Login

वकिली हिसका. भाग २

पोलिस आणि वकील यांच्यातली जुगलबंदी
वकिली हिसका
भाग २
भाग १ वरुन पुढे.


दोन दिवसांनी अविनाश वकिलांनी सिविल कोर्टात अर्ज केला.
कॉंस्टेबल काशीनाथ याने माझा मुलगा रात्री १० वाजता घरी येत असतांना त्याच्या सायकल च्या वाल्व ट्यूब काढून फेकल्या. त्यामुळे मुलाला रात्री दोन मैल पायी चालत यावं लागलं. परिणामी सायकलची दोन्ही चाकं वाकडी झाली. आणि मुलाला खूप मानसिक त्रास झाला. याकरता मला सायकल च्या नुकसांनी पोटी २५० रुपये आणि जो मानसिक त्रास झाला त्या पोटी ५०० रुपयांची नुकसान भरपाई भारतीय दंड संहिते नुसार कलम ४२६ नुसार काशीनाथ कडून मिळावी.
कोर्टाने अर्ज दाखल करून घेतला आणि काशीनाथला कोर्टात हजार राहण्यासाठी समन्स जारी केलं.
आठ दिवसांनंतर काशीनाथ च्या हातात कोर्टाचं समन्स पडलं. त्याला १५ तारखेला सिविल कोर्टात हजर राहायचं होतं. त्याच्यावर खाजगी मालमततेच नुकसान केल्याचा आणि एका सामान्य नागरिकाला मानसिक त्रास दिल्याचा आरोप होता. काशीनाथने डोक्याला खूप ताण दिला, पण काही लक्षात येत नव्हतं की असं काय त्याच्या हातून घडलं की कोर्टात उभं राहावं लागणार आहे. तो इंस्पेक्टर साहेबांकडे गेला. साहेबांनी समन्स पाहिलं आणि म्हणाले,
“काशीनाथ, हे व्ययक्तिक समन्स आहे, याचा डिपार्टमेंटशी काही संबंध नाही. तुलाच जाऊन हे प्रकरण हाताळावं लागेल. – साहेब.
“म्हणजे मी आता काय करू? माझी काय चूक झाली हे पण मला माहीत नाही. कोणची मालमत्ता? आणि मी काय नुकसान केलं?” – काशीनाथ.
“केस अविनाश वकिलांनी फाइल केली आहे. त्यांच्या मुलांच्या सायकलचं तू काय नुकसान केल ते तुलाच माहीत असणार.” – साहेब.
“साहेब, ती मुलं रात्रीच्या वेळेस विदाउट लाइट आणि डबल सीट जात होती, थोडी समज द्यावी एवढ्याच उद्देशाने मी वाल्व ट्यूब काढली. अजून काही नाही.”-काशीनाथने सफाई दिली.
“तरी पण काशीनाथ वकील साहेबांशी पंगा घेतला हे चुकीचच झालं.” – साहेब.
“तो वकील साहेबांचा मुलगा आहे हे मला माहीत नव्हतं. आणि त्या पोराने पण सांगितलं नाही. मग मला कसं कळणार?” – काशीनाथ.
“साहेब, त्या पोरांनी पण त्यांची चूक कबूल केली. तरी सुद्धा वकील साहेब असं का करताहेत?” – काशीनाथ.
“या वकील लोकांना खूप अभिमान असतो. त्याचाच परिणाम असू शकतो तू १५ तारखेला कोर्टात हजर हो, तिथेच कळेल.” – साहेब.
काशीनाथ डोक्याला हात लावून बसला होता. साहेबांना त्यांची दया आली, ते म्हणाले,
“काशीनाथ तू एकदा वकील साहेबांना जाऊन भेट. माफी माग. हवं तर पाया पड पण केस वापस घ्या अशी विनंती कर.” – साहेब.
“ते माझं ऐकतील का?” – काशीनाथ.
“हे बघ, गरज आपल्याला आहे. प्रयत्न करून बघ. कोर्टात तू त्यांच्या समोर टिकणार नाहीस. हे तरी पटतंय न तुला? कदाचित तू माफी मागीतल्यावर ते विरघळतील. पण एकदा प्रयत्न तर करून बघ.” साहेब.
काशीनाथ दुसऱ्या दिवशी सकाळीच अविनाशच्या ऑफिस मधे गेला. तिथे अविनाश नव्हता पण त्याचा असिस्टेंट भेटला. त्याने सांगितलं की साहेब वलगाव ला शेती आहे तिकडे काही काम निघालं म्हणून गेले आहेत.
“कधी भेट होऊ शकेल?” – अविनाश.
“दोन एक दिवस लागतील.” – असिस्टंट
काशीनाथ परतला.
नंतर त्याला जायला वेळच मिळाला नाही. १५ तारीख उजाडली आणि काशीनाथ कोर्टात हजार झाला. व्ययक्तिक केस असल्यामुळे त्याला सुट्टी घ्यावी लागली होती. त्या दिवशी कोर्टात इतक्या केसेस लागल्या होत्या की अविनाश ची केस लागलीच नाही. कोर्टाच्या क्लर्क ने पुढची तारीख दिली. एक सुट्टी वाया गेली. आधीच पोलीस खात्यात सुट्टी मिळायची मारामार, त्यात ही एक सुट्टी विनाकारण खर्च झाली. काशीनाथ वैतागला, पण काहीच उपाय नव्हता. आता पुढच्या तारखेला पण सुट्टी घ्यावी लागणार होती. काशीनाथ चडफडत घरी परतला.
क्रमश:--

दिलीप भिडे

🎭 Series Post

View all