रीती ओंजळ भाग 2

एका त्यागाची प्रेम कथा
दिवाळीनंतर पुन्हा कॉलेज सुरू झाले होते. तेजल मात्र कॉलेजला आली नव्हती. शिवने तिला फोन मेसेज करण्याचा प्रयत्न केला. पण तिने शिवचे ना कॉल घेतले ना त्याच्या कुठल्याही मेसेजला रिप्लाय दिला.
त्यादिवशी हॉस्पिटल मधून शिवने तिला घरासमोर सोडले. त्यानंतर दोन-चार दिवस दोघांमध्ये व्यवस्थित बोलणं झालं होतं. पण नंतर नंतर मात्र तिने त्याचे कॉल टाळायला सुरुवात केली. 'बिझी आहे','बाहेर आहे', 'फॅमिली सोबत आहे', असे कारण सांगून ती बोलायला टाळाटाळ करू लागली. शिवला वाटलं दिवाळी आहे घरच्यांसोबत बिझी असेल. म्हणून त्यानेही दुर्लक्ष केलं. पण न चुकता तो तिला गुड मॉर्निंग आणि गुड नाईट चे मेसेज पाठवायचा. पण तिने त्याला रिप्लाय दिला नाही.
कॉलेज सुरू होऊन आज आठ दिवस होऊन गेले होते. शिव तेजल ची वाट बघून कंटाळून गेला होता. अचानक त्याच्या मोबाईलवर मेसेज टोन माजली.
'मला तुला भेटायचे आहे आपल्या नेहमीच्या जाग्यावर ये.'
हा तेजल चा मेसेज बघून त्याला कोण आनंद झाला. धावतच तो तळ्याकाठी गेला कधी एकदा तेजलला बघतो आणि तिला मिठी मारतो असं त्याला झालं होतं. तेजल दिसताच धावत धावत तो तिला मिठी मारायला गेला. पण तेजल ने त्याला हातानेच अडवलं. शिव क्षणभर घाबरून गेला.
" मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचे शिव आणि शेवटचं सुद्धा"
शेवटचं या शब्दावर जोर टाकत तेजल उद्गारली.
"महत्त्वाचं बोल ना पण शेवटचं असं म्हणू नकोस."
शिव व्याकुळतेने म्हणाला.
त्याच्याकडे दुर्लक्ष करत तेजलने त्याला अचानक विचारलं. "माणिक ज्वेलर्स मध्ये काम करणारे गिरीश राऊत कोण आहेत शिव?"
एका एका शब्दावर जोर देत तेजलने शिवला प्रश्न केला.
"ते माझे बाबा आहेत."
"ही गोष्ट तू मला का सांगितली नाहीस?"
"सुरुवातीला तू प्रेम स्वीकारायची नाहीस या गोष्टीची भीती वाटली म्हणून सांगितली नव्हती. आणि नंतर कधी विषयच निघाला नाही म्हणून राहून गेलं."
"म्हणजे तू फसवलस मला." तेजलने शिववर एक जळजळीत कटाक्ष टाकून विचारलं.
"नाही तेजा मला तुला फसवायचं नव्हतं. जेव्हा तू सांगितलंस की तुला श्रीमंत नाही तर कर्तबगार नवरा हवा त्याच वेळेस मी तुला सर्व खरं सांगणार होतो पण राहून गेलं." तिचा हात हातात घेत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
पण तिने त्याचा हात झटकून टाकला.
" इथून पुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या घरच्या नोकराच्या इथे सून म्हणून जायची माझी अजिबात इच्छा नाहीये. इथून पुढे मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही " तेजल रागाने तिथून जायला निघाली.
"थांब तेजा,मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. एक वेळेस मला माफ कर.मान्य आहे मी तुला खरं सांगितलं नाही पण मी तुझ्याशी खोटं बोललो नाही ग." शिवने अर्जव करत म्हटले.
पण तेजल ने त्याचं काही एक ऐकून घेतलं नाही आणि तिथून निघून गेली. कितीतरी वेळ शिव ती गेली त्या दिशेने बघत होता. भानावर आला तसं त्याने धावतच तेजल ला शोधायला सुरुवात केली. पण तोपर्यंत तेजल घरी निघून गेली होती. शिव रोज तेजलच्या घरासमोर दिवस दिवस थांबायचा. तिच्याशी भेटायचं बोलायचं प्रयत्न करायचा. परंतु त्या दिवसानंतर तेजल कधीही त्याच्या समोर आली नाही.
एक दिवस घरात जेवताना शिवच्या बाबांनी सांगितलं की इथून पुढे त्यांना कामावरून यायला उशीर होईल.त्यांच्या मालकाच्या मुलीचं लग्न खूप मोठ्या घरी जमलं आहे. मुलगा फॉरेनला असतो. लग्न तिकडेच करायचं ठरलं आहे. त्यामुळे दुकानाची जिम्मेदारी भरवशाच्या एक दोन माणसांवर टाकून त्यांचे मालक अमेरिकेला जाणार आहेत.
ही बातमी ऐकून शिवला धक्काच बसला. कुठल्याही कारणाशिवाय तेजल त्याच्याशी असं का वागते हे त्याला समजत नव्हतं.
"का तेजल का वागलीस असं माझ्याशी?" त्याचं हृदय जोरजोरात रडत होतं. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला.
'मला कर्तबगार मुलाशी लग्न करायचं होतं तुझ्यासारख्या कर्तव्य शून्य मुलाशी नाही. नुसते मार्कशीट वरचे मार्क पोट भरू शकत नाहीत. तुझ्यात हिम्मत असेल तर काहीतरी करून दाखव नाहीतर आयुष्यात कधीही माझ्यासमोर येऊ नकोस. कारण मी माझा कर्तबगार जोडीदार निवडला आहे.'
आणि दुसऱ्या क्षणाला तेजल ने त्याला ब्लॉक करून टाकलं होतं.
तो मेसेज वाचून शिवच्या मोठी रागाने आवळल्या गेल्या. प्रेमभंगाच्या दुःखापेक्षा तेजाने त्याची काढलेली लायकी त्याला जास्त दुखावून गेली. स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. या विचाराने तो पेटून उठला.
त्याच दिवशी त्याने गाव सोडलं आणि मुंबईला निघून गेला. त्याला काहीही करून स्वतःला सिद्ध करायचं होतं. थोडसं स्ट्रगल केल्यानंतर त्याला एका लायब्ररीमध्ये जॉब मिळाला. लायब्ररीमध्ये त्याची ओळख राकेश सोबत झाली. जो एमपीएससीची तयारी करायचा. शिवने राकेश ला एमपीएससी बद्दल विचारले. तेव्हा राकेशने त्याला एमपीएससी ची पूर्ण माहिती दिली. शिवने एमपीएससी करायचे ठरवले. राकेश जा क्लासमध्ये जायचा तिकडे शिवने ऍडमिशन घेतले.
शिवला तेजलची खुप आठवण यायची. पण तिने केलेला अपमान आठवून तो स्वतःला पुन्हा पुन्हा अभ्यासात झोकून द्यायचा.
दोन वर्ष निघून गेली. पण शिव एक क्षण सुद्धा तेजलला विसरला नव्हता. शिव नेहमीप्रमाणे लायब्ररीमध्ये त्याचं काम करत बसला होता. तेवढ्यात राकेश धावत आला. त्याला धाप लागली होती. आल्या आल्या त्याने कडकडून शिवला मिठी मारली. लायब्ररीत शांतता भंग नको म्हणून तसं कसं सावरत शिव त्याला बाहेर घेऊन आला.
"काय झालं राकेश? असा का धावत आलायस? "
शिवने त्याला काळजीने विचारलं.
राकेश चे डोळे भरून आले. दाटलेल्या कंठाने तो इतकंच बोलला.
"राज्यसेवेचा निकाल लागला शिव, तू त्याच्यातून पहिला आलास."
आणि ते शब्द ऐकून शिव जाग्यावर स्तब्ध झाला. त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं. तेजल ने केलेल्या अपमानाला त्याने सणसणीत उत्तर दिलं होतं. कर्तुत्वाच्या लढाईत जिंकलेला तो प्रेमामध्ये मात्र सपशेल हरला होता.
प्रेम अभंगाचे दुःख पुन्हा एकदा त्याचं काळीज चिरून गेलं होतं.




🎭 Series Post

View all