" सर..! तुम्हाला असं खरचं वाटतयं की टोनीने एकट्याने हे अपहरण केलं आहे." साक्षी मॅडमनी शिर्के सरांना विचारलं.
" मी कुठे असं बोललो आहे..!" शिर्के सर बोलले.
" पण सर! त्याने सांगितलेल्या बिनआधाराच्या खोट्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला...?" शिंदेंनी विचारलं.
" नाही शिंदे..!"
" मग तुम्ही आता केतकीच्या वडिलांना आणि केतकीला पोलीस स्टेशनमध्ये का बोलावलं आहे..?"
" थांबा ! थांबा..! " शिर्के सर बोलले, " ते इथे आले की सगळं समजेल तुम्हाला..!"
साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदे आता शांत झाले. आता काय बोलावं हे त्या दोघांना सुचत न्हवतं. शिर्के सरांना काय सापडलं होत आणि त्यांच्या डोक्यात काय चाललं होतं हे फक्त त्यांनाच माहीत होतं.
काही तासांनी केतकीचे वडील केतकीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले. केतकीचे वडील बोलले,
" काय झालं साहेब..? आम्हाला असं तातडीने इथे बोलावलं..!"
" हो..! तुमच्या मुलीच अपहरण करणारा आम्हाला सापडला आहे. म्हणून तुम्हाला इथे बोलावलं.!" शिर्के सर केतकीच्या वडिलांना हे सांगत असताना केतकीवर नजर ठेवून होते. तिच्या हालचाली टिपल्या त्यांनी टिपल्या.
" सर..! आपण परत टोनीची काही चौकशी करायची का..?" साक्षी मॅडम न राहून बोलल्या.
" हो . ! चौकशी तर करायची .! " शिर्के सरांच्या तोंडून हे ऐकताच संभ्रमात पडलेले साक्षी मॅडम आणि शिंदे काही बोलायच्या आधीच परत शिर्के सर बोलले,
" चौकशी केतकीची करायची आहे आणि ती चौकशी मी करणार आहे...!" शिर्के सर आता जरा आवाज चढवून बोलले होते.
केतकीची चौकशी हे ऐकताच सगळे आश्चर्यचकित झाले. शिंदेंनी टोनीला बसवलेल्या रूम मध्ये केतकीला आणायच्या सूचना दिल्या आणि ते स्वतः त्या रूम मध्ये आले. पाठून साक्षी मॅडम केतकीला घेऊन आत आल्या. केतकी आणि टोनीची नजरानजर झालेली शिर्के सरांनी पकडली. केतकीच्या वडिलांना काय चाललंय हे समजत न्हवतं.
" बस केतकी..!" शिंदे सरांनी केतकीला खुर्चीवर बसायला सांगितलं.
" ह्याला ओळखतेस का..?" टोनीला उद्देशून शिर्के सरांनी केतकीला विचारलं.
केतकी काहीच बोलली नाही. तिने मान खाली घातली होती.
" बोल केतकी..! तू ओळखतेस का ह्याला..?" शिर्के सरांनी दरडावल.
" हो..!" केतकी दचकून बोलली.
तिच्या ह्या 'हो' ने सगळे आवाक झाले.
" म्हणजे तुझं ह्यांनी अपहरण केलं तेंव्हापासून एकमेकांना ओळखायला लागलात.?"
" नाही..!"
" मग कधीपासून..?"
केतकी शांत होती. आता शिर्के सर परत ओरडले.
" कधीपासून..?"
" आधीपासूनच..!" केतकी घाबरलेल्या आवाजात बोलली," हा टीनाचा भाऊ आहे..!"
साक्षी मॅडम, केतकीचे वडील आणि सगळ्यांना ह्या उत्तराने धक्का बसला.
" गुड .! म्हणजे आता तू सगळं खरं बोलायचं ठरवलं आहेस..?" शिर्के सर केतकीला बोलले.
आता केतकी काहीच बोलली नाही. शिर्के सरांनी पुन्हा प्रश्न केला.
" तुला माहीत आहे का की ह्यानेच तुझं अपहरण केलं होतं?"
केतकी शांत.
" अगं..! ह्यानेच तुझ अपहरण केलं होतं.! पण तू बोलली होतीस की ह्याने तुला एका रूम मध्ये बंद केलं होतं.! पण हा बोलतोय की ह्याने तुला कार मध्ये लपवलं होत.!"
केतकीने ओळखलं की आपण काय काय चुका केल्या आहेत आणि आता आपण फसलो आहोत.
" बोल केतकी..! तुला कारमध्ये ठेवलं होतं की रूम मध्ये..?"
" कारमध्ये...!" केतकी रडत बोलली.
साक्षी मॅडम आणि हवालदार शिंदेंना सगळा प्रकार लक्षात आला. केतकीच्या वडिलांना मात्र अजूनही उमजत न्हवतं की काय घडलं आहे.
" केतकी..! तू स्वतःहून स्वतःचचं अपहरण घडवलं.?"साक्षी मॅडम वैतागून बोलल्या.."का..?"
केतकीच्या वडिलांना हा खूप मोठा धक्का होता. त्यांना तर काय बोलावं, काय करावं सुचत न्हवत. आपली मुलगी काय उत्तर देतेय ह्याच्यावर त्यांचा विश्वास बसत न्हवता..
साक्षी मॅडमच्या सारख्या सारख्या का ? का ? का ? ह्या प्रश्नने शेवटी केतकी भडाभडा बोलू लागली,
" हो..! माझ्या अपहरणात माझा सहभाग होता. कारण मला वाटतं होत की माझे आई बाबा माझ्यासाठी काहीच करत नाहीत. बाबांना चांगली नोकरी आणि चांगला पगार असून सुद्धा ते माझ्यासाठी मला हव ते घेऊन देत न्हवते. आधी मला असं काहीच वाटायचं नाही. पण जेंव्हा मी माझ्या नवीन कॉलेजमध्ये जायला लागले, तेंव्हा माझी टीना बरोबर मैत्री झाली. तिचे आई वडील नाहीत. तरी ती महागडे कपडे घालायची, तिच्याकडे महागडा मोबाईल असायचा. पण माझ्या आई वडिलांकडे सगळं असून ही काही भेटायचं नाही. "
केतकीचे वडील हे ऐकून रडायला लागले.
शिर्के सरांनी विचारलं, " मग हा तुझ्या अपहरणाचा प्लॅन कोणाच्या डोक्यातून आला..?"
" टोनी त्याची गाडी घेऊन कधी कधी टिनाला घरी घेऊन जायला कॉलेजमध्ये गाडी घेऊन यायचा. त्यामुळे मी त्याला ओळखू लागले. आमच्यात बोलणं व्हायचं. तो मला बोलायचा की तू अशी काशी राहतेस. चांगले कपडे विकत घे, किती जुन्या मॉडेलचा मोबाईल वापरतेस. मला ते योग्य वाटायला लागलं. मी आईला बोलले की मला नवीन मोबाईल पाहिजे. पण तिने ती माझ्यावर रागावली . बाबा ही काही बोलले नाहीत. ही गोष्ट मी टोनीला सांगितली. मग त्याने हा प्लॅन केला. टोनी बोलला की आपण मस्त प्लॅन केला आहे. कुणालाच आपल्यावर संशय येणार नाही. मला ही बघायचं होत की माझे बाबा मला सोडवायला पैसे देतात की नाही. "
" बास कर बाळा.!" केतकीचे वडील रडत रडतच बोलले, " आता पुढे काही ऐकावस वाटतं नाही. पण तू आम्हाला ओळखायला चुकलीस ग...."
केतकीचे वडील रडतच खाली बसले. हवालदार शिंदेनी त्यांना सांभाळून उठवलं आणि त्या केबिनमधून बाहेर घेऊन गेले.
" केवढा मोठा मूर्खपणा केला आहेस तू कळतंय का तुला.?" साक्षी मॅडम केतकीवर ओरडल्या.
शिर्के सर खुर्चीवरून उठले. साक्षी मॅडमकडे बघून बोलले, " साक्षी..! तू भावनिक होऊन हिच्याकडे हवीतशी चौकशी केलीस नाही. नाहीतर आपल्याला तेंव्हाच सगळं समजलं असत..!"
______________समाप्त _________________
प्रिय पालकांनो..!
ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे.पण आपली मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात तेंव्हा त्यांच्या बरोबर शिकणारी मुलं ही आपल्यापेक्षा श्रीमंत, गरीब किंवा बरोबरीच्या कुटूंबातील असतात. ते मैत्री करताना कोणाबरोबर ही मैत्री करतात. त्यांचे चांगले गुण किंवा वाईट गुण ते काहीप्रमाणात चुकून का होईना आत्मसात करतात. त्यांच्यातील चुकीचे गुण आपल्याला दिसले तर आपण त्यांच्यावर रागावून, त्यांच्यावर ओरडून , त्यांना समजावून सांगून ते सोडायला लावतो. पण त्या आधी आपण पालक म्हणून एक गोष्ट आपल्या पाल्याला वेळोवेळी समजवून सांगावी अस मला वाटतं. ती म्हणजे आपण त्यांच्यासाठी जे करतोय किंवा जे करत नाही आहे, ते का करत आहे हे प्रेमाने समजावून सांगावं. म्हणजे उद्या त्यांना कोणी तुमच्याबद्दल काहीही सांगितलं तरी त्यांना तुच्याबद्दल माहिती असल्यामुळे ते तुम्हाला कोणत्याही बाबतीत गृहीत धरणार नाहीत. कोणी बाहेरच्याने तुमच्याबद्दल काहीही सांगितलं तरी तुमचा पाल्य तुमच्या बाबतीत वाईट विचार करणार नाही.
धन्यवाद..!
( आशय समजून घ्यावा..! चूक भूक माफी..! अभिप्राय स्वागतार्ह...)