प्रवास... सुरूवात नात्याची

नविन जोडप्याचा देवदर्शनाचा प्रवास... सोबत धमाल मस्ती आणि थोडासा रोमान्स.. गावरान भाषेतील गोडी असलेला सुंदर अनुभव.
एका धमाल प्रवासाची अंतरंगी किस्सा...
तुमच्या साठी आणला आहे...
एक लघुकथा... नक्की वाचा...
----------------------------------------------


" ये गण्या... अरे हो कि तिकडं... वाईच सरक कि लेका.." अज्या

" ये सोप्या... आरं तु नगं इथं बसू... लेका तुझ्या वजनानं गाडीचा पार खुळखुळा होईल... तु बस की घराकडं... फकस्त आमी जावून येतो कि... येताना तुझ्या साठी पेढा अन् गुलाल बी आणतो" गण्या

" अयं रताळ्यानों.... स्वतःला लई शहाणं समजू नका... म्या बी येणार हाय तुमच्या संग... नायतर गाडी काय गाडीच चाक बी म्या पुढं जाऊ देत नाय बगा..." सोप्या

अज्जा... सोप्या... गण्या... गाडीत बसण्यावरून भांडत होते..

" अयं... ईलास मामा... आरं तुझ्या या खुळ्याला सांग की.. कशाला उगीच तरास देतय बेन आमान्सी..." गण्या

" ओय पोरांनो.. तुमचं काय रं मदीच... आरं.. नवी जोडी जाणार हाय दर्शनाला... आपण फकस्त सोबत म्हणून जायाच हाय.. नायतर ते राहतील इथंच आन आपुणच जावू म्होरं.. तवा जरा वाईच कळ सोसा.. त्यान्सी आदुगर बसुद्या.. मग आपुलं बघू.." मामा

सागर आणि अवनी.... दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर शुभमंगलच्या अक्षता पडल्या!!!

सागर राहणारा मुंबईचा पण गाव त्याच सातारा.. आणि अवनी राहणारी पुण्याची...
सागरच्या आजीच्या इच्छेमुळे त्यांना लग्न सागरच्या गावाला म्हणजे साताऱ्याला... घरासमोरील मांडवात करावे लागले...

लग्न झाल्यावर देवदर्शनाला दोघे निघाले होते... देवदर्शन झाल्याशिवाय त्यांच्या नात्याला सुरूवात कशी होणार ना... म्हणून लग्न झाले आणि तिसऱ्या दिवशीच ते निघाले दर्शनाला....

कोल्हापूर.....
कोल्हापूरची अंबाबाई आणि जोतिबा हे सागरचे कुलदैवत... म्हणून सातारा ते कोल्हापूर गाडी ठरवण्यात आली... पण गाडीचं नाव काढलं की जत्रा तयारच झाली जाण्यासाठी...

सागरच्या घरातुन... त्याच्या काकाची मुले अजा (अजिंक्य) आणि गण्या (गणेश) धनू (धनवर्षा)... सागरचा मामा ईलास मामा (विलास माने) आणि त्याची मुले सोप्या (स्वप्निल) आणि सरू (सरिता)
तर गाडी अवनीच्या वडिलांनी पाठवली होती त्यामुळे त्यातच बसून अवनीची बहिण पुजा भाऊ सिध्दू आणि मित्र महेंद्र आले होते....

गाडी सेवन सीटर आणि बसणारे अकरा जण!!
गोंधळ तर घडणारच होता ना... त्यात मुलाकडची अन् मुलीकडची या हि पेक्षा जास्त शहरातील आणि गावाकडची हे युध्द रंगत होतं....

पुजा, महेंद्र आणि सिद्धू हे पुण्याचे... शिकलेली पिढी आणि बाकीची गॅंग आपली गावाकडची शाळेत पाऊल पण न ठेवलेली.... त्यातल्या त्यात फक्त धनूच काय ती पाचवी पर्यंत शिकली होती....

बसण्यावरून चालू झालेली हि लढाई काय रंगत आणते ते बघू आता.....

" किती गडबड करतात हि माणसे... जरा म्हणून शिस्त नाही यांना.." पुजा

" अयं... कोबीचं फुलं... माणसं कोणाला म्हनाली गं... आम्ही काय माणसं दिसतोय व्हयं तुला?? आजून लगीन बी नाय झालंय आमचं..." गण्या

" गणेश, अजिंक्य, धनू, तुम्ही मागे बसा आणि स्वप्निलला पुढे बसू द्या... त्याला जागा नाही होणार पाठीमागे..( स्वप्निल अंगाने जास्त भरलेला होता) " सागर

" पुजा... तुम्ही तिघे पण मागेच बसा थोडं ॲडजेस्ट करा..." अवनी

" मामा... तुम्ही, सरिता आणि आम्ही दोघे मधल्या सीटवर बसू... आपण एकाच साईजचे आहोत तर नीट बसता येईल.." सागर

शेवटी नविन जोडप्याने मध्यस्थी केल्यावर सगळे गाडीत चुपचाप बसले... आणि गाडी कोल्हापूर साठी रवाना झाली...

" अरे काय बोरिंग चाललो आहोत आपण... कोणी काहीच ॲक्टिव्हिटी करत नाहीत..." पुजा

" ये धने... ही पोरगी काय म्हणती गं.. काय होतंय तीला अन् काय करायचं म्हणतीया?"
अजा

" आरं तीला बोर खणायची आसंल आन् डबड अडकावयाच आसंल...तु नगं लक्ष देवू त्या खुळीकडे" गण्या

" हा कोणाला खुळी म्हणाला??" पुजा

महेंद्र आणि सिद्धू ने उत्तर न देता फक्त तीच्याच कडे बघितले..

" यु इडियट!!! तु मला बोललास... तुला काय वाटतं का नाही.. एका मुलीला असं बोलतोस.." पुजा

" ये धने... हे डिट काय हाय??" गण्या

" अरे डिट नाही... इडियट असं बोलली ती.." धनू

" हा पर हाय काय ते??" गण्या

" अयं... दादू.. मला काय माहीत... पाचवीला कुठं असतया विगंज्री.." धनू

" वेडा म्हणाली ती तुला..." सिद्धू

" हा मग ठिक हाय... इडियट ते पोरीवानी वाटतं हे त्यापेक्षा बरंय थोडं ..." गण्या

असं एकमेकांची खेचत.... एकमेकांना चिडवत गाडी पुढे निघाली... कराडच्या पूढे गाडी पोहचली... अवनीला झोप लागली... मधल्या सीटवर खिडकीत अवनी तीच्या बाजूला सागर मग मामा आणि सरिता असे बसले‌ होते... मागच्या दोन समोरासमोर असलेल्या सीटवर एका बाजूला धनू, अज्या, गण्या बसले होते... तर दुसऱ्या बाजूला महेंद्र, सिद्धू आणि पूजा दाटीवाटीने बसले होते...

अवनी सागरच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली होती.‌.. पण दाटीत बसल्यामुळे सागर अवघडून गेला... शेवटी त्याने न राहून त्याचा डावा हात अवनी च्या पाठीमागून खांद्यावर टाकला.... अवनी आता त्याच्या एका बाजूने मिठीत होती...
हे पाहून गण्या आणि धनू सागरला चिडवायला लागले....

" हम्म्मssss दादा... आरं... आम्ही पण आहोत अजून गाडीतच... आम्हाला नायतर नाय मामास्नी तरी लाज की जरा वाईच.." धनू

" धनू... ती झोपली आहे.." सागर

" कायsss... आरं अशी कशी झोपली वयनी... गाडी काय झोपायची जागा हाय व्हयं.." गण्या

" अरे बावळट... दिदीला गाडी लागते म्हणून झोपली आहे.... " पुजा

" अयं दादा... मग वयनीला मधी बसव.. नायतर तीला लागलं आणि रगात बिगात आलं तर फुकाचा दादा आमान्सी कावतील.." गण्या

" गणेश.. गाडी लागते म्हणजे तीला गाडीत त्रास होतो.. उलटीचा... म्हणून ती झोपली आहे.." सागर

" असं व्हय... मला वाटलं फकस्त आपल्या एसटीत असं कायबाही होत म्हणून.. बरं बरं झोपू दे मग वयनीला.." गण्या

दोन अडीच तासांनी आपली सगळी गॅंग पोहचली कोल्हापूरला...

सगळ्यात आधी ठरल्याप्रमाणे दर्शन महालक्ष्मी अंबाबाईच घ्यायचं होतं... सगळे आत मध्ये गेले.. मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता.. त्यामुळे सगळीकडे लग्न झालेली जोडपी लग्नाच्या वेशात होती आणि कोणी लग्नाच्या पोशाखात दिसत होती... खुप गर्दी होती... सगळे आले देवळाच्या आवारात...

" अरे सागर... लईच गर्दी हाय रं... आता काय करायचं.... जाऊया का माघारी.. येऊ कि कवातरी... थोड्या दिसानी येऊ.." मामा

" मामा... आता आलो आहोत तर घेऊया ना दर्शन... परत कोण येणार एवढ्या लांब... आणि वेळ पण नाही तितका आता... सुट्टी संपतील माझी... आताच उरकून घेऊ दर्शन.." सागर

" बरं चला मग... बिगी बिगी... " मामा

----------------------------------------------

बघूया आपल्या गँगच कसं दर्शन घडतंय कि बिघडतंय.... पुढच्या भागात....?☺️☺️



🎭 Series Post

View all