Login

अनुबंध पुस्तक समीक्षण

शांता शेळके यांच्या अनुबंध पुस्तकाविषयी...
शांताबाई शेळके यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

पुस्तकाचे नाव - अनुबंध
लेखिका - शांता शेळके


शांता शेळके हे प्रसिद्ध कवयित्रींपैकी आवर्जून उल्लेख केला जाणारे एक नाव. 'गजानना श्री गणराया' पासून 'रेशमाच्या रेघांनी' सारख्या विविध प्रकारच्या गीतांना हाताळलेल्या शांताताई एक उत्तम कवयित्री असण्यासोबतच एक उत्तम गीतकार, अनुवादक, लेखिका होत्या. त्यांनी स्वतःला साहित्याच्या विविध प्रकारांद्वारे व्यक्त केले आहे. सहजपणा हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

शांता शेळकेंच्या कवितांचा अनुभव तर आपण बरेचदा घेतो. त्यामुळे आज मी त्यांच्या एका कथासंग्रहाबद्दल सांगेन.

अनुबंध या कथासंग्रहाची सुरुवात होते 'आरसा' या कथेपासून. म्हटलं तर ही संसाराची गोष्ट आहे अन् म्हटलं तर संसारानंतरची. श्रीनिवास आणि त्याची वीस वर्षांची सहचारिणी गीता, जिचं अचानक निधन होतं. अशातच श्रीनिवासला गीताच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं पत्र येतं आणि त्याची त्याला भेटण्याची उत्सुकता वाढू लागते. भेटीसोबत कथानक पुढे सरकतं आणि गीताला 'आरसा' उपमा मिळण्याचा उलगडा होतो.

'मुक्तामामी' या कथेतून बरेच पैलू अनुभवायला मिळतात. प्रेमळ, मायाळू, रूपवान म्हणावी अशी मुक्ता लग्न करून एका अतिशय श्रीमंत घरात गेली. नवरा वयाने मोठा आणि रूपाने अगदीच तिच्या विरूद्ध म्हणावा असा होता; पण स्वभावाने मुक्ताला साजेसा नक्कीच होता. मूलबाळ नसल्याने पुढे जाऊन या पतिपत्नींच्या वाटेला आलेलं एकटेपण मनाला वेगळीच चुटपुट लावून जातं. पती अर्थात मामांनी मुक्ताच्या भविष्याचा विचार करून आपल्या मृत्यूच्या अवघ्या दोन दिवस आधी भावाच्या मुलाला दत्तक घेतलं; पण तरीही मुक्ताच्या पदरात पडलेला एकाकीपणा आणि तिची ती शेवटची इच्छा विचार करायला लावणारे आहेत.

'लिलू' या कथेमध्ये तर मैत्रीचं एक वेगळंच; पण कदाचित बऱ्याच ठिकाणी जाणवणारं जाळंच दाखवलं आहे असं म्हणता येईल. मैत्रीचं एक वर्तुळ जिथे बाह्यता तर घट्ट मैत्री दिसते, मात्र आतून ती मैत्री खरंच मैत्री म्हणावी का अशी शंका मनात उपस्थित होते. मैत्रिणींच्या वागण्यामुळे लिलाला आपण या वर्तुळातून दूर लोटले जातोय का असे वाटू लागते. प्रत्येकीच्या आयुष्यातील आपलं स्थान खास असावं म्हणून तिने शंका नावाच्या अस्त्राला हाताशी धरून खेळलेली चाल मनामनांत बरीच खळबळ माजवणारी ठरते. मैत्री, ईर्षा की आणखी काही, हे सांगणारी ही लहानशी कथा.

'वाढदिवस' म्हणजे सुभद्राबाई आणि भय्यासाहेबांची कथा किंवा असं म्हणता येईल की त्यांच्या सुखी संसाराची ही कथा आहे. माणूस आपल्या आयुष्यात सुख यावं, पैसा मिळवावा यासाठी प्रयत्न करत असतो. जेव्हा मेहनतीचं फळ म्हणून सुख पायाशी लोळण घेतं, तेव्हा खरंच सर्व काही मिळालं असे विचार मनात येतात. मात्र खरंच त्यावेळी आपल्याकडे सगळं काही असतं का? आपण खरंच सुखी असतो का? माणसांच्या गराड्यातला एकटेपणा काय असतो, अशा बऱ्याच गोष्टी सांगणारी ही कथा आहे.

'सुनीतीची सासू' या नावातूनच तसा कथेच्या विषयाचा अंदाज येतो. सुनीतीचं लग्न ठरण्यापासून ते लग्नानंतरचा काही काळ दाखवणारी ही लहानशी कथा आहे. यातलं ठळक पात्र म्हणजे तरुलताबाई, अर्थात सुनीतीची सासू! या तरुलताबाई म्हणजे अतिशय कर्तबगार, बुद्धिमान, संपन्न असं व्यक्तिमत्त्व. मात्र सतत स्वतः सगळीकडे पुढेपुढे करणं, नेहमीच तरुण किंवा खेळकर असल्यासारखं वागणं आणि इतरही काही गोष्टींमुळे सुनीती अन् तिच्या नवऱ्याची अवस्था मोठ्या वृक्षाखालील खुरटलेल्या रोपासारखी झाली आहे असं सुनीतीला वाटतं. ते का? चूक की बरोबर? कर्तबगारी अशीही असते? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कथा वाचून बघायला हवी.

'रहस्य' कथा नावाप्रमाणेच एका रहस्याभोवती फिरते. श्रीनिवास आणि लक्ष्मीचा सुखी संसार तर सुरू असतो; परंतु एका गुपिताने श्रीनिवास नेहमीच घाबरून जाई. तसं पाहता हे रहस्य सर्वांना ठाऊक आहे; पण त्या रहस्याची दुसरी बाजू श्रीनिवासने स्वतःच्या मनात दडवून ठेवलेली असते.

पुढील कथेत रजनी नावाचे 'कोडे' समजून घेताना अगदी साधे सरळ महाविद्यालयीन जीवनातील प्रसंग समोर येतात. कोणाचे काय चाललेय, कोण कोणासोबत फिरत आहे, अशा एक ना अनेक गोष्टींमध्ये नको तितकी रुची घेणारी रजनी अनेक वर्षांनंतर वेगळ्याच रूपात समोर येते आणि रजनीचं आयुष्य एखादं कोडं वाटू लागतं.

'हॅम्लेट' कथेतील पद्मनाभला अचानक स्वतःच्याच घरात परकेपणा जाणवू लागतो. श्रीमंत कुटुंब, व्यावसायिक नाती, काही गुपिते तर काही संधी... अशा गोष्टींची रेलचेल असलेली ही कथा.

पुढे 'थोरली' या कथेतून मांडलेल्या थोरलेपणामागच्या जबाबदाऱ्या‌ अन् इतर गोष्टी विचारात पाडणाऱ्या आहेत.

म्हातारपणात दोघे नवरा बायको एकमेकांच्या साथीने जगत असतात. आपल्याला कोणीही उपयोगी न पडूनही त्यांच्यासाठी मात्र सतत धावपळ करणारे तात्या म्हणजे एक वेगळंच पात्र. एकूणच काय तर या 'सावल्या' कथेत माणसाचा मूळचा स्वभाव काही सुटत नाही याची पुरेपूर जाणीव होते.

'जिवती' कथेची मांडणी खरोखरच सुरेख आहे. टेकाडावरचे रम्य म्हणावे असे घर, नाना आणि नानी, मूलबाळ नसलेल्या या दोघांचे सर्वांपासून अलिप्त असे स्वतःचेच एक जग आणि त्या जगात फक्त 'ती'ला असलेली खास जागा, सर्वच आपलंसं करणारं आहे. एका काळानंतर अगदीच पालटलेलं चित्र पाहणंही तितकंच हृदयस्पर्शी वाटतं.

'अगम्य' म्हणजे नावाप्रमाणेच अगम्य कथा वाटते. दोन लहानग्या मुलींची मैत्री वाचताना मनाला छानच वाटते. मात्र एका अपेक्षित शेवटासोबतही कथेतील अहिल्येचं आयुष्य आपल्यासाठी काहीसं अनाकलनीयच राहतं.

'अनुबंध' या कथेमध्येही नावाला साजेसे असे मायेचे पाश बघायला मिळतात. दातारबाईंचा आपल्या नातींप्रति असलेला जिव्हाळा अन् अचानक लेकीच्या पत्रामुळे मनात माजलेला कल्लोळ वाचकाला कथेसोबत जोडून ठेवतो.

सर्वात शेवटी असलेली 'शकुन दिवस' कमालीचे शब्द सांगून जाते. एकेकाळी नाटकविश्व गाजवणारा नट, ज्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कित्येक लोक भेटीस येत असत; उतारवयात मात्र एकटेपणा, त्याच्या नावाचा विसर अशा गोष्टी त्याला पाहायला मिळतात. या नटाने, म्हणजेच नानांनी आपल्या पत्नीला शेवटी बोलून दाखवलेला विचार आणि ते हसू विचारात पाडणारे आहे.

शांता शेळकेंच्या काव्यशब्दांची जशी भुरळ पडते, तसेच या कथासंग्रहातील शब्दप्रयोगही मनात घर करून राहतील असे आहेत. या सर्व कथांमधून मानवी स्वभावाचे विविध पैलू अनुभवायला मिळतात. नानांचा माईंसोबतचा तो 'आज मेलो असतो तर...' अर्थाचा संवाद विशेष आवडला. एकूणच बोलायचे झाल्यास असंख्य पुस्तकांची पारायणे करून झालेल्या व्यक्तीला कदाचित हा कथासंग्रह काहीसा साधारण वाटू शकतो; परंतु नवख्या वाचकांना हा कथासंग्रह नक्कीच खूप आवडेल. अर्थात, वाचनप्रेमींनाही आवडेलच म्हणा!

शांता शेळकेंच्या काव्याव्यतिरिक्त लेखणीला अनुभवण्यासाठी एकदा तरी हा कथासंग्रह नक्कीच वाचून पाहायला हवा.

© कामिनी खाने

सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.