Login

ऋणानुबंध...

ऋणानुबंध
ऋणानुबंध

"शांता काकू, घ्या गरम गरम अनारसे केले मी तुमच्यासाठी."रेवती अनारसे काढता काढता शांता काकूंना म्हणाली.

शांता काकू रेवतीच्या शेजारी राहायच्या. त्यांना दोन मुलं. दोघांचीही लग्न झाली होती आणि आपल्या कुटुंबासह दोघेही नोकरीसाठी दुसऱ्या शहरात राहत होती. काका काही वर्षांपूर्वी देवा घरी गेलेले. त्यामुळे एकट्याच राहायच्या त्या.

शांता काकूंचे रेवतीकडे जाणे येणे होते. रेवतीने सहज एकदा त्यांना त्यांच्या मुलांविषयी विचारले होते. पण काही सांगायच्या आधीच त्यांना रडू येत होते. असेल त्यामागे काही कारण. पण आपण मात्र विनाकारण त्यांना दुखावले. असे रेवतीचा वाटले. त्या दिवसापासून रेवतीने कधीच त्यांच्यासमोर हा विषय काढला नाही.

आजही अशाच त्या रेवतीकडे आल्या होत्या. रेवती, राजेश आणि त्यांची दोन मुले. असं ते चौकोनी कुटुंब.दोघेही नोकरीवर. मुले शाळेत जायची. रोज सकाळी न चुकता शांता काकू रेवतीच्या घरी यायच्या. अगं रेवती दे मी तुला भाजी चिरून देते. दे मी तुला लसून सोलून देते. असं म्हणत बरीच मदत करायच्या.

रेवती नको नको म्हणत असतानाही शांता काकू अत्यंत मायेनं तिला तिच्या कामात मदत करायच्या. आज रविवार असल्याने रेवती गरम अनारसे काढत होती. तेवढ्यात शांता काकू आल्या. या शांता काकू. बसा. आज तुम्ही काहीच काम करू नका. फक्त बसा. असे म्हणत रेवतीने त्यांना गरम अनारसे खायला दिले.

रेवतीचा हा नेहमीचाच शिरस्ता. दर रविवारी रेवती शांता काकूंना काहीच काम करू द्यायची नाही. त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खायला द्यायची.तिला माहीत होते, शांता काकूंना कडक वस्तू चावत नाही. म्हणून तिचा हा आटापिटा.

अशा तऱ्हेने शांता काकू व रेवती यांच्यात सुंदर नातं तयार झालं होतं. रेवती मनात म्हणायची सुद्धा. "काकू व माझ्यात नक्कीच पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असतील."

उन्हाळा सुरू झाला ,की "अगं रेवती वाळवणाचे पदार्थ करूया नां आपण." उद्या मी तुला छान पिठाचे पापड करून देते. मला माहित आहे राजेशला पिठाचे पापड आवडतात आणि खरंच अत्यंत आवडीने त्या असले पदार्थ करून सुद्धा द्यायच्या. एखाद्या दिवशी काकू आल्या नाही तर राजेश व रेवती दोघांनाही चुकल्या चुकल्यासारखे वाटायचे. ते दोघेही आवर्जून त्यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करायचे.

एके दिवशी शांता काकू नेहमीप्रमाणे सकाळीच रेवतीच्या घरी आल्या. घरी आल्या आल्या "अगं रेवती आज बरं नाही वाटत गं मला. कां कुणास ठाऊक. सारखी चक्कर येत आहे."

"काकू, चला बरं डॉक्टरांकडे जाऊ आपण. अशी दुखणी अंगावर काढत जाऊ नका."रेवती म्हणाली.

"नाही गं, होतं असं कधी कधी मला. जाते मी घरी आणि झोपते जाऊन."थांबा काकू थोडावेळ. मी तुमच्यासाठी गरम गरम शिरा करते. तो खा आणि मग जा.तेवढचं बरं वाटेल तुम्हाला. असे म्हणत रेवतीने त्यांच्यासाठी शिरा केला. त्यातला थोडासाच शिरा त्यांनी खाल्ला व घरी गेल्या.

रेवती व राजेशही आपापल्या कामावर निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांना कळले, की शांता काकू रात्री झोपेतच देवाघरी गेल्या. ते ऐकून रेवती व राजेशला तर धक्काच बसला. रेवतीचे तर रडून रडून डोळे लाल झाले होते. ती मनातल्या मनात विचार करत होती."कोण लागत होत्या शांता काकू आपल्या? पण किती मनं जुळली होती आमची. "खरंच यालाच म्हणतात ऋणानुबंध."

अशा कितीतरी व्यक्ती एकट्या किंवा दोघे अलीकडे आपल्या मुलांपासून दूर राहताना दिसतात. अंतरस्थ कारण काहीही असो. पण अशा व्यक्तींना नाना प्रश्न विचारून दुःखी करण्यापेक्षा त्यांना प्रेम द्यावे. त्यांच्या संपर्कात रहावे. ही गोष्ट आपण निश्चितच करू शकतो. नाही कां? कारण
कोणाकडूनही त्यांना धनद्रव्याची आशा नसते.
माफक प्रेम मिळावे हीच त्यांची अपेक्षा असते.
सौ. रेखा देशमुख