Login

ओढ तुझीच रे फक्त भाग 6

Odh Tujhich


भाग 6..
ओढ तुझीच रे फक्त..

आरती सुरज ला बाहेर लांब पर्यंत जातांना बघत होती ती तिथे उभी होती जोपर्यंत तो नजरे आड जात नाही...

"म्हण काही तरी कर काही इशारा ,हे बघ मी क्षणाचा ही विलंब न करता धावत येईल, फक्त तो हो म्हण ,फक्त एकदा हो म्हण ."
तो जणू तिला इशाऱ्याने खुणावत होता

आरती , " मी म्हणाले असते पण इतका अधीर ही होवू नकोस रे ,समजून घे होकार आहे , फक्त तू इशारे ही समजून घे "
ती ही इशाऱ्याने खुणावत होती

तो तिला आरशातून बघत होता ,बाय म्हणून निघत होता, जोपर्यंत ती नजरे आड जात नाही ,कारचा वेग त्याने मुद्दामच कमी ठेवला होता..ती दूर जाऊ नये असे त्याचे मन म्हणत होते , जी आता नजरेत भरली ती नजरे समोरून जाऊ नये असे त्याला वाटत होते...

ती जरी आता दिसत नव्हती तरी, तिची लाल रंगांची ओढणी अजून ही वाऱ्यावर झुलताना दिसत होती... ती ओढणी जणू तिच्या कडे त्याला ओढत होती..आणि जशी जशी ती ही दिसेनाशी झाली तेव्हा त्याने जोरात कार चे ब्रेक लावले.. अचानक कार थांबली...लांब होत जात असलेली ती आरती आणि तिचा दुरावा सहन होत नव्हता ..

एक हुरहूर का वाटत होती..का तिचे दूर होने मनाला चटका लावून जात होते...

त्याला वडिलांनी मागून आवाज दिला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, "हळूहळू चालवत रहा रे बाबा ,नाहीतर आपण आज इथेच मुक्काम करू वाटले तर, "

"बाबा हो ,हळूच चालवतो ,डोन्ट वरी " सूरज

"विचार करत जाणे हे योग्य नाही रे " बाबा

त्याला आता घराच्या ओढी पेक्षा तिची ओढ जास्त लागली होती... आजच तर मनात असलेले बोललो आणि आजच असे का व्हावे.. तिने तर मनातले नाही सांगितले तरी मी का म्हणून माझे मन तिच्या कडे ठेवून यावे...

जणू तो ही हळवा झाला होता.. जवळीक हवी हवी वाटत असताना दुरावा मात्र नको होता..

मनात बोलत होता ,तिला ही हेच होत असेल का ?..की ती तशी नसेल...असेल ही तशी ती...नाहीतर का ती इतका वेळ थांबून होती... मी आता नाही राहू शकत तिच्या पासून दूर..

इकडे तो घरी पोहचला आणि त्यात भान हरपून गेलेल्या आवस्थेत तो गाडी ची चावी गाडीला विसरला.

बाबाला ही नवल वाटले कधी चावी न विसरणारा आज असा कसा चावी विसरला, झालंय काय ह्याला, जातांना तर ठीक ठीक होता..असे म्हणून त्यांनीच ती चावी काढून आत घेऊन गेले...


आज तो नेहमी सारख सूरज हिरमुसला होता.. मन कुठे तरी हरवले होते.. पण असे नेमके कसे झाले हे वडिलांना ही उमजत नव्हते.. ना मामा काही बोलला ,ना आरती काही बोलली ,मग गाडी घसरली कुठे...

इकडे आई बाहेर आली ,तेव्हा तिला ही सुरजचा उतरलेला चेहरा साफ दिसत होता... तो ना धड कोणाशी बोलत होता ना कोण आले आहे हे बघत होता..

थोडा वेळ सगळ्यांसोबत हॉल मध्ये थांबून तो निघून गेला..सगळे त्याचे वागणे टिपत होते...


पूजाला ही कळत नव्हते.. पण आईला कळले होते ही बाब त्याच्या मनाशी संबंधित नक्कीच होती...आणि नेमकी कसली हुरहूर होती.

आई आहे ती त्याची नस ना नस ओळखत होती... तशी ती आत्या म्हणून आरतीला ही ओळखत होती...ह्या दोघां मध्ये काही तरी बिनसले आहे हे खरे.


दोघांच्या मनात काय चालू होते ते तिला खूप आधीच कळले होते... पण ती वाट बघत होती की हे त्या दोघांना कधी कळेल ह्याची, आणि आज ते दोघांना ही कळले असावे आणि म्हणून राजे कुठे तरी हरवले आहे...

इथे जर सूरज चे हे हाल आहेत तर नक्की आरतीचे ही हेच हाल असतील..ती ही अश्याच मनस्थितीत असेल, तिची तर द्विधावस्था असणार हे नक्की...ती कधीच बोलून दाखवणार नाही...मला अजून काही वेगळा निर्णय घ्यावा लागेल...त्यांच्या मध्ये दुरावा निर्माण करावा लागेल ...त्यांची एकमेकांसाठी असलेली ही ओढ कमी कशी होईल हे बघावे लागेल.. आई मनात काही तरी सांगड घालत होती.

"सूरज कुठे हरवलास ,काही मनाला खटकत आहे का, की उगाच काही कारण नसतांना चेहरा का पडला आहे " आई

"मला जरा बरं वाटत नाही, मी नंतर बोलू का तुझ्याशी ह्या बाबत " सूरज

"बर,उद्या बोलू ,जा आराम कर जरा " आई

पूजा, " आई आग तू कशी ग अशी, तसे ही तुला नाही कळणार त्याचे काय बिघडले ते ,तू राहू दे "

सगळे हसत गेले होते पण येतांना सगळे शांत होऊन आले.. आईला भले ही पूजा आणि सूरज म्हणून गेले ,तुला कळत नाही पण तिला कळत होते का ???

" हो मलाच वेडीला कळत नाही ,आले मोठे समजून घेणारे ,आई आहे मी ,तुम्हाला तरी माहीत आहे का, नेमके काय बिघडले ह्याचे मामाच्या घरी हो " आत्या प्रकाशराव यांना बोलत होती

इकडे मामा तयार होता, त्याला दोघांच्या मधील ओढ घट्ट करायची होती...दोन जीवांना जवळ आणायचे हेच त्याला मनापासून वाटत होते..

आरती , इकडे शांत शांत झाली होती .
मनाशी बोलत होती , "सूरज आला नसता तर आज इतकी बेचैन झालीच नसती, बरं होतं ते एक तरफा प्रेम ,तो मनात होता तेव्हा हसू होते चेहऱ्यावर ,आणि आता जे हवं ते मिळाले तरी हुरहूर जाईना... हे माहीत असून ही की ,आत्या त्याच्यासाठी स्थळ बघणे सुरू करेन ,माझ्या पेक्षा ही त्यासाठी कोणी साजेशी मुलगी मिळेल.. मग त्याने का असे ऐन वेळी येऊन मला त्याची ओढ लावली..मी एकटी बरी होते हे पहावले नाही का ...काय वेड्या रे मना तुही लगेच गुंतलास त्याच्यात .तुला ही धीर धरवला नाही का, "असे म्हणत उशीला मारत होती ,जणू तिचे मन आहे ते, किंवा कधी सूरज समजून घट्ट मिठीत घेत होती .


एक अतृप्त राहून जाणारी ओढ लागली होती ,की त्याने लावली होती..

तिने खूप सावरले स्वतःला , जेणे तिच्या वडिलांना कळू नये आज जे घडले आहे आणि त्याचा तिच्यावर होणारा एक अलवार परिणाम... त्यांना त्रास होईल असे ती वागणार नाही हे तिने ठरवले होते....

कधी काळी त्यांनी तिला समजावले होते की, "आरती बाळ अग जे मिळणार नाही ,जे आपले नाही ,त्याचा हट्ट करायचा नाही " हा शब्द तिच्या वडिलांचा नेहमीच असायचा...

तिला नेमका तो शब्द वारंवार कानी पडत होता.. पण त्याची ओढ अशी होती की ,तिचे मन सांगत होते ,सूरज तुझाच आणि फक्त तुझाच आहे... आणि तो तुलाच मिळणार आहे... असे विचार करत करत कधी तिला झोप लागली हे कळलेच नाही...


सकाळी उठली तर बघते तर काय ,सुरजच्या फोन वरून पाच मिस कॉल्स आले होते... तिला हे जणू स्वप्न वाटत होते... हे कसे असे होऊ शकते...शक्यच नाही ,मी स्वप्नात आहे का हे जाणून घेण्यासाठी स्वतःला तिने जोरात चिमटा घेतला होता... तरी अतोनात खुश असणारी आरती डोळे चोळत होती... आणि परत ते मिस कॉल्स बघून खुश होती...


आता तिला मनातून वाटत होते...सूरज माझाच आहे आणि माझाच रहाणार आहे...

तिने त्याच्या फोन वर चार कॉल्स केले होते पण तिकडून सूरज ने कॉल्स घेतले नाही ,म्हणून तिने काही वेळाने प्रयत्न करू .

तिच्या आवडीच्या गुलाबाच्या झाडांना पाणी द्यायला गेली होती, आज कधी न उमलणारे गुलाब उमलले होते... वर्षा नंतर त्याला फुले आली होती...तिला तो शुभ संकेत वाटत होता, जसा तिच्या मनीचा गुलाब उमलला होता तसेच काही...


मग तिने बाबांना चहा करून दिला.. त्यांना काल उदास वाटत असलेली आरती आज खूप खुश वाटत होती...काही तरी तिच्या मनासारखे झाले असेल हे समजत होते... जातांना गोल गोल फिरत होती, तिच्याच तालात होती... ही खरी आरती होती..बिनधास्त आणि सतत आनंदी असणारी... तिच्या आनंदाने घर खुलवून टाकणारी..

"ओ हो आज काय खास ,इतकी खुश !!! काय झाले ग ,असू दे तू खुश असली तर मला अजून काय हवे \"" बाबा

"तसे काही नाही ,मला अशी लहर आली ,तुला माहीत आहेच ना ,मला कारण लागत नाही खुश होण्यासाठी " आरती

" काही मनातले सांगायचे आहे का ?? म्हणजे काही सांगायचे असेल तर तू माझ्या सोबत शेर करू शकतेस, बाबा आहे मी तुझा ,आणि तू म्हणतेस तसा मित्र ही होऊ शकतो बरं " बाबा तिच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता..

" नाही तसे अगदी काही नाही रे ,मी वेळ आली की सांगेन ,तू विश्वास ठेव, ती वेळ लवकरच येईल बाबा " आरती

" ती वेळ लवकर येवो ग " बाबा

"काय रे बाबा ,तू तर असा बोलत आहेस की तुला माहीत आहे जणू ," आरती

" एक विचारायचे होते आरती ,तुला कोणी आवडतो का ,की आवडू लागला आहे ?? " बाबा आता जरा गंभीर होऊन विचारत होते

" नाही बाबा ,असे काहीच नाही ,असेल तर तुलाच आधी सांगणार " आरतीने बाबाचा हा प्रश्न खोडला आणि वेळ मारून नेली


इकडे आरती परत बेड रूम मध्ये आली ,पण म्हणाली ,जरा अजून वाटत बघू दे त्याला, कळू दे आरतीचे मन जिंकणे इतके पण सोपे नाही ..

सुरजच्या मोबाईल वर आरतीचे इतके कॉल्स बघून तो ही खुश झाला होता, त्याला वाटले की तिने तिचा विचार सांगायला फोन केला असेल, इतके कॉल्स आले आहेत म्हणजे तिला हे मान्य आहे, तिचा ही होकार आहे हे नक्की ..

ती ही तिच्या मनातले सांगणार जे ऐकायला मी अधीर होत आहे. पण ती मुद्दाम अजून काही वेळ आणि मला छळणार आहे.
छळू दे ,पण ती आज तिचे प्रेम व्यक्त करणार आहे हे नक्कीच .
ओढ ती ही मला लावणार आहे... आणि ओढ तिला ही माझी असणार आहे...ती ही होळीच्या आधी माझ्या प्रेमाच्या रंगात रंगणार आहे..

आई सुरजला उठवायला येते, आणि ती त्याचा फोन मागते...तितक्यात आरतीचा फोन येतो... ती खूप अधीर असते सूरज सोबत बोलायला.. पण ती अबोल असते ,फक्त त्याचा आवाज ऐकण्यासाठी ..

"हॅलो,सूरज ऐकतोस ना ,तू काही का बोलत नाहीस !! ,तुझा आवाज ऐकण्यासाठी मी अधीर झाले आहे...बोल ना प्लिज ,काही तरी बोल!!, का असा छळतोस मला ?, काल ही तू तेच केलेस आणि आज ही हेच करून मला छळणार आहेस असे ठरवलेस का ? का मग नव्हते बोलायचे तर इतके कॉल केलेस इतक्या सकाळी सकाळी.." आरती सूरज ला बोलत होती..

इतक्यात आई सुरजच्या हातातून फोन घेते आणि आरतीला सांगते ," अग तुला सकाळी सकाळी कॉल्स मी केले होते, सुरजने नाही ,आज घरी जरा पाहुणे येणार आहेत..तर मला वाटले की तू घरी यावे आणि जरा पुजाला घर सजवण्यात हातभार लावावा... जमेल ना तुला... खास पाहुणे आहेत ते...मग तू आज इकडे जेवशील ह्यासाठी फोन केला होता...ये आम्ही वाट बघत आहोत तुझी.."

सूरजच्या हातात फोन देऊन आई निघून गेली..अशी नजर होती की तिला काल झालेला प्रकार कळला होता ,आणि तो काल का उदास होता ह्या मागचे खरे कारण ही तिला कळले होते.. पण तिने उलटून झालेल्या प्रकाराबद्दल एक ही प्रश्न विचारला नाही ..

" सूरज आता आवरून खाली ये ,मुली कडील लोक येणार आहेत ,तुझ्या मनातला पसारा आणि हा पसारा जरा आवरता घे , सगळे झाले गेले ते विसर , कारण सर्व तुझ्यावर अवलंबून आहे..सगळेच ,कळतंय ना तुला ,सगळेच " आई सुरजला ठणकावून सांगून गेली..

सूरज ने जोरात एक उसासा टाकला, त्याला कळत नव्हते की नेमके काय सगळे, तिला काय म्हणायचे ते ,तिचा नेमका इशारा काय होता.

सूरज तर शॉक मध्ये होता,

आरतीने जे गोड स्वप्न रंगवले होते ते सगळे स्वप्न विरून गेले ,ती परत उदास झाली होती..सूरज ने कॉल्स केले नव्हते तर आत्याने हे कॉल्स केले होते. मी का परत परत मनाचे खोटे इमले बांधत आहे..जे माझे नाही ते माझे होणारच नाही हेच खरे..

इकडे सूरज ही नाराज झाला, त्याला कळले की आईनेच त्याच्या फोन वरून आरतीला कॉल्स केले होते.. आणि म्हणून आरतीने त्याला इतके मिस कॉल्स केले होते. तिला वाटले की मी केले हे कॉल्स. पण काही असो त्याला कळले होते की तिच्या मनातील ओढ त्याच्या हृदयाच्या ओढीला साद घालत होती... चुकून या का असेना अगदी योग्य वेळी हा कॉल तिच्या मनापर्यंत पोहचला होता...