Login

संस्कृती रक्षक ? खरंच ??    भाग २

-

संस्कृती रक्षक ? खरंच ??    भाग २

जलद लेखन

©® आरती पाटील - घाडीगावकर

नीलमचं बोलणं मैत्रीच्या जिव्हारी लागलं पण ती विचार करू लागली. ' नीलम बरोबरच तर बोलतेय. जर मी स्वतःसाठीच उभी राहू शकत नसेल तर इतरां साठी पुढे काय करणार ? नाही नाही, मी पळपुटी नाही. नक्कीच नाही. माझा लढा सुरु झालाय. आज जर यावर मात करू शकले तर पुढे अधिकारी कालखंडात काहीतरी करू शकेन नाही तर काहीच नाही. ' मैत्री स्वतःशीच एक निर्णय घेते.

डोळे पुसत ती जागेवरून उठते आणि नीलमला म्हणते, " नीलम मी तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनला जातेय. तू येणार आहेस का सोबत ? "

मैत्रीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून नीलमला बरं वाटत. ती म्हणते, " नक्कीच, तू जर लढायला तयार असशील तर शेवटपर्यंत सोबत करेन तूला. चल निघूयात. " असं म्हणत नीलम ने पुस्तक बंद केलं आणि दोघी निघाल्या पोलीस स्टेशनला.


पोलीस स्टेशन....

मैत्री आणि नीलम आत येत समोर बसलेल्या हवालदार ला सांगतात की त्यांना तक्रार नोंदवायची आहे. हवालदार काय झालं ? कधी झालं ? मग आधी यायचं होतं, तेव्हा का नाही लागत ? असे प्रश्न विचारून भांडवून सोडतो.

मैत्री ठामपणे म्हणते, " मला वाटलं नव्हतं, ते खरंच माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतील. आणि छोटया कारणांसाठी मला तुम्हांला त्रास द्यायचा नव्हता. पण आज चक्क त्यांनी माझ्यावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. रॉकेलचा वास अजूनही माझ्या अंगाला येत आहे बघा. "

हवालदार, " ठीक आहे, त्यांची नावे तुम्हांला माहित आहेत का ? नावे सांगा. "

मैत्री, " नाही, मला नाही माहित नावे. चौकात घेरतात मला. वर्णन करू शकते किंवा हवा असल्यास सोबत येते आणि दाखवते कोण कोण आहेत ते. "

हवालदार आत सुजित पवार साहेबांकडे जातो.

हवालदार, " साहेब, बाहेर २ मुली आल्या आहेत. ओंकार आणि त्यांच्या मित्रांविरोधात तक्रार करायला. काय करू ? "

सुजित साहेब, " त्यांनी ओंकार च नाव घेतलं ? "

हवालदार, " नाही, पण त्यांच्या सांगण्यावरून तो ओंकार आणि त्याचे मित्रच आहेत हे नक्की. "

सुजित साहेब, " ओंकार आणि त्याच्या मित्रांना सरळ तर मला पण करायचं आहे. पण.....
ठीक आहे जा त्या मुलींसोबत आणि अटक करून आणा त्यांना. आणि हो या मुलींवर कडक लक्ष ठेवा. गरजेचं आहे ते. "

हवालदार आपल्या सोबत अजून 2 हवालदार घेऊन त्या दोघींसह चौकात जातात. मैत्री त्यांना लांबून त्यांना दाखवते आणि हवालदार त्यांना पकडून पोलीस स्टेशनला आणतात. नीलम आणि मैत्री रीतसर तक्रार नोंदवून हॉस्टेल वर परत येतात.

मैत्री नीलमच्या गळ्यात पडत म्हणते, " थँक यू सो मच नीलम. मी उगाच पळपुटे पणा करत होते. तूझ्या मुळे माझा आत्मविश्वास मला परत मिळाला खरंच मनापासून धन्यवाद. "
नीलम, " आता तू टेन्शन फ्री होऊन काम आणि अभ्यास दोन्ही करू शकतेस.चल आता अभ्यासावर फोकस कर. "

मैत्री हातात पुस्तक उचलत म्हणते, " येस. "

मैत्री आणि नीलम पुन्हा अभ्यासाला लागतात.

दोन दिवसांनी.... सकाळ ची वेळ....

मैत्री, " नीलम संध्याकाळी ५ वाजता चौकात येशील का ? "
नीलम भुवया वर करत निशाऱ्यांनी काय? असं विचारते.

मैत्री, " अगदी सहज गं. खूप दिवस झाले आणि पाणीपुरी नाही खाल्ली ना म्हणून. ये ना. मी वाचनालयातून सरळ चौकात भेटते तूला. "

नीलम पुन्हा अभ्यासात गर्क होतं म्हणते," डन. "

संध्याकाळी ५ वाजता...

संध्याकाळी मैत्री गणिताची काही ट्रिक्स डोक्यात घोळत घोळत चौकात निघाली होती. चौकात का अंतरावर असलेल्या पाणीपुरी च्या गाड्यावर जात असताना कोणीतरी तिला पटकन मागे ओढत आणि त्याच बरोबर एक कोयता तिच्या समोरून खाली जातो. म्हणजे जर मैत्री ला मागे ओढल गेलं नसतं तर..?

मैत्रीने पाहिलं तर तो कोयता चालवणारा ओमकारच होता आणि तिला मागे ओढणारी तिची जिवलग मैत्रीण नीलम. आपला वार खाली गेल्याच पाहून ओंकार अजूनच चवताळ ला होता.

ओंकार, " तूला मी नीट सांगितलं होतं. आमची संस्कृती खराब करायची नाही. तर तू मलाच पोलीस स्टेशनला पाठवलंस ? एक लक्षात ठेवायचं, आम्ही संस्कृती चे रक्षक आहोत. आमच्यावर वरद हस्त असणारच. तूला काय वाटलं, तू मला आत करशील आणि तू संस्कृतीची वाट लावत फिरशील ? इथे एकतरी मुलगी दिसतेय का जिन्स वर ? कारण इथे संस्कृती मी जपतो. तुझ्यासारख्या खूप आल्या आणि गेल्या. याच चौकात दोघीना मी जिवंत जळालं आहे. साल्या छी.... आमच्या संस्कृतीची वाट लावत होत्या. एवढा मोठा चौक आहे पण कोणी बोलायची हिंमत केली नाही. तुझं चालू देईन का मी ? आता तर तूला जिवंत सोडणारच नाही. " असं म्हणतं त्याने पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला तर नीलम आणि मैत्रीने त्याला मागे ढकलून दिलं.

ओंकार ला धकलल्याबरोबर ओंकार सोबत असेलेले त्याचे मित्र पुढे सरसवले. नीलम, मैत्री आणि ओंकार आणि त्याच्या मित्रांमध्ये होतं असलेल्या झटपटीत नीलम आणि मैत्री जखमी होतात. तेवढ्यात पोलिसांची व्हॅन येताना दिसते आणि ते पाहून ओंकार आणि त्याचे मित्र तिथून निसटतात.

पोलीस त्या दोघीना सरकारी हॉस्पिटल मध्ये नेतात आणि त्यांचा जबाब घेतात.आधी घाबरलेली मैत्री यावेळी मात्र खूप खंबीर असते. तिच्या डोक्यात ओमकारचे शब्द घुमत असतात. "याच चौकात दोघीना मी जिवंत जळालं आहे. साल्या छी.... आमच्या संस्कृतीची वाट लावत होत्या. एवढा मोठा चौक आहे पण कोणी बोलायची हिंमत केली नाही."
म्हणजे या आधी सुद्धा या घाणेरड्या विचार सरणीने दोघींचा जीव घेतला आहे ?

नीलम मैत्री कडे बघत विचारते, " काय झालं मैत्री घाबरलीस का ? "

मैत्री दृढपणे म्हणते, " नाही, अजिबात नाही. उलट तुझे धन्यवाद नीलम. तुझ्यामुळे मी चुकीच्या मानसिकतेच्या विरोधात उभी राहू शकले. तूच वेळेवर येऊन माझे प्राण वाचवलेस.  बरोबर होतीस तू, जर मी माझ्यावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवू शकत नसेन, आणि लढू शकत नसेन तर काय उपयोग आहे अधिकारी होऊन.
आधीच दोन जणींचा जीव गेला आहे. आता मी माघार घेतली तर अजून किती जणींचा जीव जाईल सांगता येत नाही. त्यामुळे आता काहीही झालं तरी माघार नाही. जे होईल ते होईल. "

मैत्री बोलत असतानाच इन्स्पेक्टर सुजित आत येतात. त्यांना पाहून मैत्री आणि नीलम ला राग येतो.

नीलम, " सर, एक विचारू ?"

इन्स्पेक्टर सुजित, " हम्म, विचार.? "

नीलम, " तुम्हांला खरंच नागरिकांची काळजी नाहीये का ? एवढं सर्व त्या दिवशी सांगितलं, रीतसर तक्रार नोंदवली. तरी तो आज मोकाट फिरतोय. "

मैत्री, " तो निर्जला सारखा भर चौकात म्हणाला, त्यांनी या आधी सुद्धा दोन जणींना भर चौकात जळालं आहे. जी गोष्ट भर चौकात घडली, ती तुम्हांला माहित नाही का ? आज आमच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला झाला. कायदा- सुव्यवस्था याची जबाबदारी नक्की कोणाची आहे ?"

नीलम, " की तुम्ही सुद्धा त्यांच्यात सामील आहात. कारण पोलीस त्यांची ड्युटी नीट करत नसतील तरच हे शक्य आहे. "

इन्स्पेक्टर सुजित नीलमकडे रागाने पाहतात. पण मैत्री आणि नीलमला त्याची परवा नव्हती.

इन्स्पेक्टर सुजित हवालदार ला आवाज देऊन सांगतात. " यांची मलमपटी झाली की यांना पोलीस स्टेशनला घेऊन या. " एवढं बोलत इन्स्पेक्टर सुजित ताडताड पाऊल टाकत निघून जातात.