Login

लग्नानंतर होईल का प्रेम ? - भाग 2

Its story Of Bad Side Of Love
महिनाभर आधी....


"कोणतं मोठं पाप केलं होतं देवजाने ज्यामुळे असली पोरगी माझ्या पदरात पडली" सोनलचे बाबा घरात सगळ्यांसमोर सोनलवर ओरडत होते.

" ही असली हलकट कार्टी जन्माला आली हे माहित असतं तर लहानपणीच विहिरीत टाकून दिली असती हिला " सोनलची आई देखील सोनलवर मोठ्या आवाजात ओरडत होती.

" प्रेम करणं चुकीचं आहे का आई बाबा ? अहो तो सुद्धा चांगलं कमावतो, मला नेहमी खुश ठेवेल तो " सोनल तिच्या आई वडिलांना समजावत होती.

" प्रेम करणं चुकीचं नाही गं तायडे पण त्यांचा धर्म कोणता आपला धर्म कोणता हे तरी पहायचं ना " सोनलचा भाऊ गणेश सोनलला जाब विचारत होता.

" धर्म ? प्रेमात कसला आला धर्म,जात, रंग, रूप.. प्रेम होयचं तेव्हा होतंच.. " सोनल सगळ्यांना समजवण्याचा स्वरात बोलत होती

" होका ? अगं तायडे तो मुस्लिम आहे, त्यांच्याकडे रोज मच्छी, मटण,मासे खातात... तुलाही जबरदस्तीने खायला लावेल तो पोरगा " पुन्हा सोनलचा भाऊ गणेश सोनलवर चिडलेला स्वरात बोलला

" अरे भावड्या त्याच्याशी इतकी एकरूप झालेय की, खूप महिन्यांआधीच मी नॉन व्हेज खायला सुरुवात केलीय " सोनलने घरच्यांना सांगितलं


" शिव शिव शिव... पोरगी हातातून गेलीय आपली, आता कुठं तोंड दाखवायची जागा नाही राहिली आपली " सोनलची आई रडत रडत सोनलच्या वडिलांना सांगत होती.

" तुम्हाला काय वाटतंय ह्याच्याशी मला काही घेणं देण नाही.. तो कुठला पार्थ का काय त्याचं नाव.. त्या मुलाला मी आत्ताच फोन करून ठरलेलं लग्न मोडणार आहे " सोनल चिडून पार्थला फोन लावायला जाते...

" खबरदार जर त्यांना फोन केला तर, जर तू हे ठरलेलं लग्न मोडलंस तर इथंच जीव घेईल तूझा आणि आम्हीपण आत्महत्या करू, शिंदे पाटिलांची इज्जत सर्वकाही असते आणि तिच इज्जत जर तू धुळीत मिसळणार असशील तर आपला जगून तरी काय फायदा " सोनलचे वडील रागात येऊन सोनलवर चिडून बोलत होते..

वडिलांचे कटू शब्द सोनलला खूप दुखावत होते, आई वडिलांना समजवण्यात ती असमर्थ ठरली आणि रडत रडत आपल्या खोलीत जाऊन निजली...

सोनलची आई काहीवेळाने सोनलच्या खोलीत गेली..

" सोनल बाळ उठ आता चल थोडं खाऊन घे, बघ तूझ्या आवडीचं जेवण केलंय " सोनलची आई सोननला म्हणाली

" नको मला जेवण.. ज्या घरात प्रेमाला काडीमात्र किंमत नसते, प्रेम काय असतं हे ज्यां लोकांना समजून घेयचं नसतं त्यांच्याकडे मला जेवण सुद्धा नको वाटतंय "

" असं कसं प्रेम नाही कळत आम्हाला? प्रेम तर खूप करतो मी आणि तुझे बाबा एकमेकांवर आणि आमच्या लेकरांवर.. लग्नाआधीचं प्रेम थील्लर असतं, टाईम पास असतो नुसता... जेव्हा संसाराला सुरुवात होते तेव्हा कळतं आपण कुठं चुकलो होतो.. म्हणून अरेंज मॅरेजला जास्त महत्व आहे आजकाल.. " सोनलची आई सोनलला समजावत होती

" प्रेमाचं काय? ते होईल का अरेंज मॅरेज नंतर ? की नुसती तडजोड राहील नवरा बायकोच्या नात्यात? " सोनलने आईला प्रश्न केला...

" तडजोड?.. अगं काहीही काय बोलतेय? मी तर म्हणते तुझ्या त्या इरफान सोबत तू जर लग्न केलं तर मग तूला तडजोड करावी लागणार... अगं तो जरी चांगलं कमावत असला तरी तो कुकिंगचं कामं करतो, असे दोन चार घरी कुकिंग करणाऱ्या मुलासोबत आयुष्य काढायचं म्हणजे तडजोडच होईल ना.. " सोनलची आई सोनलला समजावत होती.

तेवढ्यात सोनलच्या फोनवर एक मेसेज आला.. तिने तो मेसेज फक्त्त वाचला आणि आईला म्हणाली ठीक आहे करेल मी लग्न तुम्हाला हव्या त्या मुलासोबत...

सोनलच्या आईला खूप आनंद झाला... सोनलच्या आईने सोनलच्या वडिलांना सांगितलं पण तरी देखील त्यांनी सोनलला लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत घरबाहेर पडण्यास मनाई ठेवलेली..