Login

कर्तव्य

कर्तव्य
कर्तव्य

“आई गंऽऽऽ, आईऽऽऽ, मेले गं मी; कंबरडं मोडलं माझं!” असं विव्हळत असणाऱ्या जयाचा आवाज ऐकून शेजारची तानी धावत धावत बाहेर आली.

बाहेर येऊन पाहिलं तर तिला तिची शेजारीण जया खाली पडलेली दिसली. जयाला उठवत तानी म्हणाली, “आगं जये, कशी काय खाली पडलीस गं? काय करत हुतीस?”

रडवेल्या स्वरात जया म्हणाली, “आगं काय सांगू तुला! पावसाळा चालू झालाय, घराचं पत्र लय गळत्यात गं; कागद घालाया म्हणून घरावर चढली‌ व्हते. पर कसा काय पाय घसरला ते कळलंच न्हाय गडे!”

जयाला कसंबसं उठवून कॉटवर बसवत तानी म्हणाली, “असं झालं व्हय. आगं बया, यकटीच घरात अस्तीस तू, संभाळून कामं करत जा की जरा. कमी ज्यादा काय झालं तर कोण हाय का गं तुला बघायला?”

तानीचे बोलणे मनाला लागल्यामुळे जया म्हणाली, “आसं काय म्हणतीस गं ताने; मला कुणी न्हाय असं कुठ हाय गं? माझी पोर हाय की माझ्यासाठी!”

नाक उडवून फन्कारतच तानी म्हणाली, “हंऽऽऽ, पोर हाय म्हणे, ती गीली लगीन करुन तिच्या घरी. तुझा नवरा पण वारलाय, आता ह्या घडीला तुझ्याजवळ हाय का कोण सांग बरं? म्हणून तर म्हणती की पदरात येक तरी पोरगा आसावा, म्हंजी कसं बरं अस्तं बघ. आपल्याजवळ र्‍हातु, काळजी घितू. पोरगी काय गं; लगीन झालं की तिच्या संसारात रमती.”

या दोघींचे बोलणे चालूच होते तेवढ्यात रोजच्यासारखा रजनीचा फोन आला. फोन उचलला गेल्यामुळे ती विचारू लागली, “हॅलो..आई कशीयस गं! काय करतेस?”
तो फोन तानीने उचलला होता. रजनीचा आवाज ऐकून तानी पटकन म्हणाली, “आगं कशीयस काय ईचारती, तुझी आय घरावरनं खाली पडलीय, कमरला लागलंय तिच्या.”

ते ऐकून घाबरुन गेलेली रजनी म्हणाली, “अहो काय सांगताय काकू! आई बरी तर आहे ना?

रजनीला दिलासा देत तानी म्हणाली, “हो गं बाई, भिण्यासारखं लय काय झालं न्हाय, कमरेला मार लागलंय फकस्त.”

“बरं ठीक आहे.. मी लगेच येते तिकडे, तोवर आईकडे लक्ष द्या.” म्हणत रजनीने फोन ठेवून दिला आणि नवऱ्याला म्हणाली, “अहो, ऐकले का.. आत्ता मी आईला फोन केला होता तर तो शेजारच्या तानी काकूने उचलला. तिने सांगितले की आई घराच्या पत्रावरून खाली पडली आहे.”

एकदम दचकून अजित म्हणाला, “बापरे! अन् ते कसे काय? जास्त लागले तर नाही ना? कशा आहेत मामी?”

रजनीच्या चेहऱ्यावर आईची काळजी दिसत होती. तिच्यासमोर सारखा आईचा चेहरा दिसू लागला. कधी एकदा जाते आणि आईला पाहते असे तिला झाले होते. आईच्या काळजीने ती अजितला म्हणाली, “अहो.. चला ना आपण आईकडे जाऊ या.”

हो, हो.. जाऊ या चल, मीही तुला तेच सांगणार होतो. असे म्हणत अजितने रजनीला तिच्या आईकडे जाण्यासाठी तयार व्हायला सांगितले.

तासाभरात रजनी नवऱ्यासोबत माहेरी आली. आईला पाहताच तिचे डोळे भरून आले. पण रजनीकडे पाहून जया म्हणाली, “आगं रडती कशाला, इतकं काय झालं न्हाय. मी बरी हाय.”

“आई.. तुला नीट उठताही येत नाही आणि म्हणते की मी बरी हाय, चल.. आधी दवाखान्यात जाऊन येऊ मग बघू बाकीचे.” आईच्या काळजीने जया कासावीस झाली होती. तिने आणि अजितने जयाला दवाखान्यात नेले.

डॉक्टर म्हणाले, “उंचावरून खाली पडल्यामुळे यांना मुक्का मार जास्त बसलाय. आत्ता मी काही औषध देतो त्याने फरक पडलेच. आणि नाही पडला तर काही टेस्ट कराव्या लागतील. सध्या तरी यांना आराम करावा लागेल.”

जयाला दवाखान्यातून‌ तपासून आणले तेव्हा कुठे रजनीच्या जीवात जीव आला.

घरी आल्यावर अजित आपल्या सासूला म्हणजे जयाला म्हणाला, “मामी, तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी चला राहायला. इथे एकटेच नका राहू. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितले आहे. इथे काळजी घेण्यासाठी कुणीच नाही. आणि आम्ही दोघे असताना तुम्ही इथे एकटे का राहणार बरं?”

लेकीच्या घरी राहणे म्हणजे जावयाच्या (पाहुण्यांच्या) घरी राहणे योग्य वाटत नाही या विचाराने बुजल्यासारखी होऊन जया म्हणाली, “नको जावईबापू, लेकीच्या घरी र्‍हाणं बरं दिसत न्हाय! लोकं काय म्हणतील?”

“लोकांचं जावू दे ओ मामी! हे बघा.. फक्त मुलानेच आई वडिलांना सांभाळावे असे कोण म्हणते. जसे मुलाचे कर्तव्य आहे तसेच मुलीचेही कर्तव्य आहेच की आपले आई वडिलांना सांभाळण्याचे. बापाच्या संपत्तीवर जसा अधिकार दाखवला जातो तसेच तिने आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यायलाच हवी.”सासूच्या काळजीने जावई बोलत होता.

आवं पावणं.. तरीबी तुमच्या तिकडं यायला नको वाटतंय. आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जायचं म्हंजी लय आवघड वाटतंय” जया अजितला पाठवून देण्याचा प्रयत्न करत होती.

पण अजित जायचे काही ऐकून घेत नव्हता. त्याला तिची खूप काळजी वाटत होती. तो म्हणाला, “मी काय सांगतोय ते ऐका.. तुम्ही असे काही मनात ठेऊ नका. आमचे घर ते तुमचे घर. आम्ही कुणी परके आहोत का तुमच्यासाठी आणि तुम्हीच सांगा.. मी तुमच्या मुलासारखा आहे ना?”

आता मात्र जयाला पुढे काही नकार देण्यासाठी जागाच शिल्लक उरली नाही. तिला जावयाच्या मनातील काळजी समजत होती म्हणून ती शांत बसली.

नवऱ्याच्या बोलण्याला दुजोरा देत रजनीही म्हणाली, “आई, अगदी बरोबर बोलतात हे, तू यायचे म्हणजे यायचेच आमच्यासोबत.. बास.”

नि:शब्द होऊन जयाने फक्त होकारार्थी मान हलवली. आणि शेवटी लेकीच्या घरी रहायला जाण्यास तयार झाली.

लेक जावई प्रेमाने काळजी घेत होते ते पाहून तानीच्या डोक्यात थोडाफार फरक पडला.

मुलगा आणि मुलगी हे दोन्हीही सारखेच असतात. फक्त मनात प्रेम, जिव्हाळा, काळजी आणि आपुलकी असायला हवी. त्याचसोबत मनात कर्तव्याची जाणीव हवी. तिचं जाणीव अजित आणि रजनी यांच्याकडे होती त्यामुळे ते जयाला सांभाळण्यासाठी त्यांच्याकडे घेऊन गेले. पुढे ते तिघेही समाधानाने आणि आनंदाने राहू लागले

—---------