Login

पावलांची सरगम...भाग 2

पावलांची सरगम
पावलांची सरगम...भाग 2

लग्न... पण वेगळं...

त्यांचं लग्न मोठ्या हॉटेलमध्ये किंवा मंदिरात झालं नाही. ते पावलांची सरगम मध्येच झालं.
साक्षीदार- त्या जागेतील प्रत्येक टेबल, पुस्तकं, wish jars आणि अनेक जुन्या ग्राहकांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या.

सईने केसात तुळस-मोगऱ्याचं गजरा घातलं, ऋषभने साधा कुर्ता आणि धोतर. दोघंही चमकत नव्हते, पण त्यांचं प्रेम झळकत होतं.

लग्नानंतर... सई आणि ऋषभने पावलांची सरगम मध्ये एक नवीन उपक्रम सुरू केला —

“Coffee with a Promise” –
प्रत्येक जोडप्याला एक दिवस एकत्र वेळ घालवायचा, एक wish लिहायची आणि तोंडभर हसू द्यायचं.

त्यांचं प्रेम, एकमेकांचा सन्मान आणि 'कॉफी'तून सांडणारी भावना शहरातल्या अनेकांना जोडत गेली.

ऋषभच्या लहानशा भाड्याच्या घरात सकाळचा प्रकाश हळूहळू खोलीत डोकावत होता. स्वयंपाकघरातून कढईतलं फोडणीचं खमंग झणझणीत सुगंध हवेत भरत होता.

सई एकदम साध्या पांढऱ्या पंजाबी ड्रेसमध्ये, केस मोकळे, कानात छोटीशी झुमकी घालून पोहे करत होती. ऋषभ तिला दरवाज्याच्या चौकटीतून पाहत होता.
“माझं आयुष्य इतकं सुंदर, शांत आणि पूर्ण होईल, असं वाटलंच नव्हतं…”

सई मागे वळून म्हणाली,
“अहो... किती वेळ उभे राहणार अशा पाठमोऱ्या?”
ऋषभने हसून उत्तर दिलं,
“तुझ्याकडे पाहताना वेळ थांबावा असं वाटतं… पण पोटाला मात्र वेळेवर भूक लागते."

दोघं हसत हसत टेबलावर बसले. पहिल्या न्याहारीतही एक हळवा स्वाद होता- आपुलकी आणि नवीन सहवासाचा..

ऋषभ आणि सईने ठरवलं होतं – आता फक्त एकाच कॉफीशॉपपुरतं नाही, तर ही संगती शहरभर पसरवायची. त्यांनी एक नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पण यावेळी, सईला एक वेगळं स्वप्न होतं –
“ऋषभ, आपण या कॉफीशॉपमध्ये केवळ प्रेमीयुगलचं नाही, तर अनाथ मुलांसाठी एक कोपरा तयार करूया ना? जिथं ते येऊन पुस्तक वाचू शकतील, खेळू शकतील…”

ऋषभने एकदम मनापासून मान डोलावली,
“तू जिथे हृदय ठेवशील, मी तिथे हात जोडेन…”

पावलांची सरगम नविन शाखेमध्ये एक छोटासा रंगीत कोपरा बनवण्यात आला. तिथं पुस्तकं, चित्रं, खेळणी आणि गाण्यांच्या छोट्या गप्पांची जागा होती. दर रविवार मुलांसाठी “गोष्टींची वेळ” असायची.
सई गाणी गात असे, ऋषभ गोष्टी सांगायचा.

हळूहळू ते ठिकाण एका समुदायाचं मन बनलं. वृद्ध लोकांपासून ते लहान मुलांपर्यंत, प्रत्येकजण त्या जागेला आपलं म्हणू लागला.

एक दिवस, एका लहानशा मुलीने सईला विचारलं
“ताई, तू माझी आई होशील का?”
सई क्षणभर स्तब्ध झाली. डोळे पाणावले. पण नंतर तिनं त्या मुलीला मिठीत घेत उत्तर दिलं —
“हो ग, मी तुझी कथा आई होईल… जी तुला रोज झोपायच्या आधी एक गोष्ट सांगेल…”

ऋषभ आणि सईनं एकत्र मिळून पावलांची सरगमला एका चळवळीचं रूप दिलं होतं.
ती फक्त कॉफीशॉप नव्हती. ती होती एक सजग स्वप्नांची बाग जिथे प्रेम, आपुलकी आणि माणुसकी यांचा प्रत्येक घोट होता.
पावसाळ्याचे दिवस होते. 'पावलांची सरगम' मध्ये खिडकीजवळ बसलेल्या लहानग्यांची नजर बाहेरच्या पावसावर होती. पावसाच्या सरी, सईच्या गोड गाणी आणि ऋषभच्या गोष्टी..
ह्यांनी त्या जागेला एक जिवंत स्वप्न बनवलं होतं.

त्या दिवशी सईने एका चिमुकल्या मुलीला मीराला पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलं होतं.

मीरा, सात वर्षांची, केस विस्कटलेले, डोळ्यात खूप काही दाटलेलं पण न बोलणारी… एकटीच बसलेली. तिच्या ओंजळीत एक छोटीशी बाहुली होती. जी पावसात ओलसर झाली होती.

सईने तिला विचारलं,
“ही तुझी सखी आहे का?”
तिने हळूच मान हलवली,
“आई गेल्यापासून हीच माझी सोबती आहे…”

सईचं काळीज क्षणात दाटून आलं.
ती हसत म्हणाली,
“आता मीरा आणि बाहुली दोघीही पावलांची सरगम मध्ये राहतील… का गं?”
मीरा पहिल्यांदाच हसली.

सई आणि ऋषभचं मोठं पाऊल...

त्या रात्री, सईने ऋषभसमोर एक मोठं स्वप्न उघडलं.

“मी मीराला दत्तक घ्यायचं ठरवलंय. तिचे डोळे... ऋषभ ते खूप काही बोलतात.
तिला आई-बाबा, घर, शाळा आणि प्रेमाची जिथे किंमत आहे अशी जागा हवी आहे...”

ऋषभ थोडा थांबला, तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला,
“सई... तू एकटीच आई नाही होणार, आपण दोघं तिचे आईबाबा होणार आणि ‘पावलांची सरगम’ तिचं अंगण बनणार.”

मीराचं नवं आयुष्य सुरु झालं.

नव्या कपड्यांत, शाळेच्या पिशवीसह, मीरा आता दर सकाळी ऋषभसोबत कविता म्हणत दुकानात यायची. सई तिला अक्षरांमध्ये जगणं शिकवत होती.
संध्याकाळी ती wish jar मध्ये गोष्टी टाकायची.

“आज आईने मला मिठी दिली... मी सांगितलं नाही, पण मनाला खूप बरं वाटलं.”

“बाबा मला झोपताना गोष्ट सांगतात. त्या गोष्टींत आई असते, पण माझीच.”
त्या चिठ्ठ्या आता फक्त दुकानाचा भाग नव्हत्या, त्या त्यांच्या आयुष्याचं आरसाच होत्या.