली. मालती आणि श्रीकांत आले. किशोरने एका ताटात कुंकूवाचं पाणी केलं होतं.

मालतीला त्यात पाय ठेवायला लावला आणि रूमालावर पायाचे ठसे घेतले.


हॉलचा कायापालट झाला होता.

दोघेही खुश झाले.

"किशोर, असं वाटतंय मी पहिल्यांदाच घरी पाऊल ठेवतेय."

"आई, मला हा दिवस खूप स्पेशल बनवायचा आहे हो आणि अजीनेही खूप मदत केली."

"आत्याबाई, आता कुठे तुम्हाला बरं वाटतंय. किती त्रास करून घेताय?"

"काही त्रास नाही."


सुमनने किशोरला डोळ्यानेच ईशारा केला.

मालतीने पाहिले.

किशोरने बेडरूममध्ये जाऊन एक कॅरी बॅग आणली.

"आई बाबा हे गिफ्ट आजीकडून आहे."


त्यात श्रीकांत आणि मालतीसाठी कपडे होते.

श्रीकांतने बॉक्स उघडला तर त्यात छान असा लाल रंगाचा कुर्ता होता. तो कुर्ता पाहून श्रीकांत खुश झाला.

मालतीने बॉक्स उघडला पाहते तर त्यात मोरपंखी रंगाची सुंदर पैठणी होती.

"मालती, आवडली का पैठणी." सुमनने विचारले.

"खूप आवडली." तिने पैठणीवर अलगद हात फिरवला.

"चल नेसून दाखव पैठणी हो आणि ही नथही घेतली आहे. हो आणि श्रीकांतच्या वडिलांनी जे तुला सोन्याचे दागिने केले आहेत तेच घालून ये हं" सुमनने तिच्या हातात नथ दिली.


"पण ह्या रंगाचा ब्लाउज..."

"आम्हाला माहीत आहे आम्ही ह्या साडीवर ब्लाऊज शिवून घेतला."

"म्हणजे त्यादिवशी किशोर आणि तुम्ही कपाटात माझ्या मापाचा ब्लाउज शोधत होता?"

"हो आई." किशोर म्हणाला.

"आणि मी काय काय विचार करत बसली होती."

मालती, पैठणी नेसून आली.

साक्षात लक्ष्मी दिसत होती. चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. सुमनने तिची नजर काढली.

"गोड दिसतेय मालती."

श्रीकांत देखील कुर्ता घालून आला.
तो देखील मालतीला पाहतच बसला.

"बाबा, आईला निवांतपणे बघा आधी एक फोटो काढुया." किशोर हसत म्हणाला.

"लबाड." सुमन म्हणाली.


भिंतीवर श्रीपंतरावांचा फोटो होता, सुमन बरोबर तिथेच खुर्चीवर बसली होती.
तिच्या खांद्यावर हात ठेवून किशोर उभा होता.
मालती आणि श्रीकांत सुमनच्या बाजूला बसले होते. पाखराने पिल्लांना पंखाखाली घ्यावं अगदी तसंच सुमनने मालती आणि श्रीकांत दोघांच्या खांद्यावर हात ठेवला होता.

एक सुंदर फोटो कायमचा कैद झाला आणि तितक्यात श्रीपंतरावांच्या फोटोवरचा हार खाली पडला.

असं वाटत होतं जणू काही ते त्यांच्या परिवाराला आशीर्वाद देत आहेत.

आज मालतीचं कुटूंब पूर्ण झालं होतं.
समाप्त.
अश्विनी ओगले.

वाचकहो मालतीच्या जीवनाचे साक्षीदार तुम्ही बनला. प्रत्येक भाग मन लावून वाचला. त्यासाठी खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद. कथेला भरभरून प्रेम दिलं.

कथेचं शीर्षक होतं जन्म बाईचा.
स्त्रीच्या आयुष्यातील काही प्रसंग रेखाटण्याचा प्रयत्न केला. खरंतर स्त्रीविषयी कितीही लिहिलं तरी कमीच आहे. प्रत्येक स्त्रीची एक वेगळीच कहाणी असते.

मालतीचीही कहाणी होती.


लग्न, सासुरवास, श्रीपंतरावांची साथ, आई होण्यासाठी धडपड, नवऱ्याची सोबत, कलह, एकत्र कुटूंबात तिने काढलेला त्रास, शेवटपर्यंत आईच्या संस्काराची जपलेली शिदोरी आणि शेवटी का होईना पण मालतीची सुमनने पारख केली.

कथेतील सर्वच पात्र मला जिवंत वाटू लागले होते. तब्बल एक महिन्याचा प्रवास आणि तुम्हा सर्व वाचकांची साथ ह्यामुळेच ही कथा लिहू शकले. तुमच्या कंमेंट वाचून लिखाणाचा उत्साह द्विगुणित होत होता.

कथामालिका लिहिताना सर्वात जास्त त्रास होतो तो शेवटचा भाग लिहिताना, कारण ती फक्त कथा नसते. आयुष्याचा भाग बनते. जिथे सुरवात आहे तिथे शेवट हा आहेच. बरोबर ना?
चला तर मग वेळ आली आहे निरोप घेण्याची.
जाता जाता तुम्हा सर्व वाचकांचे मनापासून आभार हो आणि कथेचा शेवटचा भाग कसा वाटला जरूर सांगा. तुमच्या कंमेंट नेहमीच लिखाणाला बळ देण्याचे काम करतात. लवकरच भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.
©®अश्विनी ओगले.