संघर्ष एक कथा भाग ४
दुसऱ्या दिवशी सकाळी मंगेश उठला ते त्याच्या मित्रांच्या आवाजाने
" ए मंग्या येतोस का ? नदीवर जाऊ ?
मित्रांच्या हाकेने मंगेश ताडकन उठला . टॉवेल घेतला आणि निघाला नदीवर . मित्रां बरोबर गप्पा टप्पा , आणि नदीत सूर मारायचा प्रोग्रॅम जोरात चालला होता . मंगेश त्याच्या मित्रांना शहरातील गोष्टी सांगत होता आणि मित्र पण आवडीने त्याचे ऐकत होते. पोटात भुकेचा गोळा आल्यावर सगळे घरी आले .
मंगेश नदीवरून जवळ जवळ एक तासाने आला होता . आई ने त्याच्या साठी भाकरी भाजी बनवून ठेवली होती . तरी अजून बाबा झोपलेच होते आणि आई स्वयंपाक घरात होती .
मंगेश आई ला " ए आई अजून बाबा उठले नाहीत ?तू उठवल नाहीस त्यांना ?
मंगेश आई " नकॊ उठवू त्यांना , ओरडतील तुझ्यावर . आज बऱ्याच दिवसांनी झोपलेत .
मंगेश पण गप्प बसला बाबांचा दरारा होताच तसा .
बोलता बोलता मंगेश जेवायला बसला . भुकेने कासावीस झाला होता . गरम गरम भाजी आणि भाकरी वर चांगलीच ताव मारलन . खाता खाता आई ला म्हणाला
मंगेश " मी आता दीक्षित गुरुजींकडे जाऊन येतो . "
आई " हो चालेल , त्यांचे देण्याचे पैशाची सोय झालीय का ?
मंगेश " हो म्हणूनच तर जातोय . आणि पैसे कुठे दुसरीकडे खर्च होयच्या आधी देऊन येतो ."
आई " हो चालेल "
मंगेश जेवण झाल्यावर छान पॅन्ट शर्ट बेल्ट , नवीन घेतळलेले बूट आणि घड्याळ घालून छान तयार झाला आणि गुरुजींकडे जायला निघाला .
रात्रीची छान झोप आणि आणि छान आकाशी रंगाचा शर्ट मध्ये मंगेश छान दिसत होता .आणि तो सरांकडे जायला निघालाच तेवढ्यात बाबा उठले .
बाबा " काय रे मंग्या नवरदेव झालास कि काय ? एवढा तयार होऊन कुणीकडे निघालास ? .
मंगेश " अहो बाबा मी दीक्षित गुरुजींकडे चाललोय . तुम्ही येता का बरोबर ?"
मग आधी नाही का उठवायचस नालायका ? आता माझी अजून अंघोळ होयचीय .
मग व्हा तयार मी थाम्बतो . पण जरा पटापटा आवरा .
बाबा " हो रे .
मंगेश स्वतः ला भीतीवर लावलेल्या छोटया आरशात बघून भांग पाडत असतो . कधी भांग तिकडे पाडून बघतो कधी तिकडचा इकडे पाडून बघतोय . या ड्रेस वर कोणता भांग चांगला दिसतोय ते पाहतोय .
आई आपली काम करत करत त्यांचं काय चाललंय ते बघतेय . आणि मध्ये हसतेय . पोरगं मोठं झालय आता लगीन कराया पाहिजे हे तिच्या लक्षात येतंय .
आई " त्या तुर्भ्याच्या नाना ची लेक लग्नाची हाय . तिला बघितली हायस का रे तू ?
मंगेश" कोण ग ?
आई " अरे ती सविता "
मंगेश " नको ती जाम काळी हाय "
आई " अगो बाया ,आता गोरी पोरगी कुठून आणायची ."
तेवढ्या बाबा अंघोळ करून आले आणि खायला बसले .
बाबा " त्या रामाची पोरगी पण हाय . छान हाय ती दिसायला . पण शाळेत ४थी पर्यंत गेलीय . चालेल का तुला ? तीचा बाप लै पैसेवाला हाय ."
मंगेश बाबा आता आपण जाऊन येऊ मग बोलू या विषयावर .
आणि दोघे बाप लेक निघाले बाहेर
खर सांगू तरण्या ताठ्या मुलाबरोबर जाताना एका बापाचं उर किती भरून येत . त्यात जर मुलगा मंगेश सारखा असेल तर बघायलाच नको . आणि आज तर मंगेश त्या वेळेचा सुपरस्टार आमिताभ बच्चन ला टक्कर देत होता . असो दोघे बाप लेक दीक्षित गुरुजींकडे आले
दीक्षित गुरुजी " अरे वाह मंगेश . कधी आलास ? मी ओळखलंच नाही तुला ? किती वेगळा दिसतोस ? शहरात चांगला सेट झालेला दिसतोस ."
मंगेश " सेट नाही पण छान चालू आहे . ऑफिस च काम छान जमतं साहेब लोक पण छान सांभाळून घेतात .. वगैरे वगैरे .. अशा छान गप्पा झाल्या .
मध्ये मध्ये मंगेश बाबा आणि गुरुजी पण बोलत होते .
तेवढ्यात आतून गुरुजींची मुलगी चहा घेऊन आली . मुलगी सूंदर , सुरेख , दोन लांब वेण्या , आणि साधीशी फुलांची साडी घातलेली . त्यातल्या एका वेणीत तिने चाफा माळलेला . जशी ती बाहेर आली तसा त्या सोनचाफ्या चा सुगंध त्या खोलीमध्ये दरवळला आणि जशी ती आत गेली हळू हळू तो तो सुगंध हि कमी कमी झाला .
दीक्षित गुरुजी " हि माझी मुलगी शालिनी "
मंगेश अजून त्या सुखद धक्क्यातून बाहेर आला नव्हता .
दीक्षित गुरुजी " अरे मंगेश चहा थंड होईल घे .
मंगेश " हो ... हो... घेतो सर ..
मंगेश चे बाबा " मास्तर मग शाळा किती शिकलेय तुमची लेक ?"
दीक्षित गुरुजी " यंदा दहावी ला आहे "
मंगेश चे बाबा " अरे वाह.. सुरेख आहे हो पोर .
दीक्षित गुरुजी " मंगेश तुला एक विचारू का ?
मंगेश " हो विचारा ना गुरुजी "
गुरुजी " हे बघ मी विचारतोय त्याच उत्तर मी तुझा सर आहे म्हणून किंवा मी तुला मदत केली होती म्हणून या दबावाखाली येऊन उत्तर नको देउ "
मंगेश " गुरुजी , तुम्ही असे का बोलताय . सांगा ना . "
गुरजी " हो , मी काय म्हणत होतो " शालिनी साठी मला तू नवरा मुलगा म्हणून पसंत आहेस . तुला शालिनी पसंत असेल तर पुढच्या गोष्टी मी तुझ्या वडिलांशी बोलतो .
मंगेश जरा हडबडलाच . काय उत्तर देऊ त्याला कळेनाच . दीक्षित गुरुजींनी अचानक वेगळाच प्रश्न विचारला होता
मंगेश चे बाबा " थांबा गुरुजी , ते शक्य नाही . तुमच्या आणि आमच्या परिस्थितीत खूप फरक आहे .याची जाणीव आहे का तुम्हाला ?"
गुरुजी " हो नक्कीच . पण तुमचा मुलगा पण हिरा आहे त्याची कल्पना आहे का तुम्हाला ?"
गुरुजींपुढे बाबा काय बोलणार होते . ते म्हणाले तुम्ही थोडा अजून विचार करा आम्ही पण विचार करतो .आणि निघाले घरी
एक नोकरी मिळाली तर छोकरी पण लगेच चालून आली ती सुद्धा गुरुजींची मुलगी .
दीक्षित गुरुजी हुशार होते . त्यांनी मंगेश ला लहानपणीच हेरून ठेवला होता त्यांच्या मुलींसाठी . योग्य वेळ यायची वाट बघत होते आणि ती योग्य वेळ आलीच .
मंगेश उद्या सकाळ च्या गाडीने जाणार होता . मंगेश चे बाबा जरा शांतच बसले होते ते विचार करत होते . त्यांना शालिनी बघताच क्षणी आवडली होती . पण नाका पेक्षा मोती जड नको होयला अशी त्यांना भीती वाटत होती . गावात जशी अलीकडे आणि पलीकडे लोक राहायचे पण त्यांच्या राहणीमानात पण तेवढाच फरक पण होता .त्यामुळे शालिनी शी मंगेश च लग्न लावायला ते नको म्हणाले होते . पण हे हि तितकेच खरे होते कि तिच्या इतकी चांगली मुलगी मंगेश ला शोधून नसती मिळाली .
बाबांना आता त्यांच्या तब्बेती ची पण काळजी होती .. आपण जिवंत आहोत तोपर्यंत मंगेश च लग्न झालेल बरं. चांगलं स्थळ चालून आलेय काय करावं ? हो म्हणावं का ?काय करावं ? या विचारातच झोपले .
दुसऱ्या दिवशी मंगेश सकाळी उठून शहरात जायला निघाला , आई ने डबा करून दिला थोडा खाऊ करून दिला . आणि काळजी घे रे बाबा .
बाबांचे पण डोळे पाणावले .मंगेश तुला शालिनी कशी वाटली ?करशील का तिच्याशी लग्न .?
मंगेश " बाबा आता तुम्ही ठरवा ? आई ला काय वाटत ? ते बघा ? तशी माझी काही हरकत नाही ? नाकी डोळी दिसायला तर चांगली आहे . यंदा दहावी ला आहे म्हणजे शिक्षण पण आहे .
आई आणि बाबा एकमेकांकडे बघू लागले . एकंदरीत मंगेश चा होकार आहे हे त्यांना कळले होते .
मंगेश ची आई " नुसतं दिसायला गोरी गोमटी असून काय उपयोग ? संसार करायला कामं करायला लागतात . जेवण बनवायचं?नदीवर भांडी घासायची , कपडे धुवायचे ? शेणाने घर सारवायचे ?शेतात पेरणी करायची, कापणी करायची हे सगळं करायची तयारी असेल तर माझी काही हरकत नाही.
मंगेश ने सर्व ऐकून घेतले काही बोललाच नाही दोघांना नमस्कार करून निघाला .
जाता जाता बाबा मागून म्हणाले " उद्याच मास्तरांना होकार कळवतो रे "
मंगेशने मागे वळून बघितलं आणि गालातल्या गालात हसताना दिसला
दोघे आई आणि बाबा पण हसत हसत आणि ओल्या पापण्यांनी त्याला निरोप दिला
मुलाला मुलगी नक्की कशी हवीय हे सुद्धा त्याला स्वतःच्या आई वडिलांसमोर बोलण्याचा हक्क नसतो . तो मोठ्या तोंडानी मला हीच पोरगी हवीय असे बोलू शकत नाही . असे जर तो बोलला तर तो आधीच बायकोचा झालाय किंवा तिच्या रूपावर भाळलाय असा शिक्का मारतात .
त्यामुळे एखाद्या चांगल्या मुलीचे स्थळ आलं तर त्याला सुरुवात हि नकारा पासून होते . त्याने कारण काहीतरी सांगायचे जसे कि " अजून मी सेटल नाही झालो " किंवा जर बहीण असेल तर आधी बहिणीचे लग्न होऊ दे मग माझं " किंवा मला आधी फ्लॅट बुक करायचाय " अशी कारणं त्याला त्याची इच्छा नसताना सांगवी लागतात . म्हणजे मग आई वडिलांना वाटतं कि आपला मुलगा खूप चांगला आहे . अजून आपल्या शब्दा बाहेर नाही . जशी त्या चांगल्या मुलीचं दुसरीकडे कुठेतरी जमतंय अशी बातमी लागली कि मग आपल्या मुलाला ह्या मुलीपेक्षा चांगली मुलगी मिळणार नाही हे त्यांना पटते . आणि मग फायनली त्या मुलाला त्याच्या पसंतीची मुलगी बायको म्हणून मिळते .
मुलगा असून सुद्धा त्याला या सगळ्या जाचातून जावे लागते तेव्हा कुठे त्याला त्याच्या पसंतीची बायको मिळते .