Login

आता खूप उशीर झालाय

काही गोष्टी वेळच्या वेळी केलेल्याच बऱ्या असतात
कथा : “आता खूप उशीर झालाय.”

तो आणि ती दोन वेगवेगळ्या शहरात राहणारे, पण एकमेकांच्या हृदयात कायमचे स्थिरावलेले.
तो पुणे मध्ये, ती मुंबई मध्ये. अंतर मैलांचं होतं, पण प्रेमाचं अंतर शून्य.

तो रोज तिला म्हणायचा,
“आपण भेटूया का? एकदा तरी समोर बसून बोलूया…”

ती हलकंसं हसायची,
“हो ना… पण आत्ता खूप काम आहे. पुढच्या आठवड्यात नक्की…”

तिचं शेड्युल खरंच खूप व्यस्त होतं. ऑफिस, मीटिंग्स, घरची जबाबदारी… कधी कधी तिला जेवायलाही वेळ मिळत नसे. पण तो?
तो तिच्या एका भेटीसाठी दिवस मोजत बसायचा.
ती म्हणायची, “तू इतका का वेडा आहेस माझ्यासाठी?”
तो उत्तर द्यायचा, “कारण तू आहेस म्हणून माझं जगणं आहे.”

त्याचे रोजचे मेसेज
“जेवलीस का?”
“थकली असशील… काळजी घे.”
“आज चंद्र खूप सुंदर आहे, अगदी तुझ्यासारखा.”

ती दोन दिवसांनी एकदा रिप्लाय द्यायची.
कधी आठवडाभरानंतर.
पण त्याने कधी तक्रार केली नाही.
तो तिच्या ‘ऑनलाईन’ दिसण्यावर हसत समाधान मानायचा.

एकदा तिने सहज विचारलं,
“मी इतका उशिरा रिप्लाय देते, तरी तुला वाईट वाटत नाही?”
तो म्हणाला,
“तू उत्तर देतेस, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे.”

त्यांचं नातं शब्दांपेक्षा जास्त भावनांवर चालत होतं.
व्हिडिओ कॉलवर तिचं थकलेलं चेहरं पाहून तो म्हणायचा,
“तू थकली असशील, पण माझ्यासाठी तू नेहमीच सर्वात सुंदर आहेस.”
ती त्याच्या आवाजातलं प्रेम ऐकून काही क्षण सगळा ताण विसरायची.

पण मग… अचानक काहीतरी बदललं.

एक दिवस.
दोन दिवस.
तीन…
आठवडा झाला.

त्याचा एकही मेसेज नाही.

ना “गुड मॉर्निंग”,
ना “जेवलीस का?”,
ना रात्रीचा “मिस यू”.

पहिल्या दोन दिवसांत तिने फार विचार केला नाही.
“कदाचित तोही बिझी असेल…”

पण सातव्या दिवशी तिच्या मनात काहीतरी खटकलं.
रात्री उशिरा ऑफिसमधून परतल्यावर ती बेडवर बसली आणि मोबाईल हातात घेतला. त्याचा चॅट उघडला. शेवटचा मेसेज आठवडाभरापूर्वीचा
“कधी तरी भेटायचं आहे… खूप दिवस झाले.”

तिचं मन अचानक अस्वस्थ झालं.
तिने मेसेज टाइप केला
“का रे? राग आलाय का माझ्यावर? मला मेसेज केला नाहीस… आठवडाभर झाला.”

ती स्क्रीनकडे पाहत राहिली.
ब्ल्यू टिक लागले.

काही मिनिटं…
मग ‘typing…’ दिसलं.

तिचं हृदय जोरात धडधडू लागलं.
हात थरथरत होते.
डोळ्यांसमोर त्याचा हसरा चेहरा.

मग एकच मेसेज आला.

“आता खूप उशीर झालाय.”

ती स्तब्ध झाली.

उशीर?
कशासाठी?
भेटण्यासाठी?
उत्तर देण्यासाठी?
की… कायमच्यासाठी?

फोन हातातच राहिला.
डोळ्यांत पाणी तरळलं.
आणि त्या रात्री पहिल्यांदाच तिला समजलं
व्यस्त वेळेपेक्षा जास्त मौल्यवान असतात काही क्षण…
जे हातातून निसटले की परत कधीच मिळत नाहीत.

स्क्रीनवर तोच शेवटचा मेसेज चमकत होता

“आता खूप उशीर झालाय.”

©® सचिन कमल गणपतराव मुळे...
परभणी, ९७६७३२३४१५
0