Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ९

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ९


कुमारने लग्नाला हो म्हणण्याचं वचन दिल्यावर सुमनताई आणि श्रीरंग रावांनी त्याच्यासाठी मुली पाहण्याची सुरुवात केली.

"सुमन आपण सून करायची ती सर्वसामान्य कुटुंबातील. कारण आपल्याकडे सर्व काही आहे. एखाद्या संस्कारी घरातील सालस आणि कर्तबगार मुलगी आपण कुमार साठी पसंत करूया."

"हो नक्कीच श्रीमंता घरची लाडवलेली मुलगी आपल्याला नकोच आहे."

श्रीरंग रावांच्या मित्राच्या मित्राची मुलगी त्यांना हवी तशीच होती. तीच आपली सुभाष सावंत आणि सुषमा सावंत यांची थोरली लेक समिधा! कॉलेज शिक्षण झाल्यानंतर समिधाने आपल्या हुशारीच्या बळावर एका राष्ट्रीयकृत बँकेत अधिकारी पदावर स्थान पटकावलं होतं. कुमारने ठरवलं होतं आई बाबा जी मुलगी पसंत करतील तिला हो म्हणायचं. समिधा दिसायला सुंदरच होती. कुमारने ठरवल्याप्रमाणे तिला होकार दिला.

कुमारचा निर्णय राजनला कळल्यावर तो त्याला म्हणाला,

"चला म्हणजे आता तू पण संसारात रमशील. स्वामींच्या ज्या विचारांनी तू प्रभावित झाला होतास ते आता तुला दूर सारावे लागतील."

"अरे नाही. स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे जगात इतके दिन दुबळे लोक आहेत, निराधार लोक आहेत त्यांना आपल्यासारख्या कर्तृत्ववान तरुणांनी आधार द्यायला हवा. त्यांनी हे महान कार्य हाती घेतलं आहे आणि या कार्यात माझा नक्कीच सहभाग असेल."

"पण मग तुझ्या लग्नाचं काय. हे थोर कार्य करण्यासाठी तुला घरदार सोडून आश्रमात येऊनच राहावं लागेल ना."

"मी बाबांना लग्नाला तयार होईन असं वचन दिले आहे. मी लग्न करेन असं वचन दिलं नाही."

"तू त्यांना असं शब्दात अडकवणार का. अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत वाट पाहत बसू नकोस. काहीतरी निर्णय घे नाहीतर हा ताण असह्य होऊन तुझ्या हातून काहीतरी भलतंच होऊन बसायचं."

"बघतो मी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेन."

"मी तुला आधी बोललो होतो ना की मी एकदोन वर्षांनी जाईन पण मी लवकरच जाईन. कदाचित तुझ्या लग्नाच्या आधीही जाईन.
इथे कुमारच्या घरी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली त्याप्रमाणे खरेदी, इतर कामं सुरू झाली. कुमार स्वतःहून समिधाला भेटायला तयार होईना तेव्हा बाबांनीच त्याला सुचवले,

"कुमार लग्नाच्या आधी कधीकधी समिधाला भेटत जा. तुमच्या एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करा, आवडीनिवडी जाणून घ्या. त्या मुलीला परिस्थितीची जाणीव आहे. एक-दोन दिवसात फोन करून ऑफिस सुटल्यावर तिला भेटून ये."

कुमारला वाटलं बाबा सांगतात म्हणून तरी समिधाला भेटायला हवं. त्याने तिला फोन करून विचारलं,

"समिधा मला तुला लग्नाआधी भेटायचं आहे. तुला कधी जमेल ते सांग म्हणजे मग आपण दोघं भेटून जरा एकमेकांशी बोलूया."

"हो चालेल या परवाच्या रविवारी संध्याकाळी आपण भेटू शकतो."

राजन म्हणाला होता स्वामींच्या आश्रमात सर्व स्तरातले लोक येतात अगदी अशिक्षिता पासून ते डॉक्टर, वकील. प्रत्येक जण तिथे आपापल्या योग्यतेप्रमाणे काम करतात. असं असलं तरी सर्व धर्म समभाव हा तिथे नेहमीच दिसतो. सगळ्यांनी स्वयंशिस्त पाळायची असते. सकाळी पाचला उठून स्वतःचं आवरून नामस्मरण करून इतर कामांना सुरुवात करायची. इथे येताना खाली हात यायचं आणि जाताना खाली हात जायचं. एकदा इथे आलेली व्यक्ती सहसा घरी परतत नाही. जे अगदीच लेचेपेचे असतात ते थोड्याच दिवसात आश्रम सोडून पळ काढतात.

(कुमार आणि समिधाची पहिलीच भेट रम्य होईल की रुक्ष होईल आणि त्याच्या विचारात बदल होतो का पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all