ऋषिपंचमी
भाद्रपद शुध्द पंचमी ला ऋषिपंचमी असे म्हणतात.हा देखील श्रद्धा व कृतज्ञतेचा सण असून विशेषतः स्त्रिया व्रत म्हणून तो पाळतात.
मनुष्य जन्माला आल्या नंतर त्याच्या संपूर्ण जडण घडणीत अनेक घटकांचा वाटा असतो. हे सगळे घटक कळत नकळत त्याच्या जीवनाची पायाभरणी करत असतात. त्यामुळे त्यांचे एक प्रकारचे ऋण च मनुष्यावर असते. जसे देव ऋण, मातृ ऋण ,पितृ ऋण, ऋषी ऋण.
खरं तर प्रत्येकालाच आजन्म या ऋणा तच राहायला आवडेल अन् हे न फिटणारे ऋण आहे. पण तरीही एक कृतज्ञ भाव म्हणून कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते फेडण्याचा आपण प्रयत्न करतो.
अशाच प्रकारे ऋषींचे ऋण फेडण्यासाठी आपण जे हा सण साजरा करतो.चला, आज या सणाला जाणून घेऊया.
पुरातन काळी ऋषीमुनींनी खडतर तप, साधना, चिंतन व मनन करून अनेक सूक्तांची रचना केली. चिरंतन मूल्यांचा साक्षात्कार घडविण्याचे सामर्थ्य त्या सूक्तात असल्यामुळे ती सनातन (नित्यनूतन) ठरली आहेत. त्यामुळे वेदाचेही रक्षण झाले. धर्माचा प्रचार झाला. मानवी जीवनाला दिशा मिळून ते उन्नत झाले. ही ज्ञानधारा अखंड प्रवाहीत ठेवण्याचे कार्य अनेक ऋषीमुनींनी व काही ऋषिपत्निंनी केले आहे. त्यात प्राधान्याने सप्तऋषींचे व एकाच साध्वीचे स्थान अनन्य साधारण आहे. ज्ञानदात्या ऋषींना प्रतीकात्मक रुपात भाद्रपद शुध्द पंचमीला पूजले जाते. त्यात कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ, अत्री हे सात ऋषी व वसिष्ठ पत्नी महान विदुषी अरुंधती असे आठ ज्ञानोदकांची पूजा केली जाते.
या दिवशी सकाळीच शुचिर्भूत होऊन पूजा केली जाते. बरेच जण या दिवशी नदीवर स्नान करायला जातात.ो
या दिवशी रांगोळी काढून सजवलेल्या पाटावर मूठ मूठ तांदळाच्या आठ राशी ठेऊन त्यावर ऋषींचे प्रतीक म्हणून आठ सुपाऱ्या उजवीकडून डावीकडे
मांडून व वसिष्ठऋषींच्या शेजारी म्हणजे आठव्या सुपारी वर अरुंधतीचे प्रतीक म्हणून पाण्याने भरलेला कलश चौरंगावर ठेऊन त्यात गंध, फूल,अक्षता व सुपारी घालतात व श्वेत वस्त्र गुंडाळून त्याचे पूजन केले जाते व खालील प्रमाणे प्रार्थना केली जाते.
नमोस्तु ऋषिवृंदेभ्यो देवर्षिभ्यो नमो नम:|
सर्व पापदरेभ्यां हि वेदविदभ्यो: नमो नम:||
माझ्या हातून कळत न कळत अज्ञानवश दोष किंवा पाप घडत असतात. या पापांचा नाश व्हावा अशी मी प्रार्थना ुुणंकरतो. या दिवशी स्त्रिया उपवास करतात.बैलाच्या कष्टाचे खात नाही. कंदमुळे व भाज्यांच्या आहार घ्यायचा असतो
एक दिवशी तरी स्वतः कष्ट करून अन्न घ्यावे अन् श्रमप्रतिष्ठा वाढावी हा मुख्य उद्देश.
ऋषीमुनी अरण्यात राहत असत. अरण्यात आपोआप उगवणारी कंदमुळे खाऊन स्वतःची उपजीविका करीत. त्यांची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी केवळ नैसर्गिकरीत्या तयार झालेले अन्न खाऊन रहावे. म्हणून ऋषिपंचमीचा दिवस अशा रीतीने साजरा केला जातो.
ऋषी म्हणजे 'ऋ ए असती' ऋ म्हणजे ज्ञान, असती म्हणजे अनुभूती असणे. ऋषी म्हणजे ज्यांना आत्मा व निसर्ग ज्ञानाची अनुभूती असते ते ऋषी! निसर्गाला ऋत म्हणतात. निसर्गात चालणाऱ्या घडामोडींचे साक्षीभावाने चिंतन मनन करणारे व त्याची जीवनाशी सांगड घालणारे ते ऋषी!
'ऋषती गच्छती संसार परि इति ' असेही म्हंटले जाते. संसाराला स्थिर ठेवून शोक व संताप यात कसे आनंदी रहावे हे ज्ञान देतो तो ऋषी!
ज्ञान तेच असले तरी काळानुरूप ते प्राप्त करण्याचे अन् उन्नती करण्याचे मार्ग बदलले आहेत. तेव्हा पुराण कथांचे मर्म समजून पुढे आपल्याला पुढील मार्ग शोधावे लागतील.
बऱ्याच ठिकाणी स्त्री रजस्वला असताना तिच्या हातून नकळत जी काही शिवाशिव होते त्याचे परिमार्जन म्हणून हे व्रत केले जाते अशी मान्यता आहे.पण आज काळाच्या कसोटीवर विचार केल्यास ते फारसे पटत नाही.
सप्त ऋषीत आठवी अरुंधती आहे. तेव्हा विद्याची क्षेत्रे पुरुषांसाठी राखीव होती ही आतापर्यंतची कल्पना धादांत खोटी असल्याचे सिध्द होते. तसेच ऋषिपंचमीचे व्रत स्त्रीयांसाठीच आहे असे मुळीच नाही. ते पुरुषांनीही करावयास हरकत नाही. ज्ञानाची कवाडे खुली झाल्यामुळे घेईल त्याचे ज्ञान आहे अंतर्बाह्य शुचिता हा ज्ञानाचा धर्म आहे. ज्ञान केवळ पुस्तकातून येत नसून ते ऋषिमार्गणे म्हणजे निरीक्षण, वाचन, मनन, लेखन, चिंतन व परिश्रम यांच्या अभ्यासातून येते व चरित्रातून टिकून राहते.
अशाप्रकारे ऋषिपंचमीचे मर्म नीट जाणून घेऊन डोळस पणें हे व्रत पालन करूया.
- मुक्ता बोरकर - आगाशे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा