कवी ग्रेस
प्रसिद्ध लेखक, कवी 'ग्रेस' म्हणजेच माणिक सीताराम गोडघाटे. आज या माणिक गोडघाटे अर्थात ग्रेसचा जन्मदिवस. मी आतापर्यंत लेखकाचे संध्याकाळच्या कविता, राजपुत्र आणि डार्लिंग हे काव्यसंग्रह; वाऱ्याने हलते रान आणि चर्चबेल हे ललितसंग्रह वाचले आहेत. यासोबतच पूर्वी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेलं ललितही वाचलंय. आताही कुठे काही संदर्भ लेख मिळाले की वाचले जातातच. यावरूनच आज हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करते. कारण ग्रेस यांच्या ललित लेख अथवा कवितांचं रसग्रहण किंवा समीक्षण करण्याचं धाडस काही कधी केलं गेलं नाही.
मला ग्रेस एक वेगळंच रसायन वाटतात. त्यांच्याबद्दल बरेचसे समज प्रसिद्ध आहेत. पण मुळात स्वतःच्या नियमाने, मनाने चालणाऱ्या माणसाला केवळ आपल्याला पटलं नाही म्हणून नाव का ठेवावं बरं? मी तर म्हणेन की ते नेहमीच नावाप्रमाणेच 'ग्रेसफुली' जगले आणि ते जगणं बऱ्याच विचारांना जन्म देणारं ठरलं.
बरेचदा ग्रेस म्हणजे कमाल, ग्रेस म्हणजे असे नि ग्रेस म्हणजे तसे या आशयाची वाक्यं मी ऐकली वाचली आहेत. निरीक्षण बऱ्यापैकी चांगलं असल्याने कोणाचं वाक्य कितपत मनापासून आलंय हे जाणवून येतंच. मग प्रश्न पडतो की ग्रेसबाबत समज, गैरसमज असण्याचं मूळ हेच तर नसेल? हे अगदी खरं आहे की ग्रेस नावाचं गारूड मनावर राज्य करायला लागलं तर सतत हवंसं वाटतं; पण ऐकीव माहितीवर आवडीनिवडी ठरवणारे अन् 'माहिती' पसरवणारेही तर असतातच की! माझ्या मते अनुभवांच्या जोरावर शिक्कामोर्तब करणं खरं शहाणपणाचं लक्षण असावं.
ग्रेस... मुळात हे नावच किती वेगळेपणा जपणारं आहे. या नावामागची कहाणी बहुतेक सर्वांना ठाऊक असेल. हॉलिवूड अभिनेत्री इन्ग्रिड बर्गमन हिच्या इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस या चित्रपटात 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य होतं. या शब्दाची त्यांना चांगलीच भुरळ पडली आणि ते नाव धारण केले. “या नावामुळे माझ्या आत्म्यावरची धूळ उडाली. मला माझ्या प्रतिभेचा साक्षात्कार झाला.” असे ग्रेस यांनी म्हटले होते.
'मी महाकवी दुःखाचा' असं स्वतःसाठी म्हणणं इतकंही सोपं नसावं. मात्र हा गूढता कोळून प्यायलेल्या माणूस स्वतःसाठी अशी कित्येक वाक्यं सहज बोलायचा. मला वाटतं प्रत्येक गोष्ट इतकी सहज सोपी नसते. त्यामुळे ग्रेसला जाणून घ्यायचे असेल, ग्रेसचे शब्द अन् त्या भावना अनुभवायच्या असतील तर त्या माणसाने दोन गोष्टी करणं गरजेचं असेल. त्या गोष्टी म्हणजे भान विसरून लेखनात हरवणं आणि भान ठेवून लिखाण जगणं!
मुळात ग्रेस यांच्या शब्दांत एक जादू आहे. शब्दसौंदर्य भुरळ घालणारे आहे. कधीकाळी सौंदर्यशास्त्र शिकवलेल्या या माणसाला सौंदर्याची जाण असेलच ना. त्यांच्या लेखनात प्रतिमा, नाद, उपमा, लयबद्धता आवर्जून जाणवतात. लिखाणात एक गूढता असते हेही खरं. बऱ्याच रचनांमध्ये एक साधासा अर्थ स्पष्ट करणारे शब्द, ओळी अर्थातच अस्तित्वात आहेत. ग्रेस यांनी राखलेली ती गूढता मात्र प्रत्येक वेळी लक्षात येईलच असं नाही. त्यांच्या शब्दांचे विविधांगी पापुद्रे बरेचदा शब्द मनात घोळल्यावर लक्षात येतात किंवा कधी ते लक्षात येतच नाहीत. मात्र कवीच्या मनातून आलेल्या शब्दांना दिलेलं 'दुर्बोधतेचं' नाव माझ्या मनाला आजवर पटलं नाहीये. ठीक आहे, काही कविता समजण्यापलिकडच्या असतील; पण म्हणून कवीच्या इतर शब्दांनाही 'दुर्बोध' शिक्क्याचं गालबोट लागत असेल तर ते कुठेतरी खटकतं. शेवटी व्यक्ती तितके विचार, त्यामुळे 'कविता' दुर्बोध नक्कीच होऊ शकते; पण 'कवी' दुर्बोध नक्कीच नसेल. तरीही ग्रेस यांनी स्वतः मात्र या गोष्टीचा कधीच विचार केला नाही, हे खरंच कौतुकास्पद वाटतं. आजकाल एका नकारात्मक समीक्षेमुळे अतिशय दुःखी होणारे लेखक, कवी पाहायला मिळतात. मग या 'दुर्बोध' कवीने काय करायला हवे होते? कदाचित त्यांना स्वतःच्या आत्ममग्न असण्याची पावती या तऱ्हेने मिळाली असावी. पण यातून या आत्ममग्न व्यक्तीची प्रतिभासंपन्नता झाकली जाणार नाही ना! महत्त्वाचं म्हणजे दुर्बोधता तरी काय वाचनाशिवाय कळते?
ग्रेसच्या शब्दांबद्दल काय बोलू? त्यांचे ललित लेख म्हणजे वाचतच राहावे वाटणारे एक वेगळेच आकर्षण आहे. शब्दांच्या मोहात पडणं इथे आपसूकच घडतं. आजही आठवतंय की चर्चबेल हे पुस्तक ग्रंथालयात वाचण्यात आलेलं. ग्रेस यांच्या इतर पुस्तकांच्या तुलनेत हे पुस्तक तसं सोपं वाटलं. वाळूचे माहेरघर लेखातील 'एका सरळ लयीत पापण्यांची उघडझाप करतोय मी. तू सरकन पुढे जातेस आणि मी स्वरांची गुंतवळ सोडवीत बसतो.' या सहजपणे मोहात पाडणाऱ्या ओळी काय किंवा मग तुकारामांवर आधारित 'आकांताचे देणे' लेखात त्यांच्या प्रतिभेबद्दल बरंच काही सांगूनही 'मला तुकारामांची कविता फारशी आवडत नाही. पण मी कोण? कोणीच नाही. त्यामुळे तुकारामाला धक्का पोहचत नाही.' असं स्पष्टपणे सांगणं काय, दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या अशाच आहेत. किंबहुना सर्वच लेख किमान मला तरी आवडले.
संध्याकाळ तर ग्रेस यांच्या आवडीचा विषय. संध्याकाळच्या त्या विविधांगी कविता मनात राहतात. इतर पुस्तकांमध्येही संध्याकाळ डोकावलेली दिसते. त्या सांजमय शब्दांत मन आपसूकच स्वतःला हरवून बसते.
'तुम्ही हृदयाने रडता, मला तर हृदयच सहन होत नाही.' हे संध्यामग्न पुरुषाची लक्षणे पुस्तकातील वाक्य किती साधंसं; पण बरंच काही सांगून जाणारं वाटतं.
एखाद्या साहित्याचे प्रत्येक पैलू दरवेळी लक्षात येतातच असं नाही. मुळात तो प्रत्येक पैलू माहीत असायलाच हवा हा अट्टाहास न ठेवता त्या साहित्याचा आस्वाद घेतला तरीही ते साहित्य काही अंशी तरी कळलेलं असतं. कदाचित जो अर्थ आज उलगडला नाहीये, तो भविष्यात कधीतरी अचानक कळून येईल. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भान विसरून लेखनात हरवलं आणि भान ठेवून ते लिखाण जगलं की असा उलगडा आपोआपच होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
( सदर लिखाण मी माझ्या वाचन अनुभवानुसार मांडलं आहे. एकतर्फी विचार मांडण्याचा हेतू अजिबात नाही. लेखात म्हटलं तसं 'व्यक्ती तितके विचार' असतातच. लिहिण्याच्या ओघात काही चुकले असल्यास क्षमस्व. )
© कामिनी खाने
© कामिनी खाने
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.