Login

नकळत सारे घडले - भाग ६

अचानकपणे आयुष्यात आलेल्या वळणावर दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात.
नकळत सारे घडले - भाग ६

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025 - 2026

वडिलांच्या सांगण्यावरून माधव सगळ्यांना हात जोडून उभा होता. त्यांच्याशी बोलत होता. आज जे काही झालं ते मुळीच चांगल झालं नाही. घरातला मोठा मुलगा म्हणून माधव खाली मान घालून होता. त्याचे होणारे दाजी म्हणजेच मल्हार कुठे दिसत नाही; म्हणून तो त्यांना शोधू लागला. त्यांच्याशी पण बोलायला हवे, असे म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला.
'त्यांच्याशी बोलायला हवे, ह्या सगळ्यात त्यांचे मन खूप जास्त दुखावले गेले असणार नक्कीच. कदाचित ते आपल्याला माफ करू शकणार नाही, पण तरीही एकदा त्यांच्याशी बोलून घ्यायला आणि माफी मागायला हवी.'
माधव मनातल्या मनात असे बोलत होता. त्याला समजत होते, लग्न मंडपातून स्वतः ची नवरी पळून जाणे म्हणजे काय वाटतं असेल त्यांच्या मनाला. त्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित झाल्या असतील आणि बरेच गैरसमज देखील असतील.

"दाजी.. म्हणजे नवरदेव कुठे आहे?"
माधवने अडखळतच त्यांच्या मामांना विचारले. नेमकं काय म्हणून बोलावे ते त्याला कळत नव्हते. लग्न तर झाले नव्हते त्यांचे, पण तरीही तो नकळतपणे दाजी म्हणून गेला.

"नवरदेव.. त्याला खूप धक्का बसला आहे; त्यामुळे तो थोडावेळ बाहेर मोकळ्या हवेत गेला आहे. काय झालं.. काही काम होतं का?"
मामांनी माधवला विचारले.

"नाही.. काही नाही. बस त्यांच्याशी एकदा बोलायचे होते. त्यांची माफी मागायची होती. बास बाकी काही नाही."
माधव इतकं बोलून खाली बघू लागला.

"माधव, खरचं याची काही गरज नाही. आम्ही समजावू त्याला. तू तुझ्या आई आणि वडिलांना सांभाळ. त्यांनाही खूप मोठा धक्का बसला आहे. तू काळजी नको करू, आम्ही पण सगळे जण आता आवरतं घेतो आणि इथून निघण्याचे बघतो. किती वेळ असेच थांबून राहणार? पाहुणे मंडळी पण सगळी खोळंबली आहेत."
मामांनी माधवला समजावून सांगितले आणि दिलासा देखील दिला; त्यामुळे मामांशी बोलून त्याला खूप बरे वाटले.


नवरदेव.. म्हणजेच मल्हार. तो तर सकाळपासून कोणाशीच एक शब्द देखील बोलला नव्हता. सगळे एकमेकांना काय घडले ते सांगत होते, भांडत होते, मितलीचा राग राग करत होते, पण मल्हार मात्र अगदीच गप्प झाला होता.

आज त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. लग्न म्हणजे दोन मनांच नव्हे तर दोन घराचं एकमेकांशी नात जोडल्या जातं आणि आज ते नातं जोडण्या ऐवजी तुटलंच नाही तर अक्षरशः कोलमडून गेलं होतं. आजच्या दिवशी नेमकं हेच घडायचं होतं.

तिथे जमलेले पाहुणे कोणीतरी म्हणतं होते,"बरं झालं पोरगी लग्नाच्या आधीच पळून गेली, नाहीतर लग्नानंतर उगाच त्रास झाला असता आपल्याला. लग्नाच्या आधीच तिचे गुण समजले आणि लग्न मोडले. आपल्या मल्हारचे नशीब चांगले, की त्या मुलीशी लग्न झाले नाही. त्याच्या नशिबात हीच्यापेक्षा पण जास्त सुंदर मुलगी असणार."

"हो ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मल्हारच्या नशिबात खूप सुंदर आणि गुणी मुलगी असणार."

"हो मग, असणारच.. आपला मल्हार आहेच तसा. त्याला कोणीही हसत हसत आपली मुलगी द्यायला तयार होईल."
जमलेल्या पाहुण्यांचे बोलणे सुरू होते.


मोठे मामा म्हणजेच तात्यांच्या कानावर ही सर्व काही कुजबुज स्पष्ट ऐकू येत होती. त्यांच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला, पण त्याला आपल्या घरचे साथ देतील की नाही हे निश्चित करता येत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसून येत होता.

नेमकं काय चाललं असणार मामांच्या मनात? जाणून घेऊया पुढील भागात.

क्रमशः

माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.