Login

महात्मा ज्योतिबा फुले यांची मराठीतून माहिती Jyotiba Phule Information In Marathi

Jyotiba Phule Information In Marathi
ज्योतिबा फुले यांची मराठीतून माहिती

विद्या हे धन आहे रे
श्रेष्ठ साऱ्या धना हुन
तिचा साठा जयापाशी
ज्ञानी तो मानती जन

म.फुले

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात.

महात्मा ज्योतिराव फुले एक भारतीय समाज सुधारक, समाज प्रबोधक, विचारवंत, समाजसेवक, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते होते.

वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या शोषण व्यवस्था असून जोपर्यंत या पूर्णपणे नामशेष होत नाही तोवर एका सुदृढ आणि निरोगी समाजाची निर्मिती असंभव आहे, अशी आपली रोखठोक भूमिका महात्मा फुलेंची होती, म्हणूनच जाती व्यवस्था निर्मूलनाची कल्पना आणि आंदोलनाचे ते प्रणेते ठरले.

भारताचे ज्योतिबा हे पहिले असे समाज सुधारक आहे ज्यांनी महिला शिक्षण ही योजना सगळ्यांसमोर आणली. महिलांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे तसेच त्यांना देखील त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. महिलांना देखील स्वातंत्र्य मिळावं म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी नेहमीच अपार कष्ट घेतले. बालविवाह प्रथा बंद करून, जातीभेद नष्ट करून, महात्मा फुले यांनी महिलांसाठी विद्यालय स्थापन केले.


महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत

विद्याविना मती गेली |
मतीविना नीती गेली |
नितीविना गती गेली |
गतीविना वित्त गेले |
वित्तविना शूद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती. मेजर कॅन्डी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले

तीन ऑगस्ट 1848 मध्ये महात्मा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. पहिल्या दिवशी या शाळेत आठ मुली उपस्थित होत्या. मुलींच्या शाळेत शिकवण्याकरिता ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनवले. त्यांच्या या कार्याला समाजातून प्रखर विरोध झाला त्यामुळे त्यांना घर सोडून पुण्यातील गंजपेठ येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात काही काळ मुक्काम करावा लागला. चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा तर रास्ता पेठ येथे मुलींची तिसरी शाळा त्यांनी सुरू केली. 1852 मध्ये महात्मा फुले यांनी पूना लायब्ररीची स्थापना केली. 1852 मध्येच वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक तिथे अध्यापनासाठी होते. सदाशिवराव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी फुल्यांना मोलाची मदत केली.

1882 साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशन समोर फुलेंनी साक्ष देऊन बारा वर्षाखालील मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शाळेतील शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनात उपयोगी पडेल असे व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य असावे, शेतीचे व तांत्रिक शिक्षण दिले जावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्यात यावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागवणाऱ्या असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या.

ज्योतिराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेश पर भाषणे करीत, तसेच ते शाळेतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन, शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने आणि उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांना उत्तेजनही देत असत.

"प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहोचू शकतात ज्यांचे निर्धार थांब असतात, त्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते." ज्योतिबांचे हे प्रखर विचार प्रत्येकाला ध्येयाकडे जाण्यास उद्युक्त करतात.

मानवी हक्कांवर इ.स. 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक फुले यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबद्दल त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुला मुलींच्या शिक्षणावर त्यांनी भर देण्याचे ठरवले.

गरीब आणि दुर्बल यांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचविणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. "सर्व साक्षी जगत्पती | त्याला नकोच मध्यस्ती ||" हे या समाजाचे घोषवाक्य होते. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाणग्रंथ मानला जातो.

ज्योतिराव फुले यांनी आपली वैचारिक भूमिका सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाद्वारे मांडली आहे त्यातील काही महत्त्वाची वचने.

१).सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणताही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता या भूखंडावर आपले कुटुंब समजून एकमताने सत्य वर्तन करून राहावे.

२).आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्य जन्मत:च स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपपसात साऱ्या हक्काचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे.

३). स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदास, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढी जात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानत नाही, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानित नाहीत, त्यास सत्य वर्तन करणारे म्हणावे.

महात्मा फुले यांचे समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र हे लोकशाहीचे मुख्य आधारस्तंभ मानले जाते. त्यावेळी वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्राचा उपयोग उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करायचे. या काळात महात्मा फुले यांनी त्यावेळच्या पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता कशी असावी याविषयीचे मापदंड देखील त्यांनी घालून दिले. एक मुलगा मी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाण देखील केले. त्यांच्या 'शेतकऱ्यांचा आसूड', 'गुलामगिरी' या ग्रंथातून त्यावेळच्या सामाजिक स्थितीचे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे.

'शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दूर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता त्यांनी विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिरावांचे दर्शन होते.

त्यांच्या लिखाणात त्यावेळच्या निद्रिस्त, उपेक्षित समाजाला जागे करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे.

त्यांची समाजसेवा पाहून 1888 मध्ये मुंबईत एका विशाल सभेत त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.