Login

रक्तपिंडाचा श्राप भाग ९४

सहस्त्रपाण्याने निर्माण केलेल्या सापळ्यात राजवीर अडकेल का?
भाग ९४

गावात अंधार पसरला होता, पण त्या अंधारात काही परके चेहरे लपलेले होते. सहस्त्रपाण्याचे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात गावात पसरले होते—काहींनी दरवेशींचा वेश घेतला होता, काहींनी लमाण्यांचे तर काहींनी भिक्षुकांचे. एक जण तर भविष्य सांगणाऱ्या भटाच्या रूपात गावभर फिरत होता, आणि गावकऱ्यांशी बोलून एकच अफवा पसरवत होता.

"सहस्त्रपाणी नावाचा महाभयंकर पिशाच्च गावावर हल्ला करणार आहे! त्याला एका विशिष्ट गोष्टीची गरज आहे, आणि ती फक्त गावातील एका पिशाच्चाकडे आहे. जर त्याने ती वस्तू दिली नाही, तर गाव दुसऱ्या दिवशी अस्तित्वात नसेल. संपूर्ण गाव आगीत भस्मसात होईल!" या भयानक भविष्यवाणीमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली. 

गावातील चौकात एक मोठा जमाव जमलेला होता. मधोमध, एक उंच, पांढऱ्या दाढीचा, फाटका झगा घातलेला दरवेशी एका दगडावर उभा राहून मोठमोठ्याने बोलत होता. त्याचे डोळे चमकत होते, आणि तो अत्यंत गंभीर आवाजात गावकऱ्यांना काहीतरी सांगत होता. भोवती जमा झालेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरू होती.

दरवेशी (हात आकाशाकडे करत): "ऐका! ऐका! काळ आला आहे, विधिलिखित बदलणार आहे! काळ्या शक्तीचा स्वामी, ज्याचे नाव घेण्याचीसुद्धा हिंमत माणसांनी करू नये, तो स्वतः या गावावर चालुन येणार आहे!" 

गावकरी भीतीने एकमेकांकडे बघू लागले. काहींनी हळूहळू मागे सरकायला सुरुवात केली.

पहिला गावकरी (धडधडत्या आवाजात): "पण... कोण? कोण येणार आहे? तुझा इशारा नक्की कोणाकडे आहे?" 

दरवेशी (नाट्यमय स्वरात, आवाज खाली ठेवत): "तो आहे... सहस्त्रपाणी!" 

दरवेशाचे ते बोल ऐकताच काही गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. काहींनी देवाची नावे घ्यायला सुरुवात केली.

दुसरा गावकरी (घाबरलेल्या स्वरात): "सहस्त्रपाणी? तो इथे का येईल? आमचे गाव तर लहानसे आहे! आम्ही त्याचे काय वाईट केलंय?" 

दरवेशी (गंभीरतेने डोळे मिटत): "कारण या गावात आहे एक गोष्ट... एक अशी वस्तू, जी त्याला हवी आहे. त्याच्यासाठी ती अनमोल आहे, तिच्या शिवाय त्याचा हेतू पूर्ण होणार नाही. आणि जर ती त्याला मिळाली नाही, तर..." 

तिसरा गावकरी (कुतूहलाने विचारत): "तर..तर....काय होईल?" 

दरवेशी (भीतीदायक हसत): "तर उद्याचा सूर्योदय या गावासाठी शेवटचा ठरेल! हे संपूर्ण गाव आगीत जळून राख होईल!"

गावात एकच हलकल्लोळ माजला. काही गावकरी आक्रोश करू लागले काहींनी तर घाईघाईने आपली घरे बंद करायला सुरुवात केली.

चौथा गावकरी (विव्हळ स्वरात): "असे होऊ शकत नाही! काहीतरी मार्ग नक्कीच असेल! आम्ही काय करू शकतो?" 

दरवेशी (खाली मान घालून, थोडा विचार केल्यासारखा करत): "मार्ग आहे... पण तो कठीण आहे. तुम्ही जर त्या वस्तूचा स्वामी कोण आहे, हे शोधून त्याला समजवू शकलात, तर कदाचित तो सहस्त्रपाण्याला ती वस्तू देईल, आणि गावाचे रक्षण होईल..." 

गावकरी एकमेकांकडे संशयाने बघू लागले, त्या माणसाला शोधायचे कसे हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात होता.

पहिला गावकरी (सावधपणे): "पण... ती वस्तू कोणाकडे आहे? आणि ती आहे तरी काय?" 

दरवेशी (गूढ हसत): "ते मला माहीत नाही. पण तुम्हाला शोधावे लागेल... लवकरात लवकर! तुमच्याकडे फक्त आज रात्रीची वेळ आहे.

दुसरा गावकरी (भीतीने विचारत): "आणि जर आम्हाला ती वस्तू आणि तिचा स्वामी सापडला नाही, तर?" 

दरवेशी (काळजाचा ठोकाच चुकावा अशा स्वरात): "तर तुम्ही आणि तुमचे हे गाव इतिहासाच्या पानांवर एका हरवलेल्या गावाच्या रूपात नोंदवले जाईल... जिथे एके काळी साधे लोक राहत होते, पण एकाच रात्रीत सर्व काही भस्मसात झाले!" 

गावकरी अजून जास्त घाबरू लागले. काही जण तर दरवेशीच्या पाया पडून त्याच्याकडून काहीतरी सोपा उपाय आहे का विचारू लागले.

तिसरा गावकरी (काकुळतीला येत): "कृपा करा! काहीतरी मार्ग सांगा! आम्हाला वाचवा!" 

दरवेशी (गंभीरतेने): "मार्ग तुमच्या हाती आहे... शोधा त्या व्यक्तीला! त्याने जर वेळेत तो निर्णय घेतला, तरच तुमचे गाव वाचेल!" 

गावकऱ्यांमध्ये अजून गोंधळ माजला. कोणाकडे आहे ती वस्तू? गावात खरंच कोणीतरी पिशाच्च आहे का? आता पुढे काय होईल? याचे उत्तर फक्त काळच देऊ शकेल का? सगळे जण याचाच विचार करू लागले

"हे खरे असेल का?" एका वृद्धाने चिंतेने विचारले.

"काही सांगता येत नाही. आधीच आपण लांडग्यांच्या भीषण हल्ल्यातून वाचलो होतो, आणि आता हे नवीन संकट." दुसरा गावकरी म्हणाला.

"पण... गावात पिशाच्च आहे तरी कोण? आपण कोणावर संशय घ्यायचा?" एका तरुणाने भीतीने विचारले.

"कदाचित बाहेरून आलेले प्रवासी असतील... तेच पिशाच्च असतील!" कुणीतरी कुजबूजले.

राजवीरच्या घरात खूप पाहुणे आले आहेत, कदाचित त्यातलाच कोणी एक असला तर, आपण त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे.

अफवा जोर धरू लागल्या. गावकऱ्यांच्या मनात संशय आणि घबराट पसरू लागली. 

--- 

एका निर्जन स्थळी, दाट जंगलाच्या आत, राजवीर, आशय, बलदेव आणि त्यांचे बाकीचे साथीदार जमले होते. झाडाच्या गडद सावल्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर अजूनच गंभीर छटा उमटली होती. सहस्त्रपाण्याला रक्तपिंड मिळालाय! ही शक्यता आता जवळजवळ स्पष्ट झाली होती. राजवीरच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. त्याने पूर्ण विश्वासाने रक्तपिंडाची सुरक्षित जागा ठरवली होती, पण त्याच्या लक्षात आले होते—कोणी तरी त्यांच्या गुप्त संभाषणावर नजर ठेवत होते! आशयला तो अंधारात चमकणारा आकृतीबंध आठवला, जे वटवाघूळ वाटत होते, पण प्रत्यक्षात तो वक्रसेन होता! ही लहानशी चूक आता महागात पडणार होती. जर सहस्त्रपाण्याच्या हातात रक्तपिंड गेला असेल, तर त्याला आता रोखणे अशक्यप्राय होते.


राजवीर विचारात पडला—जर रक्तपिंड त्याला मिळालाच असेल, तर आता त्याला माझी गरजच काय?

त्यावर आशय गंभीर स्वरात म्हणाला, "रक्तपिंड हा स्वतः स्वतःचा मालक निवडतो. जो त्याला पहिल्यांदा स्पर्श करतो, तोच त्याचा खरा स्वामी असतो. जोपर्यंत खरा स्वामी स्वतःहून तो दुसऱ्याला देत नाही, तोपर्यंत तो कुणाच्या हातात टिकत नाही. तुला आठवतंय का? तूच पहिल्यांदा रक्तपिंड हातात घेतला होता ना .म्हणजेच, तो तुझ्या मालकीचा आहे. तूच त्याचा खरा स्वामी आहेस."

बलदेवच्या मनात अचानक विचारांचा एक वेगवान झंझावात उसळला. त्याने ताडकन राजवीरकडे पाहिले आणि ठाम स्वरात म्हणाला, "याचा सरळ अर्थ असा की सहस्त्रपाण्याला रक्तपिंड मिळाले असले, तरी त्याचा उपयोग करता येत नाही! त्याला हवे असलेले अंतिम तत्त्व त्याच्या हाती लागलेले नाही!" राजवीर, आशय आणि बाकीचेही क्षणभर स्तब्ध झाले. बलदेव पुढे म्हणाला, "तो इतक्या सहज हार मानणाऱ्यातला नाही. म्हणूनच त्याने गावावर हल्ला करण्याची योजना आखली असणार! त्याला माहिती आहे की तुझ्या भावनांचा फायदा घेतला, तर तो तुला सहज वश करू शकतो. जर त्याने गावकरी ओलीस धरले, त्यांना ठार मारण्याची धमकी दिली, तर तू आपल्या लोकांना वाचवण्यासाठी स्वतःच्या इच्छेने रक्तपिंड त्याच्यासमोर घेऊन जाशील."

बलदेवचा आवाज आता चिंतेने भारावला होता. "एकदा का त्याने तुझ्या हातून रक्तपिंड स्वीकारला, की मग त्याला कोणीही अडवू शकणार नाही—ना आपण, ना हे संपूर्ण जग! मग या पृथ्वीवर फक्त आणि फक्त सहस्त्रपाण्याचे राज्य राहील!" त्याच्या या भयंकर भाकिताने सर्वांचीच हृदये जड झाली. वेळ आता संपत चालली होती. त्यांना तातडीने काहीतरी करावे लागणार होते!

राजवीरच्या मनात विचारांचे वादळ उठले. त्याच्या डोळ्यांत आता निर्धाराची ठिणगी चमकू लागली होती. तो खोल आवाजात म्हणाला,

"जर हे खरेच असले, तर आपण एक क्षणही वाया घालवू शकत नाही. सहस्त्रपाण्याला आपल्या योजनांचा अंदाज येण्याआधीच आपण हालचाल करायला हवी. या गावात राहणे आता सुरक्षित नाही—इथल्या निरपराध लोकांना आपल्या लढाईत ओढणे अन्यायकारक ठरेल. त्याने त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला, तर आपण एक मोठी संधी गमावू. त्याआधीच आपल्याला गडाजवळ पोहोचले पाहिजे."

तो थोडा पुढे सरसावून म्हणाला, "ही अंतिम लढाई आता अपरिहार्य आहे. सहस्त्रपाण्याला रोखायचे असेल, तर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आपण तयार झाले पाहिजे. गडावर पोहोचून त्याच्या शक्तीचा स्रोत संपवणे हाच आपला एकमेव मार्ग आहे. आपण इथून निघायला हवे—आणि ते ही तातडीने!"


"हो," आशयनेही मान डोलावली, "आपण वेळ वाया घालवू शकत नाही. मला माझ्या इतर पिशाच्च शिकाऱ्यांना बोलवावे लागेल. आता हे युद्ध शेवटपर्यंत नेलेच पाहिजे. जगाला सहस्त्रपाण्याच्या सावटातून या ब्रह्मांडातुन मुक्त करायची वेळ आली आहे!"

राजवीरच्या आणि बलदेवच्या निर्धाराने सगळ्यांच्या मनात एक नवी उमेद भरली. प्रत्येकजण या महाभयानक संघर्षासाठी तयार होत होता.

क्रमशः

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.