Login

रेड लाईट 3

Marathi Story


चौथीत असल्यापासून ती हॉस्टेलमध्ये रहात होती. अधूनमधून शांतीचाळीत जायची, पण नंतर कांताबाईने यायला मनाई केलेली, आणि तिची आई...कल्पना, जेव्हापासून आईने लग्न केलं असं समजलं तेव्हापासून तिने आईशी पूर्णपणे संबंध तोडून टाकलेला. चार लोकांसारखं तिचं आयुष्य नव्हतंच, तिला ना घर होतं ना कुटुंब... जवळ होतं ते फक्त चांगलं शिक्षण आणि एक नोकरी, त्याच्या बळावर तिला पुढचं आयुष्य काढायचं होतं. कुटुंब, घर याबद्दल तिला खूप कुतूहल वाटे, कारण यापैकी काहीही तिच्या वाट्याला आलं नव्हतं. एक घर असतं, त्यात जीवाला जीव देणारी माणसं असतात, आई असते, वडील असतात, भाऊ बहीण असते...हे सगळं तिला एखाद्या परिकथेसारखं वाटे. म्हणूनच तिने ठरवलं होतं, की सेटल व्हायचं. एखादा सुयोग्य मुलगा बघून संसार थाटायचा..मुलं जन्माला घालायची आणि त्यांना जीवापाड प्रेम द्यायचं. हे सगळं करताना शांतीचाळीत तिचं वास्तव्य आड येणार होतं. ती तिथे वाढली हे कुणाला समजलं तर तिच्याशी लग्न तर सोडाच पण वाईट नजरेने तिच्याकडे लोकं बघायला सुरवात करतील..म्हणूनच शांतीचाळी पासून कायमचा संबंध तोडायचा असं तिने ठरवलेलं, कांताबाईसाचाही नंबर ब्लॉक करून ठेवला..

कांताबाईने फोन ठेवला आणि तिच्या जागेवर येऊन ती बसली. टेबल वरचं रजिस्टर घेतलं आणि एकेकीचा हिशोब करू लागल्या. कुणाकडे किती गिऱ्हाईक आली, त्यांचा आणि मिळालेल्या रकमेचा हिशेब करत बसली. शिल्पा-300 रुपये, कुसुम-500 रुपये..आकडे भरत असतांना लिस्ट मध्ये एक नाव कायम रिकामं असायचं. कल्पनाचं...!! शांतीचाळ सोडून बरीच वर्षे लोटली तिला, पण तिचं नाव दिसलं की कांताबाईला तिची आठवण आल्यावाचून राहत नसे. पुन्हा पुन्हा तो क्षण तिला आठवायचा...
(Flashback)
रात्रीचे 2 वाजले असतील..भयाण पाऊस सुरू होता. अश्यातच एक बाई आसरा शोधत शांतीचाळीत आली..पूर्ण भिजली होती, डोळे सुजलेले दिसत होते, बाई चांगली सुशिक्षित आणि चांगल्या घरातली वाटत होती. कांताबाईंना जाग आली, तिने पाहिलं गेटवर एक बाई अंग चोरुन उभी आहे..ती पटकन गेटजवळ गेली आणि त्या बाईला पाहिलं.. पाऊस सुरू होता, कांताबाईने पदर डोक्यावर घेतला आणि घाईघाईने विचारू लागली..

"काय गं पोरी? इतक्या रात्री इथे?"

पावसाचा आवाज इतका होता की कांताबाईंला ओरडून विचारावं लागलेलं.

ती बाई भेदरली होती, कांताबाईच्या प्रश्नाला उत्तर न देता चाळीवर एकवार नजर फिरवू लागली..चाळ कसली आहे, इथे काय चालतं हे सगळं तिला माहीत होतं त्यामुळेच तिचा पाय तिथून आत जात नव्हता.

"पोरी आत ये बाई आधी.."

कांताबाईच्या स्वरात माया होती, क्षणभर कल्पनाला चाळीबद्दल विसर पडला आणि विश्वासाने ती आत गेली. कपडे ओले झालेले, कांताबाईने तिला आत घेतलं, एका खोलीत खुर्चीवर बसवलं आणि तिला टॉवेल आणि कपडे दिले. कल्पनाने अंग कोरडं केलं आणि कपडे हातात घेतले..टिकल्यांची चोळी आणि रेशमी परकर..कल्पनाला धस्स झालं...हे कपडे घालणार आपण? कांताबाईने तिच्या मनातलं ओळखलं, तिला धीर दिला..

"अगं आजच्यापुरतं फक्त, इथे असेच कपडे असतात, दुसरे नाहीये गं.."

आवाज ऐकून स्वीटीला सुदधा जाग आलेली..ती आत आली आणि सगळं पाहिलं. परत तिच्या खोलीत जाऊन एक गाऊन घेऊन आली..

"हे घे बाई..हे घालून मोकळं वाटेल तुला. "

"आत्ता गं बाई, हा गाऊन कुठून आणलास?"

"माझ्या एका कस्टमरने दिला, तो म्हणे हा गाऊन घातला की तू प्यार व्यार मधल्या त्या हिरोईन सारखी दिसतेस.."

स्वीटी लाजून म्हणाली...कल्पनाला आपण कुठे अडकलो असं झालं, आता या बायका आपल्याला या धंद्यात अडकवणार नाही ना? आपल्याकडून बळजबरी करून घेणार नाही ना? आगीतून फुफाट्यात अशी तिची अवस्था झाली. पण या क्षणी निवारा मिळाला हेच तिच्यासाठी खूप मोठं होतं. आजची रात्र जाऊ देऊ, उद्या बघू काय करायचं ते असं म्हणत तिने नाईलाजाने गाऊन अंगात चढवला. कांताबाईने तिला अंथरुण पांघरूण दिलं आणि झोपायला लावलं..

"खूप उशीर झालाय, तू झोप शांत, उद्या सांग सगळं काय सांगायचं ते.."

दुसऱ्या दिवशी कल्पनाला जाग आली. रात्री तिला शांत झोप लागली होती, कित्येक दिवसांनी अशी निर्धास्त झोप लागलेली तिला. सकाळी उठल्यावर तिला खूप बरं वाटलं पण आपण कुठे आहोत याची जाणीव होताच हृदयात परत धडधड सुरू झाली. सकाळचे 7 वाजले होते. बायकांची रेलचेल सुरू होती. कुणी चहा घेत होतं कुणी अंघोळीला जात होतं. कल्पना इकडेतिकडे बघत होती. तिच्या खोली समोरून बायका येत जात असताना तिच्याकडे एक नजर टाकायच्या, काही हसायच्या काही कुत्सितपणे बघायच्या. तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं. परत जाणं अशक्यच, त्यात इथे येऊन पडलो..इकडे आड तिकडे विहीर अशी तिची स्थिती झालेली. भेदरलेल्या अवस्थेत बसलेली असतांना तिची नजर काल भेटलेल्या कांताबाईला शोधत होती, एक तीच बाई होती जिच्या डोळ्यात हिला कणव दिसलेली. इतक्यात समोर चहाचा कप आला, स्वीटी तिच्यासाठी चहा घेऊन आलेली. कल्पनाने पटकन तो कप घेतला आणि चहा पिऊ लागली, एक तर ती रात्री जेवलीही नव्हती त्यामुळे पोटात भूक उसळली होती. स्वीटीने ते ओळखलं, एव्हाना खोलीत चार पाच बायका कुतूहलाने जमा झाल्या होत्या..

"तुला भूक लागलीये का?"

कल्पना काही उत्तर द्यायचा आत बायका म्हणाल्या,

"जोरदार भूक लागलीये म्हणून तर इकडे आलीये.."

असं ती म्हणताच एकच हशा पिकला. स्वीटीही त्यात सामील झाली.

"जत्रा आहे इथे? चला निघा बाहेर.."

कांताबाई मागून येताच बायकांवर ओरडल्या. त्यांना पाहून बायका घाबरून पटापट बाहेर निघून गेल्या. कल्पनाने एव्हाना चहा संपवला होता. सगळे बाहेर गेल्यावर कांताबाईने दार लावून घेतलं. आत फक्त कांताबाई, स्वीटी आणि कल्पना होत्या. दोघीही समोर येऊन बसल्या, खोलीत शांतता होती पण बाहेरून आवाज येत होते. वस्ती सुरू झालेली, माणसं येऊ लागलेले..


क्रमशः


(पुढील सर्व भाग ira blogging app वर प्रकाशित होतील आणि ईरा पेजवर शेयर होतील, आजच app downlaod करा)



0

🎭 Series Post

View all