Login

रात पुनवेची आली भाग 9

काय असेल देवीचा कौल
रात पुनवेची आली भाग 9

मागील भागात आपण पाहिले की दौलती आणि काशी एकमेकांकडे आकर्षित होतात . परंपरेत आपले प्रेम बसत नसल्याची काशीला जाणीव आहे . काशी बुडत असताना दौलती तिला वाचवतो . आता पाहूया पुढे .


दौलती काशीच्या डोळ्यात बुडाला होता . थोडावेळ आजूबाजूचे भान विसरून तो तिला बघत होता .

अचानक काशी म्हणाली , " पाटील , खाली उतरवा मला . "

" न्हाय उतरवल तर ? " दौलती खट्याळ हसला .

" काशी म्हणत्यात मला . माजी मर्जी नसल तर म्या थांबत नसते . "
काशी त्याच्या हाताची पकड ढिली करू लागली .

" अस्स , मंग आमच नाव ठाव हाय नव्हं ? " मिशीला पीळ देत त्याने विचारले .

" म्हणूनच खाली ठिवा आमासनी . काशी म्हंजी माडीवरली बाई नव्ह . "
तिने दुखऱ्या नसेवर हात ठेवताच त्याने तिला खाली सोडले .


आपले भिजलेले केस सावरत काशी चालायला लागली .

" काशे , तू म्हणशीला तर दवलती समद सोडलं . "
त्याने तिचा हात धरला .

" हात सोडा पाटील . "
काशीने हळूच हात सोडवला आणि चालू लागली .


काशी स्वतःशी बोलायला लागली .

" काशी , लांब रहा . पाटील म्हंजी आग हाय . त्यात जळू नग ."

काशी निघून जात असताना दौलती तिला मिळवायचे असा निर्धार करत होता . आपल्या दोस्तांना त्याने गाठलं .

" पाटील , कुठं अडकला व्हतं ? "
एकाने विचारले .

" कापड का वली झाली . पवायला वाट बघून दमलो आमी . "
सगळेजण त्याला विचारत होते .
दौलती सरळ वाड्याकडे निघाला .




" कुठून आलाय म्हणायचं सरदार . "
वाड्यात पाऊल ठेवतानाच आबांचा आवाज कानावर घुमला .

" जरा नदीवर गेलतो दोस्तांसंग . "
त्याने उत्तर दिले .

" वाईच घरची काम बघा की . किती दिस आस उंडरायचं . " आबांचा आवाज जरा कठोर झाला होता .

" तसं नव्ह आबा . आता गावकी म्हणल्याव हे आलच की . " दौलती उत्तर देत होता .

" अस्स , मंग गावकी मळ्यात माडीवर भरती व्हय ? "

आबांनी पुढचा प्रश्न केला .


" आबा आव तुमी म्हणता तसं काय न्हाई . लोक उगा काय बाय बोलत्यात . "

" म्होरल्या साली तुमचं लगीन करायचं हाय . पोरगी आमी ठरीवली हाय . "
इतके बोलून आबा आत गेले .

खाली मान घालून काम करणाऱ्या . घरात आणि दारात राबणाऱ्या आपल्या भावजया दौलती बघत होता . त्याला अशी बायको नको होती .

आबांनी आता ठरवले असले तरी आपण आपल्याला हवी तीच मुलगी निवडणार हा निर्धार केला . त्याबरोबर काशीचे मधुर हसणे कानात घुमायला लागले .


" काशे , झामे हिकडं या लवकर . आईचा मुखवटा घासायला घ्या . "
केस नीट करत असलेली काशी जागेवरून हलली नाही .

झामा पटकन जाऊन आईला मदत करायला लागली .

" काशे , कुठं उलथली . "

" हाय आजुन हितच . तसाबी लई मोठा राजमहाल हाय नव्हं हा . तकड मामा पैशात न्हात्यात आन आपून बसलो हित देवळ झाडत . "


काशी म्हणाली आणि. पुढच्या क्षणी तिच्या गालावर आईची बोटे उमटली .


काशी रागाने बेभान झाली आणि बाहेर निघाली . आता आपण जगायचे नाही असेच तिने ठरवले होते . लहानपणापासून तिच्या देखण्या रूपाचे कौतुक करणारा प्रत्येक जण त्याचसोबत घरातली गरिबी देखील काढायचा . आपले सख्खे मामा गावचे पाटील असून आपल्याला मदत करत नाहीत .


आई आपल्याला वाड्यात जाऊ देत नाही . मामा बाहेर भेटले की तिचे लाड करायचे . आईला कितीवेळा कारण विचारले तरीही तिने कधीच सांगितले नव्हते . विचारांच्या तंद्रीत काशी नदीच्या डोहावर येऊन पोहोचली .


ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात तिचा हात धरून कोणीतरी तिला मागे ओढले .

" कुणी हात धरला माझा ? "
रागाने ती वळली आणि समोर दौलती उभा होता .

" इतका जड झाला व्हय जीव ? "
त्याने विचारले .

" करायचं काय असलं जगून समद आपलं रीती भाती आन आईच आईकायचं . तुमचं गडी माणसांचं बरं हाय . आपल्या मर्जीच मालक . सोडा मला . "
काशी चिडून हाताला हिसका देत आणि रडत बोलत होती .


" सोडलं , आता फूड ? जीव देणार ? कुणासाठी ? "
दौलती हसला .

" तुमी हसणारच , पाटील घराण्यात समद मिळतंय तुमास्नी . "

" पिंजरा सोन्याचा आसला तरी त्यो पिंजराच काशी . "
दौलती बोलून गेला .

दोघे कितीतरी वेळ एकमेकांशी आपल्या मनातले बोलत होती . नंतर आनंदाने दोघेही आपापल्या घरी निघाली .


वाड्यात कसलीतरी लगबग दिसत होती . सरकारी अधिकारी आणि सोबत गावातील ज्येष्ठ लोकांची बैठक खूप वेळ चालू होती .

" ह्यो आला बघा दवलती . हिकडं ये . सायेब काय म्हणत्यात बघ . "
दौलती थांबला .

त्याने अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू केले . आतापर्यंत झालेली चर्चा त्याला समजली होती . नदीवर धरण प्रस्तावित झाले होते . त्यामध्ये शेरगाव आणि आजुबाजूची पंचवीस गावे जाणार होती .


" साहेब , आमच्या जमिनी , घर आणि संसार सगळं सोडून जाणार कुठे ? "

" सरकार पर्यायी जमीन आणि घरे बांधून देईल ."

" आम्ही गावकरी चर्चा करून आमचं उत्तर देऊ . "
अधिकारी निघून गेले .

" दवलती , आर अस गाव सोडून जाणारं कुठ आपून . ते काय न्हाय आपून जमीन द्याची न्हाय . "
आबा पाटील चिडले .

" आबा , सरकार ऐकणार थोडं हाय . त्यापरीस आपून हित जवळपास दुसरा गाव मागू . आपल्याला लांब पर मुलखात जायला लागणार न्हाय . "

त्याने सांगितले . दोन महिन्यांनी पुन्हा बैठक होणार होती .


ज्या नदीच्या काठावर गाव फुलले , बहरले तो गाव सोडून जायचा . नुसती चर्चा सुरू झाली तरी सगळेजण उदास झाले . आपले घर सोडुन दुसरीकडे जायचे होते .


हा इतका मोठा निर्णय आई काळूबाईचा कौल घेऊन घ्यायचा असे गावाने ठरवले .


महिनाभराने पौर्णिमा येत होती . काशीची आई देवीला कौल लावणार होती . त्यानुसार गावकरी निर्णय घेणार होते .


काय असेल देवीचा कौल ?
काशी आणि दौलती प्रेमात पडतील ?
वाचत रहा .
रात पुनवेची आली .
©® प्रशांत कुंजीर .
अष्टपैलू 2025 स्पर्धा.

सदर कथेचे लिखाण चालू आहे .
0

🎭 Series Post

View all