Login

सावल्यांच्या कुशीत. भाग - १४

सावल्यांच्या कुशीत
सावल्यांच्या कुशीत. भाग - १४

"आजिबात नाही नीरव, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, आपल्या सोबत जे काही होत आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी आपण दोघं एकत्र राहू… कायम, माझा विश्वास आहे की आपल्या एकीचं बळ आपल्याला या सगळ्या संकटातून बाहेर काढणार आहे." वेदिका म्हणाली तेव्हा नीरवला तिच्या डोळ्यांत एक वेगळीच शांतता आणि ठामपणा दिसला. त्याला जाणवलं की आता ही लढाई फक्त त्याची राहिलेली नाही… वेदिका, तिचं प्रेम आणि तिचा विश्वास हेही त्याच्यासोबत उभं आहे. तो अभिमानानं तिच्याकडे बघू लागला.

नीरवचं मन क्षणभर शांत झालं. त्याच्या मनात सतत चाललेली घालमेल जणू वेदिकाच्या त्या शब्दांनी शांत झाली. तो हळूच पुढे झाला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले, नंतर तिचा हात आपल्या हातात घेत प्रेमळ नजरेने तिच्या डोळ्यात बघू लागला.

"माझ्या आयुष्यातलं हे अंधाराचं पान फक्त तुझ्या प्रकाशामुळेच मिटेल… वेदिका, तू इतक्या ठामपणे माझ्या सोबत उभं राहतेय याचं मला खुप कौतुक वाटतं. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती तर कदाचित हे सगळं होतंय याचा मलाच दोष दिला असता आणि माहेरी गेली असती. पण तू तसं केलं नाही, तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली आणि आपल्याला जे भास होताय त्याबद्दल तू तुझ्या माहेरी सुद्धा सांगितलं नाही, याचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतं." नीरव म्हणाला तसं वेदिका काही न बोलता हलकं हसली. त्या क्षणी दोघांनीही शब्दांची गरज उरली नव्हती. तिने नीरवच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्याचा सहवास अनुभवू लागली.

"नीरव, तुम्हाला तुमच्या आई बाबांना सांगायचं नाही, मग मी तरी कशाला माझ्या आई बाबांना सांगून त्यांना टेन्शन देऊ. ही लढाई आपली आहे आणि त्यात आपण दोघं एकत्र आहोत, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे." वेदिका हसत म्हणाली.

"हो अगदी बरोबर बोलतेय तू, आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे आणि या लढाईत ही साथ कधीच सुटणार नाही हा माझा शब्द आहे, मग आपल्याला सगळं आयुष्य सावल्यांच्या कुशीत घालवावे लागले तरी चालेल. पण हा हात असाच कायम हातात राहिल." नीरव.

"बरं मला सांगा, तुम्ही जेवलात का? आणि हे काय तुम्ही कुठे गेला होता? मी आरवला विचारलं तर त्याने पण मला काही सांगितले नाही." वेदिकाने विचारलं तसं नीरवने तिच्यावरून नजर फिरवून घेतली.

"आता जाऊन जाऊन कुठे जाणार आहे मी, शेतावर गेलो होतो. जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत जाईल एकदा शाळा चालू झाली की मग नाही वेळ मिळणार शेतात जायला." नीरवने तिला शेतात गेल्याचं सांगितलं पण तो त्या आजोबांकडे गेला होता आणि त्यांनी जे सांगितलं होतं ते त्याने मुद्दामच तिला नाही सांगितले. त्यावर वेदिकाने हलकंसं हसून "बरं…" असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं, पण तिच्या मनात काहीतरी खटकत होतं. नीरवच्या डोळ्यांत ती सहजतेची चमक नव्हती… काहीतरी दडपलेलं होतं.

ती थोडा वेळ शांत बसली, मग न राहवून परत त्याला विचारू लागली.

"नीरव, तुम्ही खरंच शेतावरच गेला होता ना?" वेदिकाने विचारलं तेव्हा नीरवने क्षणभर नजरेचा कटाक्ष टाळला. पण परत बोलू लागला.

"हो ग, अगदी खरं. येताना तुझ्यासाठी आंबे आणि थोडी फुलंही आणली आहेत तिथून." त्याने हसून विषय बदलण्याचा प्रयत्न केला.

वेदिका हसली, पण तिच्या मनात विचारांची साखळी सुरु झाली होती. नीरव काहीतरी लपवत आहे असे तिला वाटत होते पण त्याच्यावर शंका घेऊन आपण चूक तर करत नाही ना असंही तिचं मन तिला सांगत होतं. ती विचारात हरवली त्यावेळी नीरवने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला.

"वेदिका, मला जाम भुक लागली आहे. चल आपण जेवण करून घेऊ, मग तुला काय आणि किती विचार करायचे आहे ते सावकाश करत बसं, आपल्याकडे विचार करायला भरपूर वेळ आहे." नीरवच्या त्या बोलण्यावर ती खळखळून हसली आणि त्याच्या सोबत खाली जायला म्हणून दार उघडले तर त्यावेळी एक जोराची हवा आत आली पण यावेळी दोघेही त्या हवेला जुमानले नाही. दोघांनी एकमेकांचे हात अगदी घट्ट पकडले आणि खाली गेले.

दोघांनी छान गप्पा मारत जेवणं केली. दुपारची वेळ असल्यामुळे घरी त्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. जेवण झाल्यावर वेदिका भांडी वगैरे आवरू लागली आणि नीरव बाहेर अंगणात जाऊन बसला.

आता त्याच्या डोक्यात त्या आजोबांनी जे जे सांगितलं होतं तेच घोळत होते. सरस्वतीचं नेमकं काय झालं असेल आणि एवढ्या वर्षांनी ती आपल्यालाच का वेठिला धरतेय, की ती खरोखरच सरस्वती आहे की अजून दुसरंच कोणी तरी आहे? असे एक ना अनेक प्रश्न नीरवला पडले होते.

"आता काहीही झालं तरी रात्री सगळे झोपल्यावर ती वाड्यामागची खोली उघडायचीच आणि काय खरं आहे ते जाणून घ्यायचं." नीरवने मनातल्या मनातल्या मनात निश्चय केला आणि त्याचवेळी एक हवेची मंद झुळूक त्याला स्पर्श करून गेली. त्या झुळकीच्या स्पर्शात त्याला एक ओळखीचा आणि जवळचा स्पर्श जाणवला. तसा तो ताडकन उठून उभा राहिला.

"हे कसं शक्य आहे, या हवेत मला तिचा स्पर्श कसा जाणवू शकतो.... नाही, आजिबात नाही. ती माझी कोणीच नाही आणि मी सुद्धा तिचा कोणी नाही. मला तिची आठवण यावी असं तिने काहीच ठेवलं नाहीये. मी तिचा विचार नाही करू शकत." नीरव रागाने स्वतःशीच बोलला. पण त्याचवेळी ती हवा परत आली आणि त्या हवे सोबत नीरवही पुढे पुढे चालू लागला. आपण कुठे चाललो आहे हेही त्याला समजत नव्हते. ती हवा जिकडे नेईल तिकडे तो चालत होता.