Login

सासूचा वारसा भाग २

बायकोने कान भरले वाटतं
गेल्या भागात आपण पाहिले की, अमोल घरी आला पाहतो तर त्याची आई शांता तोंड पाडून बसली होती.
आता पाहू पुढे.

तो लगबगीने रुममध्ये गेला. मेघाही तिथेच होती. त्याला वाटलं आई मेघावर रागावली आहे की काय?


"मेघा, आज काही झालं का? आई तोंड पाडून बसली आहे." ऑफिसची बॅग ठेवत तो म्हणाला.

ती काही बोलणार तीतक्यात कोणीतरी दार वाजवलं.

त्याचा भाऊ महेश होता.

"दादा, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे."

"बोल."

"दादा, माझं एका मुलीवर प्रेम आहे. मधुरा नाव आहे तिचं. माझ्या ऑफिसमध्येच काम करते. मला तिच्याशी लग्न करायचे आहे."


"तू आईशी बोलला?"

"हो, मी बोललो आईशी. म्हणूनच तर ती तोंड पाडून बसली आहे. म्हणतेय आधीच तुझ्या मोठ्या भावाने मनाने लग्न करून अशी..."

त्याने स्वतःच्या बोलण्यावर आवर घातला.

त्याला काय बोलायचं हे मेघा समजून गेली.

"सॉरी वहिनी." महेश.

"ठीक आहे भाऊजी." मेघा आवंढा गिळत म्हणाली.

अमोलला राग आला. अजूनही आई मेघाविषयी अशी बोलत होती; पण आता महेशला मधुरा आवडते आणि त्याला लग्न करायचे आहे ही सांगायची जबाबदारी त्याची होती. त्याने रागावर नियंत्रण केलं. आता राग राग केला तर आई तयार होणार नाही. अमोल, महेशचा स्वभाव जाणून होता. त्याच्या मनासारखं झालं नाही तर त्याला राग यायचा. घरातला लहान मुलगा म्हणून त्याचे सर्व हट्ट,लाड पुरवले होते. महेश रोखठोक निर्णय घेणाऱ्यामधला होता. घरातील मोठा मुलगा म्हणून अमोलने आईचं मन वळवायचे ठरवले.


तो शांताच्या रुममध्ये गेला.


"आई, काय झालं?"

"काय होणार? महेशने देखील तुझ्या पाऊलावर पाऊल ठेवलं. मनानेच मुलगी पसंत केली आणि आता लग्न करायचे म्हणतोय."

"मग आई त्यात काय वाईट आहे? त्याला मुलगी आवडली आहे. मुलीला तो आवडला आहे. दोघेही चांगला संसार करतील आणि आई तुला त्याचा स्वभाव कसा आहे हे चांगलं माहीत आहे. त्याने एकदा ठरवलं तर तो तेच करतो आणि आपण जर त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावलं तर तो सुखी राहील का? तो नीट संसार करेल का ह्याची शक्यता फार कमी आहे."


अमोल बरोबर बोलत होता. महेश तसाच होता. त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या मनासारख्या हव्या होत्या. शांतालाही ते पटलं. तिने लग्नाला संमती दिली.


महेश खूप खुश झाला. मधुरा त्याचं पाहिलं प्रेम, तिच्याशी थाटामाटात लग्न झालं.

मधुरा माप ओलांडून आली.

मधुराचं वागणं हे मेघाच्या विरुद्ध होतं.

मधुरा पटकन बोलून मोकळी होणारी आणि मेघा अबोल.

नव्याचे नऊ दिवस संपले आणि तिच्या संसाराला सुरवात झाली.

जे नियम मेघासाठी होते तेच नियम मधुरासाठी.

हळूहळू मधुराच्या लक्षात येऊ लागलं की, शांता किंमत देत नाही.

एक दिवस मधुराने मेथीची भाजी केली होती.

सगळेच जेवायला बसले होते.

"आज स्वयंपाक मधुराने केला आहे." मेघा कौतुकाने म्हणाली.

सर्वांना पानं वाढली.

शांताने घास तोंडात घातला तसं ती म्हणाली,
"मेथीची भाजी आमच्या इथे अशी करत नाही. खूपच बेचव लागतेय."

"आई, चांगली तर झाली आहे भाजी. काय वाईट आहे?" महेश पटकन म्हणाला.

मधुराची बाजू घेतली हे तिला पटलं नाही.

मेघा आणि अमोल हे सर्व शांतपणे ऐकत होते.
शांताने अर्धी पोळी कशीबशी खाल्ली.

महेशवर खुप राग आला होता.

"महेश, काय हे आईचं असं वागणं? मला नाही पटलं. बरं त्यांना नाही आवडली भाजी तर नीट सांगू शकत होत्या. सर्वांसमोर माझा अपमान केला." ती नाराजीच्या सुरात म्हणाली.

"मधू, म्हणून तर मी आईशी बोललो ना?"


"हम्म. बरं आणि आपल्या घरी फरशीला आणि भांड्याला बाई लावली तर कामं हलकी होतील. त्या दिवशी मी आईंना म्हणाले तर म्हणतात की ,अजिबात बाई लावायची नाही. तू बोल आईंशी. दिवसभर कामं, ट्रेवलिंग करून दमायला होतं रे. तुला तर माहीत आहे प्रवासातच तीन तास सहज जातात आणि पुन्हा घरी येऊन सगळं करायला जड जातं."

"बरं मी आईशी बोलतो."

सकाळी उठल्यावर तो आईशी बोलायला गेला.
तितक्यात अमोल आला आणि त्याला म्हणाला,
"अभिनंदन महेश तू काका होणार आहेस."
अमोल खूप खुश होता.

महेशही भावासाठी खुश झाला.

मेघा तिथेच होती.

"अभिनंदन वहिनी."

मधुराही आली.
तिलाही बातमी कळली. तिने देखील दोघांना शुभेच्छा दिल्या.

शांताचा मूड देखील छान होता.

मधुराने डोळ्यानेच महेशला ईशारा केला.

हीच चांगली संधी होती.

"आई, आता वहिनी प्रेग्नेंन्ट आहे तर त्यांना अश्या अवस्थेत जास्त दगदग नको. मी असा विचार करत होतो भांडी आणि लादीसाठी बाई लावावी." एका दमात बोलून मोकळा झाला.

"हे बघ मी देखील गरोदर होते, तुमच्या दोघांच्या वेळेस भरपूर कामं केली. नॉर्मल डिलिव्हरी झाली. काही होत नाही."
तिच्या आवाजाचा स्वर वाढला.

आई ऐकत नाही म्हंटल्यावर त्याला राग आला.

"आई, हे बघ ह्या घरात आता एक मदतनीस पाहिजे. वहिनी आणि मधुराच्या कामाचा ताण हलका झाला पाहिजे."

"आता माझ्या लक्षात आलं, तुझे कान कोण भरत आहे." ती रागानेच मधुराकडे पाहू लागली.

आई तिच्याकडे रागात बघायची गरज नाही. तिने माझे कान भारायला मी लहान नाही. योग्य काय नि अयोग्य काय ह्यातील अंतर कळतं.

क्रमशः
अश्विनी ओगले.
पुढचा आणि शेवटचा भाग जरूर वाचा.