पुस्तकाचे नाव : देवी रक्षति रक्षितः
लेखिका : सारिका कंदलगांवकर
लेखिका : सारिका कंदलगांवकर
लेखिका सारिका कंदलगांवकर म्हणजे प्रामुख्याने ऑनलाईन व्यासपीठांवर लेखन करणाऱ्या एक मराठी लेखिका आहेत. कौटुंबिक विषयांवर तर त्यांची विशेष पकड आहेच; पण प्रेम, सामाजिक, रहस्य रोमांचक कथालेखनातही हातखंडा आहे. ऑनलाईन प्रकाशित साहित्यासोबतच लेखिकेची पुस्तक स्वरूपातील 'समर्थांची लेक' ही कादंबरीही प्रसिद्ध आहे.
मुखपृष्ठावर असलेले ते देवी आणि भैरवाचे शांत चेहरे कथेच्या शिवशक्ती स्वरूपाला, वातावरणाला अनुरूप आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरची शांतता कथानकातील शिवशक्तीच्या संयम आणि स्वभावाला साजेशी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कपाळावर असलेली अक्षरे, यंत्रचिन्ह, तसेच सभोवताली विखुरलेले रंग कथानकाची गूढता व्यक्त करतात. माथ्यावर असलेले शिवशक्तीचे रूप आणि त्याच्या मधोमध असलेला अस्पष्ट स्त्री देह म्हणजे कथानकाचे सार आहे. चित्रकार विजयराज बोधनकर यांनी चपखलपणे कादंबरीला व्यक्त केले आहे असे म्हणता येईल. आणि याला साथ देणारे कादंबरीचे शीर्षक 'देवी रक्षति रक्षितः' म्हणजे देवीचे रक्षण करणारा आणि या रक्षकाचे रक्षण करणारी देवी, हे स्पष्ट करणारा दुवा ठरते. मलपृष्ठावर असलेला कादंबरीतील एक रोमांचक प्रसंग आणि हसमुख असा लेखिकेचा फोटो, एकाच वेळी कादंबरीच्या दोन बाजू स्पष्ट करणारे ठरतात. आणि आपसूकच कथा नक्की कशी असेल ही उत्सुकता निर्माण होते.
सुरुवातीलाच प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, लेखक चन्द्रशेखर टिळक यांची प्रस्तावना पुस्तकावर अगदी चपखल शब्दांत भाष्य करते. या काही विषयांवर हल्ली होत असलेले लिखाण, तो प्रकाशझोत आणि त्याला साजेशा अशा लेखिका सारिका कंदलगांवकर व त्यांचे लेखन, यांची सांगड घालणे मनोमन पटते. लेखिकेची ही कादंबरी अध्यात्म, पौराणिक पार्श्वभूमीची आठवण करून देत असली, तरीही ही कादंबरी आजच्या जमान्यातील पात्रांची आहे हे सांगणे कादंबरीचे वास्तव स्वीकारायला लावते. टिळक यांचे ‘लेखिकेच्या कथानकाला तांत्रिकतेची ओढ जास्त असते.’ हे एक वाक्य या सर्व स्पष्टीकरणाला अधोरेखित करते. याशिवाय कादंबरीचा थोडक्यात आढावा, त्यातील वैशिष्ट्ये उत्सुकता निर्माण करतात. टिळक यांनी नमूद केलेला हासुद्धा मुद्दा आवडला की कथेतील सर्व ठिकाणे इतक्या लवकर फिरून होत नाहीत; पण कादंबरी असल्याने इतके साहित्यिक स्वातंत्र्य दिलेच पाहिजे.
लेखिकेचे मनोगत वाचून आजच्या साहित्यापासून दूर राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत लेखिकेला लेखनात मनस्वी साथ देणारे कुटुंब लाभले याचा आनंद वाटतो. 'स्वप्नं सत्यात उतरतात' या उक्तीप्रमाणे एका स्वप्नातून ही कादंबरी सत्यात साकारली गेली आहे आणि तो एकूणच प्रवास लेखिकेने संक्षिप्त स्वरूपात मांडलाय.
कालीमातेच्या मूर्तीसमोर घडणाऱ्या एका प्रसंगापासून या कथानकाची सुरुवात होते. आता काय होणार असे वाटत असतानाच कळते की हे एक स्वप्न होते. इथेच कथेच्या नायिकेची भेट होते, ती म्हणजे शांभवी! संवादादरम्यान तिचा भाऊ अष्टमीचा उल्लेख करतो आणि खऱ्या अर्थाने कथेतील गूढ निर्माण व्हायला सुरुवात होते. पुरातत्व विभागात काम करणारी शांभवी, तिचे आईबाबा, भाऊ पार्थ, मैत्रीण जयंती, अपघातामुळे ओळख झालेला कपिल आणि शांभवीचा बॉस असलेला रूद्र या निवडक पात्रांभोवती फिरणारे हे कथानक आहे. नेमकीच पात्रे अधूनमधून भेटीला येतात आणि कादंबरीत सुटसुटीतपणा जाणवतो. अधूनमधून झलक दिसणारा 'तो' म्हणजे नक्की कोण? स्वप्नात दिसणारे पुसट चेहरे कोणाचे? हे प्रश्न कादंबरीच्या शेवटापर्यंत विचार करायला पुरतात. शांभवीच्या वडिलांनी केलेला खुलासा, कपिलकडून झालेला शक्तीपीठाचा उल्लेख, शांभवीच्या मनातील विचारमंथन अन् प्रश्न आणि एका अघटितातून सुरू झालेला प्रवास कथेला रंजक वळणावर घेऊन जातो.
परिस्थितीने आणलेल्या एका वळणाची सुरुवात पुन्हा एकदा शक्तीपीठापासूनच होते. आईबाबांचा मृत्यू, शांभवीचे अटक वॉरंट, नाशिकला जाणे, हे सगळे पूर्वनियोजित होते की खरोखरच वेळेनुसार घडत होते? प्रवास आणि त्यात डोक्यात विचारांचे काहूर माजलेली शांभवी पाहून नकळत मनातील हळवा कोपरा जागा होतो. हळूहळू उलगडणारी शक्तीपीठे, शिव-सतीची कहाणी, इतरही पौराणिक कथा, संदर्भ, काही ज्ञात तर काही अज्ञात गोष्टी, जरी आधी ऐकले वाचले असतील किंवा नसतीलही, तरी वाचकाला खिळवून ठेवतात. कपिल आणि आबासाहेबांचा अति चांगुलपणा खरोखरच निर्मळ आहे की नाही हे कथानक पुढे गेल्यावरच स्पष्ट होते.
मठपतींच्या मंत्रातून मिळालेला मार्ग आणि दशमहाविद्यांच्या दिशेने नव्याने सुरू झालेला प्रवास वाचकाला या प्रवासासोबत जोडून ठेवण्यात यशस्वी ठरतो. नाशिक, पाथर्डी, तुळजापूर, कोलकाता, आसाम, उमानंद द्वीप, पुरी,... अशी ठिकाणे असोत किंवा मग नवनाथ, दीन महाराज मठ, कालीमाता, भैरव, कालिका, बामाखेपा, कामाख्या, उमानंद, दशावतार, पंचायतन, दशमहाविद्या, विमला, जगन्नाथ, तारातारिणी,.. इ. असोत, प्रत्येक वेळी काहीतरी नवा उलगडा होतो. मधूनच जयंतीची शंका घ्यायला लावणारी झलक, तर मधेच शंका वाढवणारा कपिल जाणवत राहतात. रूद्र नावाचा रहस्य दडवणारा खडूस बॉस नक्की रक्षक की भक्षक? हे सर्व तर कादंबरी वाचल्यावरच समजते.
शेवटाकडे आल्यावर पुन्हा एकदा तोच मंत्र पडद्यासमोर येतो आणि या रहस्यमय वातावरणावरचा पडदा दूर होतो. शेवटी फायद्याशिवाय कोणासाठी काही करणारे दुर्मीळच! त्यामुळे 'आपल्या' चेहऱ्यांमागचे कपटी चेहरे आणि रहस्यमय वागण्यामागचे 'आपले' चेहरे याचा अंदाज बांधणे कठीणच... शिवशक्तीचे मिलन आणि 'देवी रक्षति रक्षितः' शीर्षकाला साजेसा असा कादंबरीचा शेवट मनाला भिडतो. सोबतच शेवटी मात्र लेखिकेने एका नव्या अध्यायाचे धागेदोरे सोडले आहेत.
पौराणिक किंवा त्या प्रकारचे लिखाण वाचायला न आवडणाऱ्यांनाही रंजक वाटेल असे हलकेफुलके तरीही अगदी अभ्यासपूर्ण लेखन या कादंबरीच्या निमित्ताने वाचायला मिळते. आसाममध्ये असताना 'जिथे अंत आहे तिथेच आरंभ आहे.' हे सांगतानाचे कपिलचे बोलणे मनाला स्पर्शून जाते. लहानसहान गोष्टींमधून वाचकांना कथेसोबत खिळवून ठेवणे लेखिकेला छान जमले आहे. लेखनशैलीही आवडावी अशीच आहे. साहित्यिक स्वातंत्र्याबाबत सुरुवातीलाच भाष्य केलेले आहे त्यामुळे यावरून कुठेही वास्तवासोबत तुलना होऊ शकते, ते नक्कीच टाळले जाईल. पुस्तकात काही तुरळक शब्दचुका आहेत; पण त्या तांत्रिक कारणांमुळे असाव्यात. बाकी, पुस्तकाचा छपाई दर्जा अतिशय उत्तम आहे. विषयाचा आवाका फार मोठा आहे; परंतु लेखिकेने निवडक मुद्द्यांचा आणि पात्रांचा वापर करून उत्तम रचना केली आहे असे म्हणता येईल. किचकटपणा नसल्याने, संदर्भांचाही उल्लेख केल्यामुळे फक्त हाडाच्या वाचकांनाच नाही, तर साधारण वाचकांनाही कथानक जिव्हाळ्याचे होण्याची शक्यता आहे. देव म्हटले की तसा संवेदनशील विषय; पण तरीही उत्तमरीत्या या विषयाला न्याय दिला आहे. एकूणच, कादंबरीचा साहित्यिक दर्जा उत्तम आहे.
अशी ही श्रद्धा, मोह, रहस्य, पौराणिक संदर्भ, हळुवार डोकावणारे प्रेम, वास्तव, कल्पना, वारसा, देव, तंत्रविद्या, प्रवास, इ.ची सांगड घालून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी ही अभ्यासपूर्ण कादंबरी एकदा नक्की वाचून पहा.
© कामिनी खाने
© कामिनी खाने
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.