Login

मनाचा खेळ सारा भाग ३

खेळ सारा
गेल्या भागात आपण पाहिले की राधा राजला त्या आजोबाबद्दल सांगते. राज राधाची खूप काळजी घेतो. त्या दिवशी तो तिला बाहेर फिरायला घेऊन जातो, जेव्हा ती घरी येते तेव्हा पाहते की, त्या आजोबांची सून तिच्या दारात उभी असते.  राधा विचारांच्या तंद्रीत असते.
आता पाहू पुढे.

"माझं नाव सुमित्रा. मी इथे आताच राहायला आले आहे. खरं तर मला अर्जंट मध्ये ब्लाऊज शिवून पाहिजे होता आणि नवीन असल्या कारणाने मला इथे जास्त काही माहित नाही. कांता ताईची भेट झाली, तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही खूप छान कपडे शिवता म्हणून तुमच्याकडे शिलाईसाठी आले आहे."

"हो शिवून देईन. कधीपर्यंत पाहिजे?"

"परवा पर्यंत होईल का? कारण जवळचं लग्न आहे."

"हो चालेल."

"ब्लाउज पीस आणि मापाचा ब्लाऊज देखील आहे." सुमित्राने  हातामध्ये कॅरीबॅग होती ती तिला दिली.

सुमित्राचा मोबाईल फोन वाजला.  तिच्या नवऱ्याने नरेशने फोन केला होता.  पलीकडून नरेश काहीतरी बोलत होता.  ते ऐकून ती घाई गडबडीत निघाली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काहीतरी घडल्यासारखं वाटत होतं.

राज देखील गाडी पार्क करून आला. राधा अजूनही दारातच उभी होती.

"राधा, काय हे इथेच उभी आहेस आणि हातात ही कसली  पिशवी?"

"ते बाजूच्या विंगमध्ये नवीन राहायला आलेल्या मावशी आहेत त्या आल्या होत्या. त्यांचेच कपडे शिवायचे आहे."

"बरं."

ती तशीच दारात उभी राहून त्यांच्या खिडकीकडे पाहत उभी होती.

"राधा, तिकडे काय बघतेय?"

" काही नाही." 

"अगं मग आत चल."

"त्यांना कोणाचा तरी फोन आला. त्या फार घाईगडबडीत गेल्या. त्यांच्या घरी काही झालं आहे का?"


"राधा, काहीही काय विचार करते."

"आपण एकदा जाऊया का ? बघूया का ?"


राजला चांगलच माहीत होतं.  जोपर्यंत तिथे जाऊन काय झालं ते बघणार नाही तोपर्यंत तिच्या जिवात जीव येणार नाही.

"ठीक आहे.  चल बघूयात.  दोघेही सुमित्राच्या घरी गेले.


सुमित्राने दार उघडलं. 

"मावशी, काही झालं का?  तुम्ही फार घाईगडबडीत निघालात, म्हणून म्हटलं विचारावं.".


" अगं सासरेबुवा पाय घसरून खाली पडले, म्हणून मिस्टरांनी मला बोलावले. आता ठीक आहेत."

राधाने आणि राजने  दारातूनच घरात नजर वळवली. त्यांचा मुलगा त्यांचे पाय चेपत होता.

"या ना आत." सुमित्राने बोलावले.

"नंतर केव्हातरी येईन." राधा म्हणाली.

राज आणि राधा घरी गेले.

"बघितलं का राधा?" राज बेडवर आडवा पडत म्हणाला.

"काय?"

"तू कालपासून त्या आजोबांचा विचार करतेय. बघ मुलगा आणि सून किती काळजी घेतात."

"हो काळजी घेतात पण.."

"आता पण काय?"

"ते असं का बोलत होते जुन्या घरी जायचं?"

"अजूनही तुझ्या डोक्यात तेच आहे का? आता त्यांचे वय झाले आहे.  कधी काय बोलतील सांगता येत नाही."

"कळतंय पण वळत नाही."


"तू आता जास्त विचार करू नको. सगळं ठीक आहे. कधी कधी आपण जसा विचार करतो तसं नसतं, त्यामुळे जास्त विचार करू नको." राज तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला."


"मलाही तेच वाटतंय बहुतेक मी चुकीचा विचार करत आहे."

"राधा, अजून एक आपण त्यांना ओळखत नाही आणि त्यांच्या पर्सनल आयुष्यात आपण विनाकारण ढवळाढवळ न केलेली बरी."

" राज, तुझं म्हणणं मला पटतंय पण माहित नाही का?  हल्ली मला फार अस्वस्थ वाटतं. तुला तर माहित आहे माझं मनच स्थिर नसतं. डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिल्या आहेत त्या वेळेवर घेते; पण तरीही हे विचारांचे चक्र काही केल्या थांबत नाही.  सतत नकारात्मक विचार छळतात.  मलाच समजत नाही हे सगळं कसं थांबवावं.  एखादी गोष्ट घडली, तर ती डोक्यातून जातच नाही  आणि हल्ली आजूबाजूला इतकं काही घडत आहे, कितीही सकारात्मक राहण्याचा विचार केला तरीही राहू वाटत नाही. असं वाटतं काहीतरी वाईट घडेल."


"राधा, तुला एक सोप्पा उपाय सांगू का ? जेव्हाही वाटतं काहीतरी वाईट घडणार, काहीतरी अघटीत घडणार,  तेव्हा दीर्घ श्वास घ्यायचा आणि स्वतःच्या मनाला समजवायचे सगळं काही व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित आहे.  जितक्या चांगल्या सूचना देशील ते मन ऐकणार आणि आपलं मन जे काही ऐकणार तसेच आपल्याला अनुभवतं."


" तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तसं मी नेहमी प्रयत्न करते. सगळं व्यवस्थितच होईल. सगळं छान आहे."

"किती हुशार आहे माझी बायको.  जे काही सांगतो ते शांतपणे ऐकते आणि तसंच वागते. खरंतर मी याबाबतीत फार नशीबवान आहे. माझी बायको माझं  ऐकते."


"पुरे हा आता चण्याच्या झाडावर चढवायची गरज नाही."

अनुज दोघांचं बोलणं ऐकत होता.  त्याने राधाला विचारलं.

"आई, आपल्या इथे कुठे आहे  झाड?  आणि तू त्याच्यावर कसं चढणार ? तुला झाडावर चढायला येतं का ?  मला पण शिकवशील का ? हे ऐकून राधा आणि राज दोघेही हसू लागले. अनुज मात्र त्या दोघांकडे स्वतःच्या उत्तराची वाट बघत बसला होता.


सुमित्राला अर्जंटमध्ये ब्लाउज शिवून पाहिजे होता;  म्हणून राधाने तो  शिवला होता.

जवळचं लग्न आहे असं सुमित्राने सांगितलं होतं. राधाने विचार केला आजोबांमुळे त्यांना यायला जमलं नसेल, म्हणून ती स्वतःच सुमित्राकडे गेली.


क्रमशः
अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all