कळत नकळत भाग 8

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर आणि मीराचे भांडण झाले.. तेवढ्यात अमरची बालमैत्रीण नेहा येते.. नेहाला बघून मीराचा चेहराच पडतो.. आता पुढे..

"अरे अम्या, काय भारी दिसालास रे.. आधीपेक्षा हॅण्डसम.." नेहा.

"तू काय कमी छान आहेस काय?? किती वेगळी दिसत आहेस?? आता तर मोठी झालीस की अजूनही लहानच आहेस.." अमर.

"मी आयुष्यभर लहानच असणार आहे.. तुला काही अडचण आहे का??" नेहा.

"मला नाही. पण तुझ्या पार्टनर कोण असेल त्याला असेल ना.." अमर.

"त्याची तुला का काळजी?? आणि आता इथेच बोलत बसतोस की आत पण घेतोस." नेहा.

"अरे ये ना. मी नको म्हटलं तर तू काय तशीच जाणार आहेस काय?" अमर.

"होय मग?? काका काकूंना न भेटता जाणं शक्यच नाही." असे म्हणत नेहा आत येते.

"अगं नेहा किती दिवसांनी भेटतेस? आज आठवण झाली होय तुला काका काकूंची?" काकू.

"अहो काकू तसं काहीच नाही. आठवण तर खूप येत होती. पण वेळच नव्हता मी तर काय करणार?? त्यात इतक्या लांब आहोत आम्ही." नेहा.

"होय ग. तुझ्या बाबांची बदली झाली आणि तुम्ही लांबच गेला.. तरी पण आपलं एक छान नात आहे बघ.. एक छान घरोबा आहे आपला.." काकू तिला पाणी देत बोलल्या.

"हो ना. म्हणूनच तर मी इथे रहायलाच आले आहे. मस्त रहाणार, तुमच्या हातचे आवडीचे छान छान पदार्थ खाणार, मस्त सुट्टी एन्जाॅय करणार.." नेहा.

"हो ग बाई. हवे तितके दिवस रहा." काकू म्हणतात.

मग सगळे गप्पा मारत बसतात. गप्पा मारत असताना नेहाचे लक्ष मीराकडे जाते.

"ही कोण आहे??" नेहा.

"अग ही आमची पेईंन गेस्ट. पण आमच्या मुलीसारखीच आहे. मीरा नाव आहे हिचं." काकू ओळख करून देतात.

"अच्छा.." असे म्हणून नेहा अमर बरोबरच बोलू लागते. तिच्या मन थोडं चलबिचल होतं. "अमरला ही आवडते की काय?? ही अमरच्या प्रेमात आहे?? नाही अमर फक्त माझा असेल.. नेमकं काय नातं आहे या दोघांमध्ये??" असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात चालू असतात.

गप्पा मारत असतानाच काकू स्वयंपाक करायला जातात. मीरा पण त्यांच्या सोबतच जाते. नेहा, अमर आणि काका गप्पा मारत बसतात. स्वयंपाक झाल्यावर काकू जेवायला बोलावतात. सगळे जण आवरून जेवायला येतात.

"काकू भाजी मस्त झाली आहे. तुमच्या हाताला चव आहे हं. खूप छान करता तुम्ही भाजी." नेहा.

"अगं भाजी मी नाही केली. मीराने केली आहे. खूप छान करते ग ती स्वयंपाक." काकू.

हे ऐकून नेहा आणखीनच तिरस्काराने तिच्याकडे पाहू लागली. "ही इंप्रेशन तर पाडायचा प्रयत्न करत नाही ना?? हिच्या मनात नेमकं काय आहे??" असा ती मनात विचार करते.

"आई खूप छान स्वयंपाक करते ना नेहा. पण काय उपयोग मी आल्यापासून तिच्या हातची भाजीच खाल्लीच नाही." अमर.

"काकू मला पण तुमच्या हातची भाजी खायची आहे बघा. कधी करणार??" नेहा.

"उद्याच कर बघ आई." अमरच्या अशा बोलण्याने मीराला खूप राग येतो.

"हो रे बाबा करते म्हणजे करते." काकू.

जेवण झाल्यावर थोडा वेळ बसल्यावर "ए अमर चल आपण आज लाॅन्ग ड्राईव्हला जाऊया. आपल्या नेहमीच्या ठिकाणापर्यंत.. मी काॅलेजला असताना एकदा आले होते. तेव्हा तू घेऊन गेला होतास. किती मज्जा आली होती ना तेव्हा?" नेहा अमरला म्हणाली.

"अगं हो नक्की जाऊ की. खूप दिवस झाले आपण गेलो नाही." अमर मुद्दाम मीराकडे बघून बोलतो.

संध्याकाळी अमर आणि नेहा लाॅन्ग ड्राईव्हला जातात.. जातानाचा तो मंद वारा.. गाडीमध्ये लागलेले सुंदर रोमँटीक गाणं.. त्यात ते दोघेजणच.. नेहाला तर जणू स्वर्गातील सुखच भासत होते.. ते दोघे खूप मज्जा करतात.. ते दोघे त्यांच्या नेहमीच्या जागी जातात.. मस्त पाणीपुरी खातात.. अचानक थंड वारा सुटतो आणि नेहाला थंडी वाजू लागते.. अमर त्याच्या अंगातील जॅकेट काढून नेहाला देतो..

नेहाला खूप छान वाटते.. अमरच्या मनात तसे काही नसते.. तिला वाटले की अमर तिच्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमामुळेच तो आपली काळजी करत आहे.. असा मनात विचार करत असताना अमर तिला बोलावतो..

"कुठे हरवलीस??" अमर.

"काही नाही रे. आधीचे दिवस आठवले.. काय दिवस होते.. खूप दिवसांनी आज परत तो दिवस आला.. मला वाटलं पण नव्हतं की आपण परत असे इथे येऊ.." नेहा.

"हो ग. एकदा तर आपण ग्रुपने आलो होतो तेव्हा किती मज्जा आली होती.. रोहन आणि शलाका नुकताच प्रेमात पडले होते.. त्यांच ते प्रेमात राहणं, लाजण.. किती एन्जाॅय केल होत आपण.." अमर.

इतक्यात पाऊस पडू लागला.. "अरेच्च्या पावसाला पण आत्ताच यायचं होतं.. चल लवकर तिथे जाऊया.." असे म्हणून अमर एका ठिकाणी जातो. पण नेहा जात नाही.. ती पावसात दोन हात पुढे करून मस्त भिजू लागते..

तू येताना पाऊस घेऊन आलास
अन् मनात प्रेम भरलास

तुला पाहुन माझं मन लाजलं
अन् पावसात चिंब चिंब न्हालं

तू असाच कायम सोबती रहा
असाच प्रेमात चिंब भिजत रहा

मन माझे तुझ्यात कसे गुंतले रे
मी तुझ्यात मिसळून तुझीच झाले रे

अशी तिच्या मनातून भावना येत होत्या. ती मनोमन खूष होती. अमर तिच्या जवळ जाऊन तिला घेऊन येतो. नेहा खूप भिजली होती.

"चल घरी जाऊया. नाहीतर ओल्या कपड्यामध्ये जास्त वेळ राहिलीस तर सर्दी होईल." असे म्हणत अमर गाडी आणायला जातो.

इकडे घरी मीराच्या मनात घालमेल सुरु असते. त्या दोघांमध्ये नेमकं कोणत नातं आहे?? नक्की मित्रच आहेत की मैत्रीच्या पलिकडेही काही आहे?? माझे मन का उदास होत आहे.. मी इतकी का नाराज आहे.. अमर मला आवडायला लागलाय की काय?? मला असं काय होतंय?? ते दोघे काय करत असतील?? कुठे गेले असतील?? असे एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात चालू असतात.

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.








🎭 Series Post

View all