माधवीने छान जेवण बनवलं होतं. वेदाला खीर आवडते म्हणून तिने खीर केली होती. सगळे जेवायला बसले.
"वेदा, आज जेवण तुझ्या वहिनीने केलं आहे बरं. तुला आवडते तशीच खीर केली आहे."
वेदाने खीर खाल्ली.
"काय हे वहिनी? साखर किती कमी आहे? आपल्या घरात अजून तरी कोणाला डायबिटीस झाला नाही" जरा तोंड वेडवाकडं करत म्हणाली.
माधवीला खूप वाईट वाटलं.
"चांगली तर आहे. ठीक आहे साखर." लक्ष्मी म्हणाली.
"हो छान झाली आहे." किशोर देखील म्हणाला.
"सपाक लागतेय आणि म्हणे छान झाली."
ती रुममध्ये निघून गेली.
"माधवी, वेदाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. तिला कळतच नाही कसं बोलायचे."
सर्व आवरून ती रुममध्ये निघून गेली.
विवेक कामावरून उशिरा आला होता.
"आज उशीर झाला?"
"हो जास्त काम होतं."
तो बेडवर आडवा पडला.
माधवी देखील त्याच्या बाजूला बसली.
त्याने तिला अलदग स्वतःकडे ओढले; पण ती नाराज होती.
तिचा नाराज चेहरा त्याच्या नजरेतून सुटला नाही.
"माधवी, काय झालं?" तिची हनुवटी धरत म्हणाला..
"काही नाही." ती उत्तरली.
"तू मला सांगणार नाही का?" विवेकने प्रेमाने विचारले.
"मी आज जेवण बनवलं होतं. वेदा ताईंना खीर आवडते म्हणून खीर केली, तर त्यांना आवडली नाही. साखर खुप कमी होती म्हणाल्या."
" अच्छा असं आहे तर. वेदाचं बोलणं मनावर घेऊ नको. ती तशीच आहे."
"बोलणं मनावर घेऊ नको? त्यांनी मला नीट सांगितलं असतं तर वाईट नसतं वाटलं; पण फार वेगळ्याच पद्धतीने बोलल्या. मला खरंच नाही आवडलं." तिने तिची बाजू मांडली.
"बरं मी बोलतो तिच्याशी."
"नको राहू द्या उगाच तुमच्यात वाद विवाद नको."
"आता माझ्या बायकोला वाईट वाटलं आहे तर बोलावं तर लागणारच ना?".
त्याच्या मिठीत ती विसावली.
सगळं छानच होतं. सासू,सासरा,नवरा सगळेच तिला जीव लावायचे; पण वेदाचं फटकून वागणं तिला त्रास देत होते.
वेदा रुममध्ये फोन बघत बसली होती.
"वेदा." लक्ष्मी.
"काय गं आई? काही काम होतं का?"
"हम्म थोडं बोलायचे होते."
"हम्म. ये."
"वेदा, तू मगाशी काय केलं?"
"मी काय केलं?"
"माधवीने तुझ्यासाठी खीर केली तर कसं बोलली तू तिला. आपल्या घरात अजून डायबिटीस कोणाला नाहीये. ही बोलायची पद्धत आहे?"
"आई,काय हे मी सहज बोलले आणि असंही किती साखर कमी होती? अशी बनवतात का खीर?"
"होती साखर कमी मग इतकं काय त्याचा बाऊ करायचा? तुझ्यासाठी आवडीने केली होती ह्याचे तरी भान ठेवायचे होते. तू लहान नाहीये कसं वागायचे आणि बोलायचे? हे तुला कळलं पाहिजे."
"आई, काय हे उगाच तू मला लेक्चर देऊ नको. स्पष्टपणे बोलली मी. मला नाही जमत वरवर कौतुक करायला."
"नसेल जमत तर जमवून घे."
"मी आहे तशीच राहणार." ती ठामपणे म्हणाली.
"तुझ्या वागण्यात बदल झाला नाही तर पुढे दुसरा बदल होईल हे लक्षात ठेव." असं बोलून ती निघून गेली.
' ही आईपण ना काहीही बोलते.'
वेदाचा स्वभाव काही बदलला नाही. प्रत्येकवेळी फटकळपणे बोलणं. असंच चालू राहिले.
माधवीमध्ये बदल होत गेला.
ती वेदासोबत कामापुरतं बोलू लागली.
तिला नणंद नको होती मैत्रीण हवी होती; पण तिचं स्वप्न अधुरं राहिले.
लक्ष्मी देखील झालेला बदल बघत होती.
वेदासोबत मैत्री झाली नाही; पण लक्ष्मीसोबत अतूट नाते तयार झाले.
लक्ष्मी नेहमी माधवी माधवी करत राहायची.
वेदाला आता जाणवू लागलं. माधवीचं महत्व घरात वाढलं होतं.
क्रमशः
अश्विनी ओगले.
स्पर्धा
अश्विनी ओगले.
स्पर्धा