Login

कलम तीनशे चोपन्न भाग ११

Use and misuse of Law
कलम तीनशे चोपन्न
भाग ११

©® सौ.हेमा पाटील.
रश्मीला कुठला प्रश्न पडला होता? यासोबत मागील भाग संपला होता. मुले झोपाळ्यावर बसली होती. विनिताचे स्वयंपाकघर आवरून झाले की रश्मी हाॅल मध्ये आली. तिथे विवेक आणि साकेत यांच्या गप्पा चालल्या होत्या. गप्पांचा विषय वेगळा होता; त्यामुळे बोलू की नको असा रश्मीला प्रश्न पडला. डोक्यात आलेला प्रश्न तिला गप्प बसू देत नव्हता, त्यामुळे तिने मध्येच विवेकला विचारले,
" मला तुम्हाला काही विचारायचे आहे. विचारू का?" यावर विवेक म्हणाला,
" बोला ना वहिनी! काय विचारायचे आहे?" यावर रश्मी म्हणाली,
" शहाने ज्याप्रमाणे पाळत ठेवून कुठल्या दिवशी साकेत गावी गेला होता तो दिवस विनयभंगासाठी निवडला होता, तसेच त्या दिवशी कुठल्या वेळी विनयभंग झाला याची नोंद एफ. आय. आर. मध्ये केलेली आहे का? ती नोंद पाहता वेळ बरोबर आहे का? हे तपासून पाहिले पाहिजे. कारण साकेत गावी लग्नासाठी गेला होता. लग्न संध्याकाळी होते; त्यामुळे साकेत सकाळीच शेताकडे चक्कर मारून आला होता. एफ. आय. आर. मध्ये वेळ कुठली दिली आहे जरा बघता का ?" रश्मीचे हे बोलणे ऐकून विवेकचे डोळे चमकले.
" वहिनी तुमच्या बोलण्यात पॉईंट आहे बरं का. एक मिनिट, मी एफ. आय. आर.ची प्रत काढतो आणि पाहतो." असे म्हणत विवेकने आत ऑफिसमध्ये जाऊन एफ. आय. आर.ची प्रत आणली आणि तो त्यावर वेळ वाचू लागला. त्यावर विनयभंग घडल्याची वेळ संध्याकाळी साडेचार अशी दिलेली होती. ते वाचून रश्मी म्हणाली,
" लग्नाची वेळ साडेचारची होती. तो लग्नाला मंडपात हजर होता, मग त्याचवेळी तो शेतात कसा असू शकेल?" विवेक म्हणाला,
" आपल्या बाजूने एक फार मोठा पुरावा मिळालेला आहे. एवढ्यात ही गोष्ट कुणालाही सांगू नका. लग्नपत्रिकेत लग्नाची वेळ छापलेली असेलच. मला एक लग्नपत्रिका आणून द्या. नवरा नवरीचे फोटो आणून द्या, तसेच अल्बम मध्ये साकेत नवरा नवरी सोबत मंडपात असतानाचा एक फोटो आणून द्या. आपले काम हलके झालेले आहे; कारण एकाच वेळी एक माणूस दोन्हीकडे असू शकत नाही. फक्त एक शंका आहे. लग्नाचा हॉल आणि तुमचे शेत यामध्ये किती अंतर आहे?" यावर साकेत म्हणाला,
" गाडीवरून चाळीस मिनिटे लागतात." हे ऐकल्यावर विवेक म्हणाला,
" मग तर प्रश्नच मिटला. आता आपला बचाव कसा करायचा ते मी ठरवतो. मोठ्या जाणकार वकिलाकडे जाऊया असे मी म्हटले होते; पण आता त्याची गरज उरली नाही ." हे ऐकून रश्मीने साकेतकडे पाहिले. साकेतला खूप आनंद झाला. रश्मीने विचार करून हा मुद्दा त्यांच्या लक्षात आणून दिला होता. त्यानंतर या विषयावर त्यांची बराच वेळ सखोलपणे चर्चा झाली. त्यानंतर साकेत आणि रश्मी घरी आले. घरी आल्यावर साकेतने रश्मीला मिठीत घेतले आणि तो म्हणाला,
" चला, गेल्या दोन तीन दिवसांत एक तरी सकारात्मक गोष्ट घडली. त्यामुळे आज मला शांतपणे झोप लागेल." यावर रश्मी म्हणाली,
" काळजी करू नकोस . सगळे काही व्यवस्थित होईल. आपण काही केलेच नाही तर चिंता कशाला करायची? दुसरा पण एक मुद्दा माझ्या लक्षात आला आहे ."
" तो कोणता ?" असे साकेतने विचारले. यावर रश्मी म्हणाली,
" आपल्या गावात सगळीकडे चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्या तारखेला तू गावात किती वाजता गेला होतास आणि तिथून परत किती वाजता निघाला होतास याचे शूटिंग झालेले असेल. ते शूटिंग मागून घेण्याची जी काही प्रोसिजर असेल ती करून ते मागून घेतले तर त्याच्यामध्ये तुझी गावात असण्याची परफेक्ट वेळ समजेल. त्यामुळे संध्याकाळी साडेचार वाजता विनयभंग झाला अशी जी तक्रार दिलेली आहे ती खोटी आहे हे सिद्ध होईल." हे ऐकल्यावर साकेत म्हणाला,
" तुझे डोके अगदी विद्युत वेगाने चालू लागले आहे. कमाल आहे!" हे ऐकल्यावर रश्मी म्हणाली,
" म्हणजे इतर वेळी मी बुद्धु असते का?" हे ऐकून साकेत हसला. तिला जवळ ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकवत तो म्हणाला,
" जानेमन, ए मलिका, तू हुशारच आहेस मला माहित आहे; फक्त तेवढा माझ्यावर अविश्वास दाखवत जाऊ नकोस. त्याचा मला खूप त्रास होतो." यावर रश्मी म्हणाली,
" अरे वेड्या तो अविश्वास दाखवणे म्हणजे प्रेमच असते."
" असे कसे ? प्रेम असेल तर विश्वास पण असलाच पाहिजे ना?" यावर रश्मी म्हणाली,
" इतके प्रेम आहे की तू माझ्यापासून दूर तर जाणार नाहीस ना? याच्या भीती पोटी मी तुझ्यावर बारीक लक्ष ठेवत असते."
" हे चुकीचे आहे रश्मी! जर प्रेम असेल तर त्यासोबत विश्वासही असायला हवा." साकेत म्हणाला.
" तुला नाही कळणार आम्हां बायकांची मानसिकता. जाऊ दे. आता शांतपणे झोप. उद्या काय करायचे ते पाहू." असे रश्मी म्हणाली.

रश्मीला आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळाले म्हणून आनंद झाला होता. आणखी खोलात जाऊन विचार केला तर आणखी काही धागादोरा मिळेल असे तिला वाटले. हे काम वकीलांचे आहे, त्यामुळे आता ते पुढे काय करायचे ते पाहतील असे तिला वाटले. तरीही कोर्टाची लढाई लढणे सोपे नव्हते हे तिला माहीत होते. रोज रोज चकरा घालणे, वकिलांची भेट घेणे, त्यांच्याशी सल्लामसलत करणे, कोर्टात तारीख असेल त्यावेळी कोर्टात हजर राहणे या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करणे भाग होते.
काय होईल पुढे? केसमध्ये साकेतला दिलासा मिळेल? की शहा यातही काही चलाखी करेल? ते वाचण्यासाठी पुढील भाग वाचावा ही विनंती.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

प्रिय वाचकहो, क्षमस्व. मी गेले दहा दिवस वैष्णोदेवी, अमृतसर येथे ट्रीपला गेले होते, त्यामुळे भाग पाठवण्यास उशीर झाला. आता सगळे भाग लवकर पोस्ट करेन. तसदीबद्दल मनापासून माफी मागते.

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५