कुरुप कोण?.. भाग - ३ अंतिम

The story of a dusky skin girl Minal, who is beautiful in heart and nature, mother-in-law doesn't like Minal but finally realizes who the real ugly is .

कुरुप कोण ?..
भाग - तीन,अंतीम

असेच दिवसापासून दिवस जात होते. नवी नवरी मिनल सासर घरी रुळत होती. पण म्हणतात ना 'जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते.'आपल्या चष्म्यातून लोक दुसऱ्याला अजमावत असतात, तसेच सासुबाई सुलभाताई आणि जाऊबाई मिनलशी नीट वागत नव्हत्या. तिचा नवरा संतोषला आपली जीवनसाथी पसंत होती पण या दोघींना तिचा सावळा रंग खटकत होता.

एक दिवस मिनल आंघोळीला गेली जाण्यापूर्वी जाऊबाईला बोलली,

"ताई गॅसवर कुकर लावलाय तेवढे शिट्ट्यांवर लक्ष असू द्या."
मिनल आंघोळ करत होती. तीन शिट्ट्या होऊन गेल्या, तिला बाथरुममध्ये ऐकायला येत होत्या पण गॅस बंद केला नव्हता.अजून चार पाच शिट्ट्या ऐकायला आल्या तिने लगबगीने आंघोळ उरकली आणि धावतच किचनमध्ये आली तर तिथे सुलभाताई रागाने तिच्याकडे बघत होत्या.

"मी ताईंना सांगितले होते"

ती बोलली पण तिचे अजिबात काही ऐकून न घेता त्या तिला बडबडल्या. तिचे डोळे पाण्याने भरले.

तिने पाहिले तर जाऊबाई कानात कॉड अडकवून मोबाईल मधील व्हिडिओ पाहण्यात दंग होत्या.

कामाचा भार एकट्या मिनल वर पडत होता. सणवार असो काहीही असो. एकदा गणपती घरी आले होते, त्या दिवशी गौराईचे आगमन होणार होते. गणपतीचा मोदकांचा नैवेद्य करण्यात मिनल व्यस्त होती. दुपारी लक्ष्मीचे (गौराईचे) आगमन होणार होते. संध्याकाळची गौराईच्या नैवेद्यासाठी भाजी साफ करायची होती. सुलभाताईने मोठ्या सुनेला भाजी साफ करायला सांगितले तर माझं डोकं दुखत आहे म्हणून ती झोपून राहिली. मी बाम लावून देऊ का मिनल बोलली तर,

"मी बघून घेईन, उगाच चांगुलपणाचे नाटक करु नकोस ती म्हणाली."

मोहनराव ऐकत होते, ते बोलले,
"तू एवढ का करतेस दुसऱ्यासाठी आणि तू काहिच बोलत नाहीस."

त्यावर मिनल बोलली,
"जाऊ द्या बाबा मला तसे वागता येत नाही,त्या त्यांच्या स्वभावानुसार वागतात मी माझ्या."

सकाळचा स्वयंपाक, नैवेद्य आवरुन मिनलने पटापट भाजी साफ करून ठेवली आणि लगेच जेवायला घेतले. तिला दुपारी येणाऱ्या गौराईच्या स्वागताची तयारी करायची होती.

जेवणं उरकली आणि ती पटकन नवी साडी नेसून गौराईच्या स्वागतासाठी सज्ज झाली. जाऊबाई अजून गाउनवरच होती.

"हे बरं तूला पटतंय !...

सासरे मोहनराव सुलभाताईंना बोलले.

एकेदिवशी मोहनरावांना अचानक पॅरालाईजचा अटॅक आला, त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. ते दवाखान्यात पंधरा दिवस अॅडमिट होते. पंधरा दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला पण ते पूर्णपणे बरे झाले नव्हते. सुलभाताई आणि मिनल रोज त्यांची सेवासुश्रुषा करत होत्या पण जाऊबाई अजिबात तिकडे लक्ष घालत नव्हती. सुलभाताईंना आता तिचे वागणे खटकायलागले होते.
एक दिवस मिनल म्हणाली,

"आपण बाबांना आखेवाडचे आयुर्वेदिक औषध देवूया का? त्या औषधाने माझे काका ठणठणीत बरे झाले होते."

संतोष आणि सुलभाताईंनी ठरवले आपण प्रयत्न करत आहोत तर हा पण प्रयत्न करून पाहूया.मिनलने लगेच तिच्या बाबांना बोलवून घेतले आणि त्यांच्या सोबत गाडीतून आखेवाडला पाठवले. तिथे मोहनरावांना तपासून आयुर्वेदिक औषधे दिली मालिश करायला तेल दिले होते. रोज मिनल आणि संतोष मोहनरावांची काळजी घेत होते. मिनल त्यांच्या औषधांच्या वेळा,पथ्यपाणी व्यवस्थित सांभाळत होती. संतोष तेलाने मालिश करत होता. मोठ्या जावेला मात्र त्याचे काहीच पडले नव्हते.

मोहनरावांची सेवा सुश्रूषा चांगली केल्यामुळे आणि औषधांच्या परिणामामुळे ते लवकर पुर्ण बरे झाले,हिंडू फिरु लागले.

एकदिवस मोहनराव सुलभाताईंना म्हणाले बघ खरे सौंदर्य काय असते ते, तुला आता तरी कळलेच असेल.
तू मिनलला सावळी, कुरुप म्हणून हिणवत होतीस,आता खरे कुरुप कोण आहे सांग?...

सुलभाताईंसमोर आता सारे स्पष्ट झाले होते. 'कुरुप कोण' हे त्यांना आता पुरते पटले होते.
समाप्त
©® सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
३१/५/२४