Login

संस्कृती रक्षक ? खरंच ??   भाग १

-

संस्कृती रक्षक ? खरंच ??   भाग १

जलद लेखन

©® आरती पाटील- घाडीगावकर


" नीलम पटकन दाराला कुलूप लाव. " मैत्री धापा टाकत रूम मध्ये येत दार धडकन बंद करत अभ्यास करणाऱ्या नीलम ला म्हणाली.

नीलम मैत्री ला बघून, तिचा अवतार बघून गोंधळली.
"काय झालं मैत्री ? एवढी का घाबरली आहेस ? "

" तू आधी दरवाजा ला कुलूप लाव नीलम प्लीज.. " मैत्री अगदी रडवेली होऊन पण रागात नीलमवर ओरडली.
नीलम ने पटकन दरवाज्याला कुलूप लावला आणि मैत्रि जवळ आली जी अगदी खाटेच्या खाली दोन्ही गुडघ्यामध्ये आपलं डोकं ठेवून रडत होती. नीलम ने तिला हात लावताच मैत्री जोरात दचकली.

( नीलम आणि मैत्री दोघी रूम मेट्स होत्या. दोघीही यू. पी. एस. सी. च्या अभ्यास आणि परीक्षेसाठी जिल्हा ठिकाणी हॉस्टेल वर राहत होत्या.)

नीलम ने तिला शांतपणे तिच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं, " काय झालं मैत्री ? एवढी का घाबरली आहेस ? मला सांगितल्या शिवाय कसं कळणार ? " नीलमचे ते मायेचे, काळजीचे आणि आश्वासक शब्द ऐकून मैत्रीचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली. नीलम ने तिला रडू दिल आणि ती शांत झाल्यावर तिला पुन्हा विचारलं,

नीलम," मैत्री आता तरी सांगशील का ? काय झालं ते ? "

मैत्रीने डोळे पुसले आणि बोलू लागली, " नीलम तू नव्हतीस तेव्हा या काळात म्हणजे अगदी आठवड्या भरात माझ्या सोबत खूप वाईट प्रकार घडत आहे. कळत नाही काय करू ? "

नीलम, " मैत्री मला कळेल असं नीट आणि स्पष्ट बोल. "

मैत्री, " त्या दिवशी तूला बस स्टॉप वर सोडलं आणि मी परत हॉस्टेल वर यायला निघाले तर, थोड्या अंतरावरच पाच -सहा जण समोर आले आणि माझ्यावर चिडून बोलू लागले की, ' तुझ्यासारख्या मुलीं मुळेच भारतीय संस्कृती बदनाम झाली आहे. आई - वडील वाऱ्यावर सोडल्या सारखे वागतात. त्यामुळे या मुली बेताल वागतात. यांच्या सारख्यामुळे बाकीच्या मुली बिघडतात. '

नीलम, " असं काय केलं होतस तू ? " नीलम ने आश्चर्य चकित होऊन विचारलं.

मैत्री, " तेच मला सुद्धा कळत नव्हतं. की मी नक्की असं काय केलंय त्यामुळे हे लोग असं बोलत आहेत. त्यामुळे भीत भीतच मी त्यांना विचारलं तर मला म्हणाले, " वर तोंड करून आम्हालाच विचार निर्लज्ज मुलगी. असे कपडे घालून सर्व ठिकाणी फिरतेस वर काहीच केलं नाहीस असा आव आणतेयस. '
नीलम त्यांनी अक्षरशः मला धमकी दिली,' परत या पेहराव्यात दिसलीस तर परिणाम वाईट होतील. '
नीलम मी खूप घाबरले गं.

नीलम, " अगं पण तू मला सोडायला आलीस तेव्हा जीन्स आणि लॉन्ग कुर्ता घातला होतास ना ? आणि असं पण तू नेहमी तसेच कपडे वापरतेस. मग त्यात धमकी देण्यासारखं काय आहे ? शिवाय त्यांना अधिकार कोणी दिला की तू काय घालावंसं हे त्यांनी ठरवण्याचा ? " नीलम ला आता राग येऊ लागला होता.

मैत्री, " तेच तर, त्यामुळे मी जास्त मनावर नाही घेतलं. तर दोन दिवसांपूर्वी मार्केट मधून येताना पुन्हा त्यांनी अडवलं आणि या वेळी ते आक्रमक होते. म्हणत होते, " तू एकदा सांगितलेलं कळत नाही का? की संस्कृती भ्रष्ट करायची असं ठरवूनच ठेवलं आहे.
मैत्री, " अहो पण हे तुम्ही ठरवणारे कोण ? मला असा त्रास नाही देऊ शकत तुम्ही. "
गुंड, " ठरवणार ते आम्हीच ठरवणार. आता तुझ्यासारख्या मुलीवर ताबा ठेवला नाही तर संस्कृती चे धिंडवडे काढाल तुम्ही. " असं म्हणतं त्याने मला ढकलून दिलं आणि धमकी दिली ' परत एकदा आणि शेवट चं सांगतोय, पुन्हा अश्या वेषात दिसलीस तर चौकात पेटवून देऊ कळलं का ? म्हणजे तुझी अवस्था बघून तुझ्यासारखं वागताना मुली दहा वेळा विचार करतील.

नीलम मैत्री च्या डोक्यावर हात फिरवत तिला धीर देत होती.
मैत्री, " नीलम माझे आई - वडील साधे शेतकरी आहेत गं. अगदी अर्धा एकर जमीन आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या शेतावर जातात. माझं स्वप्न पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी मला पोटाला चिमटा काढून आणि गावातल्या लोकांची बोलणी ऐकून सुद्धा इथे शिकायला पाठवलं. प्रॉपर पंजाबी ड्रेस किंवा साडी नेसून मी नाही राहू शकत. पंजाबी ड्रेस अगदी साधा घ्यायचा म्हटल तरी चारशे चा पीस आणि शिलाई तीनशे, चारशे असते म्हणजे नाही म्हटलं तरी आठशे ला एक ड्रेस. किमान चार ड्रेस हवेत. म्हणजे तीन हजार दोनशे. साडीचे तर बोलूच नकोस. त्या पेक्षा मी रस्त्यावर तीनशे ला एक अश्या दोन जिन्स आणि दोनशे ला चार कुर्ते घेतले. म्हणजे फक्त चौदाशे मध्ये माझं काम झालं शिवाय जिन्स काही वर्षे नक्कीच वापरता येते. कुर्ता जरी मध्ये घ्यायला म्हटलं तरी दोनशे रुपये मॅनेज होतात. आणि जर ड्रेस जरा जरी खराब झाला तर आठशे रुपयांचा फटका. स्वतःचा खर्च स्वतः उचलता यावा म्हणून मी वाचनालयात नोकरीं धरली का तर चार पैसे मिळतील आणि अभ्यास सुद्धा करता येईल. माझंच कसं बसं सुरु आहे आणि त्यात हे नवीन. "

नीलम, " शांत हो मैत्री, आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात. "

मैत्री, " काय मार्ग काढायचा ? अगं आज अक्षरशः ते लोक रॉकेल चा कॅन घेऊन माझ्या मागे लागले होते. अगदी गर्दीच्या ठिकाणी असून पण कोणी मदतीला आलं नाही. काय करू काही सुचत नाहीये. " असं बोलून मैत्री पुन्हा रडू लागली.

नीलम ला आता मैत्री चा राग आला आणि ती बोलू लागली, " काय करायचं ते सुचत नाहीये म्हणजे ? अगं अधिकारी होण्याची स्वप्न बघतेस ना ? मग एवढ्याश्या संकटाने कोलमडलीस ? तू जर स्वतः साठी काही करू शकत नसशील तर अधिकारी झाल्यावर दुसऱ्यांसाठी काय करणार ?  जरा धीट हो. चल माझ्या सोबत आपण पोलीस चौकीत जाऊन तक्रार नोंदवूयात. "

मैत्री घाबरून म्हणाली, " नको नको, त्याने अजून चिडून त्यांनी काही केलं तर ? हे बघ माझ्या कपड्यावर रॉकेल चे शिंतोडे अजून आहेत. " मैत्री कपडे दाखवत म्हणाली.

मैत्रीच्या अश्या बोलण्याचा नीलम ला प्रचंड राग आला आणि ती मैत्रीवर बरसली, " तूला कळतंय का तू काय बोलतेयस ? अगं यू. पी. एस.सी चा अभ्यास करतोय आपण. उद्या अधिकारी पदावर असू. तू आतापासून अश्या लोकांना घाबरलीस तर दुसऱ्यांना अभय कसं देणार आहेस ? तुझ्यात हिंमतच नसेल तर का करतेयस एवढी मेहनत ? जा परत गावी. तिथे तू सुरक्षित राहशील. इथे पावलो पावली अशी माणसे भेटतील. तू जर स्वतः साठी उभी राहू शकत नसशील तर समाजासाठी तूला काय काम करायला जमणार आहे ? जा बाई तू परत तुझ्या गावी. किमान तुझ्या जागी धाडसी व्यक्ती नियुत होईल तर समाजाची मदत होईल. "

नीलमचं बोलणं ऐकून मैत्रीला अजून रडू येत होतं. एका मागोमाग संकट येत असताना नीलम चं वागणं आणि बोलणं यामुळे मैत्रीला वाईट वाटत होतं.

मैत्रीला अजूनही तसंच बसलेलं पाहून नीलम उठली आणि आपल्या स्टडी टेबल वर पुन्हा येऊन बसली. पुस्तकाची पाने उलटत असताना नीलम म्हणाली, " तू अशीच वागणार अशील तर मी तुझी काहीच मदत करू शकत नाही. स्वतःसाठी पाऊल स्वतःच उचलावं लागत आणि स्वतः प्रयत्न करणाऱ्यालाच देव साथ देतो. "