नंदिनी श्वास माझा 18

आणि ते जीवघेणे सत्य
भाग-18 : आणि ते जीवघेणे सत्य

श्रीराज घरात तिथे खुर्चीवर शांतपणे बसला होता. हे सगळं काय सुरू आहे , त्याला काहीच कळत नव्हते. जरी वरून तो शांत दिसत होता , तरी आतून पूर्णपणे तुटला होता. त्याने एक मोठा आवंढा गिळला आणि तो आबा आजी जवळ जाऊन बसला.

" हे काय झाले आहे? आबा मला सगळं , एक एक शब्द सविस्तर ऐकायचे आहे." श्रीराज म्हणाला.

" सगळं सांगतो , पण आधी थोडं खाऊन तरी घे, आत्ताच प्रवासातून आला आहेस." आबा म्हणाले.

" नाही , ते सगळं नंतर बघू. आधी मला नंदू बद्दल सगळं सांगा." श्रीराज म्हणाला.

" ह्म्म्म ! नंदिनीचा बारावीचा रिझल्ट छान लागला. तिला 89 टक्के मिळाले. तिच्या सोबत मीना सुद्धा चांगल्या मार्काने पास झाली. पुढल्या शिक्षणासाठी आता तालुक्याच्या गावी जावे लागणार होते. नंदिनी आणि मीनाने बी .एस .सी साठी ऍडमिशन घेतली.

चांगल्या टक्क्यांनी पास झाली म्हणून तिने स्कूटरसाठी हट्ट केला. तिला नकार द्यायचं काही कारण नव्हते. मी सुद्धा आनंदाने तिला स्कूटर घेऊन दिली. मीना आणि नंदू दोघी मिळून स्कूटर वरूनच कॉलेजला जात होत्या. बीएससीमध्ये सुद्धा नंदू चांगल्या मार्काने पास होत होती. तिला कॉलेजमध्ये लेक्चरर व्हायचे होते. त्यामुळे ती भरपूर अभ्यास करत होती. कॉलेजमध्ये होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आवडीने भाग घेत होती. आता ती थर्ड इयरच्या वर्षाला होती. तिथेच कुठे बाजूच्या गावातला एक मुलगा तिच्या मागे लागला आणि तिला त्रास देऊ लागला होता. तो मुलगा अति गुंड प्रवृत्तीचा होता. सतत तिच्या मागेमागे जाणे, नको ते बोलणे, टोमणे मारणे, असं सुरू होतं. सुरवातीला नंदूने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण हळूहळू त्या मुलाची हिम्मत वाढतच होती. एकदा तर तो तिच्या कॉलेजमध्ये जाऊन पोहोचला आणि तिचा रस्ता अडवू लागला. किती सहन करायचं म्हणून तिने सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली मारले . " तू जे केलं हे फार वाईट केलं , तू सगळ्यांसमोर माझी इन्सलट केली. मी तुला बघून घेईल ' , असं बोलून तो तिथून चालला गेला. अशातच लास्ट इयरच्या परीक्षा जवळ आल्या होत्य. एक दिवस तिला लायब्ररी मधून काहीतरी पुस्तक आणायचे होते, म्हणून ती कॉलेजला गेली. त्या दिवशी मीनाला काही दुसरे काम होते म्हणून ती नंदू सोबत गेली नव्हती. बराच वेळ झाला तरी नंदू घरी आली नव्हती. का वेळ लागतो आहे म्हणून मी तिला बघायला बाहेर पडणारच होतो की बाजूच्या राम्याचा फोन आला. तिकडे गावाकडच्या रस्त्यावर तिचा एक्सीडेंट झालेला आहे असं त्याने कळवले. मी आणि तुझा मामा लगेच घटनास्थळी गेलो आणि तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो. बाकी शरीराला तिला कुठेच मार लागला नव्हता, फक्त डोक्याला खूप मार लागला होता. खूप रक्त वाहून गेले होते . डॉक्टरांनी तिला लगेच ऑपरेशन थेटर मध्ये घेतलं. ऑपरेशन तसे नीट झाले होते पण तिला शुद्ध आली नव्हती. डॉक्टर म्हणाले की शुद्ध येईपर्यंत तिच्या तब्येती बाबत काहीच सांगू शकत नाही. दहा दिवस झाले तरी तिला शुद्ध आली नव्हती. ती सुरू असलेल्या ट्रीटमेंटला काहीच रिस्पॉन्स देत नव्हती , म्हणून तुझ्या मामांनी तुझ्या घरी कळवले , तर तुझ्या बाबांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली . ते तिथून न्यूरो स्पेशालिस्ट घेऊन आले. त्यांनीसुद्धा तिची योग्य ती ट्रीटमेंट केली, पण नंदू कोम्यात गेली होती.. नंदुच्या प्रकृतीबद्दल तुला कळवावं, असं खूपदा मनात आले. पण तू तिकडे एकटा होता , तिची काळजी करशील म्हणून तुला कळवलं नाही.. आणि तुझ्या आजी आणि बाबांनी पण तशी अट घातली होती की तुला नंदू बद्दल काही कळता कामा नाही .त्यांना माहिती होतं की तू सगळं सोडून इथे परत येशील आणि त्यामुळे तुझ्या भविष्यावर त्याचा खूप मोठा वाईट परिणाम होईल. त्यामुळे आम्ही कोणीच तुला कळवलं नाही. तुझे फोन यायचे, तेव्हा सुद्धा काहीतरी बहाणा करत होतो . नंदुची आजी आणि मी फार हतबल झालो होतो. काहीच कळत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं, त्या वेळेला मात्र तुझ्या मामा मामींनी आम्हाला खूप धीर दिला. बऱ्याच गोष्टी त्यांनीच सांभाळून घेतल्या होत्या. नंदुची ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती .. पण तरी सुद्धा नंदू कोम्यातून बाहेर आली नव्हती.. जवळपास एक महिन्यांनी तिला शुद्ध आली होती.. तिला बरं झालेलं बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. पण नंतर ती कोणालाच ओळखत नव्हती, फक्त मला आणि आजीला ओळखत होती. शुद्धी वरून उठली तेव्हा ' आई बाबा , आई बाबा' करतच ओरडत होती. डॉक्टरांनी परत सगळ्या टेस्ट केल्या आणि मग आम्हाला कळलं की ती सगळं विसरली आहे. लहानपणी तिचा आई-बाबांसोबत जो एक्सीडेंट झाला ती त्याच धक्क्यात होती आणि तिला फक्त तेवढेच आठवत होते. पुढचं आयुष्य तिला काहीच आठवत नव्हतं. तिला तिच्या आयुष्यातले फक्त पहिले सात वर्ष आठवत होते , त्यापुढले ती सगळं विसरली होती. ती बरी होऊन घरी परतली तर होती, पण ती आता पूर्ण सात वर्षाच्या मुली सारखीच वागत होती. ती स्वतःला लहान समजत होती. तिचे ब्रेन आता फक्त एवढंच जाणतो. तिला पुढले काहीच आठवत नाही. ती मोठी झाली आहे , हे सुद्धा तिला समजत नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे की तिची मेमरी परत येऊ शकते पण त्याचे खूप कमी चान्सेस आहेत , नसल्या सारखेच. आता या गोष्टीला दोन वर्ष होत आले , तिला आम्ही असंच सांभाळत आहोत. खूप लोकांना ती पागल वाटते , पण ती पागल नाही आहे रे बाळा, ती सगळं विसरली आहे . यात तिचा तरी काय दोष आहे ? या गोष्टी तुला सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. तुझ्या आयुष्याचा प्रश्न होता. मला माफ कर बाळा." म्हणत आबा रडायला लागले.

ते सगळं ऐकून श्रीराजने मटकन मान खाली घातली. आता त्याचे डोकं पूर्णपणे सुन्न झाले होते. त्याचं आयुष्यच थांबल्यासारखं झालं होतं, डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. तो एकटा पायरीवर जाऊन बसला होता , ती नंदू आणि त्याची नेहमीची आवडती जागा होती . बराच विचार करून , स्वतःला सावरत तो आबांजवळ येऊन बसला.

" आबा, शांत व्हा ! सगळं ठीक होईल. ती सुखरूप आपल्या सोबत आहे , हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे." तो त्यांना सावरण्यासाठी बोलत होता. तिच्यासोबत त्याने आपल्या आयुष्याचे , भविष्याचे सुंदर स्वप्न रंगवले होते, तीच आता त्याला विसरली होती. आता त्याच्यासाठी त्याचे आयुष्यच एक स्वप्न बनून राहिलं होतं .

" आबा , मी थोड्या वेळात येतो." श्रीराजला काहीतरी आठवलं आणि तो बाहेर गेला. बराच वेळ तो कोणासोबत फोनवर बोलत होता . बोलणे आटोपून थोड्या वेळात तो आतमध्ये परत आला.


" आबा, मला नंदिनी सोबत लग्न करायचे आहे, आता लवकरच."श्रीराज शांतपणे म्हणाला.


" अरे बाळा, तुला एवढं सगळं सांगून सुद्धा तू असे कसे बोलतोय ?" आजी म्हणाली .

" आजी , मला तिच्यासोबत लग्न करायचे, प्लीज मला परवानगी द्या." श्रीराज विनवणीच्या सुरात म्हणाला.

" बाळा , तुला कळते आहे काय , ती बायको बनण्याच्या परिस्थितीत नाही आहे. तिच्यासोबत लग्न करून तू तुझं आयुष्य उध्वस्त करतोय. तिच्यासोबत तुझं काहीच भविष्य नाही आहे . शरीराने जरी ती परिपूर्ण असली , तरी मनाने आणि डोक्याने ती अजूनही सात वर्षाची मुलगी आहे. ती तुला काहीच सुख देऊ शकत नाही. तुझ्या कुठल्याच अपेक्षा तिच्याकडून पूर्ण होणार नाही. तू इतका मोठा झाला आहेस , छान सुंदर अशी एखादी गोड मुलगी तुला भेटेल. आता नंदूला विसर बाळा !"आजी त्याला समजावत होती.

" आजी आबा, नंदुवर माझं प्रेम आहे , तिच्यावर माझा स्वतःपेक्षाही जास्त जीव आहे. तिच्याशिवाय मी श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही आणि प्रेमामध्ये कुठल्या अपेक्षा आल्या? प्रेमात अपेक्षा केल्या तर ते प्रेम राहणार काय? तो तर व्यवहार होईल आणि माझं प्रेम व्यवहार नाही. ती माझ्यासोबत आहे , मला एवढेच पुष्कळ आहे. आबा, मला माझं आयुष्य द्या. मग कोणाकडूनही मला दुसरं काहीही नको .मला फक्त माझी नंदिनी हवी आहे." श्रीराज काकुळतीने बोलत होता.

" श्रीराज एवढी कशाची घाई आहे ? आता तू आराम कर , आपण नंतर बोलू." आबा म्हणाले .

" नाही आबा, तुम्ही विषय बदलू नका .माझं ठरलं आहे , मी नंदिनी सोबतच लग्न करणार आहे. नंदिनी नाहीतर मी कुठल्याच दुसऱ्या मुली सोबत लग्न करणार नाही." श्रीराज म्हणाला.

" श्रीराज , असे भावनेच्या भरात येऊन निर्णय घेत नसतात . तुझ्या घरी सुद्धा कोणाला हे आवडणार नाही. मुळात हे आम्हाला सुद्धा आवडलेले नाही. आमच्यासाठी जशी नंदिनी आहे, तसाच तू आहे. तुझे आयुष्य असं उद्ध्वस्त झालेलं आम्हाला सुद्धा बघवणार नाही. आता तुझे वय असे किती आहे? तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे, खूप नाव कमवायचं आहे. बाळा, आयुष्य खूप सुंदर आहे, असे निर्णय घेऊ नको.. तुझी आजी बरोबर म्हणते आहे, तुला खूप छान मुलगी भेटेल. तिच्यासोबत लग्न कर. आता नंदिनीला विसर." आबा म्हणाले.

" मी भावनेच्या भरात असा कुठलाच निर्णय घेत नाही आहो . जेव्हापासून मला प्रेमाचा अर्थ कळायला लागला होता , तेव्हापासून माझं नंदिनी सोबतच लग्न करायचं , असे ठरले होते. आता यात विचार काय करायचा? आणि नंदू सोबत जे घडलं तेच माझ्यासोबत घडलं असतं तर नांदू मला सोडून गेली असती काय?" श्रीराज म्हणाला.


" असे अपशब्द काढू नको. तुला काही होणार नाही." आजी त्याच्या तोंडावर हात ठेवत बोलली.


" अमेरिकेला माझा मित्र आहे, तो न्यूरो स्पेशालिस्ट आहे. मी आत्ताच त्याच्यासोबत बोललो. जर नंदूला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली तर तिला सगळं परत आठवू शकते . इथे गावात तसे डॉक्टर नाहीत. तिथे मुंबईला तिला चांगले, मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरची ट्रिटमेंट मिळेल आणि वेळ आलीच तर मी तिला अमेरिकेला सुद्धा घेऊन जाईल." श्रीराज म्हणाला.

" त्यासाठी तिच्यासोबत लग्न करायची काय गरज आहे? आपण तिला तसंच घेऊन जाऊया. हवे तर तू तिला तुझ्यासोबत घेऊन जा." आबासाहेब म्हणाले.

" नाही आबा, मला मानाने, सन्मानाने तिला आपल्यासोबत न्यायचे आहे , मी तिला प्रॉमिस केले होते. मला आता तिची जबाबदारी घ्यायची आहे." श्रीराज म्हणाला.

"तिच्या सोबत लग्न करणे , इतकी सोपी गोष्ट नाही आहे . तिला लग्नाचा अर्थ सुद्धा कळत नाही. तिला फक्त तिच्या भावला भावली यांची लग्न माहिती आहे. लग्न म्हणजे नवीन कपडे , गोड धोड खाणं आणि दिवसभर खेळणे , एवढेच काय तिला समजते. तिची जबाबदारी घेणे इतकं सोपी नाही आहे राजा. ती आता एक तरुण लहान मुलगी आहे. एकदाचे लहान मुलगी सांभाळणं सोपे असते , पण नंदूला सांभाळणं आता खूप कठीण आहे. तिची आई बनून तुला तिचा सांभाळ करावा लागेल. तिच्या शरीरात तारुण्याचे झालेले बदल सुद्धा तिला कळत नाही. तिला कपडे घालून द्यावे लागतात, तिला वेणी घालून द्यावी लागते , कधी ती भलतेसलते हट्ट करत असते , ते पुरवावे लागतात . बाळा हे सगळं करणे खूप कठीण आहे. तिचा वडील तर तू बनून जाशील पण आई होणे खूप कठीण आहे." आजी म्हणाली.

" आजी , मला हे सगळं कळतंय , म्हणून तर मी तुमच्याकडे लग्नाची परमिशन मागतोय ना ? कोणीही तिच्या चारित्र्यवर बोट उचलू नये म्हणून लग्नाची परमिशन मागतोय. एकदा लग्न झालं की मी हे सगळं करेल. मी तिची आईसुद्धा बनेल . सुरवातीला थोडं कठीण जाईल , पण सगळं नीट करेल. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही काय ?" श्रीराज म्हणाला.

" बाळा आई-बाबा तर तू बनून जाशील, पण तुझ्या नवरा असण्याच्या हक्काचं काय? ती फक्त शरीराने मोठी आहे , पण मनाने आणि डोक्याने लहान आहे. असं जर काही घडलं तर तिच्या मनावर खूप मोठा परिणाम होईल आणि मग परत तिला सगळ्या गोष्टीतून बाहेर आणणे खूप कठीण जाईल." आजी म्हणाली.

" तिच्या मनावर काही वाईट परिणाम होईल , असं मी काहीही वागणार नाही. जोपर्यंत तिला सगळ्या गोष्टींची समज येत नाही , तोपर्यंत मी तिला तसा स्पर्श सुद्धा करणार नाही. आजी माझ्यावर तुझा विश्वास आहे ना ? मी तुम्हाला शब्द देतोय , मी तिच्या मनाला खूप हळुवारपणे जपेल." श्रीराज म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून आजी आबांजवळ आता बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. त्याला काय सांगावं , कसे समजवावे , त्यांना कळत नव्हतं.

" तुझ्या आई बाबांचे , तुझ्या घरच्यांची तुझ्या लग्नाकडून खूप अपेक्षा असतील. त्यांनी खूप स्वप्न बघितली असतील . त्यांच्या अपेक्षा अशा प्रकारे मोडणार आहेस का ?" आबा म्हणाले.

" आबा , मी दुसऱ्या कुठल्याही मुलीसोबत जगू शकत नाही.. नंदिनी नाहीतर मी जिवंतपणे मरून जाईल. तुम्ही घरच्यांचा विचार करू नका , मी त्यांना समजवेल , तयार करेल, तुम्ही फक्त आमच्या लग्नासाठी परवानगी द्या." श्रीराज म्हणाला.

" होऊ दे तुझ्या मनासारखं." आबा म्हणाले.

" खरंच?" ते ऐकून श्रीराज खूप आनंदी झाला होता . त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. आबाचे हात हातात घेऊन तो वारंवार नमस्कार करत होता.
आबांनी होकारार्थी मान हलवत होकार दिला.

" आबा, येत्या दोन-तीन दिवसातच लग्नासाठी चांगला दिवस बघून , लग्नाच्या तयारी करायला सुरुवात करा."

" आजी , एकदा नंदूला बघून येऊ?" श्रीराज म्हणाला.

आजीने मानेनेच होकार दिला, तसा श्रीराज आतमध्ये नंदुच्या खोलीत गेला.

नंदू खेळून दमल्यामुळे बेडवर झोपी गेली होती.

"ही किती निरागस आहे. अजूनही तशीच आहे माझी नंदू, जसे पहिल्यांदा भेटला होतो." मनातच बोलत तो तिच्याजवळ गेला.

" खूप त्रास भोगला ग राणी तू. जेव्हा तुला माझी गरज होती, तेव्हाच मी तुझ्या जवळ नव्हतो . एकदाच मला माफ कर रे राजा , आता कधीच परत तुला स्वतःपासून दूर करणार नाही ."तिच्या डोक्यावरून हात फिरवत , तिच्या डोक्यावर, केसांवर किस करत तो बाहेर निघून गेला..


*******
क्रमशः

*********


🎭 Series Post

View all