Login

नणंदबाई येता घरा... भाग चार (अंतिम भाग )

नवऱ्याने दुसरं लग्न केल्यावर विभीता प्रेरणाच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभी राहते



मागील भागात आपण पाहिलं की, प्रेरणा सगळ्यांना चुकीची जाणीव करून देते आणि आपली नणंद विभीताची बाजू घेते.आता पाहूया पुढे,


पुढचे दोन महिने सुद्धा विभीताने तिची काळजी घेतली. दिवस भरले तस प्रेरणाने एका गोड मुलाला जन्म दिला.बाळाचं नाव सुद्धा विभीतानेच ठेवलं होत. बाळाची काळजी सुद्धा तिचं घ्यायची. प्रेरणा जास्त आराम कस करेल ह्याकडे लक्ष द्यायची. बघता बघता दिवस निघून गेले आणि आता प्रेरणाचं  बाळ आता सहा महिन्यांचं झालं होतं. घरात गोड हसण्याचे आवाज, खेळण्याचा पसारा, आणि सुखाची चाहूल लागली होती.
सगळं काही सुंदर वाटत होतं.

विभीता रोज सकाळी बाळाला अंगाई म्हणायची,

जो... जो... रे बाळा....

देवघरात ती रोज दिवा लावताना ती बाळासाठी प्रार्थना करायची. ती सगळ्यांचं हित बघत होती पण नियतीचं नियोजन वेगळं असतं…


एक दिवस संध्याकाळी आशुतोष कामावरून लवकर आला तेव्हा तो अगदी उदास दिसत होता. प्रेरणा स्वयंपाकघरात होती, पण तिला त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.

“काय झालं रे आशु एवढा गप्प का आहेस?”

तिने विचारलं.

“अग ताईच्या दिराचा फोन होता, भावोजीनी दुसरं लग्न केलं म्हणे. ताई आता किती त्रासात असेल ”

एवढं बोलून तो रडायला लागला..

“अरे पण भावोजी असं कस करू शकतात.

प्रेरणाला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता.

" भावोजीना कॉल केला तर म्हणे आईच्या दबावाखाली हे सगळं केल पण ते ताईला सांभाळायला तयार आहेत. "

"उठ आशु आपण आताच्या आता ताईंना आपल्या घरी घेऊन येऊ... त्यांना ठणकावून सांगू आम्ही आमच्या बहिणीला सांभाळायला समर्थ आहोत."


ते ऐकून आशूला प्रेरणाबद्दल असलेला अभिमान अजूनच वाढला.

" पण तुला चालेल ताई इथे आलेली... कदाचित कायमची.... "

तो अडखळत बोलला...

"का नाही आशु, हे घर जेवढं तुझं आहे तेवढंच त्यांचं आहे..."

ती त्याच्यात हातावर हात ठेवून बोलली.
लगेच त्यांनी गाडी काढली आणि थेट विभीताच्या घरी गेले.
घराचं दार अर्धवट उघडं होतं. आतमध्ये नव्या सुनेचं स्वागत चालू होत तर विभीता एका कोपऱ्यात बसलेली होती. तिच्या डोळ्यांत पाणी, पण चेहऱ्यावर उदासी होती. त्या दोघांना तिला तस पाहून खूप त्रास झाला.


“ताई…”

प्रेरणा हळू आवाजात बोलली.

विभीतानं पाहिलं तर भाऊ वाहिनी दोघे उभे होते.

“आशु, प्रेरणा… तुम्ही इथे?”

“हो, ताई आम्हाला सगळं समजलं आणि आम्ही तुला घेऊन जायला आलो आहोत.

ते ऐकून विभीता त्यांच्याकडे बघतच राहिली.


"नको.... माझ्यासारखी अपशकुनी तुझ्या घरी आली तर तुझ्या संसाराची पण वाट लागेल... तुम्ही जा इथून.. माझी सावली पण तुमच्यावर पडायला नको."


प्रेरणानं तिचे हात घट्ट धरले,

“ताई, काही गोष्टी जुळत नाहीत. पण त्यातून नवं आयुष्य उभं करता येतं! आधी स्वतःला दोष देणे बंद कर.. आजपासून तू दुसऱ्याच्या सावलीत जगायच नाही, तर तू स्वतःचा सूर्य हो. चल आपल्या घरी. "

आधी विभीता अजिबात तयार नव्हती पण प्रेरणा आणि आशुने तिला खूप समजावलं. शेवटी आपला नवरा आपल्याला थांबवत नाही हे जाणवल्यामुळे ती त्यांच्यासोबत घरी गेली.


वेळ न घालवता दुसऱ्याचं दिवशी प्रेरणानं सगळं ठरवून टाकलं. तिनं गावातल्या शाळेत विभीतासाठी काम शोधलं
“बालकांच संगोपन केंद्र,” जिथं आई नसलेल्या मुलांना प्रेम, माया द्यायची.
विभीताला सुरुवातीला शंका वाटली.
“मला जमेल का गं हे? माझी काळी सावली पडेल त्यांच्यावर ”

प्रेरणा हसली,

“ताई, तुम्ही जन्मातच आई आहात, तुम्हाला आई व्हायला शिकवावं लागणार नाही. ह्याच्यात तुम्ही तुमचं दुःख विसराल. "


हळूहळू दिवस सरत गेले.
विभीता त्या शाळेत काम करू लागली.
ती लहान मुलांना शिकवायची, त्याना प्रेम द्यायची आणि रोज संध्याकाळी प्रेरणाच्या बाळाला घेऊन घरी यायची.

त्या बाळाचं हसू तिच्या ओठांवर हसू देऊ लागलं.
कधी कधी ती त्याला कुशीत घेऊन म्हणायची,

“देवा,  माझ्या पोटी बाळ नाही झालं, पण तू मला कितीतरी मुलांची आई केलंस.”


प्रेरणाने तिला तिच्या कोशातून बाहेर काढलं... गावातली लोक आता तिला विचारायची.

" काय तुझी नणंद कायमची इथेचं राहणार वाटत... "


त्यावर ती त्यांना हसून उत्तर द्यायची....


"नणंदबाई येता घरा, तोचि दिवाळी दसरा."


प्रेरणा सारखी भावजय आणि आशु सारखा भाऊ असेल तर कोणतीही नणंद, बहीण एकटी नाही पडणार.