Login

प्रेमाचा सरळ मार्ग..! भाग -२(अंतिम )

जे लोकं पैश्यांना माणसांपेक्षा जास्त महत्व देतात. त्यांचे डोळे कशे उघडतात. या कथेत बघू.
अभिषेक आणि पूजाचं नातं आता अधिक घट्ट झालं होतं.
मेल्सच्या जागी आता खऱ्या भेटी, शांत फेरफटका, आणि मनमोकळ्या गप्पा आल्या होत्या.ते दोघं कधी गार्डन, कधी रेस्टॉरंटमध्ये भेटू लागले.
ते बरोबर असले की त्यांना त्यांचं जग मिळायचं.

ऑफिसमध्ये दोघं एकत्र दिसले की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं.ते दोघं एकमेकांना म्हणायचे आपण कधीच वेगळे नाही होणार. हा साथ शेवटपर्यंतचं आहे.

अभिषेकचा साधा स्वभाव, नम्र बोलणं आणि पूजेसाठी असलेली काळजी — या सगळ्यामुळे पूजाच्या आयुष्यात पुन्हा उजेड भरला होता.



एका संध्याकाळी पूजा थोडी अस्वस्थ वाटतं म्हणून ऑफिसमधून लवकर निघाली.
घरी गेल्यावर तिचे बाबा वर्तमानपत्र वाचत होते. त्यांनी आवाज दिला —
“पूजा,रविवारी तयार राहा. एक मुलगा आणि त्याचे आईवडील भेटायला येणार आहेत.”

पूजाच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्य उमटलं.
“पण बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला लग्नाबद्दल घाई नाही.”

बाबा थोड्या कठोर स्वरात म्हणाले,
“ही वेळ विचार करण्याची नाही. तो मुलगा खूप चांगल्या घरातला आहे. मोठा बिझनेसमन आहे. आम्हाला तुझं भविष्य सुरक्षित हवं आहे.”

पूजा शांत झाली. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
त्या रात्री ती अभिषेकला फोन करते.

“अभिषेक…” तिचा आवाज थरथरत होता,
“बाबांनी माझं लग्न ठरवायचं ठरवलं आहे. मला खूप भीती वाटते.”

क्षणभर शांतता होती. मग अभिषेक म्हणाला —
“पूजा, मी गरीब आहे हे खरं… पण मनाने श्रीमंत आहे. मी माझ्या बाबांना घेऊन उद्या तुझ्या घरी येतो. जे काही होईल, समोरासमोर बोलू.”



दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पूजाच्या
घरी अभिषेक आणि त्याचे वडील आले.
साधं शर्ट, थोडं जुनं घड्याळ, आणि चेहऱ्यावर नम्र हसू.

पूजाचे बाबा थोडे नाराज झाले. त्यांनी खुर्चीकडे हात दाखवला.
“या… बसा.”

अभिषेक आदराने म्हणाला —
“काका, मी अभिषेक. मला पूजाशी लग्न करायचं आहे. माझं उत्पन्न फारसं मोठं नाही, पण मी तिचं आयुष्य आनंदी करीन, हे वचन देतो.”

पूजाचे बाबा कठोर चेहऱ्याने म्हणाले —
“मुला, प्रेम आणि लग्न यात खूप फरक असतो. प्रेम पोट भरत नाही. तू गरीब घरातला आहेस, आमची मुलगी राजकन्या आहे. अशा घरात आम्ही तिला देऊ शकत नाही.”

अभिषेकचे बाबा हात जोडून म्हणाले —
“साहेब, आम्ही गरीब आहोत, पण ईमानदार आहोत. माझा मुलगा मनाने चांगला आहे.”

पण पूजाचे बाबा उपहासाने हसले —
“ईमानदारीने पोट भरत नाही. आम्ही तिचं लग्न कुलीन घरात लावणार आहोत. तुम्ही कृपया निघा.”

अभिषेकच्या डोळ्यांत पाणी आलं, पण त्याने शांतपणे उत्तर दिलं —
“काका, मी जबरदस्ती करणार नाही. नशिबात असेल तर भेटू पुन्हा.”

आणि दोघं निघून गेले.



पुढचे काही दिवस पूजाचं मन व्याकुळ होतं.
बाबांनी ठरवलं होतं — रविवारी मुलगा पाहायला येणार आणि त्याच दिवशी लग्न ठरणार.

ते लोकं आले. आणि मुलाला पूजा खूप आवडली. लग्नाची तारीख पण ठरली.

ती अभिषेकला फोनकरून खूप रडायची.पण अभिषेक एकच गोष्ट म्हणायचा—" कोणाचं मान दुखावून आपण खुश राहू शकत नाही. आणि ते तर तुझे बाबा आहे. "
ती म्हणायची —" मीं शरीरानीं त्याची झाले तरी माझ्यामनातून तुला कुणीच काढू शकत नाही."


लग्नाचा दिवस जवळ आला होता. पूजा बाहुलीसारखी सजली होती, पण डोळ्यांत जीव नव्हता.
आईने विचारलं, “काय झालं ग, इतकी शांत का आहेस?”
ती हसली फक्त — “काही नाही, आई. तुमच्या मानासाठी मीं स्वतःला गमवातीये.

लग्नाच्या थोडं आधी पूजा पायऱ्यांवरून उतरत असताना तिचा पाय घसरला.
क्षणात तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली .



ती शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होती.
डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले —
“तिच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर आहे आणि त्याचा एक भाग कायम वाकडा राहील. ती नीट चालू शकणार नाही.”

आई आणि बाबा अवाक झाले.
त्यानंतर तो होणारा नवरा आणि त्याचे आई-वडील आले, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं —
“आमचा मुलगा अपंग मुलीशी लग्न करणार नाही.”

पूजाचे बाबा हात जोडून म्हणाले —
“कृपया असं करू नका. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल.”

पण त्यांनी काही ऐकलं नाही. सगळे निघून गेले.
पूजाचे बाबा कपाळावर हात ठेवून बसले. डोळ्यांत लाज आणि दु:ख दोन्ही होतं.



तेवढ्यात दरवाजात अभिषेक आणि त्याचे वडील दिसले.
अभिषेक पुढे आला, पूजाच्या पलंगाजवळ बसला आणि तिचा हात हातात घेतला.

“पूजा, बघ… म्हटलं होतं ना — नशिबात असेल तर कोणी काही करू शकत नाही.”

ती रडत म्हणाली —
“अभिषेक… आता मी अपूर्ण झाले आहे. तू का तुझं आयुष्य वाया घालवतोस?”

अभिषेक हलकं हसला —
“अपूर्ण तू नाहीस, माझं जग अपूर्ण आहे तुझ्याशिवाय.
तू चालू शकतेस की नाही, त्याने माझं प्रेम कमी होत नाही.
मला तुझं मन आवडतं, तुझं हसू आवडतं, तू — अशीच आवडते .”

अभिषेकचे बाबा पुढे येऊन पूजाच्या बाबांना म्हणाले —
“साहेब, आमचं घर छोटं आहे, पण मन मोठं आहे. आम्ही तिची काळजी घेऊ. कृपया परवानगी द्या.”

पूजाचे बाबा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले —
“माफ कर रे मुला… मला उशिरा समजलं, पैशांपेक्षा प्रेम मोठं असतं.”



१५ दिवसांनी पूजाचं आणि अभिषेकचं लग्न साध्या पद्धतीने, पण मनापासून झालं.



लग्नानंतर पूजा हळूहळू चालायला शिकली.
अभिषेक रोज तिचा हात धरून म्हणायचा —
“पाय वाकडा झाला असला तरी आपल्या प्रेमाचा मार्ग सरळ आहे.”

ती हसत म्हणायची —
“आणि त्या मार्गावर तू आहेस — हाच माझा आधार.”

दोघांचं आयुष्य साधं, पण सुखी झालं.
कारण अभिषेक नेहमीच म्हणायचा —
“नशिबात असेल तर, जगही आपलं काहीच बिघडवू शकत नाही.”
0

🎭 Series Post

View all