Login

कानामागून आली अन तिखट झाली... भाग -१

पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण
जलद लेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय-कानामागून आली अन तिखट झाली

भाग -१

"हं! अजून बघ ते सासा सुनांची भांडणं. अन् काय ते तुझं बघणं,हसणं... दुसरं काही आहेच नाही. सिरीयल लावून बसते टीव्हीवर. केव्हाही घरात पाय दिला की टीव्हीवर तेच सुरू असते. भांडाभांडी, ओरडाआरडी, एकमेकांचा पान उतारा करणे.
कुटुंब घटकांविषयीचं प्रेम ,आदर, सन्मान तर बासणातच गुंडाळून ठेवला यांनी.
अगं आपण पोरांना काय संस्कार देतोय ते तर बघ? त्या कोवळ्या मनात कोणती बीजे पेरतोय आपण?
उद्या हीच मुलं तुझ्यासोबत तशीच वागतील तेव्हा कळेल तुला."

राजु अगदी चिडून गेलेला होता.
हे म्हणजे त्याच्या जखमेवर मीठ चोळणेच होते खरे तर.
आई बाबांना या उतरत्या वयात आधार द्यायचा सोडून गावातील घराकडे पाठवायला रेवाच कारणीभूत ठरली होती.

रेवा रोज काहीतरी नवीन खुसपट काढून सासूशी भांडायची आणि राजू घरी आला की रोज कांगावा करायची. राजूला सगळं कळत होतं .पण त्याच्या डोक्याला शांतता हवी होती.
आईबाबाही इथे मनमोकळेपणे राहू शकत नव्हते.
दडपण रहायचं त्यांना.
शिवाय कशाचीच उजागिरी नाही.परक्यासारखे रहायचे.रेवाचे टोमणे निमूट ऐकायचे.
राजूला त्यांची घुसमट कळत होती.
त्यांनाही शांतता,निवांतपणा मिळावा.
घरातही शांतता राहावी म्हणून नाईलाजास्तव त्याला या निर्णयाप्रत यावे लागले होते.

"मुलांना खोलीत अभ्यासाला बसवून आली आहे मी इकडे. दिवसभर काम करून थकल्यावर थोडा वेळ टीव्ही बघितला तर काय बिघडलं म्हणते मी? एवढा थयथयाट कशासाठी?"
रेवा छद्मी हसत म्हणाली.

"अहो बाईसाहेब! जरा मागे वळून बघा तुमची दोन्ही आज्ञाधारक मुलं दारा आडून काय बघतायत ते."

"अगं ,सुशिक्षित म्हणवते स्वतःला आपलं अस्तित्वच गहाण ठेवायला निघालीस त्या मिडीयाकडे याची जाणीव तरी आहे का तुला? कुटुंब संस्कार , नैतिकता काही असते की नाही? सगळे मापदंड ओलांडून या मालिका तुमच्या हलक्या डोक्याचा ताबा घेऊ लागल्या आहेत आणि घराघरात महाभारत मचवू लागल्या आहेत.
पूर्वी रामायण महाभारत यासारख्या संस्कारक्षम मालिका दाखवत आता ते सोडून या सासा सुनांच्या भांडणांच्या मालिका दाखवून काय मिळते त्यांना?
आपल्या संस्कृतीवर घाला घालतायत त्या.
पाश्चिमात्यांच्या भोगवादी संस्कृतीचे अनुकरण करायला भाग पाडतायत ते. तेच तेच सारखं मनावर बिंबवून.
आपल्या उदात्त संस्कृतीचं खच्चीकरण अगदी नियोजनपूर्वक केले जातेय.
सगळ्यात पहिले एकत्र कुटुंब पद्धतीला सुरुंग लावला.

'काना मागून आली अन तिखट झाली' .
"काय बोलतात तुम्ही,
मी तिखट झाली का ?आता दाखवूनच देते माझा तिखटपणा मग समजेल."
"अगं मी तुला कुठे म्हणतोय..."
"मग कोणाला म्हणताय ?"
समझनेवाले को इशारा काफी होता है...
राजूला नेमके काय म्हणायचेय...
क्रमशः
बाकी पुढील भागात
भाग -२मधे
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all