Login

मायेची ओंजळ

मायेची ओंजळ एक प्रेरणादायी लघुकथा
*विश्व लेखकांचे साहित्य मंच तर्फे आयोजित स्पर्धा:*


"आई, तुझ्या उदरात जन्म घेऊन
धन्य मी झाले
तुझ्या कुशीची ऊब घेऊन
खुशीत मी न्हाले

बाबा तुमच्या प्रेमळ सहवासात
आयुष्य मी जगले
अनंत तुमचे उपकार
तुमच्या पोटी मी जन्मले

गीता, कॉलेजमधून आल्या आल्या आई बाबांच्या गळ्यात पडून ह्या वरच्या ओळी बोलली... अचानक तिच्या डोळ्यात अश्रू चमकले...

ते पाहून आई म्हणाली, " हे लाडू बाई काय झालं असं अचानक इमोशनल व्हायला..? आणि अचानक एवढं प्रेम का उतू जातंय आमच्यावर... आल्या आल्या गळ्यात पडली..

गीता म्हणाली, " आई! मी पेपर मध्ये बातमी वाचली की कचऱ्याच्या पेटीत नुकतेच जन्मलेले अर्भक सापडले.... पोलिसांनी ते ताब्यात घेतले आणि चौकशी करून अनाथआश्रमात पाठवले...

खूप वाईट वाटलं ग आई ते बघून, आपल्याच काळजाच्या तुकड्याला आई बाबा असे फेकून का देतात..? कुणी कुणी इतके निष्ठुर का असतात .?

ते वाचून मला तुमची खूप आठवण आली, 'असं वाटत होतं केव्हा घरी जाईन आणि माझ्या आई-बाबांना भेटेन...

तुम्ही सुद्धा आम्हा तिघा भावंडांना  जन्म दिला आणि किती मायेने वाढवत आहात...

एवढंच काय, स्वीटी आणि बंटी पेक्षाही, पूर्ण मायेची ओंजळ तुम्ही माझ्यावरच रीती केली असं मला वाटतं...

देवाचे खूप खूप आभार की मला तुमच्या सारख्या आई बाबांच्या पोटी जन्म दिला....

असंच मला लहानपणी माझ्या आईने कचरा पेटीत फेकून दिलं असतं तर... ? नुसती कल्पनेने सुद्धा मला खूप भीती वाटते....

"तिने पुन्हा एकदा आपल्या आईच्या गळ्यात हात टाकून मिठी मारली..

शंतनु आणि शीला दोघे नवरा बायको एकमेका कडे बघत राहिले...

त्यानंतर भावनिक झालेले वातावरण हलके करण्यासाठी
शंतनू हसत म्हणाला, "पण आमची लाडू आता लवकरच आमच्यापासून लांब जाणार आहे..

गीता एकदम चमकली आणि म्हणाली, " का बाबा..? काय झाले?
मी काय केले?
मी कुठे चुकले का?
मला तुमच्या पासून लांब का पाठवत आहेत मी कधीच लांब जाणार नाही...सांगून ठेवते....

शीला हसत तिचे गाल ओढत म्हणाली, " अग बेटा जर आमच्या हातात राहिलं असतं तर तुला कायमची आमच्या हृदयाशी ठेवले असते...

प्रत्येक मुलगी आपल्या आई बाबांपासून लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी जाते ही जगाची रीत आहे बेटा... तू मोठी झालीस आत्ता ती रीत तुलाही पाळावी लागेल...

आठ दिवसापूर्वी आपण मावशीच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो.. तिथे तिची ननंद आणि तिचा मुलगा यांच्याशी आपली भेट झाली होती.. तुला आठवतं का?

गीताला लगेच आठवलं, तिच्या ननंद चा मुलगा सौरभ, त्याच्याशी तिची ओळख झाली होती आणि सौरभ आणि गीताचे नजरेतच एकमेकांशी प्रेम झाले होते... तो प्रसंग आठवूण तिच्या चेहऱ्यावर आपोआप लाज आली...

शीला म्हणाली, " बघ लाजलीस ना मी ओळखलंच होतं तुला... आमच्यापासून लांब पळायला आतुर होशील तू..

उद्या तेच पाहुणे आपल्याकडे येत आहेत तुझ्या लग्नाची बैठक आहे आणि लगेच साखरपुडा सुद्धा करून टाकायचा आहे... कारण सौरभ ची जॉब नुकतीच लागलेली आहे म्हणून त्याला सुट्टी घेता येणार नाही...

गीता लाजून घरात पळाली....

त्यानंतर पाहुणे आले, मुलगा मुलगी दोघांनाही एकमेकांची पसंती झाली... सौरभ खूप हँडसम आणि कर्तबगार मुलगा असल्यामुळे गीताला खूप आवडला होता...
आणि गीता सुद्धा खूप सुंदर आणि संस्कारशील मुलगी असल्यामुळे तिचे बोलणे चालणे सगळ्याच गोष्टी सौरभला आवडल्या होत्या.... त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांनाही आवडल्या होत्या...

म्हणून उशीर न करता त्यांनी लगेच साखरपुड्याची तारीख ठरवली...
गीताला तिचा मनपसंत नवरा मिळणार होता म्हणून ती तर अगदी हवेत उडत होती खूप खुश होती... आणि खास करून आई-बाबा ंवर जास्त खुश होती तिच मन ओळखून आई-बाबांनी हे सगळं ठरवलं होतं...

*****
"आज रात्री अकराची वेळ गीताचे आई-बाबा त्यांच्या खोलीत काहीतरी कुजबूज करत होते...
उद्या साखरपुडा होता.... गीताला ही कसली झोप लागते तीही तिच्या भावी नवऱ्याच्या सुख स्वप्नात रंगून गेली होती....
तिच्या रूमच्या बाजूलाच आई-बाबांची रूम असल्यामुळे तिला त्यांची कुजबुज ऐकू आली ती उठून बसली...
तिने कान देऊन ऐकले अरे आई-बाबा एवढ्या रात्री काय करत आहेत... एवढ्या काय गप्पा करत आहेत आणि मध्ये मध्ये तिच्या आईच्या रडण्याचा आवाज ऐकला आत्ता तर तिच्याने राहवलं नाही...

ती बाहेर आणि दाराच्या बाहेर उभे राहून त्यांच्या गप्पा ऐकू लागली...

शीला सांगत होती अहो त्या लोकांना सगळं खरं खरं सांगन्याच्या नादात तर माझी मुलगी तुटून जाईल... कारण तिलाही सगळं खरं माहित पडेल.... आठ दिवसापासून किती खुश आहे ती...

आणि हे असं मी तिला पाहू शकणार नाही...

शंतनू म्हणाला, " अगं पण आपण जर सगळी गोष्ट त्यांच्या पासून दडवून ठेवली तर कधी ना कधी जर माहीत झाले त्या लोकांना तर आपल्याच लाडूला त्रास देतील ते, ' कदाचित घराबाहेर सुद्धा हाकलतील...हे तर मी बिलकुल सहन करणार नाही माझ्या मुलीचा अपमान...त्यापेक्षा आताच सांगितलेलं बरं.... एवढेच होईल की ते संबंध तोडतील आपल्याशी...पण पुढचा अनर्थ टळेल....

गीताला आता राहावले नाही तिने लगेच दार उघडले आणि आई-बाबांसमोर उभी राहिली आणि म्हणाली बाबा काय खरं आहे.. काय सांगायचं म्हणतात, तुम्ही ते मला आत्ताच्या आत्ता सांगा..

ते दोघे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आणि नंतर सारवासारव करत तिला समजावू लागले...

गीता म्हणाली, " बाबा मी सगळं ऐकलं आहे.... तुमच्या तोंडून मला स्पष्ट सांगा..

शंतनू म्हणाला, " बरं सांगतो, पण मन घट्ट करून ऐक पोरी आणि सगळं ऐकून  लगेच काहीच मनाला लावून घेऊ नकोस....

गीता आता तर जास्तच अधीर झाली तीला वाटलं माझ्याबद्दलच काहीतरी आहे म्हणूनच असं बोलत आहेत...
ती म्हणाली, " सांगा बाबा आधी?

शंतनू सांगू लागला, बेटा तू आमची खूप लाडकी आणि चांगली मुलगी आहेस... मात्र दुर्दैवाने तू आमच्या पोटी जन्म नाही घेतलास...

हे शब्द ऐकताच गीताच्या पायाखालची जमीन सरकली... थोडा वेळ पर्यंत तिला असं वाटू लागलं की मी चक्कर येऊन खाली पडणार की काय...

एक साथ तिच्या नजरेसमोर परवाची बातमी आठवली कचऱ्याच्या पेटीत सापडलेले अर्भक, म्हणजे मी सुद्धा तशीच...
ही कल्पना तिच्या मनात येऊन ती प्रचंड हादरली...

शिलाने तिला आपल्या जवळ घेतलं... ती थोडी सावरली आणि म्हणाली, " सांगा बाबा मला सगळं, ' माझ्यापासून काहीच लपवू नका आता,

'पुढे काय झालं?

शंतन सांगू लागला, ' आज पासून 22 वर्षांपूर्वीची गोष्ट आमचे नुकतेच लग्न झाले होते...आणि गोव्याला आम्ही हनिमून साठी गेलो होतो... तिथे हॉटेल बुक करून राहू लागलो...

एक दिवस सकाळी आम्ही थंड वातावरणात निसर्गाचे सुंदर दृश्य न्याहाळत अंगावर शाल पांघरून फिरू लागलो...
चहा वाल्याकडून चहा घेतला आणि तिथेच बसून प्यायलो बाहेरच ....
हातातले प्लास्टिकचे ग्लास डजबीन मध्ये टाकण्यासाठी गेलो तर तिथे पांढऱ्या कपड्या त गुंडाळलेले काहीतरी आढळले....

थोडे निरखून बघितल्यावर कळले कि  तिथे हालचाल सुद्धा होत होती...
काहीतरी असेल म्हणून काडीने थोडसं उघड करून बघितलं तर लहान बाळाचा हात दिसला.... शिलाने पटकन ते उचलून घेतले... ते बाळ थंडीने थरथरत होतं. आणि भुकेने व्याकुळ झाले होते... त्याच्याने रडले सुद्धा जात नव्हते...

शीलाने त्याला हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन गेली त्याला थोडंसं दूध पाजलं आणि आपल्या कुशीत झोपवलं... त्या बाळाच्या पोटात थोडंसं दूध गेल्यामुळे आणि आईच्या मायेची उब मिळाल्यामुळे शांत झोपी गेलं...

तोपर्यंत शंतनुने पोलिसांना खबर दिली होती... पोलीस आले त्यांनी बाळाला घेतलं आणि म्हणाले, " चला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये थोडेफार प्रश्नांची उत्तरे द्या फक्त.... त्यानंतर घेतो आम्ही शोध या बाळाला कोणी येथे टाकले ते तोपर्यंत तर पोलीस स्टेशनमध्येच बाळाची व्यवस्था करावी लागेल...

ते पोलीस स्टेशन मध्ये गेले त्यांना विचारलेल्या जुजबी प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली.... पोलीस म्हणाले, " जा तुमचं काम झालं... थँक्यू बाळा बद्दल माहिती दिल्यामुळे घेतो आम्ही शोध...

शीला धीर एकवटून म्हणाली, " सर बाळ पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यापेक्षा आम्ही अजून इथेच आहोत हॉटेलमध्ये, जर मी सांभाळलं तर चालणार नाही का?
बाळाचे आईबाप किंवा नातेवाईक मिळाले की त्यांना परत करा माझ्याकडून घेऊन... पण तोपर्यंत मी सांभाळते...

पोलीस म्हणाले, " हे तर खूपच चांगले होईल, आजकाल असा मोठेपणा कोणी दाखवत नाहीत...

तीन दिवस पर्यंत पोलिसांनी शोध घेतला पण त्या बाळाचे कोणीच आढळून आले नाही.... शेवटी पोलिसांनी त्या बाळाला अनाथ आश्रमात ठेवण्याचे ठरवले...

इकडे तीन दिवस पर्यंत शीला आपला हनिमून वगैरे सगळं विसरून त्या बाळाच्या सेवेसाठी लागली होती...
त्याला वेळेवर दूध पाजायची आपल्या कुशीत घेऊन थोपटून त्याला झोपवायची अंगाई गीत गायची...

आपल्या ममत्वाची पूर्ण ओंजळच तिने त्या बाळावर रीती केली होती

त्या बाळाला आईची माया मिळाल्यामुळे, ते पण लवकरच तरतरीत झालं... डॉक्टरांनी सांगितले की बाळ एकदम तंदुरुस्त झाले लवकरच...

तिला त्या बाळाचा लळा लागला आणि बाळाला सुद्धा शीला च्या कुशीत आल्यावर सुरक्षित वाटू लागले...

जेव्हा ते बाळ अनाथ आश्रमामध्ये घेऊन जाऊ लागले... शीला कडून पोलिसांकडे गेल्यावर ते बाळ खूप रडू लागले...

शिलाने शंतनूकडे आर्जव केली प्लीज शंतनु आपण हे बाळ दत्तक घेऊ....

शंतनु म्हणाला, "अग! आपलं नुकतच लग्न झालं आहे कदाचित आपल्यालाही बाळ होईल.... तेव्हा हेच बाळ तुला नकोसं वाटेल बिचाऱ्या बाळाची दुर्दशा होईल त्यापेक्षा नको..
इतर बाळांप्रमाणे रमेल तेही अनाथ आश्रमात...

शीला म्हणाली, " तसं नाही होणार, मी प्रॉमिस देते तुम्हाला, माझ्या पोटच्या बाळासारखच हे बाळ मी वाढवेन... असं समजून चला की हे माझ्या पोटचच पहिलं बाळ आहे... आणि माझ्या पोटी जन्माला येईल ते दुसरं राहील...

शिला ऐकतच नव्हती म्हणून शंतनुचा नाविलाज झाला त्यांनी पोलिसांना विनंती केली आणि  पोलिसांनीही हो सांगितले....पोलिसांनी बाळाबद्दल सगळं लिहून घेतले त्यांच्या सह्या वगैरे घेतल्या आणि बाळ त्यांच्या हवाली केलं....

शंतनु गीताला सांगू लागला बस तेव्हापासून हे बाळ आम्ही वागवत आहोत.... आणि ते बाळ म्हणजे तूच आहे बेटा,
तूच एवढी गुणी बाळ आहे आमचं तर आम्ही विसरलो सुद्धा होतो की तू आमची पोटची पोर नाही म्हणून.....

ते सगळं ऐकून गीताने डोळे पुसले, आणि म्हणाली, " आई बाबा, आज पर्यंत मला हे सगळं माहीत नसल्यामुळे तुमचा खूप अभिमान होता की मी तुमच्या पोटी जन्म घेतला...माझे आई बाबा तुम्ही आहेत...


पण आता....

माझा अभिमान डबल झाला बाबा.... जन्म देऊन आपल्या पोटच्या मुलांना तर सगळेच चांगले वागतात त्यांच्या परीने संस्कार करतात, जीवापाड जपतात...

मात्र दुसऱ्याच्या बाळाला एवढा जीव लावून, मायेची ओंजळ देऊन वाढवणे, माझ्या लहान भावंडं पेक्षाही तुम्ही मला जास्त आपलं समजलं.... आणि समाजात एव्हढा सन्मान मिळवून दिला.... माझ्यासाठी तुम्ही देवा पेक्षाही महान आहेत.... असे आई-वडील क्वचितच कोणाचे असतील. ते माझे आहेत.... मला खूप अभिमान आहे तुमचा...

आणि एक गोष्ट अजून ज्या आईने मला जन्म दिला तिने मला असं कचरा पेटीत टाकून दिले तिचीही मी खूप आभारी आहे...

कारण तिने मला टाकले नसते तर तुमच्यासारख्या आई-बाबा मला कसे भेटले असते...?

आई तू दिलेली मायेची ओंजळ मला नक्कीच तिथे मिळाली नसती...

आई बाबा, सौरभच्या आई-बाबांना तुम्ही बिनधास्त सगळं सांगा माझ्याबद्दल...

सौरभ सारखे शंभर मुलांनी जरी मला नकार दिला तरी मला काहीच फरक पडत नाही... माझे आई बाबा माझ्या पाठीशी आहेत बस मला तेवढंच पाहिजे...

शिलाने गीताला मिठीत घेऊन खूप इमोशनल झाली...

आज दुपारी दोघांचा साखरपुडा होता म्हणून शंतनु ने सौरभ च्या आई-बाबांना अगदी सकाळी पाच वाजेच्या सुमारास कॉल केला... अगदी सकाळीच तुम्ही तिघे जन इथे अगोदर या म्हणून...

सौरभ आणि त्याचे आई वडील पण घाबरून गेले की असं काय झालं असेल की साखरपुड्याची तयारी न करता डायरेक्ट आपल्या तिघांना बोलावलं...

ते सकाळीच तिथे हजर झाले... शंतनूच्या घरी..

येताच त्यांनी विचारले अहो काय झालं असे ?

असं अचानक का बोलवलं...?

शंतनू म्हणाला, ' आमच्याकडून एक चूक झाली तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या राहिल्या. आणि त्या आम्ही हटकून सांगितले नाही.फक्त आमच्या मुलीला माहित पडू नये म्हणून... पण आत्ता तीला सगळं माहित झालेच आहे तर तुम्हाला सांगायला काही हरकत नाही.

त्यानंतर हे लग्न करायचं की नाही हा तुमचा निर्णय आहे.

सौरभ चे आईबाबा एकमेकांकडे बघू लागले काहीतरी सिरीयस मामला आहे असं त्यांना वाटले...

सौरभ ला वाटले गीताचे दुसरे प्रेम प्रकरण तर नसेल ना?

शंतनु ने गीताबद्दल सगळी हकीकत त्यांना सांगितली...

आणि सगळं सांगून अगदी धडधडत्या हृदयाने शांत बसून राहिले की आता त्यांचा निर्णय काय असेल?
ह्याची वाट बघत....

तिघानचेही चेहरे सिरीयस झाले... लगेच थोड्या वेळात सौरभ चे बाबा आणि आई एकमेकांकडे बघून हसले आणि म्हणाले, "बस एवढंच? का अजून काही बाकी आहे सांगायचं..?

शंतनु ने मानेनेच नाही सांगितले..

सौरभ चे बाबा म्हणाले, " अहो एवढ्यासाठीच आम्हाला इथे बोलावलं, आणि तुम्ही सांगितल्यावर आम्ही तुम्हाला नकार देऊ एवढे वेडे समजले का तुम्ही आम्हाला..?

अहो गितासारखी मुलगी आणि तीही तुमच्या घरातली... लाखात एक सुन आम्हाला मिळाली म्हणून आम्ही खूप खुश होतो....

पण आता...

शंतनू आणि शीला दोघे त्यांच्याकडे काळजीने बघू लागले...

सौरभ चे बाबा म्हणाले, " अहो तुमच्यासारख्या आई-वडिलांच्या संस्कारशील घराण्यात ही मुलगी वाढली... म्हणून ती कोणाची मुलगी आहे कुठल्या जातीची आहे त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही...

आम्हाला उलट जास्त आनंद होत आहे की... एवढ्या उच्च विचारातल्या माणसांच्या संस्कारात ही मुलगी वाढली आहे...

ह्यातच आमच्या परिवाराचे खूप मोठ भाग्य आहे...

म्हणून माझी सून लाखात नाही करोडोत एक आहे... याचा मला गर्व आहे..

चला जातो आम्ही तयारी करायची आहे साखरपुड्याची... मुहूर्त सापडला पाहिजे दुपारचा.... साखरपुडा आजच झाला पाहिजे सून घरात आणण्याची घाई झाली आहे आम्हाला....

इकडे दोघे व्याही दोघी विहीन एकमेकांना भेटत होते...एकमेकांची हसत मस्करी करत होते...

आणि तिकडे सौरभ आणि गीताचा नयन मिलाप चालू होता...

सगळे आनंदाचे वातावरण झाले होते..

एक अनाथ मुलीला सासरी आणि माहेरी मायेची ओंजळ अगदी भरभरून मिळाली होती....

बोध:~प्रत्येकाने असे विचार ठेवले पाहिजे शंतनु आणि शिलासारखे...आणि सौरभ आणि सौरभ च्या आईबाबा सारखे...

त्यांना मुलं असून सुद्धा एक अनाथ बाळ त्यांनी वाढवले...

समाजात असे अनेक अनाथ बाळ आहेत ज्यांना आईच्या मायेची गरज आहे...
समाजात असे पण आहेत की जे बाळासाठी व्याकुळ झालेले असतात पण त्यांना बाळ होत नाही....

त्यांनी खुशाल अशा अनाथ बाळांना दत्तक घेऊन आपल्या योग्य संस्काराने वाढवावे...

किंवा आपल्याला बाळ जरी असले तरी... एखाद्या अनाथ बाळाचा आपण सांभाळ केला तर, समाजाचे खूप मोठे कार्य आपल्या हातून घडेल...

              सौ.स्वाती पाटील

🎭 Series Post

View all