Login

सागराला ओढ किनाऱ्याची!!( भाग १० अंतिम)

दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर सागर आणि किनारा एक झाले.
खऱ्या प्रेमाची खरी ताकद काय असते ते श्री आणि शरयूकडे पाहून आपोआपच समजते.

एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणे, एकमेकांच्या भावनांचा आदर करणे, दूर राहूनही मनापासून एकमेकांसाठी जगणे, स्वतःच्या इच्छा, अपेक्षा काही काळ बाजूला ठेवून जोडीदाराच्या स्वप्नांची पूर्ती होण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे.
यालाच तर म्हणतात खरे प्रेम.

शरयूचे स्वप्न श्री स्वतः जगला नसता तर आज परिस्थिती कदाचित काहीतरी वेगळी असती. पण त्याने मात्र स्वतःच्या भावनांना आवर घालत तिच्या करिअरला महत्त्व दिले. तिच्या स्वप्नांचा, तिच्या मनापासून केलेल्या मेहनतीचा त्याने आदर केला.
म्हणूनच तर आज ती तिच्या धेय्यापासून अगदी काही अंतरावर उभी होती.

मुंबईत दोन वर्षांचा प्रोबेशन पिरेड पूर्ण करून शरयू आता बडोद्याला एकवीस दिवसांच्या फायनल ट्रेनिंग साठी जाणार होती.

आठ दिवसांची सुट्टी संपली आणि आता सर्वांचा आशीर्वाद घेवून शरयू तिच्या अंतिम धेय्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज झाली होती.

श्री तिला सोडवायला जाणार होता. सोबत श्री चा एक जवळचा मित्र होता.
ड्रायव्हर गाडी घेवून खाली निघण्याच्या तयारीतच होता.

घरातून बाहेर पडताना शरयूचे पाय अगदी जड झाले होते. पण आता दुसरा पर्याय देखील नव्हता.
आठ दिवसांचा तो श्रीचा सहवास तिला आणखीच हवाहवसा वाटत होता. श्रीची देखील अगदी तशीच अवस्था झाली होती. पण शरयूला जाणे तर भाग होतेच.

आयुष्यातील सर्वात सोनेरी क्षण त्यांनी हृदयाच्या कप्प्यात अगदी जपून ठेवले होते. आणि तेच पुन्हा पुढच्या काही दिवसांच्या विरहावर फुंकर घालण्याच्या कामी येणार होते.

सर्वांचा निरोप घेवून शरयू गाडीत बसली. तिच्यासोबत श्री तिच्या बाजूला मागच्या सीटवर बसला.
श्रीचा मित्र ड्रायव्हर शेजारी पुढच्या सीटवर बसला.

"सावकाश जा रे आणि अधूनमधून फोन करत राहा."

आप्पा आणि मालती ताईंची मुलांविषयीची काळजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

मुंबई ते बडोदा हे अंतर अंदाजे साडे चारशे किमी. नऊ ते दहा तासांचा तो प्रवास. त्या अखंड प्रवासात दोघांनीही एकमेकांचा हात काही सोडला नाही.
पुन्हा एकदा शब्दांनी दडी मारली होती.
पण नजरेतूनच साऱ्या भावना एकमेकांच्या हृदयाला भिडत होत्या.

एकमेकांची हाताची पकड अधिकच घट्ट होत होती. एकमेकांप्रति असणारी काळजी, ओढ नजरेतून ओसंडून वाहत होती दोघांच्याही.

नऊ तासांचा तो प्रवास कधी संपूच नये असेच वाटत होते दोघांनाही. गाडी जसजशी पुढे जास्त होती तशी दोघांचीही एकमेकांबद्दलची ओढ आणखीच वाढत होती.
विरहाची चिंता दोघांनाही सतावत होती.

प्रवास शेवटच्या टप्प्यात आला तसा श्रीच्या सूचना सुरू झाल्या. "काळजी घे, काही दुखलं खूपलं तर ट्रीटमेंट घे वेळेवर. उगीच अंगावर काढू नकोस. वेळ मिळेल तेव्हा खुशाली कळवत राहा."

"हो रे मी घेईल माझी काळजी पण तूही स्वत:ची काळजी घे. जेवण वेळेवर करत जा.

"इकडे माझी काळजी घ्यायला सगळेचजण आहेतच. फक्त तू स्वत:ला जप." श्री म्हणाला.

थोड्याच वेळात गाडी बडोद्याला ट्रेनिंग सेंटर वर पोहोचली. तो भव्यदिव्य कॅम्पस पाहून सर्वांनाच आनंद झाला.
राहण्याची देखील उत्तम व्यवस्था तिथे शेजारीच असलेल्या बिल्डिंग मध्ये केलेली होती.
जेवणाची देखील सोय अप्रतिम होती. एकंदरीतच सर्व छान होते त्यामुळे श्रीला आता शरयूची त्याबाबतीत काळजी नव्हती.

एक एक करत हळूहळू ट्रेनी जमत होते. ओळखी होत होत्या. तेथील वातावरण अगदी प्रसन्न असल्याने कोणाचेही अगदी सहज मन रमेल. असेच काहीसे चित्र दिसत होते.

शरयूला सोडून माघारी जाताना श्रीला चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.
किनाऱ्याला मागे सोडून सागर एकटाच निघाला होता आता परतीच्या प्रवासाला.

श्रीला निरोप देताना शरयूच्या डोळ्यांत नकळतपने पाणी तरळले. ती पहिल्यांदाच अशी इतक्या दूर राहणार होती.
खूप वाटत होते दिघांनाही प्रेमाची एक घट्ट मिठी मारावी. पण परिस्थितीचे भान ठेवून दोघांनीही पुन्हा एकदा भावनांना आवर घातला.

लग्ना आधीचे ते दिवस दोघांनाही आठवले. अशीच ओढ होती त्यावेळी दोघांनाही एकमेकांची.

पुन्हा एकदा शरयू जणू नजरेतून सांगत होती श्रीला,
"आता थोडेच दिवस. येते मी लवकरच."
माझा विश्वास आहे, देव इतकाही निष्ठुर नाही, नक्कीच मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग मिळेल.

जड अंत:करणाने दोघांनीही मग एकमेकांचा निरोप घेतला.
श्री गेल्यानंतर कितीतरी वेळ ती तशीच उभी राहिली पाठमोऱ्या गाडीकडे पाहत.

ट्रेनिंगदरम्यान शरयूला श्री सोबत वेळ नाही मिळायचा जास्त बोलायला.

खूप साऱ्या ॲक्टिविटी, कल्चरल प्रोग्राम यात दिवस कसा सरायचा ते कळायचे देखील नाही.

एकवीस दिवसांचे ते ट्रेनिंग शरयूला आयुष्यात खूप काही शिकवून गेले.
आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली. आनंद,उत्साह सारं काही अगदी भरभरुन मिळाले. सारं काही मनासारखं झालं होतं शरयूच्या.

आयुष्यातील सर्व स्वप्न जवळपास पूर्ण झाल्यातच जमा होते. फक्त आता स्वतःसाठी तेवढे जगायचे बाकी होते. श्रीच्या साथीने राहिलेली सर्व स्वप्न आता पूर्ण करायची असे मनोमन ठरवले होते तिने.

उद्या ट्रेनिंगचा शेवटचा दिवस. फायनल पोस्टिंग कोणाला कुठे मिळणार हे जाहीर होणार होते.
एक एक करत पोस्ट वाटप आणि छोटासा सत्कार असा काही प्रोग्राम सुरु होता.

तिकडे श्रीचे मात्र कशातही मन लागेना. मनात कुठेतरी भीती होती त्याच्या की, शरयूला दूर कुठे जर पोस्टिंग मिळाली तर मग कसे करायचे??
तो मनोमन प्रार्थना करत होता देवाला.

"देवा, आतातरी ह्या सागर आणि किनाऱ्याला जन्मभरासाठी एक होवू दे. सागराला लागलेली किनाऱ्याची ओढ आतातरी थांबू दे देवा."

इकडे शरयूची देखील अशीच काहीशी अवस्था होती.
"न मागताही देवा तू इतकं काही दिलंस मला. आता फक्त श्री साठी मला मला माझ्या मनासारखी पोस्टिंग मिळू दे. बाकी मग कसलीही अपेक्षा नाही.
कुठलाही विरह नको आता दोघांच्याही नात्यात.

तेवढ्यात शरयूच्या नावाची घोषणा झाली.

"शरयू नानासाहेब दिवेकर"
न्यू असिस्टंट मॅनेजर

पोस्टिंग "अमरावती."

आता शरयूच्या तर पायाखालची जमीनच सरकली.

फायनली शरयूने आज खूप मोठी मजल होती. मोठमोठी आव्हाने मोठ्या हिमतीने तिने पेलली होती.
आणि या सर्वात भक्कम आधार बनुन श्री तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता.

आयुष्यातील अत्यंत अमूल्य असा काळ, लग्नानंतरचे ते गोड गुलाबी दिवस त्यातील आनंद, ओढ सारं काही दोघांनीही विचारपूर्वक आणि एकमताने बाजूला सारले होते.
आणि त्याचेच हे गोड फळ आज शरयूला मिळाले होते.

पण तरीही शरयूसाठी तर खूप मोठा धक्का होता हा. शेवटी ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झाले. मनासारखी पोस्टिंग तर मिळाली नाहीच आणि जी मिळाली ती इतकी दूर की स्वप्नातही विचार करू शकत नव्हती ती तिकडे जाण्याचा.
पोस्टिंग लेटर घेण्यासाठी ती उठली. पण तेही उसने अवसान आणून.

श्री साठी देखील हा खूप मोठा धक्का असणार आहे. हे जाणून होती ती. पण आता काहीही झाले तरी मी नाही ही पोस्ट स्वीकारणार. अगदी श्री ने कितीही फोर्स केला तरी.

माझ्यासाठी आता फक्त श्रीचा आनंद महत्त्वाचा आहे. माझी फॅमिली आता माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. खूप सपोर्ट केला आतापर्यंत मला सर्वांनी.
आता माझी वेळ आहे सर्वांसाठी काहीतरी करण्याची. आणि ही पोस्ट स्वीकारून मी ते नाही करु शकणार.

म्हणूनच आता नोकरी न करण्याचा माझा निर्णय अंतिम असेल. शरयू विचारांत इतकी गुंतली होती की आजूबाजूचे कसलेच भान राहिले नव्हते तिला.
सर्वांच्या चेहऱ्यावर फायनली ट्रेनिंग पूर्ण करुन यशाला गवसणी घातल्याचा आनंद, समाधान ओसंडून वाहत होते. पण शरयू मात्र तिच्या यशाचा आनंदही साजरा करण्याच्या मनस्थितीत नव्हती.

तेवढ्यात शरयूसोबतचेच एक सहकारी ट्रेनी तिच्यासोबत बोलण्यासाठी आले.
"अभिनंदन मॅडम."

"एक बोलायचे होते. बोलू का?"

"हो बोला की सर."

"मॅडम मी अमरावतीचा पण मला मुंबईला पोस्टिंग मिळाले आहे. आणि तुम्ही मुंबईच्या पण तुम्हाला अमरावती मिळाले.
आता साहजिकच आहे तुम्हाला मुंबई हवं असणार आणि मला अमरावती."

अजून त्यांचे बोलणे पूर्णही झाले नव्हते तरी शरयूचा चेहरा उजळला होता. त्यांच्या बोलण्याचा शरयूला बरोबर अंदाज आला होता.

"मॅडम तुमची काही हरकत नसेल तर आपण रिक्वेस्ट करू शकतो, पोस्ट एक्सचेंज करण्यासाठी."

"खरंच खूप आभारी आहे सर मी तुमची. पण खरंच आपल्याला पोस्ट एक्सचेंज करुन मिळेल??"

"का नाही मिळणार??"
"आता लगेचच जर प्रयत्न केले तर नक्कीच मिळेल."
"चला आपण बोलून तर पाहुयात."

दोघांनीही मग लगेचच जावून रिक्वेस्ट केली पोस्ट वाटप करणाऱ्या सरांना.

सुरुवातीला ते ऐकेनात.
"हे सगळं आधी ठरलेलं असतं. अशी अचानक पोस्ट एक्सचेंज नाही करता येणार.
आम्हीही नियमांत बांधलेलो आहोत. त्यामुळे आम्ही आता तरी काहीच करु शकत नाही. सध्या जॉईन व्हा. पुढे जावून बदली होणारच आहे.

आता तर शरयूला रडूच आवरेना.

दोघांनीही खूप रिक्वेस्ट केली. शेवटी एका लेडीजच्या भावना, तिचा आनंद तिच्या कुटुंबाभोवतीच फिरत असतो. याची जाणीव तेथील उपस्थितांना झाली.

शरयूच्या पाणावलेल्या नजरेत तिची तिच्या कुटुंबासाठी असलेली ओढ स्पष्ट दिसत होती.

शेवटी त्यांनी दोघांनाही पोस्ट एक्सचेंज करून मिळाली.

आता कुठे शरयूच्या जीवात जीव आला होता. आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता तिच्या. कधी एकदा श्रीला ही बातमी सांगते असे झाले होते तिला.

सगळा प्रोग्राम आटोपला. पहिला मग तिने श्रीला फोन लावला. आनंदाची बातमी त्याला सांगितली. त्यालाही खूप आनंद झाला.

सागर आणि किनारा आता आयुष्यभरासाठी एक होणार होते. श्रीने योग्य वेळी पाठिंबा दिला म्हणून आज हे शक्य झाले होते. त्याबरोबरच घरातील सर्वांचा पाठिंबाही खूप कामी आला.

दुसऱ्या दिवशी श्री निघाला मग शरयूला आणायला.
सागराची किनाऱ्याला असलेली ओढ त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.

भेटीची आस त्याच्या नजरेत दिसत होती. आजचा हा प्रवास संपता संपत नव्हता. पण जुन्या साऱ्या आठवणींत श्री रममान झाला.
बंद पापणीच्या पलिकडे शरयूचा दडलेला चेहरा आठवत आणि आता विरहाचे शेवटचे काही क्षण तो अनुभवत होता.

इतका मोठा केलेला त्याग आज खऱ्या अर्थाने कामी आला होता. दोन वर्षातील तो विरह त्यांच्या नात्याचा पाया आणखीच घट्ट करून गेला होता. .

त्या बरोबरच शरयूबद्दलचा घरच्यांचा अभिमान आता कैक पटीने वाढला होता.

फायनली श्री पोहोचला. इतका मोठा प्रवास झाला पण चेहऱ्यावर थकव्याची लकेर सुध्धा उमटली नव्हती. त्याचा किनारा जो त्याला खुणावत होता.

एक दिवसाचा मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी मुंबईचा रस्ता पकडला.

तिकडे सर्वच जण शरयूच्या स्वागतासाठी सज्जच होते. आप्पांनी गावावरुन नाना आणि सुनीता ताईंना बोलावून घेतले होते, माधवराव आणि अनुराधा ताई देखील हजर होत्या.

मग काय.. घरी येताच हे असे गोड गिफ्ट समोर पाहून शरयूच्या डोळ्यांत आसवांची दाटी झाली.
अनपेक्षित होते हे सारे तिच्यासाठी.

शरयू घरी आल्यावर मग दोनच दिवसांत आप्पांनी सुनेच्या यशाचे कौतुक म्हणून छोटेसे फंक्शन आयोजित केले.
मित्र मंडळी, नातेवाईक साऱ्यांनाच शरयूचे खूप कौतुक वाटत होते.
पुष्पगुच्छ देवून सर्वांनी तिचा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.

खऱ्या अर्थाने आज शरयूची मेहनत आणि तिला श्रीची असलेली साथ फळाला आली होती.
नाना आणि सूनिताताई लेकीचे तिच्या सासरी होत असलेले कौतुक पाहून अगदी धन्य झाले होते.

"पोरीने खरंच आपले नाव काढले" म्हणत सुनिता ताईंनी पदराने अलगद डोळे टिपले. नानांचाही उर अभिमानाने भरून आला.

दोन तीन दिवसांतच शरयू तिच्या कामावर रुजू झाली. एकीकडे संसाराची धुरा सांभाळत दुसरीकडे नोकरीचे आव्हान देखील ती मोठ्या हिमतीने पेलत होती.
मालती ताईंचीही सुनेला हवी तशी साथ मिळत होती.
दिवसामागून दिवस जात होते. आनंदाचे वारे मात्र साऱ्या घरभर वाहत होते.

प्रेमाच्या गावी आता सागर आणि किनारा रोजच भेटत होते.
लुटूपुटूची भांडणेही संसारातील गोडवा वाढवत होती. श्री आणि शरयू मधील नाते मात्र दिवसागणिक अधिकच घट्ट होत होते. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सारे काही नात्यातील ऊब आणखीच वाढवत होते.
एक समजदारीचे नाते दोघेही अगदी मनसोक्त जगत होते.

बघता बघता श्री आणि शरयूच्या लग्नाला तीन वर्षे होत आली. दोघांनीही आता आयुष्यात एक पाऊल आणखी पुढे जाण्याचा निर्णय पक्का केला.
लहान,गोंडस, निरागस रूप त्यांना साद घालू लागले. आई बाबा होण्याचा त्यांचा निर्णय अगदी योग्य वेळी आणि विचारपूर्वक दोघांनी एकमताने पक्का केला होता.

आनंदाची बातमी येताच घरातील वातावरणच बदलून गेले. सागर आणि किनारा यांच्या प्रेमाचे प्रतिक काही दिवसांतच त्यांच्या हाती विसावले. इवल्याशा पावलांनी घराचे अगदी गोकुळ झाले.

एक एक करत सारी स्वप्न आज सत्यात उतरली होती. पण त्याला सर्वांची तितकीच साथही होती.
योग्य वेळी घेतलेला प्रत्येक निर्णय हाच आजच्या या आनंदाची आणि सुखाची खरी पावती होता.

"सुख म्हणजे ते हेच का?"

अशावेळी असा प्रश्न पडणेही तितकेच स्वाभाविक होते.

खरंच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते..
"दृष्ट न लागो कुणाचीही सागर आणि किनाऱ्याच्या या प्रेमाला..
आनंदाने असाच फुलू दे,बहरू दे संसार त्यांचा प्रेमाचा.."

समाप्त..
*†*******†******†"*********†********†*********
सर्वप्रथम माझ्या प्रिय वाचक वर्गाचे मनापासून आभार. कथेच्या प्रत्येक भागाला मिळालेला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद लेखणीचा आनंद द्विगुणित करुन गेला.

या कथेतून साकारलेले श्री आणि शरयूचे पात्र वाचकांचे अगदी प्रिय होवून गेले.
श्री आणि शरयुची हळुवारपने फुलत जाणारी प्रेमकहाणी, नात्यातील बंध अधिकच घट्ट करत गेली.

कोणत्याही नात्याला जर पुरेसा वेळ दिला तर ते कसे फुलते, बहरते हे या कथेतून चित्रित केले आहे. त्याबरोबरच शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही कथा प्रत्येक नात्यातील समजूतदारपणामुळे अधिकच फुलत गेली.

मैत्रीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे नाना आणि माधवराव. आजच्या पिढीला आदर्श घालून देणारी ही दोन मित्रांची जोडी.

त्याबरोबरच एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय पूर्वग्रह मनात ठेवून नात्याची सुरुवात कधीही करू नये. हा लाखमोलाचा सल्ला या कथेतून देण्यात आला आहे.

बायकोची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारा नवरा तसेच क्षणिक सुखाला महत्त्व न देता तिचे करियर घडवण्यासाठीची त्याची धडपड जेव्हा फळाला येते तेव्हाचा आनंद खरंच अवर्णनीय.

कितीही मुलीने शिक्षण घेतले तरी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला पुढील करियर साठी दिलेली साथ खरी महत्त्वाची असते. त्यावरच तिचे भविष्य, तिची सारी स्वप्न अवलंबून असतात.

एकमेकांना समजून घेत नात्यांना जपले तर सुखाची ओंजळ कशी भरभरून वाहते याचे प्रत्यक्ष दर्शन या कथेतून घडवले आहे.

धन्यवाद...

©® कविता सुयोग वायकर
0

🎭 Series Post

View all