सवत- एक सामाजिक व्यथा -भाग 1
आजुबाजुच्या समाजात पाहिलं , तर असं वाटतं की ,आज समाजात पुरुषांच्या इतकाच समान दर्जा स्त्रीला मिळत आहे, पण असं खूप कमी ठिकाणी पहायला मिळेल.दुस-र्याना सल्ला देणे आणि प्रत्यक्षात स्वतः वर वेळ आल्यावर तीच व्यक्ती विचित्र वागते , म्हणतात ना दुस-र्या सांगे ब्रह्म ज्ञान स्वतः कोरडे पाषाण.
रमेश आणि नेहाच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मूल नाही झाले. डॉक्टरांकडे सर्व प्रकारचे उपचार करून झाले तरी अजूनही तिला दिवस गेले नव्हते. एक दिवस तिच्या ओटीपोटात अचानक खूप दुखू लागले,डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या. आज त्या टेस्टचे रिपोर्ट येणार म्हणून दोघेही हॉस्पिटल मधे आलेले ,दोघेही थोडे टेन्शन मधेच होते ,पण एकमेकांना दाखवत नव्हते.शेवटी एकदाचा त्यांचा नंबर आला ,दोघेही आत गेले.
डॉक्टर म्हणाले “ या बसा ,रिपोर्ट आले आहेत,मी मागवतो “ , एवढं बोलून डॉक्टरांनी फोन करून रिपोर्ट मागवले.रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या चेहरा बदलत होता.गांभीर्याने डॉक्टरांनी दोघांकडे बघीतलं आणि मग बोलायला सुरुवात केली. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, नेहाला गर्भाशयाचा कँसर झाला आहे आणि यावर एकच पर्याय आहे की तिचे गर्भाशय काढावे लागेल असे सांगितले. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली,काय बोलावे ते सुचेना.डॉक्टर त्यांना म्हणाले ,तुम्ही घरी जाऊन विचार करा आणि मग परत भेटायला या.
तिथून निघाल्यावर दोघेही गाडीत बसले ,पण कुणीही कुणाशीच काही बोलत नव्हते. रमेशने गाडी सुरू केली,आणि रेडिओ लावला तर त्यावर गाणे लागले होते,वक्त ने किया क्या हसीं सितम तुम रहे ना तुम हम रहे ना हम. दोघांच्या मनात विचारांचे खूप मोठे वादळ थैमान घालत होतं. यात घर कधी आलं ते कळलचं नाही,
गाडी घरापाशी आली तेव्हा रमेश नेहाला म्हणाला, तू चल घरात मी गाडी पार्क करुन येतो, तेव्हा ती तिच्या तंद्रीतून बाहेर आली आणि म्हणाली ,”अं, काय म्हणालास तू “. रमेश म्हणाला,”अगं,घर आलय “. नेहा तंद्रीतून बाहेर येत म्हणाली,”हो ,उतरते “ आणि गाडीतून उतरुन घरात गेली. रमेशही गाडी पार्क करून घरात आला.वातावरण हलकं करण्यासाठी, तो नेहाला म्हणाला,”छान चहा ठेव,मी आलोच हातपाय धुऊन “, आणि तो बेडरूममधे फ्रेश होण्यासाठी गेला.
फ्रेश होऊन आल्यावर पहातो तर काय,नेहा किचन मध्ये असते, तो जाऊन पहातो तर चहा ऊतू जात असतो,तो पटकन गॅस स्टोव्ह बंद करत म्हणाला,”अगं नेहा,लक्ष कुठे आहे तुझं ” .ती विषय टाळत म्हणाली ,”अरे कुठे काय ,मी आले चहा घेऊन चल”. रमेश बाहेर जाऊन बसला,त्याच्या पाठोपाठ नेहाही आली चहा घेऊन,तिने चहा त्याला दिला आणि स्वत:साठी पण घेतला आणि कप हातात धरून परत विचार करत होती.
रमेशने तिच्या हाताला गरम कप लावला,तशी ती त्याच्यावर रागवली,रमेश तिला म्हणाला ही आहे माझी नेहा. तो नेहाला म्हणाला,”मला माहित आहे,डॉक्टर जे बोलले त्याचा तू विचार करत आहेस,अगं आपण दुस-या एखाद्या डॉक्टरकडे जाऊ ,तू टेन्शन घेऊ नकोस,काही तरी मार्ग निघेल,मी घरात येतानाच विचार केलेला,की आपण अजून एका डॉक्टरचा सल्ला घेऊ.” तशी ती त्याच्या जवळ जाऊन त्याच्या छाती वर डोकं ठेऊन म्हणते,”होईल ना रे सगळं व्यवस्थित “. तो नेहाला म्हणतो,”हो गं सगळं ठीक होईल “.
रमेश तिला तसं म्हणतो पण त्यालाही टेन्शन आलेलेचं असतं,पण तो मनात ठरवतो,की अजून एका डॉक्टरचा सल्ला घेऊ मग बघू पुढचं पुढे.
काय होईल त्यांच्या आयुष्यात बघू पुढील भागात....
(ही कथा सत्यकथेवर आधारीत आहे,पात्रांची नावे बदलण्यात आली आहे )
रुपाली थोरात