Login

नात्यांची नवी वीण भाग १

नात्यांची नवी वीण भाग १
नात्यांची नवी वीण भाग १

" अनुष्का, घराचा उंबरठा हा फक्त आत येण्यासाठी नसतो ग !

तर तो सासर आणि माहेर या दोन जगांना वेगळं करणारी एक लक्ष्मणरेषा असते. तू या रेषेवर किती दिवस उभं राहणार आहेस ?

तुला नक्की कोणत्या बाजूला राहायचंय, हे एकदा ठरवून टाकलं तर आम्हा सर्वांनाच सोपं जाईल ! "

पुण्यातील बाणेर येथील एका पॉश अपार्टमेंटच्या हॉलमध्ये नेत्राने आपल्या हातातील आयफोन टेबलावर आदळत विचारलं, तेव्हा वातावरणातली थंडी अचानक वाढल्यासारखी वाटली. नेत्रा अनुष्काची नणंद होती.

लग्नाला तीन वर्षे होऊनही तिचं स्वतःच्या सासरी फारसं पटत नसे, त्यामुळे तिचा बहुतेक मुक्काम इथे माहेरीच असायचा.

अनुष्काने हातातील ट्रॅव्हल बॅग खाली ठेवली. तिने आज पीच रंगाचा मलमलचा ड्रेस घातला होता, केसांचा साधा अंबाडा आणि चेहऱ्यावर एक संयमी शांतता होती. तिने नेत्राच्या नजरेला नजर भिडवली आणि धीरगंभीर स्वरात म्हटलं,

" नेत्रा, नात्यांना लक्ष्मणरेषेच्या चौकटीत मोजणं आता जुनं झालंय गं !  हे घर माझं अस्तित्व आहे, तर कोल्हापूरचा तो वाडा माझी पाळं मुळं ! फांद्या कितीही विस्तारल्या तरी मुळांशी असलेलं नातं तोडलं की झाड वाळून जातं, हे तुलाही माहिती असायला हवं."

सकाळचे दहा वाजले होते. मोहिते कुटुंबाच्या या घराची रचना जेवढी आधुनिक होती, तेवढेच इथले विचार अजूनही जुन्या रुढींमध्ये गुंतलेले होते. अनुष्काचा नवरा, विवेक, एक यशस्वी बिझनेसमन होता. तो चांगला होता, पण घरातल्या स्त्रियांच्या वादात तो नेहमी शांत राहणं पसंत करायचा.
किचनमधून हेमलता अनुष्काची सासूबाई बाहेर आल्या. त्यांनी गडद तपकिरी रंगाची सिल्कची साडी नेसली होती. त्यांच्या हातात चहाचा कप होता, पण चेहऱ्यावर मात्र नाराजीचे ढग दाटले होते.

" अनुष्का, नेत्राचं बोलणं तुला कदाचित टोचेल, पण त्यात तथ्य आहे. आज कार्तिकच्या अनुष्काचा लहान भावाच्या ऑफिसचं ओपनिंग आहे म्हणून तू निघालीस. पण उद्या तिथे सण असेल, परवा कुणाचा वाढदिवस असेल... असं करत तू किती वेळा पळत सुटणार ?

मधुकररावांना अनुष्काचे सासरे यांना वाटतंय की तू आता या घरची सूत्रं पूर्णपणे हाती घ्यावीत. पण तुझं लक्ष तर नेहमी तिकडच्या बातम्यांकडेच असतं."

अनुष्काच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं.

' नेत्रा इथे हक्काने राहते तेव्हा आईंना चालतं, पण मी दोन दिवस भावाच्या आनंदासाठी गेले तर घराची सूत्रं धोक्यात येतात ? '

तिने स्वतःला सावरलं. तिला माहीत होतं की, सासरच्या माणसांशी वाद घालून प्रश्न सुटणार नाहीत, तर ते अधिक जड होतील.

" आई, मी फक्त दोन दिवसांसाठी कोल्हापूरला जातेय. कार्तिकचं हे पहिलं स्टार्टअप आहे. अतुल दादा आणि गौरी वहिनी सुद्धा माझी वाट पाहत आहेत. तिथल्या वास्तूत माझाही एक कोपरा आहे, तो मला साद घालतोय. मी इथल्या जबाबदाऱ्या कधी टाळल्यात का ? " अनुष्काने आर्ततेने विचारलं.

तेवढ्यात विवेक आपल्या केबिनमधून बाहेर आला. त्याने निळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट घातला होता. त्याने अनुष्काची बॅग पाहिली आणि मग नेत्राचा रागीट चेहरा.

" आई, नेत्रा... सकाळपासून काय हा वाद लावलाय ? अनुष्काने कोल्हापूरला जाणं हे काही नवीन नाहीये. आणि कार्तिकच्या आयुष्यातील इतक्या मोठ्या प्रसंगी तिने तिथे न जाणं म्हणजे त्याच्या आनंदावर विरजण घालण्यासारखं आहे."

" दादा, तू नेहमी वहिनीचीच बाजू घेतोस ! "
नेत्रा चिडून म्हणाली.

" आज संध्याकाळी तुझ्या ऑफिसची महत्त्वाची डिनर पार्टी आहे. क्लायंट्स येणार आहेत. तिथे वहिनीने तुझ्या सोबत असायला हवं की नाही ? की तू तिथे एकटा जाणार आहेस ? "

विवेक क्षणभर थांबला. त्याला त्या पार्टीची गोष्ट खरंच विसरला होता. अनुष्काच्या मनातही धाकधूक सुरू झाली. पार्टी की कार्तिकचं ऑफिस ? ' या पेचात ती अडकली.

" विवेक, मला खरंच आठवण नव्हती..." अनुष्का अपराधी स्वरात म्हणाली. विवेकने स्मितहास्य केलं.

"इट्स ओके अनुष्का. तू जा. मी मॅनेज करीन. कार्तिकचा हा दिवस पुन्हा येणार नाही. पार्टी आपण पुन्हा कधीही करू शकतो."

विवेकचा हा पाठिंबा अनुष्कासाठी एखाद्या ढालसारखा होता. पण हेमलता बाई आणि नेत्रा यांच्यातील मत्सर आणि असमाधान यामुळे घरातली शांतता भंग पावली होती. मधुकरराव बाल्कनीत बसून हे सगळं पाहत होते. त्यांनी अनुष्काला जवळ बोलावलं.

" अनुष्का, ये जरा . कोल्हापूरला गेल्यावर सुलभा वहिनींना माझा नमस्कार सांग. आणि हो, कार्तिकला सांग की त्याने जिद्दीने काम करावं. तुला तिथे गेल्यावर बरं वाटेल, पण इथली काळजी नको करू. विवेक आणि मी घर बघून घेऊ."

सासऱ्यांच्या या शब्दांनी अनुष्काला बळ मिळालं. तिने बॅग उचलली, पण जाताना नेत्राच्या नजरेत तिला एक वेगळीच धग जाणवली. नेत्राचा मत्सर केवळ अनुष्काच्या माहेरच्या ओढीवर नव्हता, तर विवेकने तिला दिलेल्या स्वातंत्र्यावर होता. नेत्राला स्वतःच्या सासरी जे मिळालं नव्हतं, ते अनुष्काला मिळत होतं, हे तिला सहन होत नव्हतं.

अनुष्का कारमध्ये बसली, पण तिचं मन दोन घरांच्या उंबरठ्यावर विखुरलं होतं. तिला कोल्हापूरला जायचा आनंद होता, पण पुण्यातील या घरातील धुसफूस तिला छळत होती. तिला माहीत नव्हतं की, कोल्हापूरला पोहोचल्यावर तिला अतुल आणि गौरी यांच्यातील एका मोठ्या वादाला सामोरं जावं लागणार आहे. नव्या

युगातील या बदलत्या नात्यांची ही गुंतागुंत आता एका नव्या वळणावर उभी होती.

सासरच्या या रेशमी गाठी घट्ट विणण्याचा प्रयत्न करणारी अनुष्का, माहेरच्या वादळाला कशी सावरणार ?

नेत्राचा मत्सर या घराला कोणतं वळण देणार ?
हे सर्व पाहणं आता महत्त्वाचं ठरणार होतं.