Login

कुणीही कुणाचं नसतं...भाग -३अंतिम

नादार होईपर्यंत उदार होऊ नये
जलद कथालेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय - अति उदार तो सदा नादार

कुणीही कुणाचं नसतं
भाग -३अंतिम

विवेक वृंदाचा मोठा मुलगा सीए झाला असून त्याची उत्तम प्रॅक्टिस आहे. त्याच्या हाताखाली चार मुलं कामाला आहेत. लहान मुलगा इंजिनियर एका चांगल्या कंपनीत मोठ्या पोस्टवर आहे. दोघांचाही उत्तम संसार आहे.
विवेक वृंदा कृतकृत्य आहेत.
आयुष्यभर केलेल्या मेहनतीचा फळ आज ते चाखत आहेत.
आणि केलेले सत्कर्म कधीही वाया जात नाहीत.

आता विवेकच्या डोक्याला विचाराचा भुंगा पोखरतो, त्यावेळी आपण वृंदाचे ऐकले नसते तर कदाचित.... आज काय परिस्थिती राहिली असती?
आज जे चित्र आपण आपल्या कुटुंबाचे बघतोय ते कदाचित उलटे राहिले असते.
.............

मोठ्या मुलाची तर ऍडमिशन करून झाली होती.तो दुसर्या वर्षाला होता.
पण लहान मुलाची ऍडमिशन करायची त्यावेळी पैसा उभा करण्यासाठी शेवटी वृंदाने आपले सगळे दागिने विकले आपले दोन हीरे घडविण्यासाठी.
त्याची इंजिनिअरिंगची पहिली फी भरली.
आता इथून पुढे काय?
दोघेजण दोन ठिकाणी शिकायला. त्यांचे खाणे पिणे राहण्याचा खर्च दर महिन्याचा आणि इंजिनिअरिंगची दर सहा महिन्यानंतरची फी आणि मोठ्याची पण दरवर्षाची फी.
कुठून करणार एवढा खर्च?

पण वृंदा पक्की होती.
निघेलच काहीतरी मार्ग पण पहिलेच हार मानायची नाही.

दोघे मिळून परिस्थितीशी झगडत राहिले .संघर्ष करत राहिले. एकेक समस्येला तोंड देता देता नाकी नऊ येत होते.कधी रडायला यायचे.कसे होईल ?
पण समोर ध्येय दिसत होते आपले दोन हिरे घडवायचे आहेत. आपले हे दोन हिरे घडवताना तिने तिचं हिऱ्याचं मंगळसूत्रही शेवटी विकलं.
कितीही कष्ट करण्याची तयारी होती.
घरची लोकं मजा बघत होते.पण एकालाही कदर आली नाही.
उलट पैसे मागतील का ?या भितीने अंतर ठेवून रहायचे.
त्यावेळी विवेकला खऱ्या अर्थाने नात्यांचा अर्थ कळला.
'ना' ते शब्दच त्याचा अर्थ सांगून जातो 'जे नाही ते 'नाते'.
संकटकाळीच नात्यांची खरी परीक्षा होत असते.

घरचं ,माहेरचं एकही नातं कामी आलं नाही.
विवेकच्या मित्रांनी मात्र खूप मदत केली.

काही बँकांचे कर्ज काढून तर काही मित्रांच्या मदतीने असे मिळून मुलांची शिक्षणं पूर्ण झाली.
पण तो पूर्णतः कर्जबाजारी झाला होता.

मुलं चांगली निघालीत. चांगल्या नोकरीत लागलीत. विशेष म्हणजे पाय जमिनीवर होते. आई वडिलांचा उत्तम सांभाळ करत होती. परिस्थितीची जाणीव होती. त्यांनी विवेक चे सगळे कर्ज फेडले.

सगळं व्यवस्थित होतं विवेक वृंदा समाधानी जीवन जगत होते.
विवेक ला मात्र आयुष्यात एक चांगला धडा मिळाला होता कुणीही कुणाचं नसतं.
बाप बडा न भैय्या
सबसे बडा रुपैय्या
आपली काळजी आपणच घ्यायची असते.स्वत: नादार होईपर्यंत लोकांसाठी उदार व्हायचं नसतं.
समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all