Login

रात पुनवेची आली भाग 18

एक अतृप्त प्रेमिका मुक्त होईल का ?
रात पुनवेची आली भाग 18


मागील भागात आपण पाहिले दौलती आणि काशीच्या अधुऱ्या प्रेमाची गोष्ट . त्यामुळे पुढील चार पिढ्या त्याची शिक्षा भोगत आहेत . या संकटावर अमेय आणि अनघा कसे मात करतात पाहूया .


" नयना , उठ लवकर . आपल्याला आवरून जुन्या देवळात जायचं हाय . "
आजीने आवाज दिला .


नयनाने अनघाला देखील उठवले . आज देवीचा अभिषेक होऊन उत्सव सुरू होणार होता . सगळेजण आवरून तयार झाले . कित्येक वर्षांनी देशमुखांचे वंशज देवीच्या सेवेला उपस्थित होते .


देवीच्या अभिषेकानंतर सगळेजण दर्शन घेऊन निघाले .

" आजी राधा मुरळी ह्यात मदत करत होती . तिचे काय झाले असेल ? "
शर्मन म्हणाला .

" हस्तलिखित असलेल्या पेटीत आपण शोध घ्यायला हवा . " नयना पटकन बोलून गेली .

" आजी , तुला वाचता , लिहिता येत नाही . मागच्या पिढीत ते कसे काय येत होते ? "

" माझी आई लहानपणी वारली . आईच लेकीला शिकवायची . मला शिकवायला कुणी नव्हतं . "

आजी सगळ्यांना घरी घेऊन आली . आजीने ती पेटी पुन्हा एकदा उघडली .

" तुमी बघा . तवर खायला बनवते . " आजी आत निघून गेली .



पेटीत अनेक पुड्या होत्या . त्यातील औषधी बनवायची पद्धत लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या . एकेक वस्तू अमेय जपून बाहेर काढत होता . तेव्हाच त्याला पिवळ्या रंगाच्या कापडात काहीतरी गुंडाळलेले दिसले .



अमेयने हलक्या हाताने ते बाहेर काढले . आत एक चिठ्ठी होती .


" येळकोट येळकोट जय मल्हार , आजुन किती दिस जगलं माहित न्हाय . शेरगाव पाण्यात बुडाल आन मुरळी असणारी म्या बोर्डावर नाचायला लागले . पोटाची भूक वाईट .


म्हातारबा पाटील वारल आन घरात जन्माला आलेल्या तीन पोरी पाण्यात बुडून मेल्या . एक दिस संध्याकाळी पाटलांचा थोरला ल्योक मला भेटायला आला .

" राधाबाई , देवीचा कोप झाला आमच्यावर . गावात आता राहायचं न्हाई . इथून गेलो तर आमच्या पोरी वाचत्याल . "


म्हातारबा पाटलांनी केलेल्या चुकीन घर बुडालं . पर काशी त्यांना कुठ गेल तरी सोडायची न्हाय . त्यावर उपाय शोधायला म्या जेजुरीला गेले . तिथं मला एक साधू भेटलं .


त्यांनी सांगितलं शरीराला जाळून पिंड देत न्हाय तवर आत्मा भटकत राहतोय .

म्या पुन्हा गावात आले पर पाटलांच्या घरातल कुणीच नव्हतं . झामा व्हती पर तिन यात पडणार न्हाय अस सांगितलं . तिच्या पाया पडून म्हणले पाटलांच्या घरातला कुणी आला तर त्याला ही चिठ्ठी दे . "


" म्हणजे संदुकीत असलेले काशीचे शरीर शोधायला लागणार . "
नयना असे म्हणाली आणि हवेत अचानक गार झुळूक गेल्याचा भास झाला .

" हो , त्यासाठी वाड्यात जायला लागेल . "
वसुधाताई म्हणाल्या .


नयनाची आजी त्यांचे बोलणे ऐकून आत आली .

" नयना , ही देवीची उदी बांधलेल कवच हाय . तिथं कायबी व्हईल घाबरायच न्हाई . "

" आजी , आपल्याला उद्याच संध्याकाळी जायला लागणार . "

" व्हय , आता आराम करा तुम्ही . "
सगळेजण दुपारचे जेवण करून झोपायला गेले .


खळखळ वाहणारा पाण्याचा मंजुळ आवाज ऐकू येत होता . एक लहानगी गोंडस मुलगी पाण्यात खेळत होती . अचानक पाण्याचा आकार बदलला आणि ती लहानगी नाकातोंडात पाणी जाऊ लागल्याने ओरडायला लागली .
अनघा दचकून जागी झाली . शेजारी अमेय शांत झोपला होता . भोवताली पाणी नव्हते .



संध्याकाळी देवीच्या आरतीचा मान शर्मनला मिळाला . त्याने मनोमन त्याची मुलगी शुद्धीवर यावी अशी प्रार्थना केली . आरती झाल्यावर सगळेजण मंदिरातून बाहेर आले . जवळपास पाच वर्षांनी धरण आटल्याने उत्सव होत असल्याने मंदिराच्या आजुबाजूला दुकाने उघडण्यात आली होती . थोडावेळ तिथे थांबून सगळेजण घरी आले .


रात्र झाली तसे धरणाच्या आतील भागात असलेल्या पाण्याचा गारवा जाणवायला लागला .

" अनघा , माझ्यामुळे तू ह्या संकटात सापडलीस . "
अमेय तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला .

" अमेय , याची तुलाही कल्पना नव्हतीच . आपण एकत्रित ह्यातून मार्ग काढू . आजपर्यंत आपण एकत्रित कितीतरी संकटे झेलली आहेत . "

" अनघा ह्यावेळी प्रश्न तुझ्या आणि बाळाच्या जीवाचा आहे . तुम्हाला काही झाले तर ? "

" अमेय आपल्याला फक्त एका फसवल्या गेलेल्या प्रेमिकेला मुक्त करायचे आहे . काहीही वाईट घडणार नाही . "
दोघेही बराच वेळ बोलत होते .


पहाटे पहाटे पक्षी किलबिल करायला लागले . थोड्या वेळाने अनघा जागी झाली . अमेय शेजारी नव्हता .

" आई , अमेय तुम्हाला सांगून बाहेर गेला आहे का ? " अनघा वसुधाताईंना विचारू लागली .

" नाही , मी आताच उठले आहे . "
त्यांचे आवाज ऐकून शर्मन बाहेर आला .

" शर्मन , अमेय घरात नाही . "
अनघा आता थोडी घाबरली होती .

" असेल इथेच बाहेर . मी पाहून येतो . "
शर्मन घराच्या आसपास शोधून आला . अमेय कुठेच नव्हता.



अमेय डोळ्यांवर उन्हे येताच जागा झाला . तो वाड्यात होता . आपण इथे कसे पोहोचलो ? तितक्यात त्याला आठवले .

" पाण्याचा आवाज ऐक . माझ्यासाठी आवाजाच्या माग ये . "

त्याच आवाजाच्या दिशेने चालत तो इथे पोहोचला होता . अनघा आणि आईची आठवण येताच अमेय जायला निघाला आणि दरवाजा बंद झाला . अमेय पुन्हा सगळीकडे शोधू लागला बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसत नव्हता .


शेवाळ आलेल्या त्या ओल्या भिंती , कोंदट आणि कुबट वास . अमेय आता घाबरला होता . जितका प्रयत्न करेल तितका तो चुकत होता . घाबरून अमेय पळत सुटला आणि त्याचे डोके दगडावर आपटून पुढे अंधार पसरला .



" आई चला . अमेय त्या वाड्यात असणार . "
अनघा निर्धाराने उठली .

" अनघा थांब , असच तिकड गेलो तर सगळ्यांचा जीव जाईल . " आजी म्हणाली .

" मग माझ्या नवऱ्याला मरताना बघू का आजी ? "
रागाने अनघा ओरडली .

" आता कुणीच मरणार न्हाय . संध्याकाळी मी परत येते . तवर वाड्यात जाऊ नगा . काही झालं तरी . "

आजी घराबाहेर पडली आणि सगळे सुन्न होऊन बसून राहिले .


अमेय यातून वाचेल का ?
देशमुख घराण्याची चूक अनघा सुधारेल का ?

वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .


अष्टपैलू 2025 स्पर्धा
सदर कथेचे लिखाण चालू आहे .
0

🎭 Series Post

View all