Login

का रे दुरावा भाग ३

Lovestory
त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी झालेल्या त्या घटनेनंतर गंधार परत तिच्याजवळ कधीच गेला नाही. दुसऱ्यादिवशी काहीच घडले नाही असं तो तिच्याशी वागत होता.   त्याने तिला कधी अपराधी वाटू दिले नाही.   तिच्या भावंडांच्या  शिक्षणाचा खर्च त्याने उचलला.  तिच्या आईलाही नोकरीं सोडायला लावली.   इतकेच नाही.... पंचवीस लाखांचे फिक्स डीपोसिट त्याने तिच्या आईच्या नावाने बँकेत ठेवले. त्यावर येणाऱ्या व्याजाने त्यांचा घरखर्चही सहज निघत होता.   त्याने आयुष्यभर जमा केलेली कमाई तिच्या प्रेमाखातर पणाला लावली.  एकदा अरुंधती आजारी होती.  तेंव्हा अगदी फुलासारखे जपले त्याने... तिला वाटायचे देवाने याला कुठच्या मातीने बनवलय. हळुहळू तिचा त्याच्यावर जीव जडू लागला.  सहा महिने झाले होते त्यांच्या लग्नाला.   आता तीपण त्याला हवे नको ते पाहू लागली त्याच्या आवडी जपू लागली. त्याला आपल्या भावना कशा सांगायच्या याचा विचार करू लागली.

पण एक दिवस अचानक तो कोर्टात गेला तो परत घरी आलाच नाही.... ड्रेसिंग टेबलवर त्याने डिवोर्स पेपर सही करून ठेवले होते ... आणि घर, गाडी सर्वच तिच्या नावे ठेवले.... तो सोडून गेल्यामुळे तिची अवस्था खूप वाईट झाली होती.... ती स्वतःला दोष देऊ लागली... तिने त्याला खूप शोधले... त्याच्या मित्रांना सांगून ठेवले... शेवटी त्याच्या एका मित्रानेच तिला इथला पत्ता सांगितला.

"सायेब किती चांगले हायेत.... तुमी लई दुखावलेत त्यांना.......... पण काळजी करू नका.... समदं ठीक होईल." अरुंधतीच्या तोंडून सगळी हकीकत ऐकून रखमा म्हणाली.


दुसऱ्यादिवशी दुपारी
वकिलांसारखा काळा कोट घालून गंधारबरोबर एक सुंदर स्त्री येताना अरुंधतीने पाहिली.

त्यानंतर ती सतत दोन तीन दिवस त्याच्याबरोबरच यायची.  अरुंधतीच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. कोण असेल ती?   गंधारबरोबर रोज रोज का येते ती?  गंधार तिच्याबरोबर इतका खूश का दिसतो?
तिने रखमाला माहिती काढायला सांगितली.

"बाईं.... गावात पण तीच चर्चा आहे.... कोणी म्हणतं सायबांचे  झेंगाट आहे कोण बोलत सायबांची असटेंट हाय."

"असिस्टंट....

"हा... तेच"

"पण झेंगाट म्हणजे..."

बाईं लफड्याला हिथं झेंगाट बोलत्यात...
अरुंधतीच्या मनात कालवाकालव झाली....

"नाही... तसे... नाहीत ते.."

"बाईं.... तुमीच सांगितलंत ना... तुमच्या अंगास तुम्ही हात बी लावायला दिला नाही त्यांना....... पुरुष हाय त्यो..... कितीवेळ असा सडा राहणार....... बरं बाईं... मी जाती.... सायबांना आणि मालकीण सायबांना चाय करून द्यायची आहे...."

अरुंधतीच्या मनात संशयाचे बीज पेरून रखमा तिथून निघून गेली.

इकडे रखमा गंधार कडे आली.
तो आपल्या असिस्टंट बरोबर केस discuss करत होता.  रखमाने चहा बनविला आणि त्या दोघांना दिला.

"सायेब.... आज तुमास्नी मेस चेच जेवण खावे लागेल..." हातातली फाईल असिस्टंट कडे देत गंधारने रखमाकडे पाहिले.

"रखमा... तेच मी तुला सांगतोय ना.... मला नकोय त्यांच्याकडचे जेवण.... अन्नाचा अपमान करू नये म्हणून मी जेवत होतो."

"ते ठीक आहे.... पर.... तुमी विचारणार नाही का ते."

"का?... तिच्याकडे काहीसे रागाने पाहत गंधारने विचारले.

"बाईंची तब्ब्येत ठीक न्हाई... तापाने फणफणल्यात.."

"मग डॉक्टरकडे नाही गेली ती...." गंधार चिंतातूर झाला. रखमाला हसू येत होते.  तिचा प्लान सफल होतं होता.

"सायेब.... किती नाजूक हायेत त्या.... त्यांच्याच्याने चालवत बी न्हाई.... मगाशी एक तापाची गोळी खाल्ली त्यांनी.... पडून हायेत कवादरनं...."

गंधार बाहेर आला.  लांबूनच त्याने तिच्या घराकडे पाहिले.   त्याच्याबरोबर रखमाही बाहेर आली.

"सायेब.... सकाळपासून लई रडत्यात त्या .... मी म्हणलं.... तुमी मुंबईला जावा..... आमचे सायेब काय ऐकणार नाहीत........ ते तुमाला इसरलेत... ते आता लवकरच लग्न पण करतील...."

"रखमा... असं कशाला बोलायचं तू...... जा समजावं तिला...... आणि तिला ताप आहे तर तू इथे काय करतेस तू जा तिच्याजवळ."

"सायेब.... मला लई कामं हायेत..........आता तुमी म्हणता तर.... बघून इते जरा..."

रखमा घाईघाईत अरुंधती कडे गेली.
  तिने लावलेल्या आगीचे ज्वालामुखीत रुपांतर झाले होते.  अरुंधती रडत रडत आपली बॅग भरत होती.   तिला बॅग भरताना पाहून रखमा लागलीच गंधारकडे धावत गेली.

गंधार तिची वाटच बघत बसला होता.

"कशी आहे ती?" गंधारने ती घरात शिरताच तिला विचारले....

"सायेब.... बाईं निघाल्यात लई रडत्यात.... कोणीतरी त्यांना बोलले की या बाईंशी (असिस्टंट कडे बोट दाखवत )तुम्ही लग्न करताय..... तवापासून लई मनावर घेतलंय त्यांनी.... त्या चालल्या....." रखमा हळू आवाजात बोलली.

"काय... काहीतरीच.... तिने यावर विश्वास कसा ठेवला...?" तो वेगात अरुंधतीच्या घरात गेला.


"अरु......"

गंधारच्या आवाजाने रडत बसलेल्या अरुंधतीचे दरवाजाकडे लक्ष गेले.   तिने त्याच्याकडे पाहिले आणि परत आपली बॅग भरायला सुरुवात केली.  डोळ्यातून गंगा जमुना तर अखंड वाहत होत्या.

तो हळू हळू चालत तिच्याकडे गेला.  त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.  तिने तो काढून टाकला.  त्याने पाठमोऱ्या तिला आपल्याकडे वळविले...ती वळली.... आणि हुंदकून रडू लागली.

"आता मला समजले... तुम्ही माझ्याकडे का दुर्लक्ष करता ते... तुम्हाला दुसरे कोणीतरी भेटलय..... माझ्यापेक्षा चांगले... तुमच्यावर प्रेम करणारे..... म्हणून नको आहे ना मी...."

गंधारने तिचा चेहरा वर उचलला आणि तिच्या माथ्याचे चुंबन घेतले.  तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारे मला भेटेलही कदाचित."
त्याच्या या बोलण्यावर तिला परत एक मोठा हुंदका आला.

"पण माझे जिच्यावर खूप खूप प्रेम आहे ती तर तूच आहेस ना..... मग मला दुसरे कोण कसे आवडेल..."
ती डबडबल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत होती.... त्याचे वाक्य पूर्ण झाल्यावर ती खुदकन हसली.....

"पण तुला आता बरे वाटतेय ना अरु.... ताप गेला का तुझा... किती बारीक झालेस अगदी....मला काळजी वाटली... म्हणून.." गंधार.

"पण मला ताप नाही आहे... तुम्हाला कोणी सांगितले.... तुम्ही त्या मॅडमशी लग्न करणार असे रखमा म्हणाली म्हणून मी रडत होते...."

रखमाचे नाव घेताच दोघांची ट्यूब पेटली. अच्छा हे तिचे  काम आहे तर.  दूर उभ्या असणाऱ्या रखमाकडे त्यांनी मोठ्या कृतज्ञतेने पाहिले.


लांबून रखमा एक हात कमरेवर आणि एक हनुवटीवर ठेवून त्यांचे हे मिलन बघत होती.   तिने दोघांचीही करकचून बोटे मोडून दृष्ट काढली.


या आगळ्या वेगळ्या रखुमाईने लक्ष्मी नारायणाचा जोडा एकत्र आणला होता.


समाप्त


यात ग्रामीण भाषा वापरण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...
चूक भूल द्यावी घ्यावी......


माझ्या लिखाणावर वाचकांची कृपादृष्टी पडत राहो हीच सदिच्छा.

तुमच्या समीक्षेच्या आणि प्रोत्साहनाच्या प्रतीक्षेत