Login

कथा -प्रसंगावधान

Story About A A A Girl Who Have To Marry In A Small Age
कथा - प्रसंगावधान


अगं मयुरी! 'लेझीम अशी, सरळ हातात धर'. 'आणि थोडं कमरेला वाक दे'. 'बघ, इतर मुलं-मुली कसे वाकून लेझीम खेळताहेत'.
मयूरीला बाईंनी सूचना दिल्यात .पण मयुरीचं लक्ष काही बाईंनी दिलेल्या सूचनांकडे नव्हतं. ती आज अस्वस्थ दिसत होती. चेहरा सुद्धा पडलेला दिसत होता. लेझीम हातात घेऊन ती सरळ वर्गाकडे निघाली.

रोजच्या प्रमाणे आज सुद्धा, वर्ग सातच्या सर्व मुला मुलींनी लेझीम चा आवाज करीत मैदान गाठले. सर्व विद्यार्थ्यांना लेझीम खूप आवडायचं. तसंच बाईंना सुद्धा शिकवायला मजा यायची...
बाईंचं लक्ष मयुरी कडेच होतं. ती अशी तडका फडकी वर्गात का गेली असेल? सर्व विद्यार्थी शेवटच्या तासाला बाहेरच असतात. शाळेतील सर्व शिक्षक आप आपल्या वर्गातील मुलांना खेळांचा सराव देण्यात गुंग होते.

बाईंनी कॅप्टन ला, विद्यार्थ्यांच्या लेझीमचा सराव घ्यायला सांगून, त्या तिच्या मागेच वर्गात गेल्या. तर ती बेंचवर डोके ठेवून हुंदके देत होती.
'मयुरी! काय झालं? कुणी काही अपशब्द बोलले का तुला? का बरं तू अशी रडतेस? अशी अस्वस्थ का आहेस'?... या आठवड्यात तिच्या चेहऱ्यावरच्या हाव भावा वरून आणि हालचालीं वरून ती, कसल्या तरी अनामिक दडपणाखाली वावरताना दिसू लागली होती.
तिने बाईंकडे पाहिलं .आणि तिला आणखीनच रडू कोसळले. काय झालं असेल हिला? नक्कीच काहीतरी कुठेतरी बिनसलंय .आता हिच्या मनातलं तर काढून घ्यायचंच... बाईंनी हळूच वर्गाचं दार लावलं. मायेने तिला जवळ घेतलं.ती कावरीबावरी झाली. हं! 'सांग बरं मयुरी तुझ्या मनातलं'! 'बोललीस तर बरं होईल'. 'तुझं मन हलकं होईल.' 'आणि मी कुठे काही सांगणार पण नाही'. बाईंनी तिला धीर देत तिच्या पाठीवर हात ठेवला.
'काय सांगू बाई... मला घरी जावसंच वाटत नाही'.' 'माझ्या माय बापानं माह्यं लगीन ठरविलं आहे'. 'माया लग्नाच्या गोष्टी घरात सुरू हाय'... 'माय म्हणते, "पोरगी जहराची पुडी असते". लवकर बाहेर टाकली तर बरं'...
'माह्या बापानं, त्याच्या वयाच्या मानसाले आणून, त्याच्यासोबत मायं लगीन लावून देणार हाय.'

बाईंना हे अनपेक्षित होतं. ही एवढीशी किशोरवयीन पोर, फक्त बारा-तेरा वर्षांची... ही कळी आत्ताच तर उमलू पाहत आहे, आणि हे काय! या कळीला पूर्णपणे उमलू सुद्धा द्यायचं नाही. बापरे! किती भयंकर!... बाईंनी तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, बाई!
'मले तुमच्या सारखं मास्तरीन व्हायचं हाय'. 'मले लेझीम शिकाले बी लय आवडते'. मले लय शिकायचं हाय'! 'पण घरी गेली की, माह्य कुणीही ऐकत नाही. असं वाटते की, कधी दिवस निघते... आणि मी घराच्या बाहेर पडते'. 'लय कोंडल्यावानी लागते मले माया घरात... लहान होती तवा, माया बाप, माया अंगावर खेकसत होता. माही माय तं मले नजरेसमोर ठेवतच नाही. सारखी कामाले लावते.

आता हा प्रकार बाईंच्या लक्षात यायला लागला. बाई तिला म्हणाल्या, 'मयुरी अगं, पण तू अजून लहान आहेस. वयात बसत नाहीस. कायद्यानं असं लग्न करणं हा गुन्हा आहे. हे तुझ्या आई वडिलांना कळत कसं नाही'?' बरं झालं तू मला हे सगळं कळविलं. मी बघते काय करायचं ते. तू आता डोळे पूस. हे असं अश्रू गाळण्याचं तुझं वय नाही. तुला पुढे शिकायचं आहे ना! मग तसंच होईल .आता तू शांततेने घरी जा'.

घरी गेल्यावर, बाईंच्या डोळ्यासमोर सतत मयूरीचाच रडवेला चेहरा येत होता. तिच्यासाठी सर्वांनी मिळून काहीतरी करावेच लागणार... नाही तर एक कळी विस्कटवल्याचं पातक आपणाकडून घडेल... आणि हे आपण आयुष्यभर विसरू शकणार नाही. या विचाराने त्या अस्वस्थ झाल्यात.

काय ग चंदा, आज मयुरी दिसत नाही वर्गात? बाईंनी तिच्या घराजवळ राहणाऱ्या चंदाला विचारलं. चंदा म्हणाली, बाई, 'आज मयुरी च्या घरी चार-पाच माणसं दिसले. माह्यी आई म्हणे, तिचं लगीन करणार हाय तिचा बाप'.
आता बाईंचं डोकं सुन्न झालं. त्या तडक मुख्याध्यापकांच्या खोलीत गेल्या. मुख्याध्यापकांना सगळी माहिती देऊन, आपण सर्व शिक्षकांनी हे लग्न थांबवायला हवे ,असं मुख्याध्यापकांच्या मनात ठसविलं.
मुख्याध्यापकांनी ताबडतोब सर्व शिक्षकांना वर्गातून बोलावून विश्वासात घेतलं.

सर,"आपण पहिल्यांदा या प्रकरणाची शहनिशा करूया. असं ताबडतोब त्या मुलीच्या घरी जाणं बरोबर नाही. या प्रकरणाला जरा व्यवस्थित च शेवटास न्यावं लागेल".शिक्षक म्हणाले .प्रथम आपण मयूरीच्या बाईंना व एका शिक्षिकेला तिच्या घरी पाठवू. मुख्याध्यापकांना शिक्षकाचं म्हणणं पटलं.


'मयुरी आहे का घरी? आज आली नाही शाळेत'? बाईंनी तिला हाक मारली. तशी मयुरी ची आई डोक्यावरचा पदर सावरीत अंगणात आली. 'या ना बाई...अशा अवचित कशा काय आल्या घराकडे'? त्या ताईंनी अंगणात खाट टाकून त्यावर चादर पसरविली. दोघींनी खाटेवर बसतच विचारलं .मयुरी नाही दिसत कुठे ?'अहो बाई, त्याचं काय आहे, घरातल्या बैठकीत चार पाव्हनं बसलं आहे की...
आज तिचं कुंकू आहे. म्हुन ती अंदर च्या खोलीत बसून हाय'.
काय?... दोघीही 'आ' वासून उभ्या राहिल्या.त्या काळात फोन वगैरे हा प्रकार नव्हता. त्यामुळे शाळेत ताबडतोब निरोप पोहोचविणे शक्य झाले नाही. त्या दोघीही लगबगीने भराभर चालत शाळेत पोहोचल्या. सर्व हकीगत शिक्षकांना सांगितली. त्यातील दोन शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या हातून, लग्न थांबविण्यासाठी ची तक्रार लिहून घेतली. निवेदनावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का घेतला. तालुक्याच्या गावी जाऊन पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली. व ताबडतोब तक्रारीची दखल घेण्याची विनंती केली.
तेथील ठाणेदारांनी सुद्धा, वेळीच दखल घेऊन बालविवाह कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आणि त्यातून मयूरीची सुटका केली.
बाईंच्या आणि सर्व शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे एका निष्पर्ण होत चाललेल्या वेलीला अंकुर फुटले.
शाळेत तिच्या पालकांना बोलाविण्यात आले. त्यांचे समुपदेशन करून मयुरीचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे, हे त्यांना पटवून देण्यात आलं.
आता हीच मयुरी, पुढे शिक्षण घेऊन आत्मविश्वासाने स्वतःला सिद्ध करू शकली.


छाया राऊत बर्वे अमरावती
८३९००८६९१७