Login

मनापासूनचं प्रेम जे असते, निरागस, निर्मळ, नि खरं!

प्रेम आणि व्हर्च्युअल प्रेमाची रित

प्रेम म्हणजे शरीराची भूक नाही…
प्रेम म्हणजे मनांची भेट.
प्रेम म्हणजे दोन हृदयांनी एकमेकांवर ठेवलेला अढळ विश्वास.
आजच्या डिजिटल युगात प्रेमाचं रूप खूप बदललं आहे.
मोबाईल रिचार्ज, महागडी हॉटेल्स, नाईट आउट, गिफ्ट्स, शुगर डॅडी–शुगर मॉम…
या दिखाव्याच्या जगात खरं प्रेम कुठेतरी हरवत चाललंय.

यात एक नवीन रूप वाढलंय ते
लिव्ह-इन रिलेशनशिप आणि व्हर्च्युअल प्रेम.
लिव्ह-इनमध्ये दोन माणसं एकत्र राहतात, पण हेही प्रेम तेव्हाच सुंदर होतं,
जेव्हा त्या नात्यात स्वार्थ नसतो, हिशेब नसतो,
फक्त सोबत असते, विश्वास असतो, आणि एकमेकांना समजून घेण्याची भावना असते.
शरीराच्या जवळीकीतून नाही, तर मनाच्या जवळीकीतून जे नातं उभं राहतं…
तेच खरं लिव्ह-इन प्रेम.
आणि व्हर्च्युअल प्रेम तर आजच्या जमान्याची नवी कथा…
स्क्रीनवरून बोलताना मन जुळतं,
हजारो किलोमीटर अंतर असलं तरी भावना जवळ येतात.
पण व्हर्च्युअल प्रेमही तेव्हाच खरं असतं,
जेव्हा त्यात फसवणूक नसते, खोटं प्रोफाइल नसतं,
फक्त एका मनाचं दुसऱ्या मनाशी जुळलेलं खरं नातं असतं. दिखावा, फोटो फिल्टर, स्टेटस या गोष्टी त्यात नाही,
तर सत्य, प्रामाणिकपणा आणि निरागस विश्वास असतो.

आजही मनाच्या एका कोपऱ्यात
लैला–मजनू, हीर–रांझा, राधा–कृष्ण यांच्यासारखं निरागस प्रेम जिवंत आहे.
ते प्रेम शरीरावर नाही, तर भावनांवर उभं असतं;
क्षणभराच्या सुखासाठी नाही, तर आयुष्यभराच्या साथीसाठी जन्मतं.

खरं प्रेम म्हणजे काय तर
तिच्या हातात हात ठेवताना मन शांत होणं,
त्याच्या शब्दावर पुन्हा नव्याने विश्वास बसणं,
नाटक नाही, नखरे नाही, दिखावा नाही
फक्त मनापासून केलेली मनःपूर्वक साथ.

ज्यांना देह महत्त्वाचा वाटतो, त्यांचं प्रेम आटणाऱ्या दवबिंदूसारखं.
पण ज्यांच्या प्रेमात विश्वास असतो,
त्यांना मिळतं सुख—भरपूर, कायमचं, आणि मनापासूनचं.

प्रेम रिचार्ज कार्डनं टिकत नाही…
ते टिकतं संवादानं.
प्रेम महागड्या हॉटेलनं वाढत नाही…
ते वाढतं वेळ देऊन, एकमेकांना समजून घेऊन.
नाईट आउटने नव्हे…
तर मनाच्या अंधाऱ्या क्षणांत हात धरून उभं राहिल्यानं.

खरं प्रेम साधंच असतं
एक हसू, एक संदेश, एक काळजीचं वाक्य,
आणि कधी कधी एक अपूर्ण वाक्य… जे पूर्ण करण्यासाठी कुणीतरी असतं.

या युगात
लिव्ह-इन, व्हर्च्युअल, किंवा परंपरागत प्रेम
कुठल्याही रूपातलं प्रेम तेव्हाच खरं
जेव्हा ते पैशावर, स्वार्थावर, गरजांवर उभं राहत नाही…
तर मनाने मनाशी जोडलेल्या निर्मळ भावनेवर उभं राहतं.

प्रेम करा… पण मनापासून.
प्रेम द्या… पण मनःपूर्वक कारण की, शरीराचं प्रेम तात्पुरतं असतं, पण भावना आणि विश्वासाचं प्रेम आयुष्यभर सोबत राहतं.

निरागस प्रेम करा…
जग अजूनही त्यालाच सर्वांत सुंदर मानतं.

सुनिल पुणे TM 9359850065
0