Login

रुममेट भाग १

Bonding between Mother And Daughter

रुममेट भाग १

©® सौ.हेमा पाटील.

" हॅलो बोल माॅम!" तोंडात सॅंडविचचा घास कोंबत आर्या म्हणाली.
‌"अगं खाताना बोलू नये गं, आणि बोलताना खाऊ नये."
" तू पण ना मम्मी, दोन्हींचा अर्थ एकच ना की काही खात असताना बोलू नये." आर्या म्हणाली.
" हो. ठसका लागतो. चुकून अन्नाचा एखादा कण जरी श्वासनलिकेत गेला तरी जीवाला धोका निर्माण होतो." मम्मी म्हणाली.

" बरं, आता माझा घास खाऊन झालेला आहे. तुझ्याशी बोलणे संपेपर्यंत मी पुढचा घास खात नाही. ओके?" आर्या म्हणाली.
" कशी आहेस बाळा?"
" मी छान आहे गं. आपण रात्रीच बोललोय ना गं? किती काळजी करतेस? एका रात्रीत मला काय धाड भरणार आहे? आणि स्वीटी आहे ना माझ्यासोबत. कितीवेळा तुला सांगितले काळजी करु नकोस. तरी तुझी सवय काही जात नाही." आर्या कुरकुरली.

" घरापासून दूर रहातेस ना? म्हणून काळजी वाटते. जन्मापासून कायम माझ्याजवळ होतीस. आता नोकरीच्या निमित्ताने पुण्यात गेलीस त्यामुळे मला करमत नाही. तुझी सारखी आठवण येते. तरी मी सारखी फोन करत नाही."
" काय? सारखा करत नाहीस? दिवसातून कमीत कमी चार वेळा तर करतेसच फोन. त्यापेक्षा जास्त पण, कमी नाही. अन् वाॅटसअपवर तुझ्या मेसेजेसचा पूर आलेला असतो. जरा तासभर मेसेज बघितले नाही की मग तर बघायलाच नको. बरं ठेवू का आता? स्वीटी निघालीय. चल बाय." आर्या म्हणाली.
" अगं, स्वीटीला वेळ असेल तर दे ना तिच्याकडे. तिच्याशी दोन शब्द बोलते." मम्मी म्हणाली तसे आर्या म्हणाली,
" आधीच तिला उशीर झाला आहे, त्यात तुझे दोन शब्द म्हणजे मला माहीत आहे. ठेव आता फोन. ती आवरतेय. चल बाय. बोलू परत." असे म्हणत तिने फोन ठेवला.

आर्या इनामदार ही कलेढोण येथील एका घरंदाज व सधन घरातील एकुलती एक कन्या. तिचे वडील माधवराव बॅंकेत अधिकारी होते. आई सुनीती गृहिणी होती. घरची शेतीवाडी होती. आई गड्यांकरवी शेती करवून घेत असे. लग्नानंतर खूप वर्षांनी आर्याचा जन्म झाला. दोघांमध्येही काहीच दोष नव्हता, पण दैवाने बाळासाठी खूप वाट पहायला लावली.

खूप दिवसांनी कुस उजवल्यामुळे सुनीती आर्याची खूप काळजी घेत असे. लहान असताना तिला क्षणभरही डोळ्यासमोरुन दूर होऊ देत नसे. कुणी तिला बाहेर नेले तर तिला परत घरात आणेपर्यंत ती अस्वस्थपणे दारापर्यंत हेलपाटे मारत असे.
ती थोडी मोठी झाल्यावर कुठेही जाणार असेल तर आपले हातातले काम टाकून ती आर्यासोबत जात असे. आर्यालाही मग तशीच सवय लागली. आई तिचे संरक्षक कवच बनले. आईला सोबत न घेता तिला घराबाहेर पडायची भीती वाटू लागली. त्यात सुनीती तिला वारंवार सांगायची,
" हे जग फार वाईट आहे. कुणावर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. मुलीच्या जातीने अखंड सावध राहिले पाहिजे; नाही तर लबाड कोल्हे डाव साधायला टपून बसलेलेच असतात."

आईचे हे बोलणे ऐकून आर्याच्या मनावर परिणाम झाला होता. ती कामाशिवाय अजिबात घराबाहेर पडायची नाही. शाळेत जाताना ती एकटी जायची, तर जीव मुठीत धरून जायची. कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्यास तेवढे उत्तर देऊन ती पुढे जायची. तिला मित्र तर सोडाच, मैत्रिणीही नव्हत्या. बाहेर काय घडले याची रेघ न रेघ आर्या घरी आल्यावर आईला सांगायची.

सांगली येथे रहाणारी तिची आत्या अनघा आणि तिची दोन मुले सौरभ आणि साक्षी यांच्याशी तेवढी ती मिळून मिसळून रहात असे. सुट्टीत तिघांचा नुसता धुमाकुळ सुरु असे. जसजसे मुले मोठी होत गेली, मुलांचे मामाकडे येणे कमी कमी झाले. तरीही बालपणी तयार झालेले बाॅण्डिंग टिकून होते. ते दोघे सोडल्यास ती कुठल्याही समवयस्क मुलामुलींच्या जवळ कधी गेली नाही.

काॅलेजमध्ये गेल्यावर तर सुनीतीने माधवरावांना शहरात भाड्याने रुम घ्यायला लावली व ती तिच्यासोबत चार वर्षे तिथे जाऊन राहिली. माधवराव सुनीतीवर खूप चिडत.
" तुझ्या अशा वागण्याने तू मुलीला भित्री बनवून ठेवले आहेस. आपल्या मुलांनी मोकळ्या आकाशात उंच झेप घ्यावी यासाठी आईवडील प्रयत्न करतात, अन् तू तर तिचे पंखच छाटते आहेस. अशाने बाहेरच्या जगात जेव्हा एकटीने जाण्याची तिच्यावर वेळ येईल तेव्हा तिला किती अवघड जाईल! नको तिला आपल्या पंखाखाली घेऊ...तिला बाहेरच्या जगाचे भले बुरे अनुभव घेऊ देत." परंतु सुनीतीवर याचा काहीच परिणाम होत नसे.

‌त्यामुळे आता आर्या नोकरीनिमित्ताने पुण्यात आल्यावर तिच्या आईला तिची खूप काळजी वाटत होती. वारंवार फोन करून ती आर्याला भंडावून सोडत असे. सकाळी आईच्या फोनमुळेच आर्याला जाग यायची आणि रात्री आईचा निरोप घेऊन ती झोपी जायची. आत्ताही तिचा ब्रेकफास्ट सुरु असताना सुनीतीचा फोन आला होता.

आर्याचे पुण्याला जाणे नक्की झाले तेव्हा माधवरावांनी आर्याला सांगितले होते की;
" आजवर तू आईच्या संरक्षण कवचातून बाहेर पडून या जगाचा अनुभव कधीच घेतला नाहीस. आता तू नोकरीनिमित्ताने पुण्यात जात आहेस. आईशिवाय रहाण्याची सवय करुन घे. मित्रमैत्रिणींसोबत आयुष्य जगण्याचा अनुभव घे. नाहीतर चार दिवस गेले की आईला फोन करून सोबतीला बोलावून घेशील.
लक्षात ठेव, आईवडील एका मर्यादेपर्यंत मुलांना सोबत करतात. त्यापुढचे आयुष्य आपले आपल्यालाच जगायचे असते. आयुष्यभर आपण आईवडिलांवर विसंबून राहू शकत नाही. त्यामुळे मुक्तपणे आईची कुबडी सोडून जगण्याचा आनंद घे. असा प्रयत्न केला नाहीस तर कायमच तू आधारासाठी कुबडी शोधत जगशील.

तू उच्चशिक्षित आहेस, आता स्वतःच्या पायावर उभी रहात आहेस. चार वर्षांनी लग्न झाले की, परत दुसऱ्या बेडीत अडकशील. तेव्हा आईच्या मायेची बेडी तोड. मला प्राॅमिस कर, तू आईला सोबतीला बोलावून घेणार नाहीस. आईला सोडून एकटी रहाशील. आजवर मी तुला कधीच काही मागितले नाही. आज तुझे स्वातंत्र्य मागतोय, देशील ना? मला निराश करणार नाहीस ना?"

यावर आर्याने आपल्या पप्पांना प्राॅमिस केले की, ती आईला बोलावणार नाही. हे पाहून माधवरावांना आनंद झाला होता. आजवर त्यांनी पत्नी सुनीतीला खूपदा याची जाणीव करून दिली होती, पण ती मायेच्या जंजाळातून बाहेर पडत नव्हती. आता आर्या आपल्याला दिलेले प्राॅमिस पाळतेय का हे पहायचे असे त्यांनी ठरवले.

ऑफीसच्या जवळच आर्याला रुम मिळाली होती. सुरवातीला रुम मिळेपर्यंत ती कंपनीच्या जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये रहात होती. आता तिला स्वीटी ही रुम पार्टनर मिळाल्याने सुनीतीचा जीव भांड्यात पडला होता. पुढच्या महिन्यात आर्याला भेटायला जायचे असे तिने मनाशी ठरवले होते.
क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५