Login

कुणीही कुणाचं नसतं... भाग -१

नादर होईपर्यंत उदार होऊ नये
जलद कथालेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय - अति उदार तो सदा नादार

कुणीही कुणाचं नसतं
भाग -१

"अहो, तुमच्या लेखी बायका म्हणजे मूर्ख. त्यांना मुळी अक्कलच नसते. पण तेव्हा जर माझा ऐकलं असतं तर आज मुलांचे उच्च शिक्षण करताना ही अशी भीक मागायची वेळ आपल्यावर आली नसती हो."
वृंदा पोटतिडकीने बोलत होती.

आपल्या अत्यंत बुद्धिमान
मुलाची ऍडमिशन इंजिनिअरिंगला करायची तर पैसे नाही म्हणून त्याची बी कॉम ला ऍडमिशन घ्यावी लागली.
मुलाच्या चेहऱ्यावरच्या वेदना ती बघू शकत नव्हती. वृंदा विवेकला म्हणाली,
" तुम्ही म्हणताय आपण त्याची ऍडमिशन पुढच्या वर्षी इंजिनिअरिंगला घेऊ. पण तुम्ही त्याचं वर्ष नाही, आयुष्य वाया घालवताय. त्याच्या मनावर परिणाम झाला तर उद्या मुलगा हातचा जाईल. त्याचा चेहरा बघा एवढा हसता खेळता पोरगा नुसता चिंबून गेलाय.मी चांगली ओळखते त्याला.
तो बोलून दाखवत नाहीय पण तो आतून खूप दुःखी झाला आहे. त्याच्यावर खूप मानसिक परिणाम झालाय हो.
दहावीला जिथे पंचान्नव टक्क्यांची ची अपेक्षा होती तिथे अस्सी टक्के आले तेव्हाच किती नाराज झाला होता तो.
आता बारावीला एवढे ब्यान्नव टक्के मिळाले तरी काय फायदा? तो त्याच्या मित्राजवळ बोलला तसा.

काहीपण करु पण त्यांची ऍडमिशन इंजिनिअरिंगला करू आपण.आपल्या जवळचं किडुकमिडुक विकु पण... " वृंदा आपले अश्रू आवरु शकली नाही.

"अगं एवढं सोपं वाटते का तुला वृंदा, सगळे सोंग आणता येतात गं पण पैशाचं सोंग नाही आणता येत.मला काय वाटत नाही का?अगं... "विवेकही हुंदके देत होता. त्यालाही वेदना होत होत्या अंतरंगातून की आपण आपल्या हुशार मुलाला इंजिनिअरिंगला पाठवू शकत नाही. आपण नुकसान करतोय त्याचं.

..........‌‌

त्याच्या नजरेसमोर भुतकाळ नाचत होता.
वृंदा, विवेकला सतत म्हणायची,"अहो थोडं तरी ऐका हो माझं. उद्या आपलीही लेकरं आहेत दुखणे खूपणे आहेत, शिक्षणं आहेत त्यांची. आज धंदा चांगला आहे. उद्याचं कोणी पाहिलं ? थोडी शिल्लक पुंजी राहू द्या जवळ.
पण आपण ऐकलं नाही.उलट तिलाच ऐकवून मोकळं व्हायचं,

"आम्ही किती गरिबीत दिवस काढले याची कल्पना नाही तुला वृंदा .अगं! जवाच्या पोळ्या खाल्ल्या. कधी एक वेळ जेऊन दिवस काढला.
लोकांचे उतरलेले कपडे घातले. फुटक्या पाटीवर शिकलो गं आम्ही.
आता आपल्याला चांगले दिवस आलेत पण बाकी बहीण भावांची दैन्यावस्था मी नाही बघू शकत."

आणि विवेक मदत करत राहिला.

कर्तव्यच होतं त्याचं. तिलाही मान्य होतं.
आई वडिलांचा सांभाळ तर तो करतच होता. बहिणीची लग्न सुद्धा करून दिलीत. त्यांचे माहेरपण.तिनेही न कुरकुरता सगळं केलं.

पण बाकीचे भाऊ आयतं मिळाल्यावर हात पाय हलवायला ही तयार नव्हते.
वृंदाचे म्हणणे होते ,"त्यांना अशी मदत करा की ते आपल्या पायावर उभे होतील.ते आळशी बनतायत हो."

तुम्ही काय कमरेचे धोतर सोडून द्यायलाही मागेपुढे पहाणार नाही.

माझा एक वाक्य नेहमीसाठी लक्षात ठेवा
'अति उदार तो सदा नादार'

अहो हीच लोक उद्या तुमच्यावर वेळ आली तर तुम्हाला मदत तर करणार नाहीतच उलट चार गोष्टी ऐकवतील एवढी कमाई केली कुठे गेली? तुमच्याकडे पाठ फिरवायलाही कमी करणार नाहीत.तशी वेळ येवू नये पण...
भविष्य कोणी पाहिलं?

पुढे काय घडतं... मुलांची शिक्षण तो कशी करतो? घरची लोकं त्याच्याशी कसे वागतात? ते बघुयात पुढील भागात.