Login

ओंजळीत माझ्या सुखाचे चांदणे...४

कथा मालिका
ओंजळीत माझ्या ४

केतकी सामान घेऊन निघून गेली. एका
दिवसांतच तिने तिचे घर सेट केले. पण मनात मात्र निराशेचे मळभ साचले होते. ऊन पावसाचा जसा खेळ चालतो ना तसे तिच्या मनाचे झाले होते. चार वर्षाच्या संसारात एक मिनीटे सुध्दा शशांक पासून ती दूर झाली नव्हती. पण अचानक घडलेल्या या प्रसंगातनू ती हादरली होती. आपली ही अवस्था तर शशांकची काय अवस्था असेल. नुसत्या विचारांनीच तिला अस्वस्थ होत होते. सगळीकडे तिची बदनामी झाली होती. पण तिने आयुष्याच्या वाटेवर एकट्याने प्रवास सुरू केला.

पाहुया पुढे....

केतकी आणि शशांकच्या मध्ये अलकाताई भिंत बनून उभ्या राहिल्या. त्या दोघांना त्यांनी सहा महिन्यांत वेगळे केले. केतकीच्या माहेरी ही गोष्ट कळली. त्यांनी सुध्दा केतकी आणि अलकाताईंना खूप समजावून सांगितले. पण काहीच फरक पडला नाही.

त्यानंतर केतकीने मनावर दगड ठेवला. हळुहळु केतकी बरीच स्थिर झाली होती.

दुसऱ्या दिवशी...

केतकी महाविद्यालयात पोहोचली.

तिच्या डीनने तिला ऑफीसमध्ये बोलावले.

"काय केतकी मॅडम, झाली का कविता तयार?"

"हो अगदी शेवटच्या टप्प्यात आहे सर."

"मग आम्हाला कधी ऐकवता. एक काम करा चार ओळी जरा ऐकवाच."

"सर, थोडी अपुर्ण आहे."

"काही हरकत नाही. पण तुमच्या शब्दात जादू असते. ती ऐकायची आहे."

"ओके सर."

कवितेच शीर्षक आहे. 'ओंजळीत माझ्या'

ओंजळीत माझ्या
सुखाची चाहूल
मनात विचारांचे
उठले काहूर....

आयुष्याच्या वाटेवरती
पावले चालली मी सात
विश्वास दिला त्याने
धरून हाती माझा हात....

रेखाटली रांगोळी
सुरेख अशा स्वप्नांची
विविध रंग भरूनही
होळी झाली स्वप्नांची....

दूर गेलो जरी आम्ही
मन त्यातच गुंतले
अचानक तो दिसताच
हृदय पुन्हा तुटले....

अचानक तिच्या आवाजात कापरे भरले. डोळ्यात पाणी आले. कंठ दाटून आले.

"साॅरी सर. "

"खुपचं सुंदर केतकी मॅडम. तुम्ही जीव ओतून लिहीता. हीच गोष्ट मला फार आवडते."

"धन्यवाद सर."

"या तुम्ही आता. करा तयारी. आपल्याला महाविद्यालयातून तुम्ही कविसंमेलनासाठी जाणार आहात. याचा मला अभिमान आहे."

"धन्यवाद सर."

ती केबिनमधून बाहेर पडते. पण तिच्या अश्रुंचा बांध फुटला होता. शशांकचा विरह तिला सहन होत नव्हता. मनात कंप सुटला होता. तिचे हात पाय लटपट करत होते. अचानक तिच्यासमोर अद्वैत येतो.

"काय झालं केतकी मॅडम? इतक्या अस्वस्थ कि आहात?"

"साॅरी. काही नाही." असे म्हणत ती पुढे निघाली. पण अचानक तिला चक्कर आली. काही कळायच्या आतच ती खाली पडली. डाॅक्टरांना बोलावले. तर त्यांनी दोन तीन दिवसांपासून काहीच खाल्लेलं नव्हते. असे लक्षात आले. त्यांना ग्लुकोज चे पाणी प्यायला दिले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. तिच्या स्वभावामुळे अनेक विद्यार्थी आपले लेक्चर सोडून तिला बघायला आले. काही वेळात ती शुध्दीवर आली.

"मी इथे कशी !" ती पेशंटच्या रुम मध्ये झोपली होती.

"मीच आणले तुम्हांला."

"का? " ती उठून बसली.

तेवढ्यात डीनसर तिथे आले.

"केतकी मॅडम तुम्ही थोडावेळ आराम करा. आज लेक्चर्स नाही घेतले तरी चालतील."

"साॅरी सर. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला."

"अद्वैत सर , प्लीज यांना यांच्या घरी सोडून या."

"नको सर मी जाईन."

"नाही. अजुनही तुम्हाला बर वाटत नाहीये. तेव्हा आज मी तुमचं काहीच ऐकणार नाही."

अद्वैतने लगेच गाडी काढली. दोघेही निघाले. पण केतकी शांत होती. वीस मिनीटांच्या वेळात ती एकही शब्द बोलली नाही. तिच्या रागाचा उद्वेग झाला होता. तिला तिचे जीवन एकाकी, भकास‌ वाटू लागले. रस्त्यावर एवढी गर्दी असुनही तिला एकटे असल्याचा भास होत होता. तिची दूर कुठेतरी तंद्री लागली होती.

"केतकी मॅडम, तुमचे घर आले. केतकी मॅडम..."

"हो, काय झाले?"

"अहो, घर आले तुमचे."

"ती गाडीतून खाली उतरली. पण कम्फटेर्बल नव्हती. तिचा तोल जात होता."

अद्वैतने तिचा हात धरून नेले. लाॅक उघडून ते घरात गेले.

"मला वाटतं तुम्ही तुमच्या सोबत कोणालातरी बोलवून घ्यावे. तशी गरज आहे."

"नको, मी ठीक आहे. "

अद्वैतने स्वतः च स्वयंपाक घरातून पाणी आणले आणि तिला दिले.

"साॅरी सर, तुम्ही पहिल्यांदाच माझ्या घरी आले आणि मी तुम्हाला..."

"नो फाॅरमलिटी केतकी. आधी तुम्ही तुमची काळजी घ्या. एक काम करतो. मी तुमच्यासाठी गरमागरम खिचडी आणि कढी बनवतो."

"नको, मी खाईल काहीतरी, थॅकन्स."

ती उठायचा प्रयत्न करू लागली. पण पोटात काहीच नसल्याने तिला थकवा येत होता. काही वेळातच तिला झोप लागली.

इकडे अद्वैतने स्वयंपाक घरात थोडी सामानांची शोधाशोध केली आणि खिचडी आणि कढी बनवली.

तो बाहेर येऊन बघतो तर केतकीला गाढ झोप लागली होती. एका निरागस हास्याच्या मागे किती दुःख आणि वेदना लपलेल्या आहेत. खिचडीचा कुकर थंडा झाला होता. पण केतकीला इतकं गाढ झोपतांना बघून तो शांत बसून होता.

काही वेळानंतर तिला जाग आली.

"साॅरी, अद्वैत सर. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला. "

"ठीक आहे. मी निघतो आता. तुम्ही आराम करा. शांततेत कविता तयार करा. "

मनातून खरंतर ती बिथरली होती. यावेळी तिरा खरोखरच कोणाच्या तरी आधाराची, प्रेमाच्या स्पर्शाची गरज होती. पण आयुष्याच्या वाटेवरती एवढे काटे पेरले गेले होते. की एक पाऊल जरी टाकले तरी प्रत्येक पावलातून दुःखाचे रक्त वाहत होते. पुढे ती काही निर्णय घेते की नाही.

पाहुया पुढच्या भागात....