सावल्यांच्या कुशीत. भाग - १३
"आजोबा, काय झालं? तुम्ही एवढं शांत का झालात?" आजोबा काहीच बोलत नाही हे बघून नीरवने विचारलं.
"नीरव, वाड्यात जे काही घडून गेलयं त्याला खूप वर्ष झाली आहे. मग आताच तुम्हाला असे भास कसे व्हायला लागले. तुझ्या आई बाबांना तर कधीच काही जाणवलं नाही." आजोबांनी थोडं गंभीर होत विचारलं.
"ते मलाही नाही माहीत, माझा जन्म झाल्यापासून आतापर्यंत कधीच असं काही जाणवलं नाही, पण लग्न झाल्यानंतरच या गोष्टी घडायला लागल्या आहेत म्हणून तर मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का ते विचारायला आलोय, तेव्हा कृपया तुम्हाला जे माहिती असेल ते मला सांगा." नीरव म्हणाला तसं आजोबा पुढे बोलू लागले,
"तुमच्या त्या वाड्यात तुझ्या पणजोबांची धाकटी बहीण राहत होती, सरस्वती. ती खुप सुंदर आणि मनमिळावू स्वभावाची होती. पण अचानक एके दिवशी ती हरवली. कुणालाही काहीच समजलं नाही. पण कुणीतरी तिच्यावर जादूटोणा केल्याचं बोललं जात होतं. वाड्याच्या मागच्या खोल्यांमध्ये काहीतरी असल्याची शंका गावकऱ्यांना होती... मग तेव्हापासून कुणी त्या विषयावर काहीच बोलले नाही." आजोबांनी नीरवला माहिती दिली.
आजोबांच्या बोलण्याने नीरव सुन्न झाला होता. त्याच्या डोळ्यांसमोर वाड्याच्या मागच्या अंधाऱ्या खोल्या, त्या दिवशीचा वेदिकाचा भास, आणि वाड्यात त्याला ऐकू आलेल्या आवाजाची आठवण एकत्रच डोळ्यासमोर उभी राहिली.
"म्हणजे त्या खोल्यांमध्ये खरंच काही आहे का?" नीरवने संकोचून विचारलं.
आजोबा थोडा वेळ शांत राहिले आणि मग हळूच म्हणाले, "असं म्हणतात की, सरस्वतीची छाया अजूनही त्या खोल्यांत आहे. काहीजण म्हणतात तिने परत यायचं वचन दिलं होतं… पण ती कधीच परतली नाही." आजोबांनी सांगितलं तसं नीरवच्या अंगावर शहारा गेला.
"पण मग ती मला का हाक मारत असेल?" नीरवने गोंधळून विचारलं.
आजोबांनी नीरवकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, "जर ती तुला हाक मारतेय… तर कदाचित तिचं काहीतरी अपूर्ण राहिलंय. एखादं रहस्य… एखादं दुःख… जे ती अजूनही व्यक्त करू शकलेली नाही. किंवा कदाचित… तिला वाटत असेल की तो तूच आहेस… जो तिचं सत्य जगासमोर आणू शकतो." आजोबा म्हणाले तेव्हा नीरव परत गोंधळलेल्या नजरेनं आजोबांकडे पाहू लागला.
"म्हणजे ती मला काहीतरी सांगू पाहतेय, असं म्हणायचं आहे का तुम्हाला?" नीरव
"कदाचित, असंही असेल कदाचित अजून वेगळं सुद्धा काही असेल, कारण तिच्यासोबत नेमकं काय झालं हे नक्की कुणालाच माहीत नाही. सगळं काही फक्त सांगावांगीच आहे त्यामुळे त्या खोलीत गेल्याशिवाय नेमकं काय आहे ते कळणार नाही. पण लक्षात ठेव… अशा आत्म्यांना शांती मिळवून देणं सोपं नसतं. तू जर त्या खोल्यांमध्ये गेला तर तुझ्या जीवावर बेतू शकतं, तिथं फक्त डोळ्यांनी नाही, तर मनानं सुद्धा बघावं लागेल. बाकी तुला जे काही करायचं आहे ते विचारपुर्वक कर." आजोबा.
"पण त्यातली एक खोली बाबांनी तर मागच्या वर्षी उघडली होती, मी स्वतः पाहिलं होतं त्यांना आत जाताना सुद्धा आणि बाहेर येताना सुद्धा, तेव्हा ते अगदी सुखरूप बाहेर पडले होते." नीरव.
"ते गेले असतील. पण त्यांनी तिथं खूप वेळ घालवला नसेल, किंवा ते फक्त एका खोलीपर्यंत गेले असतील. पण त्या मागच्या खोलीत जिथं सरस्वती शेवटचं दिसली होती तिथं अजूनही कोणी गेलं नाही. कारण ती खोली बंदच ठेवलेली आहे." आजोबांच्या बोलण्यावर नीरव काही क्षण गप्प राहिला. त्याला वाटलं की त्याच्या मनातलं कुतूहल आता धोक्याच्या पातळीवर पोहोचत होतं. पण त्या आवाजाचं सतत ऐकू येणं, त्याचं स्वप्नात सारखं काहीतरी सांगणं, हे दुर्लक्ष करणं त्याला अशक्य वाटत होतं.
नीरव विचारात पडला. आता त्याला त्या खोलीचा शोध घ्यायचा होता. वेदिकाचे वागणे, तिच्या डोळ्यांतली भीती, आणि हे जुने रहस्य सगळं काही एकमेकांशी जोडलेलं वाटत होतं.
"आजोबा, मला त्या खोल्यांबद्दल अजून माहिती पाहिजे. काही जुने फोटो, दस्तऐवज, किंवा असं काहीतरी... जे मला मदत करू शकेल." नीरव.
"आता या गोष्टीला बरेच दिवस झालेत नीरव, त्यामुळे माझ्याकडे काय तुला कोणाकडेच काही मिळणार नाही. पण हा... माझ्याकडे त्या खोल्यांच्या चाव्या तेवढ्या आहेत. त्या फार पुर्वी तुझ्या आजोबांनी मला दिल्या होत्या. त्याच्या दुसऱ्या चाव्या तुमच्या घरी पण आहे. त्या तुझ्या बाबांकडे आहे. तुला त्या हव्या असतील तर मी देतो तुला." आजोबा म्हणाले तेव्हा नीरव हो म्हणाला मग आजोबांनी आत जाऊन त्या चाव्या आणल्या आणि त्याला दिल्या. नीरव त्या चाव्या घेऊन जाऊ लागला तोच आजीने त्याला आवाज दिला.
"नीरव, तुला जर त्या वाड्यामागच्या खोल्या उघडायच्या असतील तर हा अंगारा आहे. तो तुझ्याजवळ ठेव, याने तिथे तुला काही नुकसान पोहोचवू शकणार नाही." आजी म्हणाली तेव्हा नीरवने ती अंगाऱ्याची पुडी हातात घेतली आणि तिथून निघाला.
नीरव घरी आला तेव्हा वेदिका नुकतीच अंघोळ करून बाहेर आली होती. तिच्या केसातून पाण्याचे ओघळ गालावर उतरत होते. ते बघून नीरव एकटक तिच्याकडे बघू लागला.
वेदिकाला नीरवच्या नजरेतला तो एकटकपणा जाणला. ती थोडीशी लाजली आणि केस मागे सारत म्हणाली,
"काय झालं? असं काय बघताय?" वेदिकाने विचारलं तेव्हा नीरव हळूच तिच्याजवळ गेला. तिच्या गालावरून ओघळणाऱ्या पाण्याचा थेंब आपल्या बोटांनी हलकेच पुसला आणि म्हणाला,
"कधी कधी वाटतं, तू खरंच माझ्यासमोर आहेस का… की हे एखादं सुंदर स्वप्न आहे." नीरवचं बोलणं ऐकून वेदिका हसली, पण त्या हास्यात लाजही मिसळली होती.
"काहीही काय नीरव... हे जर स्वप्न असते तर तुम्ही मला स्पर्श करू शकला असता का?" असं म्हणून ती टॉवेलने केस पुसू लागली. तेव्हा नीरवने हळूच तिचा हात पकडला.
"वेदिका, आज तू माझ्या डोळ्यांसमोर आहेस, पण माझं मन मात्र अजूनही त्या भास आभासात आणि सावल्यांच्या कुशीत अडकलंय… असं काहीतरी आहे, जे मला सतावतंय. त्यात तुझी खूप काळजी वाटते. असं वाटतं की तुला काही दिवस इथून दूर ठेवावं. म्हणजे तुला तरी त्रास होणार नाही." नीरव म्हणाला तसं वेदिकाने त्याचा हात हातात घेतला आणि त्याच्या डोळ्यात पाहू लागली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा