Login

नात्यातला ओलावा

आजकालचे नाते संबंध कसे सुधारतील हे लक्ष दिले पाहिजे
        "आज श्यामला त्याचा मोठा भाऊ मोहनच पत्र आलं होतं.

पत्र बघूनच तो अगोदर अवाक् झाला..


  कारण आज पर्यंत शामला अगदी दहा वर्षापासून मोठ्या भावाच असं पत्र चिठ्ठी वगैरे कधीच आलेलं नव्हतं.

ते तीन भाऊ होते..शाम, मोहन आणि गोपाळ,

दहा वर्षापूर्वी त्यांची आई गेली तेव्हा हिस्से वाटणी वरून तिन्ही भावात आणि तिन्ही जावांमध्ये खूप भांडण झाली होती..


   तेव्हापासून ते एकमेकांपासून दुरावले होते.

  श्यामने टेबल वरून चष्मा उचलून डोळ्याला लावला आणि वाचू लागले  पत्र श्यामचा मोठा भाऊ मोहनचच होतं..
  
       "ते पत्र वाचतानाच अगदी मन भरून येत होतं.

  मोहनच्या हाताने लिहिलेलं ते पत्र, अगदी हृदयाला स्पर्श होतील अशी वाक्य लिहिली होती...

मोबाईलच्या हजार मेसेजला सुद्धा त्याची सर येणार नाही...असं ते पत्र,

     "प्रिय श्याम,

    "खूप वर्ष लोटले रे! कधीपासून आपण तिनही भावांनी एकत्र दिवाळी साजरी केली नाही..

तुला आठवण आहे? जेव्हा आई जिवंत होती.. तेव्हा,
आपण तीनही भाऊ, शिक्षणाच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या निमित्ताने, वेगवेगळ्या शहरात होतो...
पण दिवाळी आली म्हणजे आई आपल्याला तीनही भावंडांना कसंही करून एकत्र घरी बोलवून घ्यायचीच..

किती मजेने आनंदाने आपण तिन्ही भाऊ एकत्र दिवाळी साजरी करायचो..

खुप आठवण येते रे तुमची दोन्ही भावांची..

   "मला वाटतं, यावर्षी आपण तिन्ही भावंडे आणि आपले बायको मुले एकत्र येऊन दिवाळी साजरी करू, तुम्ही आपल्या घरी इकडे गावाकडे या, दोन्ही भाऊ सगळ्यांना घेऊन..

आपण एकाच घरात सगळे कुटुंब एकत्र दिवाळी साजरी करू,
    
'श्याम, मला खात्री आहे, तुम्ही नक्की येणार...

येणार ना?

मी वाट बघीन...
  
दिवाळीच्या कमीत कमी एक दोन दिवस अगोदर तुम्ही नक्कीच घरी पोहचाल, अशी मला आशा आहे...
                         
                       तुझाच भाऊ,
                        मोहन

   
               ' त्या तीन भावांची आई गेली तेव्हा पासून जवळ जवळ दहा वर्षां पासून त्यांनी एकत्र दिवाळी साजरी केलेली नव्हती...
आई जिवंत होती तेव्हा तिघांना कसेही करून एकत्र आणायची...
सगळे मिळून ते अगदी धूम धाम मध्ये दिवाळी साजरी करायचे...
   
आई लक्ष्मीची पूजा करून, प्रसादाची थाळी बाहेर आणून तिन्ही मुलांच्या तोंडात एक एक लाडू द्यायची..
  

     आई सांगायची बाळांनो तुम्ही एकाच फांदीची तीन फुल आहेत..
यशोदा माईच्या कृष्णा चे तीन रूपे आहेत..
मोहन, शाम, गोपाल. तिन्ही नावे कृष्णाचीच..
म्हणून बाळांनो आयुष्यात तुम्ही नोकरी काम धंद्याच्या निमित्ताने, तिन्ही भाऊ वेगवेगळे असणार कुठेही..
पण मी नसले तरी दिवाळीला एकत्र येत जा..


      " बिचारी आई!

     'आई देवाघरी गेली, तेव्हापासून त्यांचं गाव सुटलं,
नाती दूर झाले..

भाऊ, भाऊ एकमेकांना दूर झाले..

नात्यातला दुरावा वाढला,. आणि असं करत करत हळूहळू खूप गोष्टी सुटत गेल्या.


     "श्याम हातात पत्र घेऊन विचारात गुंतला होता...
तेवढ्यात त्याची मुलगी रुही, आली.. आणि विचारलं,
"काय झालं पप्पा..?

तुम्ही एवढे सिरियस का आहेत..?

असं म्हणून श्यामच्या हातातलं पत्र घेऊन ती पाहू लागली...
तेवढ्यात शाम बोलला तुझ्या मोठ्या काकांच पत्र आहे...

ओह! म्हणजे तुमचे 'बिग ब्रदर चे...

तिने ते पत्र तिथेच खाली फेकून न वाचताच घरात गेली..

श्याम ला मुलीच्या अशा वागण्याचा राग आला...
त्याने पटकन पत्र उचललं, आणि खिशात घातल..
आणि मुलीवर जोरात ओरडला, "रूही! नीट बोल,

तुझे काका आहेत,

तुझ्या पप्पांचे मोठे भाऊ आहेत...

   "रुही निष्पाप पणे म्हणाली, पप्पा! तुमचे मोठे भाऊ,
म्हणजे तुमचे बिग ब्रदर, अर्थ तर एकच ना..मग त्यात मी काय वेगळं बोलली?

    तेवढ्यात शामची बायको सीमा म्हणाली, "अहो काय जेव्हा तेव्हा मुलांवर ओरडतच असतात...

   "सीमा म्हणाली, हो! पण तुझ्या पप्पांच्या मोठ्या भावांचं, म्हणजे तुझ्या काकांच, इथे कस काय अचानक नाव काढलं...
   
    "काय माहित आई! त्या पत्रात असं काय लिहिलं आहे,की अचानक पप्पांच्या मनात आपल्या मोठ्याभावा विषयी एकदम आदर निर्माण झाला... नाहीतर याच्या अगोदर कधी नाव सुद्धा घेतलं नाही... रूही बोलली!
  
    " सीमा आश्चर्यचकित होऊन म्हणाली,
पत्र? कसल पत्र?
श्यामने पत्र काढून सीमाला वाचायला दिले..

" पत्र वाचून सीमा एकदम बोलली..
आपल्या भावाला एकदमच लहान भावाची कशी काय आठवण झाली... अचानक इतकं काय प्रेम उमलून आलं भावांबद्दल...
   मला वाटत, दिवाळीच्या निमित्ताने तुम्हा नोकरी करणाऱ्या भावा कडून काहीतरी अपेक्षा असेल...

शाम ओरडला, गप्प बस काही पण बोलू नकोस

   " सीमाने दिवाळीला जायचं मना केलं..
"म्हणाली, "भावाने पत्रात एक वाक्य लिहिल येऊन जा म्हणून... आणि अगदी एक्सप्रेस सारखं तयार होऊन गेले.. लहान मुलासारखं,

'पन्नास वर्षाचे झाले तुम्ही आत्ता... स्वतःलाही थोडा आत्मसन्मान असू द्या...

    "श्याम म्हणाला, सीमा! एक भावाने दुसऱ्या भावाला आपल्या घरी दिवाळी साठी बोलवले त्यात आत्मसन्मान कुठला आला?
  
     "सीमा म्हणाली, "हे बघा आपल्या घरी अंधार करून तुमच्या भावाच्या घरी उजेड करायला जायचं नाही.,..
  
' दिवाळी आपल्या घरीच साजरी केली पाहिजे,


        "सीमा, आपण खरंच दिवाळी कशी साजरी करतो, " हे तुलाही चांगले माहीत आहे...

    तेलाचे दिवे लावण्याचा कंटाळा, इलेक्ट्रिक झगमगती दिवे घेऊन येतो आणि देतो टांगून...

दोन पक्वान्न करू शकत नाही, तू थकलेली असते...
शेवटी बाजारातून तयार मिठाई घेऊन यावे लागते...

आपली मुलं मोबाईल पासून दूर हटत नाही...
त्यांना दिवाळीचं महत्वच नाही...

आमच्या सारखे दिवाळी त्यांना कधीच मनवायला भेटत नाही..

      "श्याम म्हणाला, सीमा प्लीज, दिवाळीच्या निमित्ताने सगळे भाऊ आणि सगळे कुटुंब आपण एकत्र येऊ...
नाही म्हणू नकोस, बघ तू सगळे एकत्र आल्यावर आपली यंदाची दिवाळी नक्कीच स्पेशल होईल.... सगळ्यांचा आनंद चार गुना होईल...
    
   "श्यामच्या आग्रहाने सीमा नाविलाजने जायला तयार झाली...

    "दिवाळीच्या दोन दिवस अगोदरच, श्याम त्याची बायको मुलासहित, मुंबई हून मोहन च्या घरी गावाकडे  आलेत..

श्याम प्रमाणेच मोहनने गोपाल ला पत्र लिहिलं होत. त्याचं कुटुंबही नाशिक होऊन गावाकडे आले...

      " सगळ्यांना पाहून अभिमानाने  मोहन ने आपल्या पत्नीस सांगितले..
" अग तू सांगत होती ना! की तुम्ही उगाचच त्यांना आमंत्रण करता आहात... ते नाही येणार अस!

बघ आले की नाही माझे भाऊ!

"मोहन ची पत्नी म्हणाली, "तर मी खोटं थोडीच सांगत होती...

याच्या अगोदर कधी आले का ते एकदा ही!

     "गोपाल हसतच म्हणाला, "वहिनी! याच्या अगोदर तुम्ही बोलावलंच नाही आम्हाला कधी..
  
यावर मात्र सगळे खळखळून हसले...

त्या हसण्यातच एका क्षणात दहा वर्षाचं वैर मिटलं


           "संध्याकाळी गोबारस च्या दिवशीच, तीनहीं भाऊ, त्यांच्या बायका, व तिघींची मुलं असे सगळे मिळून घर अगदी गजबजून गेले...
सगळी मुलं अगदी एकमेकांत हरवून गेली...
तीनही बायांनी हसत खेळत यथासांग गाय गोहऱ्याची पूजा केली...
    
        ' रुही, जी आपल्या काकांना पप्पांचा बिग ब्रदर म्हणत होती... ति तर काकांची अगदी लाडकी चीऊ झाली..
काकांच्या सांगण्याप्रमाणे चहा करून द्यायची..
त्यांच्या डोक्याची मालिश करून द्यायची...
  
  शामला ते पाहून खूप आनंद व्हायचा...
'त्याला आपली चूक कळली, आपल्या मुलांना आपण सगळ्या कुटुंबाची ओळखच करून दिली नाही...तर, काका काकू काय असते... ? हे त्यांना कसं समजेल... ?   हा परिवार पण आपलाच आहे हे त्यांना कसं कळणार?

    
        "अगदी जवळ जवळ दहा वर्षांनी, तीनही भावांच कुटुंब एकत्र आल होत... सगळ्यांना एक सुखद अनुभव येत होता...

तीनही भावांच्या बायकांनी, एकत्र मिळून मिठाई बनवली... आणि मिठाई बनवताना तर त्यांच्या गप्पांना अगदीच उत आला होता... तीघही जावांच्या गप्पा खूप रंगत होत्या, हसण्या खिदळण्याला तर अंतच नव्हता

लक्ष्मीची पूजा करून मोठ्या वहिनीने प्रसादाची थाळी बाहेर आणली. व शाम आणि गोपाल च्या तोंडात अख्खी मिठाई खुपसली.

ते पाहून सगळीच हसू लागली...

शामच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले...त्यांना आईची आठवण झाली...आई सुद्धा असाच प्रसादाचा लाडू तोंडात कोंबत असे.

        "दिवाळीच्या दिवशी मोठ्या वहिनीने खापरावरची पुरणपोळी केली होती....

तिघांना पुरणपोळ्या आवडतात म्हणून त्यांची आई आवर्जून करायची.

  "तिन्ही भाऊ, एकमेकांच्या बायकांना त्यांचे नवऱ्याचे लहान पणीचे किस्से रंगवून सांगताना खूप पोट धरून हसू लागले.

"रात्री लहानासोबत मोठ्यांनीही फटाके फोडण्याचा आनंद घेतला...
 
     "भाऊ बीजेच्या दिवशी रुहिने, आपल्या भावांना म्हणजे काकाच्या मुलांना ओवाळले...

मोहनला मुलगी नव्हती... म्हणून यंदाच्या दिवाळीत मुलांना बहीण मिळाली ...

तात्पर्य:~ आपल्या मुलांना थोडसं परिवाराचे महत्व कळू दया, सोशल मीडियाच्या नकली दूनियेपासून थोडं दूर करून, परिवारात पण रमु द्या, नात्यांमधला ओलावा टिकून राहण्यासाठी असच प्रयत्न केला तर, नक्कीच समाज, गाव, शहर एकमेकांना भावनिक दृष्ट्या जोडून राहील..   

                     सौ.स्वाती पाटील


🎭 Series Post

View all