आमचे एक लेखक मित्र आहेत, ते नेहमी नवऱ्यांना गरीब माणूस म्हणून संबोधतात. त्यांना मी सांगू इच्छिते की ते ज्यांना गरीब माणूस म्हणतात, त्या गरीब माणसा पायी मी चक्क एका मोबाईल कंपनीला इतक्या शिव्या दिल्यात इतक्या शिव्या दिल्यात की अजूनही माझं नवीन मोबाईल घ्यायचं मुहूर्त निघालेलं नाही.
झालं असं की माझा जुना मोबाईल खूप स्टोरेज प्रॉब्लेम दाखवू लागला. फोटोज व्हिडिओज डिलीट करून करून मी थकले. म्हणून साहेबांनी एक नवीन मोबाईल मला घेऊन दिला. माझी उगीच धावपळ होऊ नये म्हणून काळजीपोटी साहेबांनी मोबाईलला प्रोटेक्शन म्हणून कव्हरही विकत घेऊन मग माझ्या हवाली केला.
आता साहेबांनी इतक्या प्रेमाने दिला म्हटल्यावर मी कशाला त्याचं कव्हर वगैरे बघते काढून. मी आपली तशीच फोटो काढू लागले. पण एकही फोटो धडाचा येत नव्हता.
एक स्त्री म्हटल्यावर तिला मोबाईल कशासाठी हवा असतो? ( माझ्या बाबतीत तरी ) छान सुंदर मनमोहक फोटोज व व्हिडिओज काढण्यासाठी. पण आमचा तो मोबाईल तेच मुख्य काम करत नाही आहे हे बघून जीव कसातरी झाला.
मनात आलं, वीस एकवीस हजाराचा मोबाईल पण फोटो इतक्या लो क्वालिटीचे, धूसर भुरकट असं का होतंय काही कळेना. म्हणून मग ऑनलाईन त्या मोबाईलची माहिती ही काढली. रिव्ह्यूज चेक केले. सगळं ओके होतं. तक्रारी असतातच म्हणा काही ना काही पण फोटो बद्दल किंवा व्हिडिओ बद्दल सर्व चांगल्याच कमेंट्स होत्या.
मला काही कळेना की मग माझ्याच मोबाईल सोबत असं का होतंय. बापरे मनोमन साहेबांचाही चांगला राग आला मला. त्यांना म्हटलं तुम्ही घेतलाय ना हा मोबाईल विकत मग ठेवा तुम्हीच. मला नको असा विचित्र लो कॉलिटी फोटो काढणारा मोबाईल.
साहेबांना ही खूप वाईट वाटलं. पण त्यांचाही जुना मोबाईल ९९ टक्के डॅमेज झालेला त्यामुळे त्यांनाही गरज होतीच नवीन मोबाईलची. म्हणून त्यांनी इतकं काही मनाला लावून घेतलं नाही. मोबाईल वापरण्यात आला म्हणून मीही जास्त काही त्रास करून घेतला नाही. म्हटला आपण घेऊन पुढे नवीन आपल्या मनाने व्यवस्थित तपासून वगैरे.
पुढे दिवाळीला साहेब आठ दहा दिवसांसाठी घरी आलेत. तेव्हा सहज म्हणून एक दिवस मी त्यांच्या मोबाईलचे कव्हर काढून फोटो काढून बघितले. तर फोटो एकदम क्लिअर आणि सुंदर आलेत. तेव्हा माझ्या मनात शंका आली की नक्कीच मोबाईल कव्हर मध्ये काहीतरी गडबड आहे. मी त्या मोबाईल कव्हरचे नीट निरीक्षण केले तेव्हा लक्षात आले की साहेबांनी कॅमेरासाठी दिलेल्या जागेवरचे स्टीकरच काढलेले नव्हते. ते पारदर्शी स्टीकर तिथे लागलेले असल्यामुळे फोटोज व व्हिडिओज धूसर, भुरकट निघत होते.
हे जेव्हा मी साहेबांना सांगितलं, त्यांना बिचाऱ्यांना कसंतरीच वाटलं. त्यांचा तो गरीब माणसाचा चेहरा बघून माझा राग कुठच्या कुठे पळून गेला. पोट धरून जाम हसले की हे कसलं नग माझ्या पदरात पडलं. खरंच असं वाटतंय जसं काही मी दोन लेकरांची आई आहे, एक माझं आणि एक माझ्या सासूबाईंचं.
असो, तर यावर्षी आमच्या लग्नाला बारा वर्षे पूर्ण होतील. वाटलं होतं इतक्या वर्षाच्या ट्रेनिंग नंतर तरी साहेब उर्फ गरीब प्राणी परफेक्ट झाले असतील. पण ते म्हणतात ना माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो, आणि हे तर गरीब माणूस आहेत.
तळटीप : लेख फक्त मनोरंजन पर लिहिला गेलेला आहे. त्यामुळे उगीच कोणी स्वतःवर ओढवून घेऊ नये व नवरा बायको या वादात पडू नये.
धन्यवाद.
लेखिका अर्चना सोनाग्रे वसतकार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा